#तुकोबा नावाचे जीवनविद्यापीठ.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, माझे आवडते संत. कारण त्यांचे अभंग साहित्य अभ्यासक व्यक्तींसाठी मौलिक अध्यासन आहे.
आजकाल अलक, सिक्स वर्ड स्टोरी वगैरे साहित्य प्रकार प्रचलित आहेत.
पण तुकोबांनी त्या काळात अत्यन्त अल्प शब्दात, तेही चार ओळीच्या काव्यातून कित्येक कथा आपल्या गाथेतून सांगितल्या आहेत.
आता हाच श्लोक बघा ना!👇👇
माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥
काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥
शुकें नळिकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥२॥
तुका म्हणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव कांहीं तेथें ॥३॥
माकड मदाऱ्याच्या फशी कां पडतो? तर मोहामुळे. नेमके निसटण्याच्या वेळी फुटाण्यात मन गुंतले आणि कायमचा जेरबंद झाला. माकडावर अन्याय आहे कां, शिकाऱ्याने केलेला? नाही !
"जीव: जीवस्य जीवनम् |"
माकडाच्या जवळ क्षमता होती, तरी हा मोहाचा बळी ठरला! शिकाऱ्याचे जीवन शिकारीवरच असणार, हो की नाही?
तीच गत फिरत्या नळीवर लटकणाऱ्या पोपटाची आहेत. स्वतःच्या पंखाचे बळ विसरून नळीच्या फिरण्याने घाबरून अजून अजून गुलामगिरीत अडकण्याचं खापर शिकाऱ्यावर फोडणे चूकच, नाही कां?
'यह मजबूर है, किंतु आप नही', अशा आशयाची पुढील पंक्ती आहे.......
'तुका म्हणे एक ऐसे पशुजीव ।
न चले उपाव कांहीं तेथें ॥३॥'
मानव हा विचारी, विवेकी असतो, असंच तुकोबांना वाटत असावे.
पोपट आणि माकडाची कथा भरमसाठ शब्दात सांगता येते, सांगितलीही जाते.
पण इथे या अभंगात चार ओळीत, सोप्या शब्दात सांगितली आहेत.
शिवाय तात्पर्य काढायची मुभा वाचकाच्या सदसदविवेकबुद्धीवर सोपवली आहेत. जीवनाच्या ज्या ज्या म्हणून क्षेत्रात असाल तेथे तेथे, हा अभंग, दृष्टांतासारखा योजून द्राष्टांतिक समजून घेता येईल.
आणि जीवनमान सुधरवता येईल.
म्हणून तर संत तुकाराम महाराज, "जगद्गुरु" आहेत.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.