Monday, October 10, 2022

#सहजोक्त.

.


तुकोबांच्या अभंगांचे मनन करताना , 'कसं वागावं?' ह्याचं  अवचित मार्गदर्शन घडते. आपलं वागणं , परत सुधरवण्याची  बुद्धी होते. दुसऱ्यातील न्यून बघण्यापेक्षा आपल्या स्वतःला घडविण्यासाठी हे अभंग अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.

संत तुकाराम महाराज म्हणजे  त्रिकालदर्शी , सर्ववंद्य , जगद्गुरु  आहेत ;  यात शंकाच नाही.  

आता हाच अभंग बघा ना . 

૪९ ) ढालतलवारें गुंतले हे कर ! 

म्हणे मी जुंझार कैसा झुंजो !!१!!

पेटी पडदळे सिले टोप ओझे ! 

हे तो जाले दुजे मरणमूळ !!२!!

बैसविले मला येणें अश्वावरी !

 धावू पळू तरी कैसा आता ? !!३!!

असोनि उपाय म्हणे हे अपाय !

 म्हणे हायहाय काय करू !!४!!

तुका म्हणे हा तो स्वयें परब्रह्म ! 

मूर्ख नेणे वर्म संतचरण !!५!!

 (अभंग क्र. ४३४८)

  स्वतः विषयी भयंकर अभिमान असलेल्या सैनिकाला युद्धावर पाठवण्यासाठी ढाल , तरवार ,  पेटी-पडदळे ,  सिलेटोप वगैरे  घालून घोड्यावर चढवूनही दिले .  त्याला या सर्व साधनांचे ओझे वाटू लागले.  जे जे उपाय सांगितले ते सगळे त्याला अपाय वाटू लागले.   तो सारखा  नाराजी द‍ाखवू लागला  व  तक्रारी करू लागला की ,  "मी झुंजार आहो पण लढूच कसा?" 

  या सैनिकासारखेच ,  जीवनात बरीचशी सुखं मिळाली असूनही आपल्या तक्रारी कमी होत नाहीत.   दुसऱ्याला काय चांगलं मिळालं  न्  आपल्याला काय कमी मिळालंय ,  ह्याच्याच संशोधनात  आपली आपल्या आयुष्यातील सुख उपभोगण्याची क्षमता संपते. 

   तुकाराम  महाराज म्हणतात ,  खरे तर  'आपण परब्रह्म आहोत' ,  ह्याची जाणीव होण्यासाठी सद्गुरुला शरण जायची बुद्धी असावी लागते.  

  जिज्ञासा , समर्पण , विनम्रता , कृतज्ञता  तसेच सातत्य  हे दैवी गुण आहेत.   हे गुण जिथे , ज्याच्यात आढळतील त्या व्यक्तीला उपरोल्लिखित सैनिकासारखा अनुभव येणारच नाही. 

  हा अभंग वाचल्यावर साधारणतः आपल्या अवती भवती अशा प्रवृत्तीचे कोण कोण आढळतात ,  हेच बघण्यात वेळ जातो.  पण जरा स्वतःतच सखोल बघितले तर ? कितेक प्रसंगी आपण असे वागतो ना ?  असं नेमकं केव्हा वागतो  ?  असे परखड निरीक्षण केले तर ?  

 आपलच आयुष्य सुखावह , समाधानकारक होईल  हे निश्चितच . 

  संतसाहित्य वाचण्यापेक्षा वागण्यासाठी आहे, होय ना ?

  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे . 

No comments:

Post a Comment