.
तुकोबांच्या अभंगांचे मनन करताना , 'कसं वागावं?' ह्याचं अवचित मार्गदर्शन घडते. आपलं वागणं , परत सुधरवण्याची बुद्धी होते. दुसऱ्यातील न्यून बघण्यापेक्षा आपल्या स्वतःला घडविण्यासाठी हे अभंग अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.
संत तुकाराम महाराज म्हणजे त्रिकालदर्शी , सर्ववंद्य , जगद्गुरु आहेत ; यात शंकाच नाही.
आता हाच अभंग बघा ना .
૪९ ) ढालतलवारें गुंतले हे कर !
म्हणे मी जुंझार कैसा झुंजो !!१!!
पेटी पडदळे सिले टोप ओझे !
हे तो जाले दुजे मरणमूळ !!२!!
बैसविले मला येणें अश्वावरी !
धावू पळू तरी कैसा आता ? !!३!!
असोनि उपाय म्हणे हे अपाय !
म्हणे हायहाय काय करू !!४!!
तुका म्हणे हा तो स्वयें परब्रह्म !
मूर्ख नेणे वर्म संतचरण !!५!!
(अभंग क्र. ४३४८)
स्वतः विषयी भयंकर अभिमान असलेल्या सैनिकाला युद्धावर पाठवण्यासाठी ढाल , तरवार , पेटी-पडदळे , सिलेटोप वगैरे घालून घोड्यावर चढवूनही दिले . त्याला या सर्व साधनांचे ओझे वाटू लागले. जे जे उपाय सांगितले ते सगळे त्याला अपाय वाटू लागले. तो सारखा नाराजी दाखवू लागला व तक्रारी करू लागला की , "मी झुंजार आहो पण लढूच कसा?"
या सैनिकासारखेच , जीवनात बरीचशी सुखं मिळाली असूनही आपल्या तक्रारी कमी होत नाहीत. दुसऱ्याला काय चांगलं मिळालं न् आपल्याला काय कमी मिळालंय , ह्याच्याच संशोधनात आपली आपल्या आयुष्यातील सुख उपभोगण्याची क्षमता संपते.
तुकाराम महाराज म्हणतात , खरे तर 'आपण परब्रह्म आहोत' , ह्याची जाणीव होण्यासाठी सद्गुरुला शरण जायची बुद्धी असावी लागते.
जिज्ञासा , समर्पण , विनम्रता , कृतज्ञता तसेच सातत्य हे दैवी गुण आहेत. हे गुण जिथे , ज्याच्यात आढळतील त्या व्यक्तीला उपरोल्लिखित सैनिकासारखा अनुभव येणारच नाही.
हा अभंग वाचल्यावर साधारणतः आपल्या अवती भवती अशा प्रवृत्तीचे कोण कोण आढळतात , हेच बघण्यात वेळ जातो. पण जरा स्वतःतच सखोल बघितले तर ? कितेक प्रसंगी आपण असे वागतो ना ? असं नेमकं केव्हा वागतो ? असे परखड निरीक्षण केले तर ?
आपलच आयुष्य सुखावह , समाधानकारक होईल हे निश्चितच .
संतसाहित्य वाचण्यापेक्षा वागण्यासाठी आहे, होय ना ?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे .
No comments:
Post a Comment