Friday, August 5, 2022

#सुभाषित-सहजोक्त.



विद्या ददाति विनयं 

विनयाद् याति पात्रताम् । 

पात्रत्वात् धनमाप्नोति

 धनात् धर्मं ततः सुखम् ॥

 सुभाषिते जितकी वाचत जावीत , तितके त्यांच्या अर्थच्छटा  अधिकाधिक भावतात न्  नकळत मनात घर करतात , पुढे कृतीतही उतरतात . 'जसे मनी तसे वर्तनी'!  म्हणून शालेय क्रमिक पुस्तकांत संस्कृत सुभाषितांचे संग्रह दिले आहेत.

 आता हेच सुभाषित बघू या. 

 शालेय स्तरावर या सुभाषिताचा अर्थ अतिशय सोपा वाटतो. 

 विद्येने विनम्रता मिळते , विनम्रतेने पात्रता लाभते . पात्रतेमुळे धनलाभ होतो. धनलाभामुळे धर्मलाभ व त्यातूनच सुख लाभते.   

   विद्या म्हणजे नुसत्या पदव्या हा अर्थ अपेक्षित नाही. बुद्धिमत्ता वाढविणारे शिक्षण घेणे म्हणजे विद्याभ्यास होय. आज मानसशास्त्राचा भरपूर विकास झाला आहे. आजकाल मानवी बुद्धिमत्ता फक्त  बुद्ध्यांकाने(IQ)  ठरत नाही.  (EQ ) भावनांक , ( SQ ) सामाजिक-संवेदनशीलत्व (AQ ) आपत्ति-समायोजकत्व उत्तरोत्तर महत्त्वाचे असतात. 'मेरीटवीर' म्हणजे उच्च बुद्ध्यांक असलेली मंडळी बरेचदा उत्तम (एंप्लॉई) नोकरदार  होतात . तर EQ, SQ , AQ   उत्तम असलेली मंडळी  उद्योजक , लोकनायक वगैरे होतात.  

   जी ह्यासर्व स्तारांतील बुद्धिमत्ता वाढवते तीच खरी विद्या. अशी विद्या प्राप्त केलेली व्यक्ती नेहमीच विनयी असते.  व्यक्ती विनयी म्हणजे 'फक्त अंगी नम्रता असलेला' , इतका संकुचित अर्थ नाही.  

   यथा “ जितेन्द्रियत्वं विनयस्य कारणं गुणप्रकर्षो विनयादवाप्यते । गुणप्रकर्षेण जनोऽनुरज्यते जनानुरागप्रभवा हि सम्पदः ॥ “ इत्युद्भटः ॥अथ विनयप्रशंसा । “  विद्येमुळे विनम्रता अंगी बाणली की मन-भावना-शरीरावर नियंत्रण करता येते. मन व भावनांवर ताबा मिळाला की सुप्त गुण वाढतात.  गुणांमुळे लोक आकर्षित होतात. लोक प्रभावित झाले की संपत्ती सहज मिळते.  

 अशी विनयशील व्यक्ती "पात्र" ठरते. पात्रतेमुळेच धनलाभ होतो. समाजधारणेसाठी धर्म असतो. धन मिळाले की समाजाच्या भल्यासाठी उपयोगी होते. फक्त स्वतःपुरता किंवा स्वतःच्याच कुटुंबा पुरता  जगणाऱ्याला कधीच आंतरिक समाधान-सौख्य लाभत नाही.  म्हणून कमावलेल्या संपत्तीचा मोठा हिस्सा  परोपकारासाठी खर्चावा. त्यातच खरे सुख असते.  

 हा श्लोक व त्याचा अर्थ समजून-उमजून यथाशक्ती कृतीत आणला तर 'उद्धरेदात्मना आत्मा' नक्कीच साधेल. 

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

2 comments: