Thursday, June 12, 2025

#शब्दचिंतन.

 #कमळ -शब्द चिंतन.


संस्कृत साहित्यात 

कमल ( क =पाणी, अल=सुशोभित करणारे )  

ते दोन प्रकारचे असतात.

सूर्यविकासी (सकाळी उगवणारे )  

तर  चंद्रविकासी  


कुमुद = (कु =पृथ्वी वर , मुद =आनंद देणारे )  हे ही पांढरे असते.

श्वेतकमळ = पुंडरीक (दुसऱ्या फुलांचा गर्व हरण करणारे ) 


कमळ शब्दाचे अनेक पर्यायी शब्द आहेत.


जसे 

अमरकोशानुसार 👇

1 नलिनम् 

२अरविन्दम् 

३ महोत्पलम् 

४ सहस्रपत्रम् 

५ कमलम् 

६ शतपत्रम् 

७ कुशेशयम्

 ८ पङ्केरुहम् 

९ तामरसम् 

१० सारसम् 

११ सरसीरुहम् 

१२ विसप्रसूनम् 

१३ राजीवम् 

१४ पुष्करम् 

१५ अम्भोरुहम् 

१६   पङ्कजम् 


रत्नावली नुसार 👇

१७ अम्भोजम् 

१८ अम्बुजम् 

१९ सरसिजम् 

२० श्रीवासम् 

२१ श्रीपर्णम् 

२२ इन्दिरालयम् 

२३ जलेजातम् 

२४ अब्जम् 

२५कञ्जम् 

२६ नलम् 

२७ नालीकम् 

२८ नालिकम् 

२९ वनजम् 

३० अम्लानम् 

३१ पुटकम् 

३२अब्जः 


याशिवाय अनेक नावे आहेत, जसे 

१ कैरवम्   

 चन्द्रकान्तम् 

३ गर्द्दभम् 

४ कुमुत् 

५ धवलोत्पलम् 

६ कह्लारम् 

७ शीतलकम्

 ८ शशिकान्तम् 

९ इन्दुकमलम् 

१० चन्द्रिकाम्बुजम् 

११ गन्धसोमम् 


वरील शब्द जरी कमल/कुमुद शब्दाचे पर्यायवाची असले तरी त्या प्रत्येक शब्दाला स्वतंत्र अर्थ आहे. फुलाच्या गुणवैशिष्ट्यानुसार ती नावे आहेत.  प्रत्येक नावाची व्युत्पत्ती समजून घेणे, रंजक आहे.

नुसता 

"कमळ"  शब्द म्हटल्या बरोबर साहित्य (सर्वभाषिक ) व्याकरण,

व्युत्पत्तीशास्त्र, वनस्पती शास्त्र, समाजशास्त्र, राजनीती वगैरे अनेक अर्थाने अभ्यासण्याजोगा विषय आहे.


एका मुद्द्यावरून अनेक विषयांना स्पर्श करीत शिकवणे याला बहुआयामी शिक्षण म्हणतात. ही शिक्षण पद्धती सध्या जगातील अव्वल देशात कुठे कुठे प्रचलित आहे.

असा अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाच्या इंटरनॅशनल स्कूल मध्ये होता.

इति कमलाख्यान!

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Thursday, June 5, 2025

#सहजोक्त.


"ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी , भेटीत तृष्टता मोठी ..." 

गाणं कानी पडलं , कुमार गंधर्व नि वाणी जयराम यांचा आवाज , गीतकार  बाळ कोल्हटकर यांनी रचलेले हे गीत पहाडी रागात  संगीतबद्ध केले आहे वसंत देसाई यांनी .  


गाण्यातील शब्दांच्या अर्थच्छटा , एकेक भावना खरी करत हृदयावर रेखाटणाऱ्या ! हे गाणे सर्वच प्रकारच्या ऋणानुबंधावर भाष्य करणारे आहे. मला जसे उलगडले तसे इथे मांडणार आहे.


                   ||ध्रु||

ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी

भेटीत तृष्टता मोठी ||ध्रु||

जनन-मरणाचे चक्र अखंड गतिमान ठेवणारा संसार. 

संसार म्हणजे योग्य रीतीने समोर जाणारा. म्हणजेच त्याला एक सतत्यपूर्ण गती हवी आणि एक ठहराव पण हवा.  ऋणानुबंधामुळे संसार असतो.

 ऋणानुबंध , हा शब्दच मुळात अर्थप्रवाही आहे. जगात जन्माला आल्या पासून तर जग सोडून जाई पर्यंत जे जे बंध , अनुबंध , संबंध  जुळतात ते सारे ऋणानुबंधामुळेच ! रक्ताचे ,  नात्याचे , मैत्रीचे , व्यावसायाचे , ओळखीचे असे सारे सारे संबंध  मुळात ऋणानुबंधानेच होतात बहुधा . काही अनुबंध जुळतात ते फक्त  ऋण चुकविण्यासाठीच !  ऋणानुबंधाच्या गाठी तशा गुंतागुंतीच्याच असतात.  जनन-मरणाच्या अव्याहात चालणाऱ्या या चक्रात नेमकी कोणाची, कोणाशी, कशी, कुठे गाठ पडली ते कळणे शक्य नाही.  ऋणानुबंधाच्या गाठीमुळे  एक जीव दुसऱ्या जीवाशी भेटतो. या भेटीमध्ये तृष्टता असतें.  तृष्टता म्हणजे कठोरपणा , कोरडेपणा , उद्धटपणा , तुटकपणा इत्यादी. 

गाण्याच्या या एका ओळीत किती गहन अर्थ आहे, होय ना? 



                ||1||

त्या कातरवेळा थरथरती कधि अधरी

त्या तिन्हीसांजांच्या आठवणी त्या प्रहरी

कितिदा आलो, गेलो, रमलो

रुसण्यावाचुनि परस्परांच्या 

कधी न घडल्या गोष्टी


कातरवेळ,  अधर, तिन्हीसांज  वगैरे शब्द  वाचले तर शृंगार-रस युक्त काव्य वाटते. पण तसे नाहीय.

तिन्हीसांज म्हणजे सायंकाळ. 

उतारवयातील  असा टप्पा ज्यात कर्तृत्व करून झालेय,  कृतकृत्यता सुद्धा आहे. नवे करण्यासारखे काहीही नाही. शांतपणे मृत्यूची वाट पाहण्याचा हा काळ. हीच ती आयुष्याच्या तिन्हीसांजेची कातर वेळ आहे.  जीवनाच्या या प्रहरात आपल्या ओठातून आठवणीं बाहेर पडतात आणि आपल्याला थरथरवतात.  यातून ऋणानुबंधाच्या गाठी अवचित पडतात.

आपण कितीदा जन्मलो, संसारात रमलो, परत गेलो (मरून गेलो).   विशेष ऋणानुबंधात  परस्परांवर हक्काने 'रुसणे' हाच महत्त्वाचा अनुबंध असतो. 


         ||2||

कधि तिने मनोरम रुसणे

रुसण्यात उगीच ते हसणे

म्हणून ते मनोहर रुसणे

हसणे, रुसणे, रुसणे, हसणे

हसण्यावरती रुसण्यासाठी,

 जन्मजन्मिच्या गाठी. 

हे कडवं  अत्यूत्तम आहे कारण यात 'ती आणि तो' यांच्या ऋणानुबंधाचे खास भाष्य आहे. सात जन्माच्या नात्याचे गूढ यात उकलले आहे.  पहिल्या वाक्यातच बघा ना 

'कधि तिने मनोरम रुसणे'  यात 'तिने रुसणे' हे व्यवहारात नेहमीचेच आहे. पण रुसणे 'मनोरम' असते कां?  मन ज्यात रमते, ते मनोरम. 'ती' रुसली कि आपले सर्व लक्ष 'तिच्या'कडे लागते. कशाने रुसली? काय कारण झाले? कसे समजावू? कसा रुसवा दूर करू? कुठला उपाय असेल? वगैरे वगैरे विचारचक्र सुरु राहते. म्हणजे मन तिच्या त्या आपल्यावरील हक्काने रुसण्यात आणि  तिला समजविण्यात सतत रमते. आपण तिला खुलविण्याचा प्रयत्न करीत असतो आणि ती -'रुसण्यात उगीच ते हसणे'- अशी वागत असते. नव्या नवलाईच्या दिवसात छोट्या छोट्या गोष्टमुळे रुसवे-फुगवे असतातच. 'तिलाही' माहिती असते कि या मुद्द्यावर रुसण्यात अर्थ नसतो, पण 'त्यांचे' लक्ष वेधायाचे असते म्हणून रुसून बसली आहे. 'त्यालाही' माहिती आहे, कि 'ती' उगाच रुसली आहे, आणि आपण व्यर्थ 'तिची' समजूत काढत आहोत. पण तरीही 'तो' मनवतो आहे म्हणून 'तीही' उगाच हसते आहे. "तुम रुठी रहो, मैं मनाता रहू" असे सुरु असते. दोघांचेही मन या प्रकारात एकमेका समोर हरण्यात धन्यता मानत असतें. म्हणून ते रुसणे 'मनोहर' रुसणे असतें. 

एकमेकांवर अशा हसण्याच्या, रुसण्याच्या कारणामुळे ऋणानुबंधाच्या गाठी पक्क्या होतात. आणि त्या चुकविण्यासाठी  'तिला-त्याला'  जन्म घ्यावे लागतात. अशा रीतीने 'ती-तो' साता जन्माच्या गाठीत बांधले जातात. 



        ||3||

कधि जवळ  सुखाने बसलो

दुःखात सुखाला हसलो

कधि गहिवरलो, कधि धुसफुसलो

सागरतीरी आठवणींनी वाळूत मारल्या रेघा,

जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मात जमली ना गट्टी...


 हे  कडवे फक्त युगल किंवा पतिपत्नी यांनाच लागू होत नाही, तर प्रत्येक नात्याला (रक्ताचे, मैत्रीचे, व्यावसायिक किंवा मानलेले, आजकाल आभासी सुद्धा ) लागू होते. 

आयुष्यात कधी सुखाने जवळ बसलो. कधी आपण दु:खात असताना सुखाला हसलो, कधी गहिवरून आलो, कधी धुसफूसलो. कधी निवांत वेळी सागरकिनाऱ्यावर वाळून  रेघोट्या ओढत बसलो. कधी आठवणी काढत बसलो.  

पुढचे वाक्य अत्यन्त आशयघन आहे. "जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मात जमली ना गट्टी"... 

गेल्या जन्मातील अनुबंधाचे ऋण चुकवण्यासाठी नवा जन्म घेतला.  परत परत जन्म घेतला. पण अनुबंध अनुकूल झाले नाही, गट्टी जमली नाही, उलट तृष्टता वाढली. पुन्हा ऋणानुबंध तयार झाले, पुन्हा ते फेडण्यासाठी जन्म घ्यावाच लागला. 

ऋणानुबंधमुळेच आदी शंकराचार्य म्हणतात,

 "पुनरपि जननम् पुनरपि मरणम् |

पुनरपि जननीजठरे शयनम्" ||


अत्यन्त सखोल, अध्यात्मिक चिंतन  अतिशय कमी शब्दात या मराठी भावगीतातून  उलगडले आहे, नाही कां?

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.




Thursday, April 10, 2025

सहजोक्त.

 #शब्दचिंतन.

कधी कधी शब्द कसे बदलतात , हे भाषेचं कोडं उलगडत नाही. कोणता शब्द कधी वर्णविपर्यस्त झाला ? अर्थपरिवर्तन कधी झाले हे कळत नाही. बरेच शब्द परंपरेने रूढ होतात. त्यांचा मूळचा अर्थ जाऊन नवा अर्थ चिकटतो , कधी, कसे , कोणी , हे प्रश्न गौण ठरतात. भाषेची हीच तर खरी गंमत आहे.


माझे आजोबा भा. ह. मुंजे (आईचे वडिल) अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. महाराष्ट्रात अर्थशास्त्राची पुस्तके पहिल्यांदा मराठीतून आणण्याचे व अर्थशास्त्रीय संज्ञांना मराठीत प्रतिशब्द देण्याचे कार्य त्यांनी केले. इंग्रजी ,संस्कृत व मराठी या तीनही भाषांवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. लहानपणी त्यांचा सहवास मिळाला , सर्व नातवंडात एकुलती एक नात म्हणून मी त्यांची अतिशय लाडकी होती , हे माझे परमभाग्य.


आजोबा ,अजूनही स्मरतात . त्यांची किरकोळ शरीरयष्टी ,सुरकुतलेलं अंग , धोतर ,काळी टोपी , एका हातात काठी व दुसरा हात मी पकडलेला ; असे त्यांच्या बहीणीकडे रोज न चुकता जाणारे. दुपारी वामकुक्षी घेण्यापूर्वी आम्हा नातवंडांना रामायण-महाभारतातील गोष्ट सांगणारे. कल्याण , The Truth वाचणारे , तत्कालीन प्राध्यापकवर्ग व विद्वानांना आदरणीय असलेले , तरीही आमच्यासाठी प्रेमळ व साधे असे आजोबा . आम्ही नातवंडेच नाही तर आजुबाजूचे सारेच जण त्यांना भय्यासाहेब म्हणत असू.


आजोबा अतिशय परंपरावादी व जुन्या वळणाचे होते ,हे नक्कीच . . एकदा कौतुकाने ,नव्हाळीचा म्हणून मावशीने माझ्यासाठीे पंजाबीड्रेस शिवला होता. मी घातला . त्यांना अजिबात आवडला नव्हता. हा आपला पोशाख नव्हे ,आपण परकर-पोलकं घालावं , असं ते म्हणाले. कितीही रागावले तरी ते मारत नसत , अपशब्द त्यांच्या तोंडी कधीच नसत.

त्याच काळात "कुर्बानी" सिनेमा व त्यातील "आप जैसा कोई मेरी जिंदगी में अाये...." हे गाणं रेडिअोतून प्रचंड गाजलेलं व प्रसिद्ध झालं होतं . गाण्याची मला आवड न् सगळ्या मैत्रीणी हेच गाणं म्हणणा-या , मग मी पण ते गाणं घरात म्हणू लागली . अाजोबांना ती सुरावट व ते शब्द बिलकुल आवडले नाही. मला समजावणीच्या सुरात म्हणाले , " *बेटा ,देवाने दिलेल्या गळ्यातून देवाची भक्ती होईल असं गायला हवं ग*." माझी बाजू घेत नक्कीच आई-मावशी काहीतरी बोलल्या असाव्यात . त्यावर ते म्हणाले ,"आर्त आळवणी मीरेनेही केली ना ? मग तसा भाव गाण्यातून यावा , उत्तानभाव नको."


जास्तीत जास्त मराठी शब्द योजावे यासाठी ते जागरुक असत. कोणालाही बाहेर जाताना ,"टाटा" म्हटले कि ते हमखास रागवायचे , "जय जय" म्हणावं , असं सांगायचे. *हिंदी-ऊर्दू-इंग्रजी शब्दांची भेसळ न करता ते स्वतः अस्सल मराठी-भाषा बोलत न् आम्हाला अनुकरण करायला संधी देत असत. कधी चुकून किंवा शब्द न आठवल्यामुळे आम्ही मराठी-इतर शब्द वापरला तर , न रागवता मराठी शब्द सांगून वाक्य पूर्ण करून देत असत*. सायंकाळी हातपाय धुतल्यावर " आई , नॅपकीन/टॉवेल दे " असे म्हटले की हमखास "हातपुशा,अंगपुशा दे म्हणावं " , असं शांत-प्रेमळ शब्दात कितीदा तरी त्यांनी सांगितले आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही होतं . ........................मी तिसरीत असताना त्यांना देवाज्ञा झाली . .....ते वारले . एक पर्व संपले.


परवा बोलताना कोणी तरी , "अरे यार!" हे संबोधन योजले , अन् आजोबा आठवले. "यार" हा शब्द वापरायचा नाही ; असा त्यांचा दंडक ! शोले ,जंजीर सिनेमातील गाण्यांमुळे यारी ,दोस्ती हे शब्द मैत्री शब्दाहून भारी वाटायचे. मग आजोबा उगाच रागवतात , त्यांना कळत नाही ,असा बालभ्रम मनात उमटायचा. 


संस्कृतसाहित्य ,शाक्तपंथ बद्दल काहीतरी वाचत असताना , वीज चमकावी तसा एक शब्द अवचित 'समजून' गेला. तो शब्द होता "यार"! अन् आजोबा कां रागवायचे , हे सकारण कळले. 


व्यवहारात भाषा-परिवर्तनामुळे नेहमी र<>ल , व<>ब , य<>ज असे वर्णपरिवर्तन होते. रयी >> लयी (विपुल ,खूप ) , वर्षात >> बरसात , यात्रा>>जत्रा इत्यादी अनेक उदाहरणे आहेत. 

संस्कृतात "जार" हा शब्द आहे. त्या शब्दाला विशिष्ट पंथ ,संप्रदाय ,विधी यांचे कंगोरे आहेत . जार-जारिणी , जारकर्म , असे संज्ञात्मक शब्द आहेत. सोप्या भाषेत 'जार' म्हणजे 'कामेच्छा पूर्ण करणारा साथीदार' ! 

'जार>> यार' असा त्याचा वर्णविपर्याय होतो. 


* *"शास्त्रात् रूढिः बलीयसी!" हे त्रिवार सत्य आहे. मूळ अर्थ अतिशय वेगळ्याच पंथाचे असूनही वापरून वापरून ते पार गुळगुळीत होतात न् कुठेच टोचत नाहीत , हेही भाषेचे वैशिष्ट्यच समजावे*!! . मूळ अर्थ सभ्यतेला धरून नाही , हे माहीत असूनही

बरेचदा बोली भाषेत , दैनिक संवादात असे अनेक शब्द कोणीही वापरतात . छोटीशी यादी वानगी म्हणून देत आहे. रांड ,रांडलेक ,साल्या , चायला ,आयला , हरामजादा , हरामखोर ,भडवा इत्यादी इत्यादी .


*पण "यार" , या शब्दाने कधी , केव्हा , कशी मूळ अर्थाशी प्रतारणा केली व "सभ्यपणे" स्वतःला चांगल्या अर्थाने प्रतिष्ठित केले , हे शोधणे एक भन्नाट भाषिक-उपक्रम ठरेल* !! 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, April 5, 2025

सहजोक्त

 #रामनवमीच्या शुभेच्छा.

शेकडो वर्षांच्या प्रतीक्षे नंतर श्रीरामलला आज स्वतःच्या घरी, जन्मदिनोत्सव साजरा करतोय.

आयुष्यात 'राम' गवसणे, यातच राम आहे. नाही तर आयुष्य जागूनही  'राम नाम सत'  ठरलेच आहे.

मैथिली ठाकूर च्या आवाजात ऐकलेले एक रामभजन मला आवडते.

त्या भजनाचे शब्द असे 👇👇


राम को देख कर श्री जनक नंदिनी,

बाग में जा खड़ी की खड़ी रह गयी,

राम देखे सिया माँ सिया राम को,

चारो अँखिआ लड़ी की लड़ी रह गयी….


थे जनकपुर गये देखने के लिए,

सारी सखियाँ झरोकान से झाँकन लगी,

देखते ही नजर मिल गयी दोनों की,

जो जहाँ थी खड़ी की खड़ी रह गयी….


बोली है एक सखी राम को देखकर,

रच दिए है विधाता ने जोड़ी सुघर,

पर धनुष कैसे तोड़ेंगे वारे कुंवर,

सब में शंका बनी की बनी रह गयी….


बोली दूजी सखी छोटन देखन में है,

पर चमत्कार इनका नहीं जानती,

एक ही बाण में ताड़िका राक्षसी,

उठ सकी ना पड़ी की पड़ी रह गयी….




 मैथिली बोली असावी ही बहुधा. काव्य रचियता कोण ते कळले नाही.

पण गाण्याचे भाव किती तरल आहेत ना?

मर्यादापुरुषोत्तम रामाचे वर्णन करताना आजचेही कवी मर्यादा सोडत नाहीत, हीच ती संस्कृतीची सखोल रुजवण होय.

गुरु सह जनकराजाच्या राजवाड्यात स्वयंवरासाठी गेलेल्या रामाला अचानक बघून सीतेची व अर्थात रामाचीही प्रतिक्रिया अलवार रंगवली आहे.

दोघेही नवतरुण. दोघेही विवाहयोग्य. दोघांही पहिल्या नजरेतच कळले की, 'आपण एकमेकांसाठी सुयोग्य आहोत'.

सीतेच्या सख्या सुद्धा तितक्याच अल्लड आहेत. त्या सुद्धा खिडकीतून वाकून वाकून सीतेच्या रामाला बघत आहेत. तिच्या मैत्रिणी 

तिची काळजी घेणाऱ्या आहेत. या दोघांची जोडी छानच दिसते असे त्या मैत्रिणींना वाटते. पण राम सुकुमार आहे. कसे बरं धनुष्य तोडतील? ही शंका. दुसरी सखी लगेच रामाचा पराक्रम सांगते आणि सीतेला संभ्रमित होण्यापासून वाचवते. 

या पूर्ण काव्यात त्या बोलीभाषेचा ठसका आणि गोडवा जसा मनाला भावतो तसेंच कुलीन मर्यादशील वागणारे नवतरुण युगल सुद्धा मनाचा ठाव घेतात. हे कडवं तर अतिशय उत्तम आहे.


राम को देख कर श्री जनक नंदिनी,

बाग में जा खड़ी की खड़ी रह गयी,

राम देखे सिया माँ सिया राम को,

चारो अँखिआ लड़ी की लड़ी रह गयी….

रामाला बघून सीतामाता बागेत जिथं उभी होती तिथेच खिळून उभी राहिली. इतकुसा प्रसंग अत्यल्प शब्दात, डोळ्यासमोर उभा करण्यात कवी यशस्वी झालाय.

मैथिली ठाकुरचा आवाजही गाण्याला वेगळ्या उंचीवर नेतो, यात शंका नाही.

युट्युब वर हे गाणं नक्की ऐका.

सर्वाना रामनवमीच्या शुभेच्छा 

🙏🙏🙏🙏

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, March 29, 2025

#सहजोक्त.

#एक श्लोकी साहित्य. 

 उद्या गुढीपडावा. उद्यापासून श्रीरामाचे नवरात्र  सुरु होते. तसेच देवीचेही नवरात्र सुरु होते. चैत्र-महिन्यातील प्रतिपदे(गुढी पाडवा)  पासून ते पौर्णिमा (हनुमान जयंती) पर्यंतचा काळ हा जागृत उपासनेचा काळ आहे.  या काळात  रामरक्षा-स्तोत्र सिद्ध करतात. तसेच देवी सप्तशती, श्रीसूक्त आदिचे पारायण केल्या जाते. खूप जास्त वेळ पारायण करण्यात जातो म्हणून उपासनाच न करणारे अनेक आहेत.  
'फुल ना फुलाची पाकळी' तरी उपासना करावी. 
पण "वेळ नाही" असे वाटणाऱ्यांसाठी सुद्धा आपल्या संस्कृतीत उपासेनासाठी उत्तम पर्याय आहे. 
संपूर्ण रामायण,  सुंदरकांड, देवी-सप्तशती आदींचे सार एका श्लोकात लिहिलेले आढळते.  हा एक श्लोक पाठ करून म्हटला तरी संपूर्ण ग्रंथ, स्तोत्र म्हटल्याचे समाधान लाभते. एक श्लोक म्हणायला एका मिनिटाहून कमीच वेळ लागतो.   
तर यंदाच्या चैत्र-पर्वात किमान *एक-श्लोकी* उपासना करू या कां? 
(1) एक श्लोकी रामायण
आदौ रामतपोवनादि गमनं, 
हत्वा मृगं कांचनम्।
वैदेहीहरणं जटायुमरणं, 
सुग्रीवसंभाषणम् ।।
बालीनिग्रहणं समुद्रतरणं,
 लंकापुरीदाहनम्।
पश्चाद् रावण कुम्भकर्ण हननम, 
एतद्धि रामायणम्।।
या श्लोकात रामायणातील सर्वच महत्त्वपूर्ण घटना आल्या आहेत. हा श्लोक शार्दूलविक्रीडीत
वृत्तात आहे.
(म्हणजे मंगलाष्टके रचतात ती चाल किंवा "या कुंदेदुतुषारहार धवला" ची चाल.)  
गमन, संभाषण, निग्रहण, तरण, दाहन, हनन, अयन  इत्यादी शब्द 'कृदंत' आहेत.   अशा शब्दांनी  अनुप्रास, यमक आदी साधले आहेच.  यामुळे श्लोक अधिक रंजक झाला तसेच  वाक्य रचना सुटसुटीत आणि सारगर्भ झाली.  
(2) एक-श्लोकि-सुन्दरकाण्ड.
यस्य श्रीहनुमाननुग्रहबला
-त्तीर्णाम्बुधिर्लीलया 
लङ्कां प्राप्य निशाम्य रामदयितां 
भङ्क्त्वा वनं राक्षसान्। 
अक्षादीन् विनिहत्य वीक्ष्य दशकं 
दग्ध्वा पुरीं तां पुनः 
तीर्णाब्धिः कपिभिर्युतो यमनमत् 
तं रामचन्द्रं भजे।।
रामायणात सात कांडे आहेत.
बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, लंकाकांड आणि उत्तरकांड.  यातील सुंदर कांडाचे सार,  वर दिलेल्या एका श्लोकात  आहे. हाही श्लोक शार्दूलविक्रीडीत  वृत्तात आहे. 


(3) एक-श्लोकी देवी सप्तशती.

या ह्यम्बा मधुकैटभप्रमथिनी 

या माहिषोन्मूलिनी 

या धूम्रेक्षणचण्डमुण्डमथिनी 

या रक्तबीजाशिनी। 

शक्तिः शुम्भनिशुम्भदैत्यदलिनी 

या सिद्धिलक्ष्मीः परा

 सा दुर्गा नवकोटिविश्वसहिता

मां पातु विश्वेश्वरी।।

चैत्री-नवरात्रात शारदीय नवरात्रा इतका गवगवा नसतो.  पण हेही नवरात्र मोठेच असतें.  दुर्गा सप्तशती, श्रीसूक्त आदीची पारायणे करतात. पण तेच की वेळ, बैठक करण्याची सवय, तसेच इच्छा या सर्वांच्या अभावाने  दिवसोंदिवस   शक्तिउपासना कमी होते आहे. 

वरील एका श्लोकात  शक्तीचा महिमा वर्णीला आहे.  या नवरात्रात हा श्लोक रोज सकाळ संध्याकाळी म्हणू या.


या शिवाय 

महाभारत, भागवत,  विष्णुसहस्रनाम, नवग्रहस्तोत्र  आदी सर्वांचे एक-श्लोकी सारांश उपलब्ध आहे. 


(4) एक-श्लोकी- महाभारत.

आदौ पाण्डवधार्तराष्ट्रजननं

 लाक्षागृहे दाहनं

 द्यूते श्रीहरणं वने विहरणं 

मत्स्यालये वर्तनम्।

 लीलागोग्रहणं रणे विहरणं

 सन्धिक्रियाजृम्भणं 

पश्चाद्भीष्मसुयोधनादिनिधनं 

ह्येतन्महाभारतम् ।।


(5)एक-श्लोकी-भागवत.

आदौ देवकी देव गर्भजननं,

गोपी गृहे वर्धनं |

माया पूतना जीव ताप हरणं

 गोवर्धनोद्धारणं।

 कंसच्छेदनं कौरवादिहननं,

कुंतीसुता पालनम् |

एतद्भागवतं पुराणकथितं, 

श्रीकृष्णलीलामृतम्||


(6) एक-श्लोकी-विष्णु सहस्रनाम.

नमो स्तवन अनंताय सहस्त्रमूर्तये, सहस्त्रपादाक्षिशिरोरुबाहवे। 

सहस्त्र नाम्ने पुरुषाय शाश्वते, 

सहस्त्रकोटि युगधारिणे नम:।। 


(7) एक-श्लोकी-नवग्रह-स्तोत्र

आरोग्यं प्रददातु नो दिनकरः

 चन्द्रो यशो निर्मलं 

भूतिं भूमिसुतः सुधांशुतनयः

 प्रज्ञां गुरुर्गौरवम्।

काव्यः कोमलवाग्विलासमतुलां

 मन्दो मुदं सर्वदा 

राहुर्बाहुबलं विरोधशमनं 

केतुः कुलस्योन्नतिम् ॥

इत्येकश्लोकी नवग्रहस्तोत्रं समाप्तम् ।


हे सर्व श्लोक आपल्याला ते ते मूळ धार्मिक साहित्य समजावून तर देतच आहेत. शिवाय 

कमी वेळात आपल्या धार्मिक ग्रंथाची पर्यायाने आपल्या प्राचीन वारश्याची ओळख टिकवून ठेवतात.

या श्लोकां च्या स्पष्टीकरणा साठी रामायण-महाभारत, देविपुराण, भागवत आदितील  अनेक कथा रंगवून सांगता येतील. 

या श्लोकां च्या रचना बघितल्या तर अल्प शब्दातून सारांश कसा लिहावा याचा वास्तुपाठ दिसतो. तसेच श्लोक स्पष्टीकरण करता करता त्या विषयक लघुनिबंध नक्कीच रचला जातो.

इतकेच नाही तर वृत्त, अलंकार याचीही माहिती होईल. शिवाय नवनवीन शब्दसंग्रह वाढेल.

आपली भारतीय ज्ञान परंपरा खरोखर महान आहे, नाही कां?

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर.




Saturday, February 8, 2025

#सहजोक्त

 #शब्दचिंतन-अलग 

भाषेचीही गंमत असते. एखादा शब्द कानी पडला की "तो अमुक अमुक भाषेचाच आहे, मग आपल्या भाषेत तो वापरता कामा नये" , असे अस्मितेचे फतवे निघू लागतात. शब्दाचे मूळ विचारात घेतल्याच जात नाही. असो.


'अलग' शब्द हिंदीच आहे, असे अनेकांना वाटते. कारण बॉलिवूड गाण्यात असतो हा शब्द. आमच्या नागपुरी बोलीत 'अल्लग' म्हणतात. पण हा शब्द खरोखर 'हिंदी' आहे कां? 

 विलग, लग्न, संलग्न, लागणे, लगडणे इत्यादी शब्द मराठीत आहेत, होय ना? 

मराठीत जे जे शब्द आहेत, त्यातील कित्तेक शब्द तत्सम (संस्कृत मधून जसेच्या तसे घेतलेले ),  तद्भव (संस्कृत मधून घेताना जरा बदल केलेले ) असतात.  

आता याच शब्दांचे बघा.  संस्कृत "लग्" धातू, पहिला गण, परस्मैपद.  असा हा मूळधातू.  त्याचे, चिकटणे , जुळणे, संग असणे इत्यादी अर्थ होतात.

 आता या धातूपासून  कृदंत, क्रियापदे तयार होतात. जसे 

लग्न >>जुळणार आलेले.

संलग्न >> सम्यक रित्या जुळलेले.

विलग >> वेगळे झालेले.

अलग >> न जुळलेले.

लागणे >> वाक्य =झाडाला फुले लागली. 

( इथे लागणे म्हणजे, फांदीला जुळली, उगवून चिकटली , असे अर्थ होतात.) 

लगडणे >> खूप प्रमाणात लागणे, असा अर्थ होतो. 


मग, अलग शब्द मराठीत चालणार नाही कां? 

तत्सम शब्द मराठीत योजला तर बिघडले कुठे? 


तत्सम शब्दांना मराठीपासून विलग न करता, मराठी वाक्यात संलग्न करून घ्यावे. मराठीला अलग करू नये. तत्सम शब्द लागले तर हरकत काय? भाषेत तत्सम शब्द लगडू द्या की? नाही कां?

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर.

Thursday, January 30, 2025

सहजोक्त

 ३१.१.२०१७ ©डॉ.प्रज्ञा देशपांडे


.भाषा (भाष्, बोलणे )पासून "जी बोलल्या जाते ती भाषा"  या अर्थाने हा शब्द आहे.

 अन् खरे तर  "भाषा" शब्दाची हीच मूळ व्याख्या आहे , तसेच बोलणे ,संवाद साधणे हेच तिचे मूळ उद्दिष्ट आहे.


बोली, उपभाषा, प्रमाणभाषा, शुद्धभाषा,  मिश्रभाषा, प्राचीनभाषा, आधुनिकभाषा, ज्ञानभाषा इत्यादि प्रकार हा म्हणजे शब्दविलास होय.


अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा , तसेच कामक्रोधहर्षादि मूळभावनांच्या पूर्ततेसाठीच भाषेचा उपयोग असतो.

अस्मिता-साहित्य-संस्कृती इत्यादि म्हणजे फ़ुटलेले घुमारे आहेत. ते चूकीचे आहेत , असे अजिबात नाही .

पण  "खाली पेट भजन न भाये गोपाला"     हे त्रिकालाबाधित त्रिवार सत्य आहे.


भाषेचा उगम केव्हा झाला?

प्राचीनतम भाषा कोणती?

कोण्या भाषेतून कोणती भाषा जन्मली?

सर्वाधिक बोलली जाणारी भाषा?

मूलनिवासी भाषा कोणती??

श्रेष्ठ  भाषा कोणती??

आजची मृतभाषा कोणती?

जागतिकभाषा कोणती??

अशा प्रश्नमालिका सोडविण्याचा या लेखाचा उद्देश नाही आणि ह्या '"अनादि-अखंड-अनंत" प्रश्नमालिका सोडविण्या इतपत दांडगी माझी प्रज्ञा नाही नि भाषिकव्यासंग ही नाही!! असो.


एक सामान्य व्यक्ती म्हणून  "भाषा" विषयाबाबत  माझे विचार व्यक्त करीत आहे. 


 कोणतीही भाषा १००% नवी नाही नि १००% जुनी ही नाही. 

 आई ज्याप्रमाणे अपत्याला जन्म देते त्या प्रमाणे कोणी एक भाषा कोण्या एका भाषेला जन्म देत नाही.

   भाषा  ही भूगोल-समाज-कालसापेक्ष असते.


  प्रत्येक व्यक्ती तीच  भाषा वेगळी-वैशिष्ट्यपूर्ण बोलत असते. 

भाषेचे मूळ, शब्द आहेत तर शब्दांचे मूळ ध्वनि म्हणजे नाद होय.

  " मुख" हेच नाद प्रगटीकरणाचे मूळ साधन आहे.

 जगात जितके लोक आहेत त्या सगळ्यांची मुखरचना भिन्न व वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे उच्चारणशैली प्रत्येकाची भिन्न असते.


   साध्या 'अ' चे उदाहरण बघू. कोमल-मध्यम-तीव्र ,लघु-गुरु-प्लूत, सानुनासिक-अननुनासिक याप्रकारे अठरा भेद होतात. त्यात व्यक्तिवैशिष्ट्याने अगणित उच्चार तयार होतात.


   इथेच "भाषा-अंतर" व्हायला खरी सुरवात होते. म्हणून तर म्हणतात , "नवा वाणी मुखे मुखे"!

  भाषिकभेदाची सुरवात इथेच होते. 


  उदाहरणार्थ त्रयोदशी>तेरस>तेरा 

  अक्षय्य>अख्खय>आखजी>आख्खा

  आषाढी>आखाडी

  यमुना> जमना

  बर मग ठिक आहे> बर्मगठिका

  देवयानी>देबजानी

  इंद्रवर>इंदिवर

  अमरेंद्र>अमरिंदर

  लुप्त हंसा> लुप्तांझा

  ओनामा >ओम् नम: 

  ओनामासिधम> ओम् नमो सिद्धम् 

  अशाप्रकारे उच्चारण भेद हे भाषा-विभाषेचे मूळ कारण असावे, असे वाटते.


  मानवीवंशापासूनच भाषेचा जन्म झाला असावा. वर सांगितल्या प्रमाणे भाषांतर होता होता अनेक भाषा तयार झाल्या असाव्यत. त्यामुळे कोणत्या भाषेतून कोणता शब्द आला हे ठरवणे कष्टसाध्यच आहे. शिवाय शक्याशक्यते नुसार या भाषेतील शब्द त्या भाषेत जाऊन परत या भाषेत येऊ शकतोच ना.  तसेच या दोन्ही भाषेतून तिसऱ्या भाषेत या सर्व शब्दांसह तिचा स्वतंत्र शब्द असू शकतोच ना.


उदाहरणार्थ  पक्षी (संस्कृत) > पख्खी(पाली) >पक्षी ,पाखरू (मराठी)


  [पालीपासून संस्कृत झाली की संस्कृतपासून पाली , मराठी आधी का या भाषा , या वादात पडाण्यासाठी ही उदाहरणे दिली नसून मला याच भाषा ज्ञात आहेत. इतर भाषांचा अभ्यास  नाही .म्हणून याच भाषांची उदाहरणे मी देते.] 


  पूर्वी दळणवळण साधने तितकी उपलब्ध नव्हती. शिवाय तंत्रज्ञानही प्रगत नव्हते. त्यामुळे एकच भाषा वा मर्यादित बोली यांच्याद्वारे व्यवहार होत होते. देवाण-घेवाण क्वचितच होत असे.


आज सगळीच वर्दळ वाढलीय . त्यामुळे मानवांप्रमाणे भाषांचाही प्रवास-प्रगती वाढतेय यात शंका नाही.

 मग शब्द-शैली-ढब-तंत्र यांची देवाण-घेवाण होणे अपरिहार्य आहेच.


मानवीसमूहाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे "अहंपण"!  मी-माझे-मम यातूनच ममत्व निर्माण होते. त्यातून भाषाही सुटत नाही.

पण कधी कधी मानवी प्रवृत्तीपेक्षाही शब्दांची विष्णुवृत्ती- (हा धार्मिक शब्द नाही ,शिरण्याची प्रवृत्ती)- अधिक तीव्र असते. 

त्यामुळे कोणत्याही भाषेतील शब्द कुठल्या भाषेतील शब्दांशी साम्य बाळगतील हे सांगता येत नाही.

 उदाहरणार्थ निअर (जवळ या अर्थाने) इंग्रजी भाषेतील शब्द त्याच अर्थाने पण उच्चार वेगळा 'निअरे' राजस्थानीत आढळतो. 

असे अनेक उदाहरणं कोसो दूरच्या भाषांमध्ये सापडतात. 

कोणी कोणाचा शब्द घेतला यावर वाद करण्यापेक्षा भाषा शब्दसमृद्ध झाली हा परिणाम मोठा नाही कां? 

मी माझ्या भाषेत परके शब्द घेणार नाहीच हा दुरभिमान आहे तसेच अधिकाधिक परकेच शब्द योजेन हा ही कणा नसल्याचा पुरावा आहे. इथे विवेक हवा. माझ्या मूळ भाषिक- अस्तित्वाला धोका न आणता ,भाषिकप्रवृत्तीला जपत जपतच मी शब्द स्वीकारेन  असा दृष्टिकोण असावा. 

तसेच माझ्या भाषेतील याच अर्थाचे सर्व शब्द त्याच्या इतर अर्थच्छटांसह जपत नव्या शब्दाची भर घालण्यात कमीपणा वाटू नये.

गरज भासल्यास कोणत्याही भाषेतून शब्द आयात करावे . तसेच आपल्या भाषेतील शब्द सहज दुसऱ्या भाषेत पेरावे. शेवटी भाषा ही बोलण्यासाठी (टचटच नाही) हे मूळ उद्दिष्ट कोणीच विसरू नये. 

जगा -जगवा -जगू द्या. 

तद्वत  बोला- बोलू द्या-बोलवा.

(सर्वा मुखी मंगल बोलवावे मधिल बोलवा... ) हेच सूत्र महत्त्वाचे.


©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Wednesday, January 15, 2025

#विसरसीमेच्या स्मरणकुपीतून......

 

2) अंभोरा 

  आयुष्यात घडलेले प्रसंग, भेटलेल्या व्यक्ती, अनुभवलेल्या घटना या स्मृतीतून कधीच जात नाहीत. फक्त कालौघात त्यावर धूळ बसते, इतकेच. पण काही कारणाने ती धूळ झटकल्या गेली,

की मूळ स्मृती जशीच्या तशी समोर येते.


अंभोऱ्याला आमचे लक्ष्मीनारायणाचे प्राचीन मंदिर (250+वर्षे जुने ) असल्यामुळे घरातील मंडळी आम्हाला घेऊन जायची तिथे. अंभोऱ्याला आमच्या देवळाजवळ,  गावाच्या शेवटच्या टोकाला, नदीकाठी पण टेकाडावर असं चार तसम्याचे आमचे घर होते. मी बघितले तेव्हा ते जीर्ण, आणि खचलेले होते. पण त्या घरात राहणारे राजुकाका मुंजे आणि  मुंजेआजी  नेहमीच ते घर नीटनेटके ठेवायचे. आंगणत सकाळी सडासारवण, तुळशी भोवती रांगोळी, ओसरी, माजघर, स्वयंपाक घर सारवून स्वच्छ ठेवलेले असे. 

मुंजे आजी माध्यम बांध्याच्या, सावळ्या आणि अतिशय शिस्तप्रिय, कडक, अत्यंत कष्टिक होत्या. 1967पासून  मुंजे आजी (श्रीमती वत्सला अंबादास मुंजे ) , आजोबा छोट्या राजुकाका सह  इतक्या खेडेगावात आमच्या मंदिराचे पुजारी आणि व्यवस्थापक म्हणून राहत होते .  अंबादास आजोबांच्या मृत्यु नंतर  आजीने अतिशय शिस्तीत राजुकाकाचे  पौरोहित्य शिक्षण नागपुरातील अंबादासपांडे गुरुजी यांचेकडून करुन घेतले. आजही राजुकाका 'गुरुजी' म्हणून पंचक्रोशीत चांगले नाव कमावून आहे.

माझ्या आईचे माहेर म्हणजे मुंजे. पण मुंजे आजी आणि आईकडील मुंजे घराणे यांच्यात आडनावशिवाय काहीच सबंध नाही. 

परंतु मोठीआई (आईची आई =श्रीमती रत्नप्रभा भास्करराव मुंजे )  मुंजे आजीला बहीण आणि राजुकाकाला पुत्रवत समजत होती.  गंगा दशहरा म्हणून दहा दिवस आजीचा मुक्काम अंभोऱ्यात असे. एकदोनदा अस्मादिकांचाही मुक्काम आजी सोबत म्हणून अंभोऱ्यात झालाय लहानपणी. 

तेव्हा खेड्यात बराच वेळा लाईन नसायची. घरात झिरोचे किंवा कमी व्होल्टचे पिवळे लाईट असायचे. शक्यतो सर्व कामे दिवसा, उजेडी करायचे. पाखरे निजली की आपणही निजून जायचे. 

मोठी आई पोथ्या पुराण वाचायची. वाती वळत बसायची. भाज्या निवडून ठेवायची. मुंजे आजी त्यांचे दैनिक कामे नेटाने करायच्या. राजुकाका देऊळ स्वच्छ करून देवाची पूजाअर्चा करून परिसरातील यजमानाकडे पूजेला निघून जायचा.  

माझ्या बरोबरीचे सोडा, बोलायलाही कोणी नसायचे.  मग मुंजे आजी मला फुले तोडून आण, फुलांचे हार कर अशी कामे सांगायच्या. त्या नदीवर गेल्या की मलाही घेऊन जायच्या. नदीवर कपडे कसे धुवायचे, हे प्रात्यक्षिकासह मला शिकवले त्यांनी.  नदीत भोंवरे कुठेय? उथळ पाणी कुठेय? शेवाळलेले खडक कुठेय? हे सर्व त्या आजी पाण्यात कपडे धूता धूता सांगायच्या.   

अंभोऱ्यात माझा मुक्काम बराच वेळ  नदीच्या पाण्यात किंवा आमच्या देवळाच्या सभामंडपात असायचा. मनसोक्त गाणे जोर जोरात म्हणायचे.  एकटीनेच भेंडया खेळायच्या.  नदीच्या काठी बसून दगड नदीत भिरकवायचे, किती तरंग निघाले, ते मोजायचे. वाळूतून शिंपले, शंख गोळा करायचे. मोठ्या शिंपल्याला दगडावर घासून  बटाटे-सोलणी तयार करायचे. मध्यम आकाराचे शिंपले, तिखट-मिठाच्या पाळ्यात चमचा म्हणून वापरायला गोळा करायचे. उगवत्या सूर्याची, पाण्याला सोनझळाळी  देत पसरणारी किरणे बघायची , तसेच वाळूत देऊळ, घर वगैरे तयार करायचे. आकाशातून  उडणारे, आकार बदलणारे  थवे बघत शांतपणे घंटोंशी बसून राहायचे. हवेचा आवाज ऐकायचा.  वेगवेगळ्या झाडांच्या पानांच्या सळसळीचे आवाज वेगवेगळे असतात, ते नीट ऐकायचे.  विविध पक्षी बघायचे. शिवाय सकाळ संध्याकाळी देवळात  स्तोत्र, अभंग म्हणायचे. ना कुठली चिंता, ना घाई, ना काळजी! इतकी फुरसत पुन्हा  कधी मिळालीच नाही.

कोणतेही साधने, वस्तु, खेळणे यांच्या शिवाय स्वतःच स्वतःची करमणूक करून घेण्याची कला, या काळात साधून गेली. कोरोना काळात याचा खूप उपयोग झाला. 

तेव्हा अंभोरा इतकं छोटं खेडे होते की जीवनावश्यक वस्तु आणायलाही कुही पर्यंत जावे लागे. आठवडी बाजार सुद्धा मेंढ्याला (मेंढा नावाचे गाव ) भरायचा. त्यामुळे वस्तु, पदार्थ अत्यन्त काटकसरीने वापराचे प्रशिक्षण आजीच्याच हाताखाली मिळाले.  

नकळत जीवनोपयोगी किती तरी गोष्टी या काळात सहज समजल्या. आज मागे वळून बघताना जाणवते की, अतिशय समृद्ध आणि विविधतापूर्ण बालपण जगायला मिळाले.  

इतकी छान मंडळी छोट्या कालावधीसाठी कां असेना, आयुष्यात आली, यासाठी देवाचे मानावे तितके आभार कमीच आहे.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर.