Saturday, September 26, 2020

#सहजोक्त.

 #आई अंबे तू झोपी नको जाऊ .....

कवी कविता करतात , ते अंतःप्रेरणेने. ती अंतःप्रेरणा बहुतेकदा त्यांच्या भावविश्वातील व्यक्ति-वस्तु-प्रसंग वगैरे असते. एकदा कां त्यांच्या इप्सिताची प्राप्ती वा पूर्ती झाली की कवींची काव्य-झरणी लुप्त होते. संतांचे अंतःकरण ईशप्रेरणेने भारलेले असते.  कविता करावी ,  या हेतूने त्यांच्या रचना नसल्यामुळे काव्य-निर्झर अखंड वाहता असतो म्हणून त्यांचे वाङ्मय "अभंग" ठरते. शब्दसंग्रह करून , यमकादी अलंकार जोडून काव्य करण्याकडे कवींचा कल असतो . हेच संतांच्या रचना चिरंतनातून आल्यामुळे  शब्द , अलंकार , वृत्त-छंद वगैरे , त्यांच्या रचनेत  उत्स्फूर्त येतात.  सहज बोली भाषेतील शब्द रचणे , सोपी रचना करणे ही तर संतांच्या रचनेची विशेषताच असते. समजायला सोपी पण आचरायला कष्टसाध्य रचना संतांची असते.


आता हीच रचना बघा ना  - 


माझी पतिताची पापकृती खोटी 

तुझी पावन करण्याची शक्ती मोठी समजवता मी काय समजावून 

उठ अंबे तू झोपी नको जाऊ ॥१॥

जरी गेलीस तू माय बाई झोपी 

तरी बुडतिल भवसागरात पापी

ब्रह्मज्ञानीही लागतील वाहू ॥२॥

काम क्रोधादिक चोरटे गृहात 

शिरुनी पडले ते दृष्ट आग्रहात 

लुटू म्हणती हणू , मारू जीव घेऊ॥३॥ 

काळसर्प मुख वासुनी उशाला

टपत बसला तो, भिईना कशाला कितीतरी या निर्वाणी तुला वाहू ॥૪॥

कृपा सोडूनि निजलीस यथासांग उपेक्षीसी मज काय अता सांग 

कृपावंते निष्ठूर  नको होऊ ॥५॥

तुझ्याविण मी कोणाशी हात जोडू

 आई म्हणुनी, कोणाचा पदर ओढू

  तुझे पाय सोडुनि कुठे जाऊ ॥६॥

  जगी त्राता तुजविण कोणी नाही 

  माझी कोणी कळवळ जाणी नाही

  तूच जननी तू जनक बहिण भाऊ ॥७॥

    नको सांड करू माझ्या जीवाची

     तुला एकविरे आण भार्गवाची 

     नको सहसा जगदंबे अंत पाहू ॥८॥

      जरी माझी ना करिसी तू उपेक्षा 

      तरी वाढेल तुझे नाव याहीपेक्षा विष्णुदास म्हणे गुण तुझे गाऊ ॥९॥

      

विष्णुदासांचे रेणुकेशी आईचे नाते आहे. अवखळ वयातील मुले कमीच झोपतात.  आई  संसाराची सगळी कामे करून दमते , तिला झोप येते. आई झोपली की लेकरांना करमत नाही , आई तू उठ ना म्हणून मागे लागतात. ह्याच मूळभावाने  ही रचना झाली आहे. प्रत्येकच कडवे इतके लडिवाळ पण गभीर (आशयघन व सखोल) आहे की ज्याचे नाव ते !  


 आईपणाचा स्नेह व क्षमेचा पदर  इतका मोठा  असतो की मातृवत्सल बाळे  आडवळणाला जायला धजावतच नाही. वात्सल्याची हीच खरी कसोटी असते की  स्नेहानी बालकाचे अपराध लीलया संपून जातात. "मुलाचे कल्याण व्हावे" ही तीव्र इच्छा व कृती कायमच असते. शिवाय निखळ वात्सल्यामुळे बालकाच्या 'पापराशी' सहज वितळून जातात. जसा उजेड जास्त होत गेला की अंधार संपवावा लागत नाही , तो आपोआप संपतो.  म्हणूनच कवी विष्णुदास म्हणतात माझ्या सारख्या पतिताच्या पापराशींहूनही  , तुझी  पावन करण्याची क्षमता अतिशय जास्त आहे.   


"आई" केवळ शरीर-प्रक्रियेने घडत नाही तर मन-भावनांनी घडते.  "आई" होणे अपघातही असू शकतो पण "आईपण" मात्र संस्कारांनी  बाणवावा लागतो.   

आईला परोपरी समजावत आहे की तू झोपू नको ना गं ! पण आई ही मुळातच समजदार असते तिला समजवावे कसे ? हे ही मुलाला कळत नाही ना !  


आई झोपी गेली की चुकार , व्रात्य मुले नको त्या खोड्या करतात न् शहाणी मुलेही उगाच गमजा करतात.  जगदंबा जर झोपी गेली तर जगात भवसागर पार करूच शकणार नाहीत. ब्रह्मज्ञानीसुद्धा त्यांच्या ब्रह्मज्ञानापासून चळतील. 


 गृहकृत्यदक्ष आई गाढ झोपली तर चोरटे लूटपाट , प्रसंगी जीवहत्याही करू शकतात. जगदंबेच्या झोपण्याने कामक्रोधरूपी षड्रिपु  घरात शिरतील आणि सन्मार्गी साधकालाही आडमार्गी नेतील न् जीवाची अवनती करतील . 


जुन्या काळी घरात साप , विंचू  निघणे सामान्य असायचे. झोपलेल्याला वा गाफील असलेल्याला  दंश करायचे. जगदंबा झोपली तर  टपून बसलेला काळसर्प जीवात्म्याला दंश करणारच.  त्याला कोणाचीही भीती उरणार नाही.   अतिशय आर्ततेने , परोपरीने आईला विनवीत आहे की तू झोपी जाऊ नकोस.


आई ग , तू निष्ठूर होऊ नकोस , तू तर कृपाळू ,कनवाळू आहेस . माझी उपेक्षा कां ग करतेस ?  मुलांना कायमच वाटतं की आईने फक्त माझ्याच कडे लक्ष द्यावे , फक्त माझाच लाड करावा. सतत माझ्याच अवती भवती असावे. 


  आजकालच्या भाषेत "मी ममाज् बॉय" आहे .  शिवाय  'तुजविण अंबे मज कोण तारी' हे तर सत्यच आहे ना ? तुलाच अनन्यशरणागत आहो मी , जगदंबे तूच मला सांभाळ. आईचा पदर म्हणजे बाळाचे अभयस्थान असते.  मायच्या पदराची ऊब मोठ्ठ्या व्यक्तिमत्त्वालाही तान्हं करते.(अभिमानाच्या /बडेजावपणाच्या  झुला ,आईच्या ऊबदार  मायेत गळून पडायलाच हव्या.) 

  

  "त्वमेव माता च पिता त्वमेव , 

  त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव

   त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ,

    त्वमेव सर्वं मम देव देव " ॥  

     तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो ।

तुमही हो बंधू, सखा तुमही हो ॥

तुम ही हो साथी, तुम ही सहारे ।

कोई ना अपना सिवा तुम्हारे ॥

ह्याच  भावनेला किती सुरेख खुलवले आहे ना  या कडव्यातून ?  मराठी वाङ्मयाची महत्ता इथेही दिसून येते. आईशिवाय जगात इतर कोणालाही खरा कळवळा नसतो , हे खरेच आहे. 



     अजूनही रेणुका-आई म्हणावं तसं लक्ष देत नाही , आर्जवाला जुमानत नाही ; हे बघून विष्णुदास म्हणतात की तुला परशुरामची शपथ आहे , माझी आबाळ करू नकोस . ( परशुराम हे भार्गव गोत्रोत्पन्न म्हणजे भृगु ऋषींच्या चौतीसव्या पिढीत जन्मले , असे म्हणतात . शिवाय परशुरामाचे वडील- जमदग्नी हे भार्गव वशांचे प्रवर प्रमुख आहेत . )  

     

लहान मुलां इतके मानसशास्त्र कोणालाही येत नाही. आईला वळविण्यासाठी रडतील , पडतील ,  काय काय शपथा घालतील , कोणा कोणाचा धाक दाखवतील सांगता येत नाही. इथं बालमानसिकता छानच व्यक्त झाली आहे.



      'तुझ्या शिवाय मी किती पोरका आहे' हे सांगून झाले. तू दुर्लक्ष केल्यावर  घोर दुर्गती होईल , हे  ही सांगून झाले.  निर्वाणीचा इशारा देऊन झाला ,  आर्जव झाले , अनन्यशरणागती झाली , धाकही दाखवून झाला. आता मात्र  तिच्याच कर्तव्यपरायण लौकिकाला साद घालणे हेच शेवटचे शस्त्र ठरते. 

      "तू जर मला जवळ केलेस तर तुझीच कीर्ती वाढेल , माझे काय ? मी तर भक्ती करीनच ! तुझे नाव तूच सांभाळ ग बाई !" 

      The ball in your court madam , असाच काहीसा भाव यातून व्यक्त होत आहे. 

      आई-लेकराचा अनुबंध विष्णुदासांच्या लेखणीतून सहज उतरतो न् तो वाचकांच्या मनाचा ठाव घेतो. शिवाय अध्यात्माची आवड असलेल्यांना चिंतन करण्यास भाग पाडतो तर सामान्य वाचकांनाही भावविभोर करतो , यात शंका नाही. 

      ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

      नागपुर 


2 comments: