"ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी , भेटीत तृष्टता मोठी ..."
गाणं कानी पडलं , कुमार गंधर्व नि वाणी जयराम यांचा आवाज , गीतकार बाळ कोल्हटकर यांनी रचलेले हे गीत पहाडी रागात संगीतबद्ध केले आहे वसंत देसाई यांनी .
गाण्यातील शब्दांच्या अर्थच्छटा , एकेक भावना खरी करत हृदयावर रेखाटणाऱ्या ! हे गाणे सर्वच प्रकारच्या ऋणानुबंधावर भाष्य करणारे आहे. मला जसे उलगडले तसे इथे मांडणार आहे.
||ध्रु||
ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तृष्टता मोठी ||ध्रु||
जनन-मरणाचे चक्र अखंड गतिमान ठेवणारा संसार.
संसार म्हणजे योग्य रीतीने समोर जाणारा. म्हणजेच त्याला एक सतत्यपूर्ण गती हवी आणि एक ठहराव पण हवा. ऋणानुबंधामुळे संसार असतो.
ऋणानुबंध , हा शब्दच मुळात अर्थप्रवाही आहे. जगात जन्माला आल्या पासून तर जग सोडून जाई पर्यंत जे जे बंध , अनुबंध , संबंध जुळतात ते सारे ऋणानुबंधामुळेच ! रक्ताचे , नात्याचे , मैत्रीचे , व्यावसायाचे , ओळखीचे असे सारे सारे संबंध मुळात ऋणानुबंधानेच होतात बहुधा . काही अनुबंध जुळतात ते फक्त ऋण चुकविण्यासाठीच ! ऋणानुबंधाच्या गाठी तशा गुंतागुंतीच्याच असतात. जनन-मरणाच्या अव्याहात चालणाऱ्या या चक्रात नेमकी कोणाची, कोणाशी, कशी, कुठे गाठ पडली ते कळणे शक्य नाही. ऋणानुबंधाच्या गाठीमुळे एक जीव दुसऱ्या जीवाशी भेटतो. या भेटीमध्ये तृष्टता असतें. तृष्टता म्हणजे कठोरपणा , कोरडेपणा , उद्धटपणा , तुटकपणा इत्यादी.
गाण्याच्या या एका ओळीत किती गहन अर्थ आहे, होय ना?
||1||
त्या कातरवेळा थरथरती कधि अधरी
त्या तिन्हीसांजांच्या आठवणी त्या प्रहरी
कितिदा आलो, गेलो, रमलो
रुसण्यावाचुनि परस्परांच्या
कधी न घडल्या गोष्टी
कातरवेळ, अधर, तिन्हीसांज वगैरे शब्द वाचले तर शृंगार-रस युक्त काव्य वाटते. पण तसे नाहीय.
तिन्हीसांज म्हणजे सायंकाळ.
उतारवयातील असा टप्पा ज्यात कर्तृत्व करून झालेय, कृतकृत्यता सुद्धा आहे. नवे करण्यासारखे काहीही नाही. शांतपणे मृत्यूची वाट पाहण्याचा हा काळ. हीच ती आयुष्याच्या तिन्हीसांजेची कातर वेळ आहे. जीवनाच्या या प्रहरात आपल्या ओठातून आठवणीं बाहेर पडतात आणि आपल्याला थरथरवतात. यातून ऋणानुबंधाच्या गाठी अवचित पडतात.
आपण कितीदा जन्मलो, संसारात रमलो, परत गेलो (मरून गेलो). विशेष ऋणानुबंधात परस्परांवर हक्काने 'रुसणे' हाच महत्त्वाचा अनुबंध असतो.
||2||
कधि तिने मनोरम रुसणे
रुसण्यात उगीच ते हसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
हसणे, रुसणे, रुसणे, हसणे
हसण्यावरती रुसण्यासाठी,
जन्मजन्मिच्या गाठी.
हे कडवं अत्यूत्तम आहे कारण यात 'ती आणि तो' यांच्या ऋणानुबंधाचे खास भाष्य आहे. सात जन्माच्या नात्याचे गूढ यात उकलले आहे. पहिल्या वाक्यातच बघा ना
'कधि तिने मनोरम रुसणे' यात 'तिने रुसणे' हे व्यवहारात नेहमीचेच आहे. पण रुसणे 'मनोरम' असते कां? मन ज्यात रमते, ते मनोरम. 'ती' रुसली कि आपले सर्व लक्ष 'तिच्या'कडे लागते. कशाने रुसली? काय कारण झाले? कसे समजावू? कसा रुसवा दूर करू? कुठला उपाय असेल? वगैरे वगैरे विचारचक्र सुरु राहते. म्हणजे मन तिच्या त्या आपल्यावरील हक्काने रुसण्यात आणि तिला समजविण्यात सतत रमते. आपण तिला खुलविण्याचा प्रयत्न करीत असतो आणि ती -'रुसण्यात उगीच ते हसणे'- अशी वागत असते. नव्या नवलाईच्या दिवसात छोट्या छोट्या गोष्टमुळे रुसवे-फुगवे असतातच. 'तिलाही' माहिती असते कि या मुद्द्यावर रुसण्यात अर्थ नसतो, पण 'त्यांचे' लक्ष वेधायाचे असते म्हणून रुसून बसली आहे. 'त्यालाही' माहिती आहे, कि 'ती' उगाच रुसली आहे, आणि आपण व्यर्थ 'तिची' समजूत काढत आहोत. पण तरीही 'तो' मनवतो आहे म्हणून 'तीही' उगाच हसते आहे. "तुम रुठी रहो, मैं मनाता रहू" असे सुरु असते. दोघांचेही मन या प्रकारात एकमेका समोर हरण्यात धन्यता मानत असतें. म्हणून ते रुसणे 'मनोहर' रुसणे असतें.
एकमेकांवर अशा हसण्याच्या, रुसण्याच्या कारणामुळे ऋणानुबंधाच्या गाठी पक्क्या होतात. आणि त्या चुकविण्यासाठी 'तिला-त्याला' जन्म घ्यावे लागतात. अशा रीतीने 'ती-तो' साता जन्माच्या गाठीत बांधले जातात.
||3||
कधि जवळ सुखाने बसलो
दुःखात सुखाला हसलो
कधि गहिवरलो, कधि धुसफुसलो
सागरतीरी आठवणींनी वाळूत मारल्या रेघा,
जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मात जमली ना गट्टी...
हे कडवे फक्त युगल किंवा पतिपत्नी यांनाच लागू होत नाही, तर प्रत्येक नात्याला (रक्ताचे, मैत्रीचे, व्यावसायिक किंवा मानलेले, आजकाल आभासी सुद्धा ) लागू होते.
आयुष्यात कधी सुखाने जवळ बसलो. कधी आपण दु:खात असताना सुखाला हसलो, कधी गहिवरून आलो, कधी धुसफूसलो. कधी निवांत वेळी सागरकिनाऱ्यावर वाळून रेघोट्या ओढत बसलो. कधी आठवणी काढत बसलो.
पुढचे वाक्य अत्यन्त आशयघन आहे. "जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मात जमली ना गट्टी"...
गेल्या जन्मातील अनुबंधाचे ऋण चुकवण्यासाठी नवा जन्म घेतला. परत परत जन्म घेतला. पण अनुबंध अनुकूल झाले नाही, गट्टी जमली नाही, उलट तृष्टता वाढली. पुन्हा ऋणानुबंध तयार झाले, पुन्हा ते फेडण्यासाठी जन्म घ्यावाच लागला.
ऋणानुबंधमुळेच आदी शंकराचार्य म्हणतात,
"पुनरपि जननम् पुनरपि मरणम् |
पुनरपि जननीजठरे शयनम्" ||
अत्यन्त सखोल, अध्यात्मिक चिंतन अतिशय कमी शब्दात या मराठी भावगीतातून उलगडले आहे, नाही कां?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.