Thursday, December 6, 2018

#शब्दचिंतन.



कविता करणारा कवी ,
लेख लिहिणारा लेखक ,
कथा लिहिणारा कथाकार ,
नाटक लिहिणारा नाटककार ,
रचना करणारा रचयिता  .
असा साधारण अर्थ वरच्या शब्दांचा होतो व्यवहारात . पण खरोखर यांचा असाच अर्थ होतो कां ?
महाभारत हा ग्रंथ रचला  महर्षी व्यास यांनी तर त्यांना लेखनिक होते साक्षात् श्रीगणेश .म्हणजे व्यास कवी तर गणेश लेखक होते. रामायण हे आदिकाव्य वाल्मिकिंनी रचले.
कवी शब्दाचा अर्थ वर दिला इतका सीमित आहे कां ? तर नाही. जुन्या शब्दकोशात बघितला तर बुद्धिमान् ,जाणता ,द्रष्टा ,पुरोहित ,संत ,साधु ,तत्त्वज्ञ,विचारवंत,गायक,समजुतदार,प्रगल्भ इत्यादी असे अर्थ दिले आहेत. म्हणून तर वाल्मिकी ,कालिदास ,भास ,भारवी ,माघ अादींना कवी म्हणतात. यांनी पद्य ,गद्य ,मिश्र ,नाटक इत्यादी प्रकारचे साहित्य रचले आहे.  त्यांचे साहित्य समाजाला दिशा देते ,संस्कारित करते.जीवनाचे व्यवहारिक व आदर्श असे दोन्ही तत्त्व यांच्या साहित्यात दिसते. आजही  हे साहित्य कालबाह्य ठरले नाही. एकूणच उच्चकोटीचे साहित्य रचणारे हे कवी-महाकवी  आहेत.  साहित्य/ वाङ्मय रचणारा तो कवी असे संस्कृतमध्ये मानतात. कवी शब्द तेव्हा अतिशय व्यापक अर्थाने होता. कालौघात अर्थ संकोच होत होत  ,कविता करणारा कवी ,नाटक लिहिणारा नाटककार , गद्य/निबंध लिहिणारा लेखक , असे प्रकार वाढले.
प्राचीन भारतात "कवी"  या व्यक्तिमत्वाला फार मोठे वलय होते. कवीची दिनचर्या ,कवीचे राहाणीमान न् निवासस्थान याबद्दल दण्डी यांनी उत्तम मार्गदर्शन केले आहे. 
कवी शब्दाचा कलौघात अर्थसंकोच झाला तसाच प्रतिष्ठेचाही झाला असेल काय ??
©डॉ. प्रज्ञा देशपांडे