Monday, August 26, 2019

रेडिअो

#सहजोक्त.
 कॉलेजला जाताना नेहमी प्रमाणे , FM रेडिअो सुरु होता. अचानक गाणे कानी पडले. नेहमी सारखं विचारचक्र सुरु झाले. शब्द होते ...

क्यों जिन्दगी की राह
में मजबूर हो गए
इतने हुए करीब के हम दूर
हो गए

तसं हे गाणं जुनंच आहे.  कॉलेजच्या दिवसांत ऐकले होतंच .  आज आयुष्याचे चढ-उतार अनुभवलेल्या मध्यम वयात हे  गाणं वेगळाच अर्थ सांगून गेलं .
संसार , जो समोर समोर त्याच्याच गतीने सरकतो ,जो कधीच परतून येत नाही.
 लहानपणी भावबंधांनी घट्ट जुऴलेले मित्रमैत्रिणींचे नाते ,जन्मभराचे  कायमचेच राहील , अशी भाबडी आशा असते. पुढे शिक्षणामुळे , नोकरीमुळे , लग्नामुळे हळूहळु   त्या भावना तितक्या तीव्र राहिल्या नाहीत , हे जाणवते. बरेच वर्षांनी पुनर्भेटीचा प्रसंग आला तरी  , " सारे जरी ते तसेच , धुंदी आज ती कुठे?" हे लक्षात येतेच.
 जन्माचं ,रक्ताचं , मैत्रीचं , कायद्याचं , व्यावसायिक असं कोणत्याही लेबलचं नातं असो , मनातून घट्ट जुळलेलं असो की नसो , सतत एकसारख्याच तीव्र , उत्स्फूर्त भावना नसतातच . "अतिपरिचयात् अवज्ञा" होते वा 'नावडतीचे मीठ अळणी ' किंवा 'चलो एक बार फिर से  अजनबी बन जाये' असे वाटू लागतेच .  जुन्या आठवणी बेचैन करतात , "कोई लौटाये मेरे बिते हुए दिन" , "दिल धूंडता है फिर वही फुरसत के रात दिन.." असं मनातून दाटून येतं . पण कधी खरोखर दोन दिवसांची फुरसत मिळाली तर , " ती मजा , ते क्षण , ते  सारे पुन्हा सानंदाने उपभोगू " असं मनातून ठरवतोही .पण लक्षात येतं की , "वृद्धत्वी निज शैशवास जपणे"  वास्तवात होतच नाही. दृष्य-अदृष्य अोझ्यांनी ते निरागस कोवळे मन कधीच जरड , निबर होऊन गेलेय , याची जाणीव होते . 
 अशा वेळी आतून पटते की , "क्यों जिन्दगी की राह
में मजबूर हो गए
इतने हुए करीब के हम दूर
हो गए"
पुढचा अंतरा तर बहुतेक  सर्वाच्या अनुभवाचाच असतो.

"ऐसा नहीं के हम को कोई भी
खुशी नहीं
लेकिन ये जिन्दगी तो
कोई जिन्दगी नहीं
क्यों इसके फैसले हमे
मंजूर हो गए"
 लहानपणीची काही स्वप्न  पूर्ण करण्यासाठी अतिशय कष्ट करून , जगात सन्मानाने जगायला जे जे हवं ते सारं मिळवण्यात बरेच वर्ष घसतो माणूस . मनाजोगं आयुष्य मिळवितोही .  पण काही तरी , कुठेतरी नेमकं हरवतं , छोटसं काही बिघडतं , ते हळवे-निरागस क्षण लोप पावतात  न् तरीही स्पर्धेच्या या युगातील घोडदौड सुरुच ठेवावी लागते .  हीच भावना सुधीर फडके त्यांच्या स्पष्ट पण कातर आवाजात म्हणून जातात ,
 " जे जे हवे  से जीवनी
 ते सर्व आहे लाभलेले
 तरीही उरे काही उणे.." 
 प्रत्येकाच्याच आयुष्यात असे , रिकामे  , सुने , व्यर्थ , बोझिल ,वांझ क्षण येतात. 'आला क्षण गेला क्षण' करीत जगणारे  जगतच रहातात  ,  त्या क्षणातून ना त्यांचे भले होत ना जगाचे काही अडत.  'चलता है भाई'  म्हणत गतानुगतिक संसरत राहातात .
 पण  कलाकार वा साधक या अशा क्षणांनी अधिक समृद्ध होतो . दर्द ,खलीश ,कसक , सल ,चुभन , वेदना ,भळभळती जखम ,चटका  कलाकारांना आतून ढवळून , तोडून मोडून टाकतो , पार उध्वस्त करतो न् मग जन्माला येते ती अजरामर कलाकृती ,जी कालजयी ठरते.  मंथनातून निघालेलं विष पचवण्याची ताकद असल्या शिवाय कोणाला तरी अमृत मिळेल काय ? तुटून ,कोसळून पडल्या शिवाय फिनिक्सभरारी घेता येणार नाही.  त्यामुळे "क्यों इसके फैसले हमे मंजूर हो गए"  अशी वेळ आली तरी चरैवेती चरैवेती करत रहावे ,
 काय माहीत जीवनात पुढच्या क्षणावर आपलेच नाव सुवर्णाक्षरांनी रेखाटले असेल, नियतीने !
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.