#सहजोक्त.
संस्कृत सुभाषिते अनमोल खजिना आहेत. मानवी मनोव्यापारांना अचूक टिपणारे , मानवी मनाला शांतवणारे , समुपदेश करणारे असे अनेक सुभाषिते दिसतात साहित्यात.
एखादी गोष्ट अतिशय तीव्रतेने आपल्याला मिळावी असं आपल्याला वाटत असते. योग्य वेळी , योग्य प्रमाणात त्या गोष्टीचा लाभ मिळावा , यासाठी आपली धडपड सुरु असते. आपले धैर्य कमकुवत होत जाते. 'आताच मिळावी' म्हणून आपण अधीर होतो. 'अमुक एका व्यक्तीच्या हातात देणं असू शकेल' असा कयास आपण बांधतो . न् जी जी व्यक्ती आपल्याला सहायक ठरू शकेल त्या सर्वांजवळ आपण विनंती , याचना , वेळप्रसंगी नवनीतलेपन , पाद्यपूजा वगैरे करतो.
खरे पाहता ती गोष्ट मिळविण्याची अर्हता , योग्यता न् पात्रताही आपल्यात असते. प्रश्न वेळ न् धीराचा असतो.
यथावकाश ती गोष्ट आपल्याला मिळतेही. पण या अस्वस्थ कालखंडात आपण ज्यांना ज्यांना विचारले , भाव दिला , जोडे झिजवले ; त्या सर्वांचे विविध अनुभव आपल्याला येतात. कोणी आपल्या परिस्थितीवर हसतात , कोणी अजून खच्चीकरण करतात . कोणी स्वतःचा टेंभा मिरवून घेतात तर कोणी करणं टिचभर न् सांगणं गावभर करतात. कोणी छुपी दुश्मनी काढता तर कोणी दिखावू सख्य बाळगतात.
फारच दुर्मीळ असे काही लोकं बिनबोभाट काम करून निःश्रेयस अलिप्त होतात.
चालायचेच ! हीच दुनियादारी आहे. अनुभवातून शिकून लक्षात ठेवून वागायला हवे.
अशाच अर्थाने एक अन्योक्ती श्लोक संस्कृतात आहे.
रे रे चातक ! सावधान मनसा मित्र क्षणं श्रूयताम् ।
अम्बोदा बहवो हि सन्ति गगने सर्वेअपि नैतादृशा: ।।
केचिद् वृष्टिभिः आद्रयन्ति वसुधां गर्जन्ति केचिद् वृथा ।
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः ।।( भामिनी विलासः )
अरे चातका , मित्रा सावध हो , जरा ऐक . आकाशात अनेक ढग असतात. कोणी वर्षणारे तर कोणी निव्वळ गर्जणारे. तू सर्वांकडे दीनपणे याचना करू नकोस.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.