Wednesday, April 27, 2022

#सहजोक्त.

 

सुभाषिते कालातीत असतात. मानवी प्रवृत्तींचे , भावनांचे प्रकटीकरण करणारी  अनेक सुभाषिते आहेत.  

खरा श्रीमंत कोण ?  यावर भरपूर चर्चा , लेखन वगैरे घडू शकते. पण अत्यल्प शब्दात समजावण्याची सुभाषितांची शैली खासच असते.

 आता हेच सुभाषित  बघा ना !

वयमिह परितुष्टा वल्कलैस्त्वं दुकूलैः 

सम इह परितोषो निर्विशेषो विशेष:

 स तु भवति दरिद्रो यस्य तृष्णा विशाला मनसि च परितुष्टे कोऽर्थवान् को दरिद्रः ॥   

शतक-त्रयी रचणारे भर्तृहरी हे प्राचीन काळातील प्रतिष्ठित व सदा विजयी  सम्राट होते.  राजपद सांभाळणारे  भर्तृहरी  व्याकरण , साहित्य विषयांतील तज्ज्ञ रचनाकार होते. "भारतीय शिक्षणातून सर्वांगीण व्यक्तमत्त्व विकास साधायचाच" , सिद्ध करणारे  हे उदाहरण आहे. असो.

"वैराग्यशतकम्" मधला हा श्लोक आहे. 

श्लोकाची पार्श्वभूमी थोडक्यात  अशी -   एक संन्याशी व राजा यांच्यात घडलेला हा प्रसंग . तो राजा खूप दानी व न्यायी असतो.  तर हा संन्याशी देखील आत्ममग्न , संतृप्त व  अतिशय वैराग्यमूर्ती असतो. ऐहिक दृष्ट्या अतिशय दारिद्यावस्थेत असलेल्या या वैराग्याला  सत्पात्री दान करावे , अशी राजा   इच्छितो. तुम्हाला काय हवे ते मागा , मी देतो. असे राजा म्हणतो. त्यावेळी संन्याशी , वरील श्लोक म्हणतो.  श्लोकाचा भावार्थ थोडक्यात असा -  

हे राजा , तू तुझ्या रेशमी वस्त्रांमध्ये खुश आहेस ,  तसा  मी वल्कले घालूनही संतुष्ट आहे.  संतुष्टीचा स्तर  दोघांमध्ये समानच आहे.  त्या संतुष्टीत काहीही भेद नाही. मग दरिद्री कोण ?  तर  ज्याची  हाव मोठी आहे तो.   आत्मतृप्त , आत्मसंतुष्ट , समाधानी व्यक्तींमध्ये  दरिद्री  वा श्रीमंत असा भेद  कसा  बरं असेल ? (कारण समाधानी वृत्ती  ही मनाची अवस्था आहे . )


वरील श्लोकात गरीबीची भलामण केलेली नाही , तसेच श्रीमंतीचा द्वेष केलेला नाही.

आजकाल ब्रँडेड वस्तु , हॉटेलिंग , शॉपिंग करणारी हायफाय जीवनशैली  वगैरे वगैरे असणे म्हणजे सुखी ,  प्रतिष्ठित समजतात.  पण दुर्दैवाने ,"समाधान, संतुष्टी" कोणत्याच मॉलमध्ये विकत मिळत नाही. भौतिक परिस्थिती काहीही असली तरी  मनातून समाधानी , संतृप्त असणे ही  दुर्लभ देणगी आहे. अर्थात , समाधानीवृत्ती  कष्टसाध्य सद्गुण आहे. 

श्रीमंत असो वा गरीब ;   समाधानी  व  निरोगी जीवन जगण्याचे सद्भाग्य विरळांच्याच नशिबी असते.    विकसित  , संपन्न देशात आजकाल satisfaction index मोजण्याचा प्रघात रूढ होत आहे.  भारतीय संस्कृती वा विचारसरणी पहिले पासूनच प्रगत होती , हेच वरील सुभाषित आपल्याला सांगते. नाही कां ? 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 



 

Sunday, April 10, 2022

सहजोक्त.

#राम राम . 

राम  शब्दात एक न्यारीच खुमारी आहे. 

त्रेता युगात झालेला राम  हा सर्व भारतीयांना आदर्शवत् राजा होता. मानवी मूल्ये , मर्यादा , पराक्रम  , व्यवस्थापन , नेतृत्व  आदी सर्व गुणांच्या समुच्चयाचे  एकत्र  मूर्त रूप म्हणजे  त्रेतायुगातील  सीताराम !   

त्रेतायुगातील रामाला आप्तांमुळे   वा परक्यांमुळे   अनेक संकंटांचा सामना करावा लागला होता.  प्रत्येक कसोटीच्या वेळी रामाचे धैर्य , विनम्रता , सातत्य , समाधानीवृत्ती आदी  गुण  अनुकरणीय आहेत . इतकेच  नाही तर संकट समयी  गुरुजन , मित्र वा स्नेहीजनांशी परामर्श करण्याचा , सांगितलेल्या मार्गावर चिकाटीने चालण्याचा  तसेच  सर्वांना घेऊन काम करण्याचा रामाचा स्वभाव म्हणजे सुसंस्कृत-यशस्वी व्यक्तिमत्वाचे  अनुसरणीय दर्शन होय . 

 विश्व विजेत्या बलवान रावणाशी  लढताना रामचे मनोधैर्य किंचित खचणं अगदी स्वाभाविक होते. त्यावेळी प्रत्यक्ष सूर्याने  देखिल त्याला प्रोत्सहित केले.

"राम राम महाबाहो 

शृणु गुह्यं सनातनम्।

येन सर्वानरीन् वत्स 

समरे विजयिष्यसि ॥"

 वेळोवेळी गुरुजनांचे मार्गदर्शन मिळणे  व त्याबरहुकूम  वागण्याची बुद्धी मिळणे , यासाठी देवाची कृपा जबरदस्त   हवीच हवी. 

 विष्णुचा अवतार राम  भारतीय संस्कृतीला भारतीयत्व प्रदान करतो , करत राहील. पण त्यासाठी प्रत्येक भारतीयाने स्वतःतील "राम" जपला पाहिजे.  "राम" समजून घेणे व रामत्व अंगी बाणणे या  प्रगत अवस्था आहेत. 

 

 फक्त त्रेतायुगातील रामच  "राम"  आहे , असे नाही. 

तर  राम म्हणजे  रमते इति ।  रम् + णः ।  किंवा  रम्यते अनेन इति । रम् + घञ्  ।  म्हणजे  मनोज्ञ > मनाला उमजणारा /रमवणारा  असा र‍ाम . 

 राष्ट्र , समाज , नातेसंबंध या सर्वांमध्ये रमता येणे , रममाण होणे म्हणजे खरे "राममय होणे"!   असा राम प्रत्येक मनात जिवंत राहिला तर  "यावच्चंद्रदिवारकौ" , आपण भारतीय  "सर्वेऽपि सुखिनः" होऊ यात शंका नाही.

जुन्या काळापेक्षाही आज अशी  रामोपासना करणे व्यष्टी  व समष्टी  दोहोंसाठी आवश्यक व अनिवार्य आहे.   शुद्ध पाण्याला दूषविण्यास थेंब भर गढूळ पाणी कारण ठरते. तद्वत् आपले भारतीयपण काही विखारी/विकारी मतांनी दूषित  होतात. 

 ते होऊ नयेत , यासाठी  रामदासांच्या शब्दांनुसार  रामालाच शरण जाणे इष्ट होय.

 

युक्ति नाही बुद्धि नाही। 

विद्या नाही विवंचिता॥

 नेणता भक्त मी तुझा।

  बुद्धी दे रघुनायका॥१॥


मन हे आवरेना की।

 वासना वावडे सदा॥ 

 कल्पना धावते सैरा। 

 बुद्धी दे रघुनायका॥२॥


बोलता चालता येना। 

कार्यभाग कळेचिना॥

 बहुत पीडिलो लोकी।

  बुद्धी दे रघुनायका॥३॥


तुझा मी टोणपा झालो। 

कष्टलो बहुतापरी॥

 सौख्य ते पाहता येत नाही। 

 बुद्धी दे रघुनायका॥४॥


नेटके लिहीता येना। 

वाचिता चुकतो सदा॥

 अर्थ तो सांगता येना।

  बुद्धी दे रघुनायका॥५॥


प्रसंग वेळ तर्केना।

 सुचेना दीर्घ सूचना॥

  मैत्रिकी राखता येना। 

  बुद्धी दे रघुनायका॥६॥


संसारी श्लाघ्यता नाही।

 सर्वहि लोक हासती॥

  वीसरु पडतो पोटी। 

  बुद्धी दे रघुनायका॥७॥


चित्त दुश्चित होता हे।

 ताळतंत्र कळेचिना॥ 

 आळसू लागला पाठी।

  बुद्धी दे रघुनायका॥८॥


कायावाचामनोभावे। 

तुझा मी म्हणवितसे॥

 हे लाज तुजला माझी। 

 बुद्धी दे रघुनायका॥९॥


आशा हे लागली मोठी।

 दयाळुवा दया करी॥

  आणीक नलगे काही।

   बुद्धी दे रघुनायका॥१०॥

   

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.