Sunday, May 28, 2023

सहजोक्त.

 

लहानपणी आजी दररविवारी न्हाऊ घालायची. माझे लांबसडक केस, शिकेकायी किंवा काळ्या मातीने धुवून द्यायची. शिकेकायी लावून धुतल्यावर थोडे खोबरेल तेल एका हाताच्या ओंजळीत घ्यायची. थेंबभर तेल जमिनीवर टाकायची, थेंबभर तेल दक्षिण देशीला हवेत शिंपडायची. शिंपडताना म्हणायची,         

         "जिथे कुठे असशील,  तिथे सुखाचा रहा ".

         जरा मोठी झाल्यावर (आजीच्या भाषेत शिंग फुटल्यावर ) तिला विचारले,"हे असं कां करतात?"  

          "पृथ्वी सर्वांचा भर सहते, तिला स्नेह मिळावा म्हणून पृथ्वीला थेंबभर तेल द्यावे ग" असे म्हणत  तिने  अश्वाथाम्याची कथा सांगितली.

"त्याने पाच उपपांडवांना मारल्यावर द्रौपदी समोर आणतात. द्रौपदी  पुत्रवियोगाने अत्यन्त दुःखी पण विवेकी विचारांची असते. अश्वाथाम्याच्या  शिरावर जन्मजात मणी असतो. केवळ मणी काढून टाकून त्याला सोडून देतात. सप्त चिरंजीवांपैकी असलेला अश्वाथामा डोक्यावर भळभळती जखम घेऊन नर्मदा किनारी शूलपाणीच्या जंगलात फिरतो. जखमेवर लावायला तेल मागतो.  आपण केलेल्या दुष्ट कृतीचा त्याला सतत पश्चाताप होतो. द्रौपदीनेच पहिल्यांदा त्याला जखमेत भरायला तेल दिले. त्याने वरदान दिलंय की जी महिला स्वतःच्या डोक्यात लावण्याआधी  थेंबभर कां होईना आठवणीने तेल देईल, तिच्या अपत्यांना शल्य रहाणार नाही.   संतती सुखाची व शल्य रहित असावी, तसेच अश्वाथाम्याला शाप सहन करायला बळ मिळावे म्हणून हे थेंबभर तेल द्यायचे त्याला."  ओल्या केसाच्या टोकावरचे तेल दिल्यामुळे केसाची टोक कायम कोरडेच रहातात, असेही तिने सांगितले.


तार्कीक विचार केला तर कथेला काहीच अर्थ नाही.

 पण मानवी वर्तनाचा व अफाट मनःशक्तीचा  विचार केला तर सहवेदना, संवेदना, तरलता याची नाजूक गुंफणं या कथेत जाणवते.

 'पृथ्वी पण स्त्री आहे. ती आपल्याला पोसते, सहते. तिलाही स्निग्धता मिळावी, स्नेह मिळावा', ही भावना परकोटीची कृतज्ञता व्यक्त करणारी आहे.' पृथ्वीविषयी कृतज्ञता बाळगायला हवीच.

 अश्वाथाम्याची कथा बोधप्रद आहे. 

दुष्टपणे वागूच नये. दुष्ट वागणाऱ्या प्रत्येकालाच त्याने केलेल्या वाईट कृत्याची शिक्षा मिळायलाच हवी व कठोरपणे राबवायलाही हवी. शिक्षा माफ करू नये. सर्वोत्तम शिक्षा तीच जी पश्चाताप करायला भाग पडते व वर्तनात सकारात्मक बदल घडवते.   शिक्षा ही ज्याची त्यानेच भोगायची असते. पण शिक्षा भोगत असलेल्याला शिक्षा भोगण्यास सुसह्य वातावरण नक्की तयार करावे. दुष्ट माणसाचा दुष्टपणा नाहीसा होईल असेच समाजाने वळण द्यावे.  असे अनेक पदर या कथेला आहे, असे मला वाटते.


आताशा न्हाताना ही कथा आठवते आणि नकळत आजीच्या भावनेला स्मरून  तशी कृती आपसूक घडते.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 #भारतीय संस्कृती, श्रेष्ठ संस्कृती!