Monday, January 8, 2024

#सहजोक्त.




अहिंसा १.० आणि २.०


अहिंसा ही फार मोठी शक्ती आहे.  शक्तिमान, बलवान माणूसच खरा अहिंसेचा  पुजारी असतो. आपण बलाढ्य असलो की आपल्या कोणीही वाटेला जात नाही. अर्थात अहिंसा प्रस्थापित होते. पूर्वापार आपला देश असाच सर्वश्रेष्ठ अहिंसक होता.


अहिंसा १.० :


नवस्वातंत्र्य काळात "एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करावा", अशा आदर्शवादी तत्वज्ञानाचे अंधनुकारण केल्या गेले. तेव्हा आपली सैनिकीशक्ती बऱ्याच वरच्या क्रमांकाची होती. आपल्या समोर चीनने "अहिंसक तिबेट" गिळंकृत केला. आम्ही आपले अहिंसक बनून  "हिंदी-चिनी भाई भाई" करत राहिलो.  आम्ही 1965 जिंकूनही युनो मध्ये अपील करून बसलो, काश्मीर धुमसत राहिले. 


व्यक्तिगत पातळीवर  सुद्धा स्वतःची कुवत विचारात न घेता "मी तुला माफ करतो, मी अहिंसक आहे"! असे ऐकवणे हास्यास्पद ठरते. दुबळ्या अहिंसेच्या अंधानुकरणाचे अनुषंगिक फळ म्हणजे खलप्रवृत्ती वाढीला लागणे , सज्जनशक्ती तटस्थ होत होत भिरू होणे, हे होय. आणि ही स्थिती देशासाठी घातक असते. दुबळ्यांची अहिंसा, स्वतःच्या बचवासाठी केलेला पलायनवाद  असतो. 


अहिंसा २.० :


मालदीव नावाच्या छोट्या देशातील तीन मंत्र्यांनी आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांची नालस्ती केली. सामान्यलोकांनी त्यावर प्रतिक्रिया म्हणून सोशलमीडियावर "बॉयकॉटमालदीव" अभियान सुरु केले.

योगायोग बघा, आपल्या विश्वसंचारी पंतप्रधानांचा दौरा  नेमका लक्षद्विपला  झाला.  आणि बॉयकॉट मालदीव पासून सुरु झालेले अभियान "चलो लक्षद्विप" पर्यंत पोहोचले.


भारत जगातील सर्वांत मोठी ग्राहकशक्ती आहे. भारतीय पर्यटकांवर अनेक देशांची आर्थिकघडी अवलंबून आहे. मालदीवही त्यातील एक. भारतीय पर्यटकांनी आपला मालदीव दौरा भराभर रद्द करणे सुरु केले. आर्थिक नुकसान लक्षात येताच तीनही मंत्र्यांना डच्चू  देत मालदीव सरकारने शरणागती पत्करली. ही आपल्या बलाढ्य क्रयशक्तीची कमाल आहे. सामान्य लोकांनी अहिंसक मार्गाने हिसका दाखवला!


पंतप्रधानकार्यालय, विदेश-मंत्रालय आदींना

कोणतीही प्रतिक्रिया द्यावी लागली नाही की निषेध व्यक्त करावा लागला नाही, धमकी, डटावणीचीही गरज पडली नाही! लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेमुळे "सापही मेला आणि लाठीही तुटली नाही" असे झाले.


खरोखर आपला देश  बदलतो आहे. देश खऱ्या अर्थाने समर्थ अहिंसक होत आहे. आत्मभान वाढते आहे. 


"राजा कालस्य कारणम् |" असे महाभारतात म्हटले आहे. 


©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

#सहजोक्त

. क्षमा शस्त्रं करे यस्य  दुर्जनः किं करिष्यति।  अतृणे पतितो वह्निः  स्वयमेवोपशाम्यति॥ ज्याच्या हातात क्षमा नावाचे शस्त्र आहे, त्याचे दुर्जन...