काशी -वाराणसी -बनारस.
नावात काय नाही? नावातच सर्व आहे. किंवा 'ते सर्व' त्यात आहे , म्हणून 'ते' त्याचे नाव आहे, नाही कां?
काशी ऊर्फ वाराणसी ऊर्फ बनारस असे तीन नावं असलेले भारतातील धार्मिकदृष्ट्या अत्यन्त महत्वाचे एक शहर आहे.
वर ऊर्फ लिहिले म्हणजे ही तीन नावे पर्यायवाची आहेत काय? अजिबात नाही. कसे 👇👇 वाचा.
#काशी =>> या शब्दाची संस्कृत व्युत्पत्ती 👇अशी
[काशते शिवत्रिशूलोपरि ।
काशृङ् दीप्तौ + अच् गौरादित्वात् ङीष् । काश + इन् ङीप् वा ।
अथवा
काशयति प्रकाशयतीदं सर्व्वं या ।
काश् + णिच् अच् गौरादित्वात् ङीष् । स्वनामख्याततीर्थम् । ]
प्रलयकाळी साक्षात शंकर, आपल्या आवडत्या काशीनगरीला त्रिशूलावर उचलून घेतात. पृथ्वीवरील सर्वात चकाकदार नगरी म्हणून "काशी" तीर्थनगरी होय.
अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका।
पूरिवती, चैव सप्तैताः मोक्षदायिकाः ॥
पुराणकाळापासून या सात नगरी प्रख्यात आहेत. यात काशीचेही नावं आहे.
काशी ही सनातन (सर्वात प्राचीन ) नगरी आहे. प्रलयकाळात सर्व जग लयाला जाते आणि त्या नंतर नवीन सृष्टी तयार होते. फक्त काशी हीच अशी शंकराची लडकी नगरी आहे, जिचा लयच होत नाही कारण शंकर तिला उचलून घेतात.
#वाराणसी = काशी नगरीला वाराणसी हे नावं तिच्या भौगोलिक वैशिष्ट्यामुळे पडले आहे.
"वरुणा" नावाची गंगेची उपनदी प्रयागराज जिल्ह्याच्या 'फूलपुर' गावातून उगम पावते. जवळ पास 100 किलोमीटर प्रवास करून साराय मोहना भागाजवळ 'आदिकेशव' घाटाजवळ ती गंगेला मिळते.
"असी" नदी वाराणसीच्या कंदवा भागातून निघून चितईपुर, करौंदी, करमाजीतपुर, नेवादा, सराय नंदन, नरिया, साकेत नगर नगवा या भागातून जवळ जवळ आठ किलोमीटर प्रवास करून अस्सी घाटावर गंगेत मिळते.
तर अशा रितीने, वरुणा आणि अस्सी या दोन नद्यांच्या मधील भूभाग म्हणजे "वाराणसी", हे नाव प्रसिद्ध झाले.
#बनारस =>> साहित्यशास्त्रात नऊ रस प्रसिद्ध आहेत.
श्रृंगार-वीर-करुणाद्भुत-हास्य-भयानका: ।
बीभत्सरौद्रौ शान्तश्च रसा: नव प्रकीर्तिता: ।।
साहित्यशास्त्रात शृंगार , वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बिभत्स, रौद्र, शांत
हे नऊ रस आहेत.
अन्नपदार्थात सहा रस प्रसिद्ध आहे.
षड्रसा: पुरुषेणेह भोक्तव्या: बलमिच्छता |
अम्लस्तिक्त: कषायश्च मधुरो लवणः कटुः ||
अम्ल =आंबट, तिक्त = कडू, कषाय =तुरट, मधुर =गोड, कटु =तिखट असे सहा रस जेवणात नेहमीच असायला हवा, ज्यामुळे समतोल आहार मिळेल.
तर असे सर्व क्षेत्रातील बना-बनाया 'रस' आस्वादण्यास सहज उपलब्ध आहे आणि येथील (प्राचीन काळातील ) जनसामान्य त्यात कुशल होते ; म्हणून "बनारस" हें या शहराचे सार्थ नाव आहे.
[अतिप्राचीन काळी]या शहरातील सर्वच लोकं रस उपभोगण्यास सक्षम होते म्हणून ते 'रसिया' म्हणजे रसिक आहे.
तर अशा रितीने काशी हें नाव, शहराचे अध्यात्मिक+धार्मिक महत्त्व दर्शविते.
वाराणसी हें नाव, शहराची (तत्कालीन ) भौगोलिक व्याप्ती दर्शविते.
तर 14 विद्या आणि चौसष्ट कला यांचे माहेरघर असलेल्या या शहरातील लोकांची वृती/स्वभाव सांगणारे नाव म्हणजे बनारस.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर.
खूप छान माहिती देता मॅडम,रोज नवनविन ज्ञानात भर पडते.धन्यवाद!
ReplyDeleteधन्यवाद 🙏🙏🙏🙏
ReplyDelete