Thursday, January 30, 2025

सहजोक्त

 ३१.१.२०१७ ©डॉ.प्रज्ञा देशपांडे


.भाषा (भाष्, बोलणे )पासून "जी बोलल्या जाते ती भाषा"  या अर्थाने हा शब्द आहे.

 अन् खरे तर  "भाषा" शब्दाची हीच मूळ व्याख्या आहे , तसेच बोलणे ,संवाद साधणे हेच तिचे मूळ उद्दिष्ट आहे.


बोली, उपभाषा, प्रमाणभाषा, शुद्धभाषा,  मिश्रभाषा, प्राचीनभाषा, आधुनिकभाषा, ज्ञानभाषा इत्यादि प्रकार हा म्हणजे शब्दविलास होय.


अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा , तसेच कामक्रोधहर्षादि मूळभावनांच्या पूर्ततेसाठीच भाषेचा उपयोग असतो.

अस्मिता-साहित्य-संस्कृती इत्यादि म्हणजे फ़ुटलेले घुमारे आहेत. ते चूकीचे आहेत , असे अजिबात नाही .

पण  "खाली पेट भजन न भाये गोपाला"     हे त्रिकालाबाधित त्रिवार सत्य आहे.


भाषेचा उगम केव्हा झाला?

प्राचीनतम भाषा कोणती?

कोण्या भाषेतून कोणती भाषा जन्मली?

सर्वाधिक बोलली जाणारी भाषा?

मूलनिवासी भाषा कोणती??

श्रेष्ठ  भाषा कोणती??

आजची मृतभाषा कोणती?

जागतिकभाषा कोणती??

अशा प्रश्नमालिका सोडविण्याचा या लेखाचा उद्देश नाही आणि ह्या '"अनादि-अखंड-अनंत" प्रश्नमालिका सोडविण्या इतपत दांडगी माझी प्रज्ञा नाही नि भाषिकव्यासंग ही नाही!! असो.


एक सामान्य व्यक्ती म्हणून  "भाषा" विषयाबाबत  माझे विचार व्यक्त करीत आहे. 


 कोणतीही भाषा १००% नवी नाही नि १००% जुनी ही नाही. 

 आई ज्याप्रमाणे अपत्याला जन्म देते त्या प्रमाणे कोणी एक भाषा कोण्या एका भाषेला जन्म देत नाही.

   भाषा  ही भूगोल-समाज-कालसापेक्ष असते.


  प्रत्येक व्यक्ती तीच  भाषा वेगळी-वैशिष्ट्यपूर्ण बोलत असते. 

भाषेचे मूळ, शब्द आहेत तर शब्दांचे मूळ ध्वनि म्हणजे नाद होय.

  " मुख" हेच नाद प्रगटीकरणाचे मूळ साधन आहे.

 जगात जितके लोक आहेत त्या सगळ्यांची मुखरचना भिन्न व वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे उच्चारणशैली प्रत्येकाची भिन्न असते.


   साध्या 'अ' चे उदाहरण बघू. कोमल-मध्यम-तीव्र ,लघु-गुरु-प्लूत, सानुनासिक-अननुनासिक याप्रकारे अठरा भेद होतात. त्यात व्यक्तिवैशिष्ट्याने अगणित उच्चार तयार होतात.


   इथेच "भाषा-अंतर" व्हायला खरी सुरवात होते. म्हणून तर म्हणतात , "नवा वाणी मुखे मुखे"!

  भाषिकभेदाची सुरवात इथेच होते. 


  उदाहरणार्थ त्रयोदशी>तेरस>तेरा 

  अक्षय्य>अख्खय>आखजी>आख्खा

  आषाढी>आखाडी

  यमुना> जमना

  बर मग ठिक आहे> बर्मगठिका

  देवयानी>देबजानी

  इंद्रवर>इंदिवर

  अमरेंद्र>अमरिंदर

  लुप्त हंसा> लुप्तांझा

  ओनामा >ओम् नम: 

  ओनामासिधम> ओम् नमो सिद्धम् 

  अशाप्रकारे उच्चारण भेद हे भाषा-विभाषेचे मूळ कारण असावे, असे वाटते.


  मानवीवंशापासूनच भाषेचा जन्म झाला असावा. वर सांगितल्या प्रमाणे भाषांतर होता होता अनेक भाषा तयार झाल्या असाव्यत. त्यामुळे कोणत्या भाषेतून कोणता शब्द आला हे ठरवणे कष्टसाध्यच आहे. शिवाय शक्याशक्यते नुसार या भाषेतील शब्द त्या भाषेत जाऊन परत या भाषेत येऊ शकतोच ना.  तसेच या दोन्ही भाषेतून तिसऱ्या भाषेत या सर्व शब्दांसह तिचा स्वतंत्र शब्द असू शकतोच ना.


उदाहरणार्थ  पक्षी (संस्कृत) > पख्खी(पाली) >पक्षी ,पाखरू (मराठी)


  [पालीपासून संस्कृत झाली की संस्कृतपासून पाली , मराठी आधी का या भाषा , या वादात पडाण्यासाठी ही उदाहरणे दिली नसून मला याच भाषा ज्ञात आहेत. इतर भाषांचा अभ्यास  नाही .म्हणून याच भाषांची उदाहरणे मी देते.] 


  पूर्वी दळणवळण साधने तितकी उपलब्ध नव्हती. शिवाय तंत्रज्ञानही प्रगत नव्हते. त्यामुळे एकच भाषा वा मर्यादित बोली यांच्याद्वारे व्यवहार होत होते. देवाण-घेवाण क्वचितच होत असे.


आज सगळीच वर्दळ वाढलीय . त्यामुळे मानवांप्रमाणे भाषांचाही प्रवास-प्रगती वाढतेय यात शंका नाही.

 मग शब्द-शैली-ढब-तंत्र यांची देवाण-घेवाण होणे अपरिहार्य आहेच.


मानवीसमूहाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे "अहंपण"!  मी-माझे-मम यातूनच ममत्व निर्माण होते. त्यातून भाषाही सुटत नाही.

पण कधी कधी मानवी प्रवृत्तीपेक्षाही शब्दांची विष्णुवृत्ती- (हा धार्मिक शब्द नाही ,शिरण्याची प्रवृत्ती)- अधिक तीव्र असते. 

त्यामुळे कोणत्याही भाषेतील शब्द कुठल्या भाषेतील शब्दांशी साम्य बाळगतील हे सांगता येत नाही.

 उदाहरणार्थ निअर (जवळ या अर्थाने) इंग्रजी भाषेतील शब्द त्याच अर्थाने पण उच्चार वेगळा 'निअरे' राजस्थानीत आढळतो. 

असे अनेक उदाहरणं कोसो दूरच्या भाषांमध्ये सापडतात. 

कोणी कोणाचा शब्द घेतला यावर वाद करण्यापेक्षा भाषा शब्दसमृद्ध झाली हा परिणाम मोठा नाही कां? 

मी माझ्या भाषेत परके शब्द घेणार नाहीच हा दुरभिमान आहे तसेच अधिकाधिक परकेच शब्द योजेन हा ही कणा नसल्याचा पुरावा आहे. इथे विवेक हवा. माझ्या मूळ भाषिक- अस्तित्वाला धोका न आणता ,भाषिकप्रवृत्तीला जपत जपतच मी शब्द स्वीकारेन  असा दृष्टिकोण असावा. 

तसेच माझ्या भाषेतील याच अर्थाचे सर्व शब्द त्याच्या इतर अर्थच्छटांसह जपत नव्या शब्दाची भर घालण्यात कमीपणा वाटू नये.

गरज भासल्यास कोणत्याही भाषेतून शब्द आयात करावे . तसेच आपल्या भाषेतील शब्द सहज दुसऱ्या भाषेत पेरावे. शेवटी भाषा ही बोलण्यासाठी (टचटच नाही) हे मूळ उद्दिष्ट कोणीच विसरू नये. 

जगा -जगवा -जगू द्या. 

तद्वत  बोला- बोलू द्या-बोलवा.

(सर्वा मुखी मंगल बोलवावे मधिल बोलवा... ) हेच सूत्र महत्त्वाचे.


©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

2 comments: