Tuesday, September 30, 2025

महालक्ष्मीची आरती

 


🙏🙏दहवी  माळ 01/10/2025🙏🙏

।। महालक्ष्मीची आरती ।।

आज आपण जी आरती बघणार आहोत, ती माहूरच्या गड मंदिरात नेहमीच म्हटली जाते. 

या आरतीतही शब्द सोपे  आणि अर्थ सरळ आहे. 


जय जय नदिपति प्रिय तनये । 

भवानी, महालक्ष्मि, माये ॥ध्रु०॥

आदिशक्ती विविध रूपातून प्रकट होते. या आरतीत आदिशक्तीच्या विविध रूपांचे नावं आलेली आहेत. 

नदीपती म्हणजे समुद्र, त्याची प्रिय कन्या म्हणजे लक्ष्मी. भव म्हणजे शंकर, भवानी म्हणजे भवाची पत्नी पार्वती, तसेच महालक्ष्मी तुझा विजय असो, विजय असो. 



आदि क्षिरसागररहिवासी|जय जय कोल्हापुरवासी |

अंबे भुवनत्रयिं भ्रमसी|सदा निज वैकुंठीं वससी |

दुर्लभ दर्शन अमरांसी|पावसि कशि मग इतरांसी |

(चाल) करुणालये मोक्षदायिनी

 भक्त जे परम - जाणती वर्म - सदा पदिं नरम

 कृपेनें त्यांसी सदुपायें| संकटीं रक्षिसि लवलाहे॥१॥ 

मुळात तू क्षीरसागरात राहणारी, कोल्हापुरात राहतेस, अंबे, तू त्रिभुवनात फिरतेस, वैकुंठात राहतेस. देवांनाही तुझे दर्शन दुर्लभ आहे, मग तू इतरांना कशी बरे पावशील? 

"तू करूणेचे आश्रयस्थान आहेस, तू मोक्ष देणारी आहेस",   असे गुज (वर्म, रहस्य) जे परम भक्त जाणतात आणि तुझ्या चरणी विनम्र आहेत  ; तुझ्या कृपेनें, तू सदुपायाने  क्षणात संकटापासून वाचवतेस.



अमरेश्वर विधिहरिहर |मिळाले असुरांचे भार|

 मंदाचल नग रवि थोर | केला वासुकिचा दोर|

 ढवळिला सागर गर गर|रगडिले जलचर-मीन-मगर 

(चाल) लाजती कोटि काम पोटीं

 तुझें सौंदर्य -गळालें धैर्य -म्हणती सुर आर्य |

जाळितो रतिपति सोसुं नये |होतां जन्म तुझा सुनयने ॥२॥

या कडव्यात समुद्रमंथन प्रसंग, लक्ष्मीचा जन्म प्रसंग सांगितला आहे.

इंद्र, ब्रह्मदेव, विष्णु, शंकर तसेच सर्व असुर एकत्र आले. मंद नावाच्या पर्वताची रवि (घुसळणी) केली. वसुकी नावाच्या सर्पाची दोरी केली. समुद्राला गरगर ढवळले, त्यामुळे समुद्रातील जलचर, मगर, मासोळ्या वगैरे रगडल्या गेले. (मग अनेक रत्न निघू लागले. त्यात तू पण होतीस)  तुझा जन्म होतच. हजारो कामदेव लाजले. तुझे सौंदर्य बघून देवासुरांचे धैर्य गळले ते म्हणू लागले की रतिपती मदन जाळतो आहे, सोसवत नाही. 


 त्रिभुवनस्वरुपें तूं आगळी|वरिलासी त्वां वनमाळी|

 तुजसम न मिळे वेल्हाळी |शंकर मकरध्वज जाळी|

 न मिळे स्पर्शहि पदकमळीं |पदरज लागो तरि भाळीं (चाल) पितांबर शोभतसे पिवळा 

बहारजरतार -हरिभरतार -तरि मज तार 

स्तवितां तुज जरि गुणग्रहे |दशशतवदनाही भ्रम ये ||३॥

तू त्रिभुवन सुंदरी आहेस, तू वनमाली (कृष्ण) विष्णु याची पतिवर म्हणून निवड केलीस.

हे भवानी, तू सती असताना मरण पावली, त्यामुळे शंकर, वैरागी झाले त्यांनी मदन/कामदेव म्हणजेच मकरध्वज याला जाळून टाकले, तेव्हा पासून कामदेव हा अनंग म्हटल्या गेला.

हे माते, तुझ्या चरणकमळाचा स्पर्श मिळणे फारच दुर्लभ, पण किमान तुझ्या पायाची धूळ तरी मला लाभो.

तुझ्या अंगी पिवळा पितांबर, रेशमी पातळ शोभते. पातळ जरतारी आणि भरजरी आहे. तुझा पती विष्णु-हरी आहे.  तर आता मला तू तार, उद्धार कर.

भक्ताच्या गुणाला तू जाणतेस, तुझी दहा वेळा शंभरवेळा जरी स्तुती केली तरी केली की नाही असा भ्रम आहे.



 सनकादिक ब्रह्मज्ञानी ।ध्याती चरण तुझे ध्यानीं |

दृढासन घालुनि निर्वाणीं |बैसले महामुनि तपिं ध्यानीं|

 तरी मी मंदबुद्धि जननी । तुझे गुणवर्णु कसे वदनीं |

(चाल) जरी हा विष्णुदास 

तूझा बहु अपात्र -करी सुपात्र-कृपा तिळमात्र 

करोनी मोक्षपदीं वाहे । अंबे लवकर वर दे ये ॥४॥

हे आदिशक्ती भगवती, जननी सनक आदि ब्रह्मज्ञानी लोकं तुझ्या चरणाचे ध्यान करतात. हे सर्व महामुनी दृढ आसन घालून निर्वाण अवस्थेत (मोक्ष मिळावा यासाठी अगदी आर या पार अवस्थेत,) तापचरण करायला बसले आहेत.

हे आई, मी तुझा मंदबुद्धी बालक आहे. तुझे गुण मी कसे बरे वर्णन करू?

मी विष्णुदास तुझा भक्त,  अत्यंत अपात्र आहे, पण तू मला सुपात्र करून घे. माझ्यावर तिळमात्र (अत्यल्प ) कृपा कर आणि मला मोक्षपद मिळवून दे. हाच वर मला दे. 


 आजची आरती सर्व देवी, आदिशक्ती यांना आळवणी आहे.

या आरतीत अनेक पुराण कथा आहेत.

तसेच अनेक विशेषणे पौराणिक संदर्भातून योजले आहे. 

आज आपली दहावी माळ समर्पित केली. 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर

लेख पूर्ण वाचून झाला की कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट नक्की करा, कृपया. 


आणि तुम्हाला माझे ब्लॉग लेखन आवडत असेल तर माझ्या नावसह ही link शेयर करायला विसरू नका. 😊











Monday, September 29, 2025

रेणुका देवीचा जोगवा

 


🙏🙏नववी  माळ 30/09/2025🙏🙏

  माहूरगड निवासी श्री रेणुका मातेचा जोगवा.


जोगवा म्हणजे देवीदेवतांसमोर पदर पसरून कृपाप्रसाद मागणे, ज्याला महाराष्ट्रातील ग्रामीण भागात भिक्षा मागणे असेही म्हणतात. या प्रथेतील उपासकांना 'जोगते' (पुरुष) किंवा 'जोगतिणी' (स्त्री) म्हणतात.   ते देवीच्या सेवेत सर्व इच्छा व अहंकार सोडून देतात त्यांचे प्रतीक म्हणून देवीला प्रिय असणाऱ्या कवड्यांची माळ घालतात आणि देवीच्या कृपेने कुटुंबात सुख-समृद्धी यावी यासाठी जोगवा मागतात. 

जोगवा हा एक पारंपरिक लोककला आणि नृत्य प्रकार देखील मानला जातो, ज्यामध्ये देवीला जोगवा मागताना गाणी गायली जातात, आणि  नाचतात.

संत एकनाथ यांनी रचलेले  जोगावा गीत प्रसिद्ध आहे. आज विष्णुदासांनी रचलेले जोगवा गीत  बघू




माहुर गडावरी, ग माहुर गडावरी गं तुझा वास, 

भक्त येती ते दर्शनास ।। माहुर ।।

 पिवळे पातळ गं। पिवळे पातळ बुट्टीदार, 

अंगी चोळी ती हिरवीगार, पितांबराची गं। पितांबराची खोविली कास ।। भक्त ।॥१॥

कडव्यातून अर्थ तसाही स्पष्ट कळून येतो.

रेणुका देवीला पिवळे पितांबर (रेशमी, सोवळे ) लुगडे आवडत असावे. कारण जवळपास प्रत्येक  गाण्यात पिवळ्या पातळाचे वर्णन आहेच.


 बिन्दीबिजवरा, गं बिन्दीबिजवरा गं

 भाळी शोभे, काफवाळ्याने कान ही साजे,

 इच्या नथेला गं, इच्या नथेला हिरवे घोस ।।२।।

या कडव्यात त्याकाळातील बिंदी, बिजवर, काफ वाळ्या, नथ  या दागिन्यांचा उल्लेख आहे.  


•बिंदी हा कपाळावरचा पारंपरिक दागिना आहे.बिंदीचा आकार छोटा असतो,

 •बिजवरा हे एक विशिष्ट प्रकारचे चंद्रकोरीच्या आकाराचे आभूषण आहे जे बिंदीपेक्षा मोठे असून कपाळाच्या मध्यभागी लावले जाते. 

•काफ वाळ्या =  कानातील दागिने. कान न टोचता कानाच्या पाळीवर घातला जाणारा काफ तर  साखळ्यांनी लोम्बणाऱ्या वाळ्या. 

•नथ नाकातील दागिना. हिची नथ हिरव्या मण्यांचा घोस असलेली आहे.



 सरी ठुसीत गं सरी ठुसीत मोहन माळ,

 जोडवे मासोळला, पैंजण चाळ, 

पट्टा सोन्याचा गं पट्टा सोन्याचा शोभे कमरेस । 

भक्त ॥ ३ ॥ 

या ही कडव्यात दागिन्यांचे वर्णन आहे.

•सरी = गळ्यात घालायची मण्यांची माळ.

• ठुशी= गळ्याला घट्ट असलेला, सोन्याच्या मण्यांचा दागिना.

• मोहनमाळ= सोन्याच्या मण्यांचा मोठा हार.

• जोडवे= पायाच्या बोटात अंगठी सारखे, त्यावर मासोळीची आकृती.

• पैंजण= जरा घट्ट आणि जाड 

• चाळ= घुंगरू, साखळ्या असलेले जरा लोम्बणारे.


जाई जुईची गं जाई जुईची आणिली फुले।

 तुरे, हार, माळीने गुंफियले, गळा शोभे तो गं

 रुप शोभे तो आनंदास ॥ भक्त येती ॥ ४ ॥

दागिनेच नाही तर फुलांच्या माळा, हार, गजरे घातलेय. तुझे रूप पाहून भक्तांना आनंद होतो.


हिला बसायला गं हिला बसायला चंदनी पाट, 

हिला जेवायला चांदीचे ताट, पुरणपोळी गं पुरणपोळीची आवड, सुरस ।॥ ५ ॥

रेणुकेच्या जेवणाचा थाट वर्णीला आहे. चंदनाचा पाट, चांदीचे ताट. पुरणपोळी ही विशेष.  


 मुखी तांबुल गं तो तांबुल पाचसे पानांचा, 

मुखकमली रंग लालीचा, 

खण नारळाची ओटी तुला ।। भक्त येती ६ ।।

जेवणानंतर 500 पानांचा तांबूल. तांबूलामुळे तोंड रंगलंय लालीलाल. खणा-नारळाची ओटी भरतात. 


 विष्णूदासाची गं विष्णूदासाची विनवणी, 

माझ्या जनार्दनी चरणी, माता भगिनीना गं

माताभगिनींना सौभाग्यदायीनी, व्हावे अखंड । अखन्डित पावनी, सदा उधळती गं हळदीस ।

 भक्त येती ते दर्शनास।। ७ ।।

विष्णुदास रेणुका आईच्या चरणी विनवणी करतात की सर्व माता भगिनींना अखंड सौभाग्यवती कर. त्या तुझ्यावर सतत हळद उधळू देत. 

सात कडव्यांचा हा जोगवा अतिशय सोपा  असून म्हणायला उत्तम आहे.

आज आपली नववी माळ अर्पित केली 🙏. 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर

लेख पूर्ण वाचून झाला की कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट नक्की करा, कृपया. 


आणि तुम्हाला माझे ब्लॉग लेखन आवडत असेल तर माझ्या नावसह ही link शेयर करायला विसरू नका. 😊










Sunday, September 28, 2025

रेणुका मातेचे पद

 🙏🙏आठवी वी माळ 29/09/2025🙏🙏

पद

आज आपण विष्णुदासांचे एक पद पाहू.


आम्ही चुकलो जरी तरी काही। 

तू चुकू नको अंबाबाई ।। धृ. ।।

 तुझे नाव 'आनंदी' साजे । 

तुझा महिमा त्रिभुवनी गाजे। 

तुझे सगुणरुप विराजे। 

तुला वंदिति सन्मुनि, राजे।

 गुण गाति वेदशास्त्रेही ।। आम्ही० ॥ १ ॥

धृपद आणि पहिले कडवे अतिशय सोपे आणि प्रत्येक दोन चरणान्ती यमक जुळविले आहे. जसे काही-बाई,  साजे-गाजे-विराजे-राजे, 

शास्त्रेही -काही-बाई. या कडव्यातील सर्वच शब्द अतिशय सोपे आहेत, अर्थ लगेच कळतो, वेगळ्या स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही.


आम्ही अनाथ, दीन भिकारी 

तू समर्थ, प्रभु, अधिकारी। 

आम्ही पतित पातकी भारी।

 तू पावन भव संभारी 

तू पर्वत, आम्ही रजराई ॥ आम्ही० ॥ २ ॥ 

याही कडव्यात यमक आहेच. शब्द सोपेच आहे. 

काही शब्दांचे फक्त अर्थ सांगते.

•दीन= गरीब

•प्रभु = मालक, स्वामी

•संभारी=  आधार असलेली. सम्पन्नता, ऐश्वर्य असलेली.

•रजराई= अतिशय सूक्ष्म धुळी-कण.



आम्ही कुपुत्र म्हणवून घेऊ । 

तू नको कुमाता होऊ।

 आम्ही विषय-ढेकळे खाऊ।

 तू प्रेमामृत दे खाऊ । 

आम्ही रांगू तू उभि राही ।। आम्ही० ॥ ३॥

आम्ही कुपुत्र म्हणजे लायकी नसलेले पण तुझे पुत्र आहोत. पण तू मात्र वाईट आई नको होऊ.

आम्ही विषयरूपी ढेकूळ (मातीचा वेडावाकडा खडा)  खाणारी [लहान मुले मातीची ढेकळे खात असत, जुन्या काळी]  तू मात्र प्रेमाने अमृत रूपी खाऊ खायला दे.

आम्ही रांगत रांगत चालतो, तू फक्त उभी राहून आम्हाला बघ, सांभाळ.

{देव्यपराधक्षमापन स्तोत्रात म्हटले आहे,

 कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति॥

मुलगा वाईट निपजू शकतो पण आई कधीच वाईट नसते.

हे कडवे वाचून या श्लोकाचे स्मरण झाले. अगदी हाच आशय विष्णुदासांनी व्यक्त केलाय.} 


आम्ही केवळ जडमूढ प्राणी। 

चैतन्यस्वरूप तू शहाणी।

 फट् बोबडी आमुची वाणी।

 तू वदू नको आमुच्या वाणी। 

आम्हा रडु, तू गाणे गाई ।। आम्ही० ।। ४ ।।

आई आणि मुलातील फरक तीव्र विरुद्ध शब्दांत सांगितला आहे.  जसे मुले जडमूढप्राणी  तर आई साक्षात चैतन्यरूप. 

आम्ही बोबडे बोलतो, तू (चौथी वाचा बोलणारी) आमच्या सारखी बोबडी बोलू नकोस.

आमचे बोलणे म्हणजे सतत रडगाणे  मात्र तुझे बोलणे मधुर गीत होय.


आम्ही चातक तुजविण कष्टि।

 तू करि कृपामृतवृष्टि।

 म्हणे विष्णुदास धरि पोटि। 

अपराध आमुचे कोटि । 

अशि आठवण असू दे हृदयी ।। आम्ही० ॥ ५ ॥

आम्ही चातक, तू दिसली नाहीस की कष्टी होतो, तू तुझ्या कृपेचा आमच्यावर वर्षाव कर. 

विष्णुदास म्हणतात आई गं, तू आमचे कोट्यानुकोटी अपराध पोटात घे आमची आठवण कायम तुझ्या हृदयात राहु दे. 

आज आपली आठवी माळ  विष्णुदास यांच्या कवित्वाला आणि रेणुका देवीला  समर्पित केली. 


©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर

लेख पूर्ण वाचून झाला की कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट नक्की करा, कृपया. 


आणि तुम्हाला माझे ब्लॉग लेखन आवडत असेल तर माझ्या नावसह ही link शेयर करायला विसरू नका. 😊




Saturday, September 27, 2025

रेणुकेचा अभंग

 


🙏🙏सातवी माळ 28/09/2025🙏🙏

  अभंग


अभंग  अक्षरवृत्त आहे, यालाच छंद असेही म्हणतात.

छंद म्हणून अभंगाचे दोन प्रमुख प्रकार पडतात. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग. 

मोठा अभंग=  प्रत्येक चरणाचे चार खंड पडतात. पहिल्या तीन खंडांत प्रत्येकी सहा अक्षरे असतात. तर शेवटच्या खंडात चार अक्षरे असतात.

 दुसऱ्या व तिसऱ्या चरणखंडाच्या शेवटी यमक जुळविलेले असते. 

तर शेवटचा खंड चरणाला पूर्णत्व देणारा असतो.

उदा० 

सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी ।। 

कर कटेवरी । ठेवोनिया ।।

 लहान अभंग= प्रत्येकी आठ अक्षरांचे दोन चरणखंड असतात.

 व शेवटी यमक जुळवलेले असते. 

उदा० 

जे का रंजले गांजले ।

 त्यांसी म्हणे जो आपुले ।।

 अभंग रचनेत अक्षरसंख्येचे बंधन नेहमीच काटेकोरपणे पाळले जाते असे नाही. उच्चारानुसार कमीजास्त अक्षरेही वापरली जातात,  हे या छंदाचे वैशिष्ट्य आहे.

"अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची"  ही उक्ती प्रसिद्ध आहे.

विष्णुदासांनी "अभंग रचना" देखील केली आहे.

आज जे उदाहरण पाहू ते, लहान अभंग या प्रकारातील आहे. 


नित्य मातृतीर्थी स्नान। नित्य रेणुकादर्शन ॥ १ ॥

आदिमाये तुजपाशी। सर्वदेव तीर्थे काशी ॥ २ ॥

उजळोनी ज्ञानज्योती नित्य ओवाळू आरती ॥ ३ ॥

करु तीर्थामृतपान। हेची जप तप ध्यान ॥ ४ ॥

 करू त्रिकाळ वंदन । तोडू यमाचे बंधन ॥ ५ ॥

करु नित्य प्रदक्षिणा। तन, मन, धन दक्षिणा ।। ६॥

तुझ्या बसोनी द्वारात । गुण गाऊ दिन रात ॥ ७॥

नित्य पाहु तुझे मुख। हेचि आम्हा ब्रम्हसुख ।। ८।।

नित्य विष्णुदास म्हणे । कृपा लोभ असू देणे ।।९।।


लहान अभंग असल्यामुळे  आठ -आठ अक्षरांचे दोन चरण (म्हणजे ओळी ) आहेत. दोन्ही चरणात यमक साधले आहे. जसे  स्नान-दर्शन, पाशी -काशी,  ज्योती -आरती, पान-ध्यान  इत्यादी 

अर्थच्या दृष्टीने अत्यंत सोपा असल्यामुळे वेगळ्या स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही.

वर्ण्य विषय रेणुका, हा एकच ठेवूनही एकसुरीपणा नसणे, ही विष्णुदासांच्या रचनेची खासियत आहे, हे नक्की.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर

लेख पूर्ण वाचून झाला की कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट नक्की करा, कृपया. 


आणि तुम्हाला माझे ब्लॉग लेखन आवडत असेल तर माझ्या नावसह ही link शेयर करायला विसरू नका. 😊









Friday, September 26, 2025

रेणुका मातेची आरती.

 


🙏🙏सहावी माळ 27/09/2025🙏🙏


 श्री रेणुका मातेची आरती

आदिशक्तीची विविध रूपे भारतात विविध नावांनी ओळखल्या जातात. आदिशक्ती जिथं सर्वप्रथम प्रकटली ते तिचे मूळपीठ. रेणुकेला भारतभर विविध प्रादेशिक नावांनी पूजले जाते, ज्यात आई येल्लम्मा, एकविरा, यमाई, एलाई अम्मन, पद्माक्षी रेणुका, उच्छंगी मरियम्मा आणि इलाई अम्मा इत्यादी महत्वपूर्ण आहेत. तर ही रूपे ज्या स्थानी प्रकटली ती सर्व उपस्थाने होय.  

या आरतीत  एकविरा रूपातील आदिशक्ती रेणुका हिचे विष्णुदासांनी स्तवन केले आहे. 


जयदेवी जयदेवी जयजय एकविरे।

 श्रीरेणुके जननी जय जगदोद्धारे ॥

 जय जय ॥ धृ.॥ 

आदि नमोस्तुते सकळारंभे आनंते। 

जय उदयोस्तु नारायणी श्रीभगवते ।

 जय जगदंबे अंबे परम कृपावंते। 

जय जय षाड्गुणयुक्ते अंबे श्रीमंते ॥ १ ॥

जगाचा उद्धार करणाऱ्या रेणुकेचा एकविरा आईचा जयकार असो ॥ धृ.॥ 

अनंत अशी आदिशक्ती सर्वप्रथम तुला नमस्कार असो. जगदंबा, परम कृपाळू अंबा सहा गुणांनी युक्त, श्रीमन्त  अशा हे नारायणी, भगवती तुझा उदय होवो. 

 •यश, श्री (लक्ष्मी), औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे सहा गुण आहेत. या गुणांमुळे देवी 'षड्गुणसंपन्न'  असतें.



श्रीमृगराजाचल मुळपीठासन मूर्ती ।

 सतत विराजे गाजे दिग्मंडळी कीर्ती।

 न्हाणिती नित्य सरस्वती यमुना भागीरथी।

 सुरवर मुनिजन भावे, पूजार्चन  करिती ।। 

जय जय ॥ २॥

मूळपीठ माहूर येथे सिहंसनावर आरूढ अशी तुझी मूर्ती विराजमान आहे. तुझ्या पराक्रमाची कीर्ती दिग्मंडळात गाजते. गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्या तुला न्हाऊ घालतात. श्रेष्ठ देव, मुनिजन, भक्तिभावाने तुझी पूजा, अर्चना करतात. 

•स्नान करविणे या क्रियापदासाठी न्हाणविणे, किती छान आहे ना?  मराठीतील कित्येक शब्द आजच्या मराठीत दिसत नाहीत.



 मुगुट कुंडले मंडित पीतांबर पिवळा।

 कुंकुम कज्जल केशर उटि कंकण माळा ।

 कणक स्तंभ मय-मंडपी शोभे वेल्हाळा । 

त्रिकाळ होतसे मंगळ भुवनी सुखसोहळा ।।

 जय जय ॥ ३ ॥ 


डोक्यावर मुकुट, कानात कुंडले, अंगावर पिवळा पितांबर. काजळ, कुंकू, केशर उटी, कंकणे, माळा आदी सर्व ल्यायलेली आदिशक्ती सोन्याचे स्तंभ असलेल्या मांडवात शोभून दिसते. तिची तिन्ही त्रिकाल पूजा अर्चना होते.


घालुनि रांगुळी उजळुनि धुपदिप सुगंधी।

 सुवर्णपात्री पंचामृत क्षिर बासुंदी। 

वरण भात घृत पापड डाळ बेसन बुंदी।

 प्रार्थिती स्वार्थ-आनंदे जेवी आनंदी ।। 

जय जय ।। ४ ।। 

रांगोळी घातलीय. धूप दीप लावून वातावरण सुगंधित झाले आहे. सोन्याच्या पात्रात पंचामृत, दूध, बासुंदी, वरण, भात त्यावर तूप, पापड, डाळ, बेसनाच्या बुंदीचे लाडू असे चारही ठाव जेवण वाढून  चांगल्या इच्छेने आनंदाने विनंती करतो की हे आनंदी तू जेवण कर.

•स्वार्थ= या  शब्दाचे दोन प्रकारे विग्रह करता येईल. स्व+अर्थ =स्वतः च्या साठी.

सु+ अर्थ = चांगल्या इच्छेने. 

इथे दुसरा अर्थ अपेक्षित आहे.



फल तांबूल दक्षिणा, सुभूषण सुमने।

 भरली ओटी मौतिक माणिक मणि सुमने।

 करूनि आरती वाहिली पुष्पांजली सुमने

 विष्णुदास म्हणे करि पूर्णार्चन सुमने ।।

 जय जय ।। ५ ।।

जेवणा नंतर, तांबूल, दक्षिणा, फळे,  दागिने आणि धत्तूर फळ (काटेरी फळ ), माणिक, मोती आणि गहू यांनी ओटी भरली. त्यानंतर सुंदर मान असलेल्या रेणुकेची आरती करून मग पुष्पांजली वाहिली. 

अशा प्रकारे विष्णुदास कवी अत्यन्त चांगल्या मनाने पूर्ण पूजा करितात.  


या कडव्यात सुमन शब्द चार अर्थाने आला आहे. धोत्र्याचे काटेरी फळ, गहू, चांगल्या मनाची रेणुका माता आणि चांगल्या मनाचे कवी विष्णुदास.



"षोडशोपचारपूजा" मधील सोळा उपचार पुढील प्रमाणे  (1)आवाहन , (2) आसन, (3)पाद्यपूजा , (4)अर्घ्य, (5)आचमन, (6)स्नान , (7)वस्त्र-उपवितक, (8)गंध-पुष्प-भूषा-अलंकार , (9) धूपदीप , (10) नैवेद्य, (11) तांबूल , (12) प्रदक्षिणा , (13)नमस्कार, (14)स्तोत्र, (15) निराजन , (16) उद्वसन (विसर्जन).

ह्या आरतीतून यातील बरेच उपचार उल्लेखले आहेत. जसे👉



पहिल्या कडव्यात देवते चे आवाहन केले आहे.

दुसऱ्या कडव्यात  देवतेचे स्नान, सम्मार्जन , पूजन, अर्चन केले आहे.

तिसऱ्या कडव्यात कुंकूम, केशर, उटी, वस्त्र, आभूषणे अर्पण इत्यादी आहे.

चौथ्या कडव्यात रंगावली, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी आनंदपूर्वक  अर्पण केले आहे.

पाचव्या कडव्यात तांबूल, फुलांचे दागिने, ओटी भरणे, आरती, मंत्रपुष्पांजली वगैरे करून पूजा पूर्ण झालेली असे सांगितले आहे. 

तर अशाप्रकारे ही एक परिपूर्ण आरती आहे.


©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर

लेख पूर्ण वाचून झाला की कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट नक्की करा, कृपया. 


आणि तुम्हाला माझे ब्लॉग लेखन आवडत असेल तर माझ्या नावसह ही link शेयर करायला विसरू नका. 😊








लो लो लागला

  🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏 #श्री रेणुका मातेची आरती. ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यां...