Sunday, December 6, 2015

स्त्री - त्रिकालभिनंदनार्हा !

‘‘स्त्रियश्चरित्रं पुरुषस्य भाग्यम्’’ 

हे वाक्य ऐकल्याबरोरबर मनात अर्थ केला जातो की, -स्त्रीचे सत्शीलत्व पुरुषाकरिता भाग्यच होय’. म्हणजेच सुशील स्त्री पुरुषाला दैवानेच लाभते! परंतु माझ्यामते या उक्तीचा अर्थ असा नाहीच. चरित्र म्हणजे वर्तन. स्त्रीचे चरित्र म्हणजे वर्तन अर्थात अनुकूल वर्तन पुरुषाकरिता भाग्यप्रद होय असेच या उक्तीतून अभिप्रेत आहे असे मला वाटते.स्त्रीचे वर्तन बरेचदा अनाकलनीय असते. दुसर्यांसाठी अनाकलनीय परंतु तिच्यासाठी ते मनःपूत म्हणजे तिच्या मनाला योग्य वाटेल असेच असते. मनःपूत म्हणजे स्वैर नाही उलट मुक्त, स्वतंत्र असे वर्तन होय. कसे? तर गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा इत्यादी वैदिक स्त्रिया ज्याप्रमाणे मनःपूत वागत असत त्याप्रमाणे.

लोपामुद्रा अगस्तीऋषींची पत्नी होती. विवाहसमयी दोघांमध्येही अलिखित संकेत ठरला होता की‘दोघांनीही एकमेकांचा मान सांभाळायचा’ दोघेही ब्रह्मवेत्ते होते. एकमेकांसह त्यांचा संसार उत्तम चालू होता. एकदा अगस्तिऋषी यात्रेला जाण्यास निघाले. लोपामुद्रेने विचारले कुठे निघालात? सर्व शिष्यांसमोर अगस्तींनी जे उत्तर दिले त्यामुळे तिच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली. लोपामुद्रा काहीच बोलली नाही. ऋषी निघून गेले. इकडे मानभंग झालेली  लोपामुद्रा कावेरीनदी रुपाने आश्रमाजवळून वाहू लागली. अगस्ती परतल्यावर त्यांना त्यांच्या चूकीच्या वागणूकीचा पश्चात्ताप झाला. पण आता वेळ निघून गेली होती. अशीच एक कथा मराठी वारकरी संप्रदायातही आहे. राका-बाका हे दोघे पतीपत्नी होते. दोघेही पांडुरंगाचे भक्त. दिवसरात्र विठ्ठलभक्तीत मग्न राहात होते. एकदा लाकडं आणण्यासाठी दोघेही जंगलात गेले. राकाला सोन्याचा दागिना दिसला. त्याला वाटले की  बाका स्त्री आहे, तिला दागिन्याचा मोह होईल. मग ती ईश्वरभक्तीपासून दूर होइल. असा विचार करुन त्याने दागिन्यावर माती  लोटली. दुरुन हे सर्व ती बघत होती. बाका विचारते, ‘‘हे काय चाललं आहे?’ राका स्वतःच्या मनातले विचार सांगतो. त्यावर बाका म्हणजे, ‘आहा रे, तुमची विठ्ठलभक्ती, माती आणि सोनं यात भेद करता होय?’’स्त्रिया अशा मनःपूत स्वतंत्र वचार करतात व स्वतःच्या विचारांनीच वागतात. म्हणून पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांना अनुकूल वर्तन करणारी स्त्री लाभणे त्यांच्या दृष्टीने भाग्यकारकच ठरते ना. म्हणून पुरुषमानसिकतेनुसार ‘स्त्रियश्चरित्रम् पुरुषस्य भाग्यम्’ ठरते.


केवळ भारतीय समाजातच नाही तर सर्व जगात स्त्रीला अबला म्हटल्या जाते. कां? खरे तर मानसिक दृष्टया महिला पुरुषांपेक्षा जास्त सुदृढ असतात. प्रेमभंगामुळे अनेक पुरुष ‘देवदास’ होतात, महिला मात्र खचत नाहीत. एखादी स्त्री दुर्दैवाने विधवा झाली तर ती कशीबशी आपल्या लेकरांना वाढवते. घरी-दारी जे जमेल, झेपेल ते काम करुन मुलांना सन्मानाने वाढवते. तिचं जीवन कितीही  दुःखमय असले तरी ती व्यसनात गुरफटत नाही. या उलट एखादा पुरुष विधूर झाल्याबरोबर दुसरं लग्न करुन मोकळा होतो. अथवा व्यसनात बुडून स्वतःची कर्तव्य, दुःख विसरण्याचा प्रयत्न करतो. शारीरिक दृष्ट्या सुध्दा स्त्री हृदय पुरुषहृदयापेक्षा बळकट असते. म्हणूनच ती प्रसववेदना सहन करु शकते. तसेच हृदयविकार सुध्दा स्त्रियांना कमी होतो. स्त्रीचा मेंदू एकावेळी चार कार्य करु शकतो. हेच पुरुषाचा मेंदू दोनच कार्य करु शकतो. स्त्री स्वतःच्या वजनापेक्षाही अधिक वनज उचलू शकते. पुरुष हे करु शकत नाही. स्त्री गर्भ विपरीत परिस्थितीतही वाढतो, पुरुषगर्भ गळून पडण्याची शक्यता जास्त असते. स्त्रियांमध्ये समायोजन शक्ती जास्त असते.अशी मनस्विनी स्त्री कठीण पण कोमल असते. कशी? तर बीजांकूराप्रमाणे. बीजांकूर कसा नाजूक, कोमल असतो. पण तरी कठीण भूकवच भेदून जमिनीबाहेर येतो. तशीच स्त्री शरीराने कोमल असून मनाने कणखर होऊन कठीण परिस्थितीवर मात करीत सन्मानाने जगते.


परचक्राच्या सतत आक्रमणामुळे मूळात सहिष्णु असलेली भारतीय संस्कृती बदलली. वैदिक काळात दिसून येणारे स्त्रीस्वातंत्र्य पुढे लुप्त होत गेले. स्त्री म्हणजे बंदिनी, रुढी-परंपरा,संस्कृती संस्कार इत्यादींच्या बन्धनात जखडलेली स्त्री,  म्हणजे बंदिनीच. पण बरेचदा हे बन्धन कुटुंबाच्या प्रेमामुळे, कर्तव्यभावनेने तिनेच स्वेच्छेने स्वीकारलेले असते. प्रत्येक स्त्री स्वतःची लक्ष्मणरेखा स्वतः निश्चित करते. त्यानंतर ती स्वतःच कधीही लक्ष्मणरेखा ओलांडत नाही. म्हणूनच आजही समाजात पुरुषांपेक्षा स्त्रियावंर अधिक विश्वास ठेवला जातो.स्त्रियांमध्ये अग्नीप्रमाणे स्वहा आणि स्वधा अशा दोन शक्ती असतात. स्वहा म्हणजे स्वतःहून आहूती होण्याची क्षमता तर स्वधा म्हणजे स्वतःला धारण करण्याची क्षमता. कोणतीही स्त्री स्वतःच्या कुटुंबासाठी स्वत्व अर्पण करण्यासही सिध्द होते. उलट परिस्थितीत ती कशाही प्रकारे स्वत्व राखते. पुराण काळापासून आजवरच्या अनेक स्त्रियांच्या उदाहरणातून हे सिध्दच झाले आहे. दुर्गा, चण्डिका, अहल्या, मन्दोदरी, सीता, कुन्ती, गांधारी, द्रौपदी, जिजाबाई, झाशीची राणी, दुर्गावती इत्यादी.


आजचा काळ विज्ञान तन्त्रज्ञानाचा काळ आहे. या तंत्रयुगातही स्त्रीमन,स्त्रीवर्तन,स्त्रीभावना मानसोपचार तज्ज्ञांच्याही संशोधनाचा विषय ठरतो. अजून तरी स्त्रीमन समजून घेणारे यंत्र विकसित झालेले नाही.सांख्य दर्शनानुसार ‘प्रकृतीच माया निर्माण करते. मायेत अडकलेला पुरुष संसार करतो. तो ज्ञानानेच मायाबंधनातून मुक्त होऊ शकतो. म्हणजेच पुरुषाला मुक्त होण्यासाठी सुध्दा प्रकृतीची आवश्यकता असतेच प्रकृतीशिवाय पुरुष सचेतन असूनही निष्क्रिय असतो.


मूळात जड असलेली (निर्जीव असलेली) प्रकृती, सचेतन परंतु निष्क्रिय पुरुषाला सक्रिय करुनच ज्ञानमार्गापर्यंत नेते. मगच तो पुरुष मोक्षमार्गावर जाऊ शकतो.’ मानवी जीवनातही स्त्रीच पुरुषाला प्रेरणा देते. कार्य करवून घेते. प्रोत्साहन देते. स्त्रीसाठीच, स्त्रियांमुळेच स्त्रियांच्या सहकार्यानेच पुरुष कार्यरत होतात. रामायण, महाभारत स्त्रिसाठीच घडले नां.स्त्रीमहिमा जाणूनच शब्दप्रभुंनी शक्ती, युक्ती, दया, क्षमा, शांती, लक्ष्मी, विद्या, भावना, बुद्धी, सत्तासुंदरी इत्यादी अनेक सुंदर शब्द स्त्रीलिंगामध्येच योजले असतील काय?स्वतःच्या उदरातून पुरुषाला जन्म देणारी, त्याचे लालन पालन करणारी, त्याचा अहंकार, अस्मिता जोपासणारी, स्वतःवर रुढीबंधने लादून घेणारी, पुरुषाला प्राधान्य देऊन स्वतःकडे दुय्यमत्व सहज घेणारी, इतकेही करुन आपण काही विशेष करतोय असं न दाखविणारी स्त्री खरोखरच त्रिकालभिनंदनीय नाही काय?

सौ. प्रज्ञा शरद देशपांडे
हडस कनिष्ठ महाविद्यालय
नागपूर.

Tuesday, November 17, 2015

माणसाला जीवन जगण्यासाठी काय लागते ?

माणसाला जीवन जगण्यासाठी काय लागते ? निस्संशयपणे----अपूर्णता , अज्ञान, गैरसमज, स्वप्न------हेच खरे आहे.  स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा , गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा.-----कित्तेकदा हे गाणे ऐकले अन् अचानक अर्थ गवसला , की मानवी सुखाची परिसीमा अपूर्णता, अज्ञान, गैरसमज, स्वप्न यातच सामावलेली आहे.

                                                           अपूर्णता हीच पूर्णता

मानवी जीवनात एवढेच कशाला संपूर्ण विश्वात अपूर्णते एवढे पूर्ण काहीही नाही. निसर्गाने सृष्टीतील कोणताही जीव परिपूर्ण बनविलेला नाही . जीवसृष्टी स्त्रीलिंगी, पुल्लिंगी यात विभागलीय. जेथे उभयलिंगी वा नपुंसकलिंगी जीव आहे तेथे अपरिहार्यपणे पूर्णत्व आहे असे म्हणू शकतो.पण उत्क्रांत होताना उभयलिंगी जीव अल्पतर होत गेले . म्हणजे पूर्णत्वापासून अपूर्णत्वाकडेच वाटचाल दिसतेय.          

असे म्हणतात कि मानवीमेंदू 1/6 टक्केच कार्यरत असतो. म्हणजे अपूर्णमेंदुच मानवीजीवन चालवतो.आजवर कोणत्याही मानवाने 100 टक्के मेंदूचा वापर करून जीवन व्यतीत केलेय असे सिद्ध झाले नाही. जगद्विख्यात नोबेल पारितोषिकविजेते भौतिकशास्त्रज्ञ आईनस्टाईन म्हणतात,माझ्या कार्यक्षम मेंदूचा फक्त 25 टक्के उपयोग मला करता आला. म्हणजे अपूर्णता जीवनसाफल्याची पूर्णता होय. अपूर्णतेमुळेच एक जीव दुस-या जीवाचा आसरा, सहारा घेत असतो.एक प्रजाती   दुस-या प्रजातीला पूरक ठरते म्हणजे कोणताच जीव परिपूर्ण नाही हेच खरे.         दुनियेत आढळणारी विविधता, जैवविविधता ही अपूर्णतांची विविधरूपे वा आविष्कार नव्हेत का? गुलाबाला सुगंध,रंग दिला पण काटेही दिले. मोग-याला रंग नाही, विड्याच्या पानाच्या वेलीला(नागवेलीला) फुले नाहीत , चंदनाला फळे नाहीत, हत्तीला चपळता नाही , सशाला शिंग नाही, हरिणाला भारदस्तपणा नाही, मोराला आवाज नाही, कोकिऴेला रूप नाही; खरंच अपूर्णतेमुऴे सृष्टी किती परिपूर्ण, उपयुक्त, मोहक, रमणीय झालीय ना। पूर्णता असती तर दुस-या कशाचीही गरजच नसती ना।    

फूल उमलते, भुंगे येतात, परागकण त्यांच्या पायाला लागतात. भुंगे इकडून तिकडे मधासाठी फिरतात,bत्यांच्या फिरण्याने परागकण या फुलांवरून त्या फुलांवर जातात. फुलांची फळे होतात. फळे पिकतात. पक्षी येतात. ते खातात. बिया जमिनीवर पडतात . ऊन्ह-पावसाने त्या रुजतात. त्यातल्या काही जगतात, त्यांची झाडे होतात. पुन्हा फूले, पुन्हा फळे-------अशाप्रकारे या निसर्गचक्रामध्ये नुसते झाड स्वतःला पुन्हा पुन्हा रुजवू शकत नाही, त्यासाठी भुंगा, पक्षी, प्राणी, सूर्यप्रकाश, जमीन,  पाणी, वारा हवेतच. कोणीही स्वयंपूर्ण नाही. म्हणूनच तर विविधतेने नटलेल्या या सृष्टीत रमणीयता आहे.
मानवी जीवन तर अतिशय अपूर्ण असल्यामुऴेच कुटुंब, समाज, राष्ट्र इत्यादिंच्या मदतीने त्याचे जीवन पूर्ण होते.
अपूर्णता हीच खरी पूर्णता होय , नाही का?
           
                                                  अज्ञान हेच मोठे ज्ञान आहे ।

असे म्हणतात कि, अज्ञानात सुख आहे. तिस-या टप्प्यात पोहचलेल्या दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तीला त्याच्या आजाराचे खरे ज्ञान झाले असेल तर उमेद खचून तो वेळे आधीच मरण पावतो. हेच त्याला आजाराबद्दल पहिलेपासून अज्ञानी ठेवले तर जगण्याचे दिवस वाढतात, त्रास जरी झाला तरी उमेद संपत नाही. रुग्णाचे सोडा, परीक्षार्थी बद्दल बघू या. परीक्षाजवळ आल्यावर ,"माझा अभ्यास पूर्ण झालाय" असा विश्वास ज्याच्यात असेल तो सुखाने परीक्षेला सामोरा जातो, मग भलेही त्याचा अभ्यास अपूर्ण असेल. म्हणजे अज्ञान असूनही त्याला समाधान असते म्हणून तो संकटांना सामोरा जातो. लहान, निरागस बालक सहजपणे वडिलांच्या बॉसशी बिनधास्तपणे बोलतो. अज्ञानामुळेच ना.! आजवरचा इतिहास सांगतो कि, किशोरवयीन बालके मोठमोठे पराक्रम करू शकले परिणामाबद्दल अज्ञान , दुसरे काय? स्वतःची कुवत, शक्ती, ताकद, बल पूर्ण ओऴखलेली व्यक्ती अभेद्य, अदम्य, अशक्यप्राय पराक्रम करूच शकत नाही. असले पराक्रम करण्यासाठी "अज्ञानी जिगरच "  कामी येतो. "मला हे सर्व येते" या (गैर का असेना) समजातूनच कोणतीही व्यक्ती कार्य करू शकते. या जगात ज्ञानापेक्षा अज्ञानामुऴे जास्त शोध लागले आहेत. भारतासाठी जगभ्रमण करायला निघालेली वास्कोदगामाची स्वारी दक्षिण अफ्रिकेच्या टोकाला पोहचली, मग कळले हा भारत नाही तर त्याने त्या भूभागाला  "केप ऑफ गुड होप"  म्हटले. भारत शोधायला निघालेला अमेरिगो अज्ञानामुळेच अमेरिकेत पोहोचला, अज्ञानामुळे नवी भूमी मिळाली. स्वतःच्या भूमीत पराभूत झालेला सिकंदर केवळ अनभिज्ञेमुळे स्वतःला जगज्जेता म्हणवून घेऊ शकला ना!

आता हेच बघा ना, डिग्री रूपी ज्ञान घेतले तरी जगरूपी पुस्तक ज्ञात होईल असे नाही. डिग्री मिळाल्यामुळे मी 'ज्ञानी'झालोय ही भावना होणे हेही अज्ञानाचे प्रगटीकरणच नव्हे का?  "पोथी पढे पढे पंडित हूआ न कोई" असे कबीर उगीच म्हणाले असतील काय?  उलट डिग्री घेणे म्हणजे विशिष्ट विषयांचे मर्यादित ज्ञान कमावणे अन् अमर्याद अज्ञानात खुश होणे असा अर्थ होत नाही काय? उलटपक्षी कोणतीही डिग्री न घेणे म्हणजेही विशिष्ट ज्ञानापासून वंचित राहाणे, म्हणजे अंशतः अज्ञानीच राहाणे , होय ना!  एकूण काय, शिका किंवा नका शिकू 'अज्ञान'चिरंतन आहे.
उद्या काय होणार याचे ज्ञान नाही म्हणून आज आपण सुखाने स्वप्न बघू शकतो ना ! आशा, अपेक्षा, स्वप्न जागविणारे अज्ञान हेच मोठे ज्ञान नव्हे का?"

                                           "गैरसमज" समाजधारणेचा पाया!

समज ही ज्ञानातून उपजते तर गैरसमज हा अज्ञानातून! जेवढा मोठा गैरसमज तेवढा सुखी समाज. अख्ख्या गावात माखनचोर, नटखट म्हणून गाजलेला कान्हा यशोदेसाठी साधाभोळाच होता, का?  यशोदेचा गैरसमज दुसरे काय!  आजही मातृत्वाच्या चष्म्यातून बघताना होणा-या (गैर)समजामुळे अख्ख्या आऴीत गाजलेलं बाळं, त्याच्या आईसाठी गुणी श्रावणबाळच असतो. गैरसमजावर आधारित समाजधारणेमुळेच  "आपला तो बाब्या
 दुस-याचा तो कारटा"  ही म्हण रूढ झाली ना! माझ्या सासुपेक्षा तिची सासू प्रेमळ आहे, किंवा उसकी साडी मेरी साडीसे सफेद कैसी,  किंवा other's garden are always green, किंवा (स्वतःची) पत्नी ही क्षणाची एम्टिव्ही अन् आयुष्यभराची डिडिमेट्रो असते किंवा गर्लफ्रेंड वा लिव्हीनपार्टनर बायकोपेक्षा समजदार असते, किंवा आमच्या ह्यांच्यापेक्षा तिचा नवरा जास्त केअरींग आहेत किंवा मराठी शाळांपेक्षा इंग्रजी शाळा गुणवत्तापूर्ण असतात किंवा सरकारी इस्पितळांपेक्षा खाजगी इस्पितळे चांगली सेवा देतात किंवा देशी वस्तुंपेक्षा विलायती वस्तू दर्जेदार असतात किंवा या राजकीयपक्षापेक्षा तो राजकीयपक्ष चांगला आहे, हे सर्व गैरसमज भारतीयांना दररोज जगण्याची नवी उमेद देतात हे सत्य नव्हे का? कुठल्याही क्षेत्रात जा वास्तवापेक्षा प्रतिमा मोठी ठरत नाही का? प्रतिमेच्या प्रेमात पडून (म्हणजे गैरसमजामुळेच)लोकं कोणा कोणाला डोक्यावर घेतात ना! म्हणजे जगण्यासाठी, समाजधारणेसाठी गैरसमज गरजेचे असतात. "तो माझ्यापेक्षा जास्त नशीबवान आहे, त्याला काहीही न कष्टता आयते मिळाते" अशा गैरसमजातून लोकं स्पर्धा, ईर्षा वगैरे करतात, समाज गतिमान होतो. "मी म्हणून सहन करते, दुसरी कोणी असती तर---- ,  मी फार सरळ आहे, माझ्यासारख्या सरळ लोकांची दुनियेला कदरच नाही, माझ्यावाचून पान नाही हालत" इ. इ गैरसमजुतींमुळे लोक संसार करतात, पुढे पुढे करतात, प्रगती करतात. एखादा रंग, खडा, वस्तु, क्रमांक वगैरे माझ्यासाठी "लकी" आहे. अमुक एका महाराजांचे म्हणणे अगदी खरे होते. अमुक ठिकाणचा ताबीज "पॉवरफूल" आहे, अमक्या-तमक्याच्या प्रेअरने रोग दूर होतो अशा अनेक गैरसमजुतींमुळे समाजात हवा, फॅशन, फॅड पसरतात. त्यातून काहींना पोट भरायचा धंदा मिळतो तर काहींना प्रतिष्ठा मिळते तर काहींना मानसिक बळ. मिळो बापडे,जो जे वांछील तो ते लाहो-------. अशाप्रकारे गैरसमज हा समाजजीवनाचा मोठ्ठा आधारस्तंभ आहे हे सिद्धच होते ना!

                                           
  स्वप्न-एक रम्य वास्तव-----

स्वप्न म्हणजे सत्यात न आलेले वास्तवच होय ! शेखचिल्ली, मुंगेरीलाल कां आवडतात? त्यांच्या स्वप्नाळूपणामुळेच. स्वप्न नसते तर क्षणोक्षणी आत्महत्याच झाल्या असत्या. डोळ्यात स्वप्न, मनात इच्छा, भावनांवर ताबा, हातात ताकद, डोक्यात ध्येय,  कृतीत सातत्य असेल तर "करलो दुनिया मुठ्ठी मे" सहज होते. डोके, शरीर जे करु शकत नाहीत , ते केवळ स्वप्नांमुळे पूर्ण होऊ शकते. ज्या डोळ्यात स्वप्न नसतात ते डोळे मृतप्रायच ठरतात. झोपेत, जागेपणी केव्हाही स्वप्न पाहाणे उत्तमच. स्वप्न पहाण्यासाठी झोपलेच पाहिजे, असेही नाही. उलट झोप उडवते तेच खरे स्वप्न. स्वप्न पहाणे व ते प्रत्यक्षात साकारणे यात महद् अंतर आहे. आपापल्या ठिकाणी दोन्हीही चांगलेच. स्वप्न पाहिली नाहीत तर साकारणार कशी? अन् साकारली तर ती स्वप्न कशी?  ते तर वास्तव होईल. वास्तवापेक्षा स्वप्न जास्त रिझवतात.स्वप्न साकार करण्यासाठी केलेला प्रवास अधिक उत्कण्ठावर्धक, सजग, जिवंत, रोमांचक असतो तेवढे वास्तव मनाला भिडत नाही.

आधुनिक शिक्षण पद्धतीत खरे तर असे धोरण असावे की, विद्यार्थ्याला काही नाही शिकवले तरी चालेल, जो तो आपापल्या अज्ञान, गैरसमज, अपूर्णता यातून शिकूनच घेईल पण प्रत्येक बालकाला भरपूर स्वप्न पहायला शिकवा. मोठमोठी स्वप्न त्यांच्या डोळ्यात, डोक्यात जागवा. आजूबाजूला अखंड, निरंतर, अविरत स्वप्नरंजन होऊ द्या. विद्यार्थीच कशाला, संपूर्ण देश स्वप्नमय करा. खरेच, स्वप्ना एवढे रम्य, मनोहर या विश्वात काहीही नाही. खरय ना?

एकूणच काय? मानवाला जगण्यासाठी अन्नवस्त्रनिवा-या पेक्षाही अपूर्णता,अज्ञान, गैरसमज, स्वप्न हेच जास्त उपयुक्त असतात.या चौघांचे कवच लाभलेला माणूस जास्त सकारात्मक,जास्त सुखी असतो.कमतरता,न्यून,उणीव याची जाणीव अजून काही नवे शोधायला प्रेरक ठरते.

डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे, हनुमाननगर, नागपूर

Monday, October 12, 2015

व्हॉट्सऍपमय जग

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म...... असा एक अभंग ऐकला आणि आजच्या जगात हा अभंग थोडाबदल करुन कसा होईल याचा विचार केला उत्तर सुचले ‘‘व्हॉट्सऍपमय जग व्हॉट्सऍपचा धर्म......’’

व्हॉट्सऍपचे स्वरुप :

माहिती तंत्रज्ञानाचा विकास झाला आणि आभासी जग निर्माण झाले. घरोघरी खेडोपाडी, महानगर, शहरे, सर्वांमध्ये व्हॉट्सऍप सर्वमान्य झाले. स्वाधीनम् सुलभम् चापि ज्ञानानंदादि वर्धकम् म्हणजे स्वाधीन असलेले, सुलभ असे ज्ञान आनंद वाढविणारं असे ज्याचे रास्त वर्णन करता येऊ शकते ते म्हणजे व्हॉट्सऍप. आजची स्थिति अशी आहे की घरातल्या घरातसुद्धा व्हॉट्सऍपवर संवाद साधतात काही जण. आज व्हॉट्सऍप ने सामान्यांचे जीवन व्यापून टाकले आहे. कराग्रे वसते लक्ष्मी ऐवजी कराग्रे वसते अॅंण्डराईड असे व्हायला लागले आहे. जिकडे पाहावे तिकडे टू जी, थ्री जी, फोर जी आहेतच. "स्टे कनेक्टेड एव्हरीव्हेअर"! मग काय जिथे तिथे मोबाईल आणि त्यात व्हॉट्सऍप!

                                                       व्हॉट्सऍपची व्याप्ती

मनोरंजनाचे साधन :

कोणी कितीही नावं ठेवोत पण व्हॉट्सऍप अतिशय करमणूक करते. किती विविध प्रकारचे जोक्स, व्यंगचित्रे, वात्रटिका, विडंबनगीत असे दिवसभर येतच राहतात. विविध विषयांची कितीतरी माहिती दिवसभर वाचायला मिळते. एकडे घटना घडली की त्याचे खुसखुशीत, लाघवी वर्णन, फोटो धाडधाड यायला सुरु होते. पुन्हा तुम्ही कोणत्या ग्रुप मध्ये आहात त्यानुसार मनोरंजनाचा स्तर, पोत, अनुभवायला मिळतो. बालिश ते फुलिश, स्टायलिश ते लॅव्हिश असे कितीही आणि कोणतेही मनोरंजन होवू शकते. घर बसल्या दुनियाभरातील अद्ययावत मनोरंजक गोष्टी ‘हाती’ येतात. एकटं वाटायला जागाच नसते. पूर्वी प्रेमात पडलेली माणसं "तनहा तनहा रहता हूँ मै तो भरी मैफिलमें" अशा अवस्थेत राहात असत. पण आजकाल व्हॉट्सऍपमुळे भर बाजारात, कार्यक्रमात, कॉलेजात कुठेही ‘‘भर मैफिलीत एकाकी लोकं बघायला मिळतात’. स्वतःशीच असणे, स्वतःचे फोटो (सेल्फी) स्वतःच बोलणे (व्हाइसनोट) इत्यादि अनेक लीला सहज दिसतात. लहान मुलगा गोंधळ करीत असेल, ऐकत नसेल त्याला अॅपवाला स्मार्ट फोन द्या तो लगेच शांत होतो! काय परिणाम आहे नाही? कॉलेजातील तरुण तरुणी तर दिवाणेच आहे या स्मार्टफोनचे. पण आजकाल बच्चे तो बच्चे बापरे बाप म्हणायची वेळ आली आहे. चाळीशी ते साठी अशी प्रगल्भ मंडळी यात आकंठ डुंबली आहेत. शिवाय आजुबाजुला एक नवाच अनुभव आलाय कि घरातील ज्येष्ठ नागरिकांना वाढदिवसाची अत्युत्तम भेट म्हणजे स्मार्टफोन. एखाद्या नातवाला शिकवणीची जबाबदारी देवून द्यावी थोडयातच दिवसात ‘‘आमच्या काळी नव्हतं व्हाटसशाप कां काय त्याचं खुळ बरं ’’ असं तावातावाने बोलणारे आजोबा आजी अलिबाबाच्या गुहेत शिरल्यासारखे गुंग होतात. पहिले फक्त ‘‘वाचक’’ असलेले हे ग्रुप मेंबर हळूहळू स्माईली, लाईक्स, प्रार्थना, टाळया वगैरे वापरु लागतात. इकडून तिकडे पोस्टू लागतात. हळूच फोटो काढू लागतात, मग व्हाईस रेकार्ड अन् काय अन् काय? ‘‘अब आ गया जिंदगी का मजा’’ असे भाव त्यांच्या चेहऱ्यांवर दिसू लागतात. अशा प्रकारे आबालवृद्धांना मोहिनी घालणारे व्हॉट्सऍप जीवीचा विसावा नव्हे काय?

माहितीचा खजिना :

"यत्र विश्वं भवति एक नीडं" अशी स्थिति केवळ व्हॉट्सऍपमुळे शक्य झालीय. यात अतिशयोक्ती नाहीच. आज विश्वातील कोणतीही माहिती असू देत इकडून तिकडे सारखी फिरत असते. जयन्ती, पुण्यतिथी, दिनविशेष, पुण्यस्मरण, महत्वाच्या घडामोडी अज्ञात कवी, लेखक, समाजसेवक, उद्योजक, नेते यांच्या जीवनकथा इतर राज्य देश, इत्यादीमधील प्रथा, परंपरा, सणवार, विविध खाद्यपदार्थ कला, गीत, नृत्य, नाटक असे जीवनातील प्रत्येक पैलूंना स्पर्श करणारी, नीट, सुसंगत, सविस्तर माहिती या व्हॉट्सऍपमुळे हाती येते. विविध भाषेतील अतिशय उपयुक्त माहिती सर्वांना खुली झालीय ती याच मुळे.

‘इंग्रजी, मराठी, हिन्दी अशा सर्वभाषांमधून उत्तम माहितीचा संग्रह सर्व ग्रृपमधून फिरत असतो. त्यामुळे इंग्रजी न येणाऱ्या किंवा हिंदीत गती नसलेल्यांना ती भाषा उमजायला लागते इतकेच नाही तर संस्कृतस्तोत्र, संस्कृत गीत सुद्धा सामान्यग्रुप वा कौटुंबिक ग्रुप मधून फिरत असतात. किती कळते पेक्षा पाठवावेसे वाटते, पहावेसे वाटते, ऐकावेसे वाटते हे महत्वाचे कुणीही न थोपवता कुठेही जबरदस्ती न होता विविधभाषा ऐकण्यात, वाचण्यात येतात त्यातून एक भाषिक सुसंवाद साधला जातोच ना!

आज व्हॉट्सऍपवर अनेक ग्रुप (गण) असतात. एक व्यक्ती एक ते 100 कितीही ग्रुपमध्ये सहभागी असतो. या सहभागामुळे व्यक्ती कुटुंबाशी, समाजाशी, विशिष्ट ध्येय, गट, भाषागट संस्था, समुहाशी जोडल्या जातो. यात कुठेही भौगोलिक अंतर वा लिंगभेद वा वयाचे अंतर इतकेच काय धर्म, जात, आर्थिकस्तर हे अडचणीचे ठरत नाही

कधी चुकून विशिष्ट विषयांनी प्रेरित मजकुर आला की त्यावर खंडन मंडनपर जोरदार वादही होतात. दुसऱ्यांचे मत असे असू शकते, ते त्याचे मत आहे, असा लोकशाही संम्मत समंजसपणा याच ठिकाणी पहावयास मिळतो. शासकीय परिपत्रके, कार्यालयीन आज्ञपत्रे, कामकाजासंबंधी विशेष नोंदी या आणि अशा अनेक बाबींचे संवाहन केंद्र म्हणजे व्हॉट्सऍप. ‘करलो दुनिया मुठ्ठी में’ व्हॉट्सऍपने शक्य भासते.

समाज जोडणीसाठी :

टि.व्ही. पेपरात, बातम्या येतात की व्हॉट्सऍपमुळे ‘हरवले ते गवसले’ दूरदूरचे नातेवाईक मित्र, संबंधी आज एकमेकांशी ‘आभासी’ (Virtual) पद्धतीने जोडले गेलेत. ज्या नातेवाईकांचे जन्मदिवस माहित नव्हते ते कळायला लागले. घरोघरी काय चांगले सुरु आहे याचे सचित्र वार्तांकन शुभेच्छा, कौतुक सोहळे व्हॉट्सऍपमुळे शक्य झाले. रक्ताचे नाही तर अनुबंधाची नाते निर्माण झाले. मायासुराच्या मायावी दुनिये सारखी ही मायावी, आभासी दुनिया आहे. सिझन बदलला की स्वेटर, शाली, कुलर, एसी, छत्री, रेनकोट यांची देवाणघेवाण चालते. दागदागिने, कपडेलत्ते, नवनव्या वस्तु (फोटो, व्हिडिओच्या रूपात) नजराणे म्हणून पाठविले जातात. ‘दानी कर्ण’ पुराणात एकच झाला पण व्हॉट्सऍपवर हजारो होतात.

खरी खरी समाजसेवा करणारे ही ग्रुप असू शकतातच. आणि त्यांचे कार्य हातातील यंत्रावर एकट्यात बघून स्वतःच्या ‘क्षुद्र’पणाची जाणीव होते. ‘मी’ मोठा व्हायच्या आतच इतरांचे उपक्रम, कार्य ‘प्रत्यक्ष’ पाहून पाय जमिनीवर राहतात. हा ही मोठा फायदाच म्हणावा. शिवाय दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होण्याची सुदृढ समाजाची लक्षणे व्हॉट्सऍपवर दिसून येतात दुसऱ्यांच्या दुःखातही धावून जातात. अडचणीत उपाययोजना सुचवितात. मार्ग काढण्यात मदत करतात. ‘भाव तसा देव’ जसे म्हणतात तसे ज्या गरजेतून तुम्ही व्हॉट्सऍप वापराल त्या गरजेनुसार तुम्हाला ते साथ देते. एकूणच व्हॉट्सऍप आधुनिक परोपकारी गंपु ठरु शकतो.

मर्यादा :

आज अॅप, स्मार्टफोन, व्हॉट्सऍप, सर्वव्यापी, सर्वस्पर्शी झालेयत. पण ते साधन आहे यातच त्याची मर्यादा आहे.

1) पृथ्वी गोल आहे हे भौगोलिकसत्य व्हॉट्सऍप पटवून देते. आपण सेंडलेली (पाठवलेली) माहिती फिरफिर फिरुन पुन्हा आपल्यावरच पोस्टल्या (पाठवल्या) जाते. कित्येक माहिती चऱ्हाटासारखी तेथल्या तिथे घुटमळते.

2) अंधश्रद्धा -श्रद्धा यांच्या विवर्तात सापडून लोकांच्या भावनांना साद घालत. ‘‘11 जणांना कळवा चार दिवसात अनपेक्षित लाभ होईल’’ असे निरोप सुद्धा सुशिक्षित मॉडर्न ग्रुपवरुनही येतात.

3) ‘टवाळा आवडे विनोद’ या रामदासस्वामींच्या उक्तीचा प्रत्ययही येतो कधी कधी.

4) अति माहिती, फोटो, व्हिडिओ मुळे मेमरी फुल होणे, फोन हँग होणे असे अनुभव येतात मग काय पुन्हा ‘फिरुनी नवी जन्मेल मी’ प्रमाणे रिसेट, फॉरमॅट करा ‘जुने जाऊ द्या मरणालागूनी’ केले की पुन्हा नवा कोरा फोन तयार मानवी आयुष्यातही अशी फॉरमॅटची सोय असती तर दुःखद, बोचण्या कटुघटना, अनुभव आठवणी फॉरमॅट केले नसते का? इथे मानवी जीवनाची मर्यादा आणि यंत्र तंत्र विज्ञानाचे सामर्थ्य आहे!

5) ‘जीवन क्षणभंगुर आहे’ असे मोठं गंभीर, सखोल तत्वज्ञानपर वाक्य व्हॉट्सऍपमुळे खरं ठरतं! या क्षणात जे हाती आलं ते फॉरवर्ड डिलीट करा जपून ठेऊ नका. अपरिग्रह, असंग्रह, व्हॉट्सऍपवर सहज शक्य चांगल्या वाईट कोणत्याही ‘पोस्ट च्या’ मोहात पडू नये. ‘डाटा कमी होतो’ हे सत्य अनुभवांनी पटते. शेवटी अध्यात्म ते वेगळे काय? बौद्धांच्या ‘शून्यावाद’’ ग्रंथचे ग्रंथ वाचून समजणार नाही पण व्हॉट्सऍप अनुभूतीसह पटवून देते. ‘ जीवन म्हणजे चैतन्याचा अविछिन्न छिन्न प्रवाह होय’. जे आताच्या क्षणी आहे, ते पुढच्या क्षणी नाही पण प्रत्येक क्षणात बदलत राहूनही ते सतत आहेच आहे. असे लक्षण केवल व्हॉट्सऍपलाच लागू पडते.

6) फिजिक्सचे क्वांटम थिअरी सुद्धा व्हॉट्सऍपला लागू पडते की.

7) शिवाय थर्मोडायमिक्सचे Energy is constant only the form of energy changes हे तत्व व्हॉट्सऍपला लागू होते. मानवी भावभावना पूर्वापार तशाच आहेत पूर्वी त्या प्रत्यक्ष, मग पत्रातून, मग फोनद्वारे आवाजाने आता हाती आलेल्या व्हॉट्सऍपने व्यक्त होतात एवढेच. पूर्वी पण भाकडकथा, दंत कथा, विद्वद्गोष्टी,  विनोद होते आताही तेच तसेच फक्त थोडया वेगळया स्वरुपात एवढाच काय तो बदल.

8) व्हॉट्सऍपमुळे माहितीची वावटळच आपल्या भोवती सतत घोंगावते. कुठे थांबावे कळतच नाही, ‘किंकर्तव्यमूढ’’ अवस्था हे व्हॉट्सऍपचे व्यवच्छेदक लक्षणच म्हणावे.

9) ‘न उल्हासे न संतापे’ त्याची प्रज्ञा स्थिरावली।’ असे स्थितप्रज्ञ लक्षण त्या व्हॉट्सऍपभक्तांमध्ये नेहमीच आढळते. कारण ते या जगात नसतातच. खरच ‘भवसागर पार’ असतात.

10) अस्सल दारुडयाला जसे दारु सोडवत नाही तसे ‘व्हॉट्सऍपचिकटगुडयांना व्हॉट्सऍप सोडवत नाही’

11) ‘तूम क्या जानो ..... कास्वाद अमा यार तुमने तो पी ही नहीं’ असा डायलॉग न मारताही व्हॉट्सऍप चिकटगुंडे स्वतःच्या वर्तनातून दुसऱ्याला  समजावून देतात. (व्हॉट्सऍपची भाषा हा तर स्वतंत्रलेख विषय आहे त्यावर बोलू पुढे कधीतरी) असो इति साठा उत्तराची व्हॉट्सऍपकहाणी इंटरनेटच्या तारी 2 जी, 3जी, दराच्या कोटयात 1 ते 10 जीबी प्लॅनात सुफळ संपूर्ण!!!

डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे, हनुमाननगर, नागपूर

Sunday, October 4, 2015

मराठी मनाचा छंद - नाव ठेवणे

खरे बघता, 'नाव ठेवणे' हा मराठी मनाचा आवडता छंदच आहे. तो आजचाच नाही तर; तो फार पूर्वीपासूनचा आहे. तसे रूढीनुसार नवजात बालकाचे 'बाराव्या' दिवशी लहान-मोठ्यांच्या उपस्थितीत आई किंवा आत्या 'नाव' ठेवते. याला 'नामकरणसोहळा' किंवा बारसं म्हणतात. हे रीतसर ठेवलेले पहिले नाव. आप्तस्वकीय, मित्रमंडळी त्या नावाची 'नाव' करू लागतात. जसे मनोहरचे मन्या, मनु, मनो, मन; तर रंजनाचे रंजू, रंज इत्यादी. हे सर्व मूळ नामाचे गुणवैशिष्ट्यांसह केलेले विस्तारित नामकरणच होय. या वाढीव आणि विस्तारित नामकरणाचा विचार तूर्तास बाजूला ठेवू; आणि खऱ्या 'नामां'चा विचार करू.

मराठी ही एकमेव भाषा असावी; ज्यात मूळ नामाच्या लिंगानुसार नामकरण केले जात नाही. उदा. सविता म्हणजे सूर्य; नीलिमा म्हणजे निळेपणा; रश्मी म्हणजे किरण; ज्योती म्हणजे तेज, हे सर्व मूळ अर्थानुसार पुल्लिंगी आहेत. पण आपल्या मराठीत ही सर्व मुलींची नावे म्हटली जातात. श्रेयस, शुभम, यश, माणिक ही नावे मूळ अर्थानुसार नपुसकलिंगी आहेत; पण मराठी घरातील मुलांना ही असली नावे ठेवली जातात. एकूणच 'नाव ठेवणे' हा शब्दप्रयोग केवळ आणि केवळ, मराठी लोकांनी शब्दशः खरा केला, यात शंका नाही.

इतकी गमतीदार नाव असलेले मराठी लोक, 'आडनाव' सुद्धा तेवढेच गमतीदार लावत असतात. मराठी आडनाव हा संपूर्ण भारतात उत्सुकतेचा विषय झालेला आहे. कारण हिंदी मुलखात गुप्ता, वर्मा, शर्मा, श्रीवास्तव, यादव, द्विवेदी, चतुर्वेदी, आदी शब्दांवर आडनावे सांगतात, बंगालमध्ये चटर्जी, मुखर्जी, डे, पाल, सार; गुजरातेत शहा, पटेल, तर दक्षिण भारतीयांमध्ये जाती वा गावाचे नाव आडनाव म्हणून लावतात. पण आडनावांच्या बाबतीत 'मराठी पाउल पडते पुढे' हे तंतोतंत लागू पडते. मराठीतील आडनावांचे ढोबळमनाने वर्गीकरण असे होईल ) गावांवरून )पदव्यांवरून ) व्यवसायावरून ) पशुपक्षी, वृक्ष, वनस्पती यावरून ) खाद्यपदार्थावरून गावांवरून पडलेली आडनावे पहा. नागपूरकर, औरंगाबादकर, अमरावतीकर, नगरकर, एदलाबादकर, दाभाडकर, म्हणजे मूळ गावाला 'कर' लावला कि मराठी आडनाव झालं, असा सोपा निष्कर्ष कोणी काढायला गेला तर रामटेके, भंडारे, नागपुरे, काटोले, धारगावे, अशीही आडनावे दिसतात.

आता पदव्यांवरून पडलेली आडनावे पहा. शास्त्री, पंडित, गुरु, पंत, इत्यादी. शेक्सपीअरने आडनावात काय आहे? असे म्हटलेले नाही हेच नशीब. आता व्यवसायावरून पडलेली नावं. आचार्य, चिटणीस, टिपणीस, सोनार, कारखानीस, पाटील, दलाल, वैद्य, जोशी, खर्डनवीस इत्यादी. अर्थात आजकालच्या व्यवसायांवरून आडनाव ठेवण्याइतका मराठी माणूस पुरोगामी नाही; अन्यथा डिझायनर, वार्ताहर, शिक्षक, अशी आडनावेही मराठीत दिसली असती. पारशींनी मराठीतील ही न्यूनता आपल्या आडनावांनी भरून काढली. जसे इंजिनिअर, कॉंट्रॅक्टर, लोहावाला, दारूवाला, बाटलीवाला, लोखंडवाला, इत्यादी. मुळातच नोकरीपेक्षा मराठी माणसाचा उद्योजकतेवर विश्वास नसल्यामुळे आणि तेथे त्यांचा कोणी 'वाली' नसल्याने अशी आडनावे ठेवत नसावीत. असो.

मराठी माणूस हा खाद्यप्रिय आहेमराठी पद्धतीचे जेवण सर्व भारतातील संतुलित आहार म्हणून प्रसिद्ध आहे. 'अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविशी जगदीशा' ही म्हण प्रसिद्धच आहे. याची जाणीव प्रत्येक मराठी व्यक्तीला आहेच. खाद्यावरून आडनावे मराठी माणसांना शोभूनही दिसतात. उदा. तुपे, तेले, हिंगे, भजे, वडे, वडाभात, गोळे, वरणे, शिरभाते इत्यादी.

मराठीत पशुपक्षी वृक्षवल्ल्लींवरून  आडनावे प्रचलित आहेत. असायलाही पाहिजे. कारण आपले संत तुकाराम महाराज म्हणूनच गेले की, 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' तर या प्रकारची उदाहरणे पाहू. वाघ, कोल्हे, लांडगे, डुकरे, पिंगळे, राजहंस, मोरे, कावळे, हळदे, झाडे, वडे, जडी, बुटी, मुके, पिंपळे, फुले, मोगरे, वाटाणे इत्यादी. मराठी लोक फार पूर्वीपासून पर्यावरणवादी आहेत हेच यावरून सिद्ध होते. आता गुणवाचक किंवा अवगुणवाचक आडनाव पाहू. वाघमारे, तितरमारे, खानझोडे, कीर्तने, लांडे, टकले, विडे, वाडे, खोले, बोबडे, आळशी, गुणे, अपराजित, रडके, तापस, रागीट, निर्मळ, सुंभ, समर्थ, दुबळे, चौकसे, चौरे इत्यादी.

काही आडनावे मात्र उगीच ठेवलेली वाटतात. ती उगाचच सांगण्यात अर्थ नाही. काहीही झाले तरी मराठी लोकांचीच आडनावे आहेत ना?

- डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे