Monday, October 12, 2015

व्हॉट्सऍपमय जग

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म...... असा एक अभंग ऐकला आणि आजच्या जगात हा अभंग थोडाबदल करुन कसा होईल याचा विचार केला उत्तर सुचले ‘‘व्हॉट्सऍपमय जग व्हॉट्सऍपचा धर्म......’’

व्हॉट्सऍपचे स्वरुप :

माहिती तंत्रज्ञानाचा विकास झाला आणि आभासी जग निर्माण झाले. घरोघरी खेडोपाडी, महानगर, शहरे, सर्वांमध्ये व्हॉट्सऍप सर्वमान्य झाले. स्वाधीनम् सुलभम् चापि ज्ञानानंदादि वर्धकम् म्हणजे स्वाधीन असलेले, सुलभ असे ज्ञान आनंद वाढविणारं असे ज्याचे रास्त वर्णन करता येऊ शकते ते म्हणजे व्हॉट्सऍप. आजची स्थिति अशी आहे की घरातल्या घरातसुद्धा व्हॉट्सऍपवर संवाद साधतात काही जण. आज व्हॉट्सऍप ने सामान्यांचे जीवन व्यापून टाकले आहे. कराग्रे वसते लक्ष्मी ऐवजी कराग्रे वसते अॅंण्डराईड असे व्हायला लागले आहे. जिकडे पाहावे तिकडे टू जी, थ्री जी, फोर जी आहेतच. "स्टे कनेक्टेड एव्हरीव्हेअर"! मग काय जिथे तिथे मोबाईल आणि त्यात व्हॉट्सऍप!

                                                       व्हॉट्सऍपची व्याप्ती

मनोरंजनाचे साधन :

कोणी कितीही नावं ठेवोत पण व्हॉट्सऍप अतिशय करमणूक करते. किती विविध प्रकारचे जोक्स, व्यंगचित्रे, वात्रटिका, विडंबनगीत असे दिवसभर येतच राहतात. विविध विषयांची कितीतरी माहिती दिवसभर वाचायला मिळते. एकडे घटना घडली की त्याचे खुसखुशीत, लाघवी वर्णन, फोटो धाडधाड यायला सुरु होते. पुन्हा तुम्ही कोणत्या ग्रुप मध्ये आहात त्यानुसार मनोरंजनाचा स्तर, पोत, अनुभवायला मिळतो. बालिश ते फुलिश, स्टायलिश ते लॅव्हिश असे कितीही आणि कोणतेही मनोरंजन होवू शकते. घर बसल्या दुनियाभरातील अद्ययावत मनोरंजक गोष्टी ‘हाती’ येतात. एकटं वाटायला जागाच नसते. पूर्वी प्रेमात पडलेली माणसं "तनहा तनहा रहता हूँ मै तो भरी मैफिलमें" अशा अवस्थेत राहात असत. पण आजकाल व्हॉट्सऍपमुळे भर बाजारात, कार्यक्रमात, कॉलेजात कुठेही ‘‘भर मैफिलीत एकाकी लोकं बघायला मिळतात’. स्वतःशीच असणे, स्वतःचे फोटो (सेल्फी) स्वतःच बोलणे (व्हाइसनोट) इत्यादि अनेक लीला सहज दिसतात. लहान मुलगा गोंधळ करीत असेल, ऐकत नसेल त्याला अॅपवाला स्मार्ट फोन द्या तो लगेच शांत होतो! काय परिणाम आहे नाही? कॉलेजातील तरुण तरुणी तर दिवाणेच आहे या स्मार्टफोनचे. पण आजकाल बच्चे तो बच्चे बापरे बाप म्हणायची वेळ आली आहे. चाळीशी ते साठी अशी प्रगल्भ मंडळी यात आकंठ डुंबली आहेत. शिवाय आजुबाजुला एक नवाच अनुभव आलाय कि घरातील ज्येष्ठ नागरिकांना वाढदिवसाची अत्युत्तम भेट म्हणजे स्मार्टफोन. एखाद्या नातवाला शिकवणीची जबाबदारी देवून द्यावी थोडयातच दिवसात ‘‘आमच्या काळी नव्हतं व्हाटसशाप कां काय त्याचं खुळ बरं ’’ असं तावातावाने बोलणारे आजोबा आजी अलिबाबाच्या गुहेत शिरल्यासारखे गुंग होतात. पहिले फक्त ‘‘वाचक’’ असलेले हे ग्रुप मेंबर हळूहळू स्माईली, लाईक्स, प्रार्थना, टाळया वगैरे वापरु लागतात. इकडून तिकडे पोस्टू लागतात. हळूच फोटो काढू लागतात, मग व्हाईस रेकार्ड अन् काय अन् काय? ‘‘अब आ गया जिंदगी का मजा’’ असे भाव त्यांच्या चेहऱ्यांवर दिसू लागतात. अशा प्रकारे आबालवृद्धांना मोहिनी घालणारे व्हॉट्सऍप जीवीचा विसावा नव्हे काय?

माहितीचा खजिना :

"यत्र विश्वं भवति एक नीडं" अशी स्थिति केवळ व्हॉट्सऍपमुळे शक्य झालीय. यात अतिशयोक्ती नाहीच. आज विश्वातील कोणतीही माहिती असू देत इकडून तिकडे सारखी फिरत असते. जयन्ती, पुण्यतिथी, दिनविशेष, पुण्यस्मरण, महत्वाच्या घडामोडी अज्ञात कवी, लेखक, समाजसेवक, उद्योजक, नेते यांच्या जीवनकथा इतर राज्य देश, इत्यादीमधील प्रथा, परंपरा, सणवार, विविध खाद्यपदार्थ कला, गीत, नृत्य, नाटक असे जीवनातील प्रत्येक पैलूंना स्पर्श करणारी, नीट, सुसंगत, सविस्तर माहिती या व्हॉट्सऍपमुळे हाती येते. विविध भाषेतील अतिशय उपयुक्त माहिती सर्वांना खुली झालीय ती याच मुळे.

‘इंग्रजी, मराठी, हिन्दी अशा सर्वभाषांमधून उत्तम माहितीचा संग्रह सर्व ग्रृपमधून फिरत असतो. त्यामुळे इंग्रजी न येणाऱ्या किंवा हिंदीत गती नसलेल्यांना ती भाषा उमजायला लागते इतकेच नाही तर संस्कृतस्तोत्र, संस्कृत गीत सुद्धा सामान्यग्रुप वा कौटुंबिक ग्रुप मधून फिरत असतात. किती कळते पेक्षा पाठवावेसे वाटते, पहावेसे वाटते, ऐकावेसे वाटते हे महत्वाचे कुणीही न थोपवता कुठेही जबरदस्ती न होता विविधभाषा ऐकण्यात, वाचण्यात येतात त्यातून एक भाषिक सुसंवाद साधला जातोच ना!

आज व्हॉट्सऍपवर अनेक ग्रुप (गण) असतात. एक व्यक्ती एक ते 100 कितीही ग्रुपमध्ये सहभागी असतो. या सहभागामुळे व्यक्ती कुटुंबाशी, समाजाशी, विशिष्ट ध्येय, गट, भाषागट संस्था, समुहाशी जोडल्या जातो. यात कुठेही भौगोलिक अंतर वा लिंगभेद वा वयाचे अंतर इतकेच काय धर्म, जात, आर्थिकस्तर हे अडचणीचे ठरत नाही

कधी चुकून विशिष्ट विषयांनी प्रेरित मजकुर आला की त्यावर खंडन मंडनपर जोरदार वादही होतात. दुसऱ्यांचे मत असे असू शकते, ते त्याचे मत आहे, असा लोकशाही संम्मत समंजसपणा याच ठिकाणी पहावयास मिळतो. शासकीय परिपत्रके, कार्यालयीन आज्ञपत्रे, कामकाजासंबंधी विशेष नोंदी या आणि अशा अनेक बाबींचे संवाहन केंद्र म्हणजे व्हॉट्सऍप. ‘करलो दुनिया मुठ्ठी में’ व्हॉट्सऍपने शक्य भासते.

समाज जोडणीसाठी :

टि.व्ही. पेपरात, बातम्या येतात की व्हॉट्सऍपमुळे ‘हरवले ते गवसले’ दूरदूरचे नातेवाईक मित्र, संबंधी आज एकमेकांशी ‘आभासी’ (Virtual) पद्धतीने जोडले गेलेत. ज्या नातेवाईकांचे जन्मदिवस माहित नव्हते ते कळायला लागले. घरोघरी काय चांगले सुरु आहे याचे सचित्र वार्तांकन शुभेच्छा, कौतुक सोहळे व्हॉट्सऍपमुळे शक्य झाले. रक्ताचे नाही तर अनुबंधाची नाते निर्माण झाले. मायासुराच्या मायावी दुनिये सारखी ही मायावी, आभासी दुनिया आहे. सिझन बदलला की स्वेटर, शाली, कुलर, एसी, छत्री, रेनकोट यांची देवाणघेवाण चालते. दागदागिने, कपडेलत्ते, नवनव्या वस्तु (फोटो, व्हिडिओच्या रूपात) नजराणे म्हणून पाठविले जातात. ‘दानी कर्ण’ पुराणात एकच झाला पण व्हॉट्सऍपवर हजारो होतात.

खरी खरी समाजसेवा करणारे ही ग्रुप असू शकतातच. आणि त्यांचे कार्य हातातील यंत्रावर एकट्यात बघून स्वतःच्या ‘क्षुद्र’पणाची जाणीव होते. ‘मी’ मोठा व्हायच्या आतच इतरांचे उपक्रम, कार्य ‘प्रत्यक्ष’ पाहून पाय जमिनीवर राहतात. हा ही मोठा फायदाच म्हणावा. शिवाय दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होण्याची सुदृढ समाजाची लक्षणे व्हॉट्सऍपवर दिसून येतात दुसऱ्यांच्या दुःखातही धावून जातात. अडचणीत उपाययोजना सुचवितात. मार्ग काढण्यात मदत करतात. ‘भाव तसा देव’ जसे म्हणतात तसे ज्या गरजेतून तुम्ही व्हॉट्सऍप वापराल त्या गरजेनुसार तुम्हाला ते साथ देते. एकूणच व्हॉट्सऍप आधुनिक परोपकारी गंपु ठरु शकतो.

मर्यादा :

आज अॅप, स्मार्टफोन, व्हॉट्सऍप, सर्वव्यापी, सर्वस्पर्शी झालेयत. पण ते साधन आहे यातच त्याची मर्यादा आहे.

1) पृथ्वी गोल आहे हे भौगोलिकसत्य व्हॉट्सऍप पटवून देते. आपण सेंडलेली (पाठवलेली) माहिती फिरफिर फिरुन पुन्हा आपल्यावरच पोस्टल्या (पाठवल्या) जाते. कित्येक माहिती चऱ्हाटासारखी तेथल्या तिथे घुटमळते.

2) अंधश्रद्धा -श्रद्धा यांच्या विवर्तात सापडून लोकांच्या भावनांना साद घालत. ‘‘11 जणांना कळवा चार दिवसात अनपेक्षित लाभ होईल’’ असे निरोप सुद्धा सुशिक्षित मॉडर्न ग्रुपवरुनही येतात.

3) ‘टवाळा आवडे विनोद’ या रामदासस्वामींच्या उक्तीचा प्रत्ययही येतो कधी कधी.

4) अति माहिती, फोटो, व्हिडिओ मुळे मेमरी फुल होणे, फोन हँग होणे असे अनुभव येतात मग काय पुन्हा ‘फिरुनी नवी जन्मेल मी’ प्रमाणे रिसेट, फॉरमॅट करा ‘जुने जाऊ द्या मरणालागूनी’ केले की पुन्हा नवा कोरा फोन तयार मानवी आयुष्यातही अशी फॉरमॅटची सोय असती तर दुःखद, बोचण्या कटुघटना, अनुभव आठवणी फॉरमॅट केले नसते का? इथे मानवी जीवनाची मर्यादा आणि यंत्र तंत्र विज्ञानाचे सामर्थ्य आहे!

5) ‘जीवन क्षणभंगुर आहे’ असे मोठं गंभीर, सखोल तत्वज्ञानपर वाक्य व्हॉट्सऍपमुळे खरं ठरतं! या क्षणात जे हाती आलं ते फॉरवर्ड डिलीट करा जपून ठेऊ नका. अपरिग्रह, असंग्रह, व्हॉट्सऍपवर सहज शक्य चांगल्या वाईट कोणत्याही ‘पोस्ट च्या’ मोहात पडू नये. ‘डाटा कमी होतो’ हे सत्य अनुभवांनी पटते. शेवटी अध्यात्म ते वेगळे काय? बौद्धांच्या ‘शून्यावाद’’ ग्रंथचे ग्रंथ वाचून समजणार नाही पण व्हॉट्सऍप अनुभूतीसह पटवून देते. ‘ जीवन म्हणजे चैतन्याचा अविछिन्न छिन्न प्रवाह होय’. जे आताच्या क्षणी आहे, ते पुढच्या क्षणी नाही पण प्रत्येक क्षणात बदलत राहूनही ते सतत आहेच आहे. असे लक्षण केवल व्हॉट्सऍपलाच लागू पडते.

6) फिजिक्सचे क्वांटम थिअरी सुद्धा व्हॉट्सऍपला लागू पडते की.

7) शिवाय थर्मोडायमिक्सचे Energy is constant only the form of energy changes हे तत्व व्हॉट्सऍपला लागू होते. मानवी भावभावना पूर्वापार तशाच आहेत पूर्वी त्या प्रत्यक्ष, मग पत्रातून, मग फोनद्वारे आवाजाने आता हाती आलेल्या व्हॉट्सऍपने व्यक्त होतात एवढेच. पूर्वी पण भाकडकथा, दंत कथा, विद्वद्गोष्टी,  विनोद होते आताही तेच तसेच फक्त थोडया वेगळया स्वरुपात एवढाच काय तो बदल.

8) व्हॉट्सऍपमुळे माहितीची वावटळच आपल्या भोवती सतत घोंगावते. कुठे थांबावे कळतच नाही, ‘किंकर्तव्यमूढ’’ अवस्था हे व्हॉट्सऍपचे व्यवच्छेदक लक्षणच म्हणावे.

9) ‘न उल्हासे न संतापे’ त्याची प्रज्ञा स्थिरावली।’ असे स्थितप्रज्ञ लक्षण त्या व्हॉट्सऍपभक्तांमध्ये नेहमीच आढळते. कारण ते या जगात नसतातच. खरच ‘भवसागर पार’ असतात.

10) अस्सल दारुडयाला जसे दारु सोडवत नाही तसे ‘व्हॉट्सऍपचिकटगुडयांना व्हॉट्सऍप सोडवत नाही’

11) ‘तूम क्या जानो ..... कास्वाद अमा यार तुमने तो पी ही नहीं’ असा डायलॉग न मारताही व्हॉट्सऍप चिकटगुंडे स्वतःच्या वर्तनातून दुसऱ्याला  समजावून देतात. (व्हॉट्सऍपची भाषा हा तर स्वतंत्रलेख विषय आहे त्यावर बोलू पुढे कधीतरी) असो इति साठा उत्तराची व्हॉट्सऍपकहाणी इंटरनेटच्या तारी 2 जी, 3जी, दराच्या कोटयात 1 ते 10 जीबी प्लॅनात सुफळ संपूर्ण!!!

डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे, हनुमाननगर, नागपूर

Sunday, October 4, 2015

मराठी मनाचा छंद - नाव ठेवणे

खरे बघता, 'नाव ठेवणे' हा मराठी मनाचा आवडता छंदच आहे. तो आजचाच नाही तर; तो फार पूर्वीपासूनचा आहे. तसे रूढीनुसार नवजात बालकाचे 'बाराव्या' दिवशी लहान-मोठ्यांच्या उपस्थितीत आई किंवा आत्या 'नाव' ठेवते. याला 'नामकरणसोहळा' किंवा बारसं म्हणतात. हे रीतसर ठेवलेले पहिले नाव. आप्तस्वकीय, मित्रमंडळी त्या नावाची 'नाव' करू लागतात. जसे मनोहरचे मन्या, मनु, मनो, मन; तर रंजनाचे रंजू, रंज इत्यादी. हे सर्व मूळ नामाचे गुणवैशिष्ट्यांसह केलेले विस्तारित नामकरणच होय. या वाढीव आणि विस्तारित नामकरणाचा विचार तूर्तास बाजूला ठेवू; आणि खऱ्या 'नामां'चा विचार करू.

मराठी ही एकमेव भाषा असावी; ज्यात मूळ नामाच्या लिंगानुसार नामकरण केले जात नाही. उदा. सविता म्हणजे सूर्य; नीलिमा म्हणजे निळेपणा; रश्मी म्हणजे किरण; ज्योती म्हणजे तेज, हे सर्व मूळ अर्थानुसार पुल्लिंगी आहेत. पण आपल्या मराठीत ही सर्व मुलींची नावे म्हटली जातात. श्रेयस, शुभम, यश, माणिक ही नावे मूळ अर्थानुसार नपुसकलिंगी आहेत; पण मराठी घरातील मुलांना ही असली नावे ठेवली जातात. एकूणच 'नाव ठेवणे' हा शब्दप्रयोग केवळ आणि केवळ, मराठी लोकांनी शब्दशः खरा केला, यात शंका नाही.

इतकी गमतीदार नाव असलेले मराठी लोक, 'आडनाव' सुद्धा तेवढेच गमतीदार लावत असतात. मराठी आडनाव हा संपूर्ण भारतात उत्सुकतेचा विषय झालेला आहे. कारण हिंदी मुलखात गुप्ता, वर्मा, शर्मा, श्रीवास्तव, यादव, द्विवेदी, चतुर्वेदी, आदी शब्दांवर आडनावे सांगतात, बंगालमध्ये चटर्जी, मुखर्जी, डे, पाल, सार; गुजरातेत शहा, पटेल, तर दक्षिण भारतीयांमध्ये जाती वा गावाचे नाव आडनाव म्हणून लावतात. पण आडनावांच्या बाबतीत 'मराठी पाउल पडते पुढे' हे तंतोतंत लागू पडते. मराठीतील आडनावांचे ढोबळमनाने वर्गीकरण असे होईल ) गावांवरून )पदव्यांवरून ) व्यवसायावरून ) पशुपक्षी, वृक्ष, वनस्पती यावरून ) खाद्यपदार्थावरून गावांवरून पडलेली आडनावे पहा. नागपूरकर, औरंगाबादकर, अमरावतीकर, नगरकर, एदलाबादकर, दाभाडकर, म्हणजे मूळ गावाला 'कर' लावला कि मराठी आडनाव झालं, असा सोपा निष्कर्ष कोणी काढायला गेला तर रामटेके, भंडारे, नागपुरे, काटोले, धारगावे, अशीही आडनावे दिसतात.

आता पदव्यांवरून पडलेली आडनावे पहा. शास्त्री, पंडित, गुरु, पंत, इत्यादी. शेक्सपीअरने आडनावात काय आहे? असे म्हटलेले नाही हेच नशीब. आता व्यवसायावरून पडलेली नावं. आचार्य, चिटणीस, टिपणीस, सोनार, कारखानीस, पाटील, दलाल, वैद्य, जोशी, खर्डनवीस इत्यादी. अर्थात आजकालच्या व्यवसायांवरून आडनाव ठेवण्याइतका मराठी माणूस पुरोगामी नाही; अन्यथा डिझायनर, वार्ताहर, शिक्षक, अशी आडनावेही मराठीत दिसली असती. पारशींनी मराठीतील ही न्यूनता आपल्या आडनावांनी भरून काढली. जसे इंजिनिअर, कॉंट्रॅक्टर, लोहावाला, दारूवाला, बाटलीवाला, लोखंडवाला, इत्यादी. मुळातच नोकरीपेक्षा मराठी माणसाचा उद्योजकतेवर विश्वास नसल्यामुळे आणि तेथे त्यांचा कोणी 'वाली' नसल्याने अशी आडनावे ठेवत नसावीत. असो.

मराठी माणूस हा खाद्यप्रिय आहेमराठी पद्धतीचे जेवण सर्व भारतातील संतुलित आहार म्हणून प्रसिद्ध आहे. 'अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविशी जगदीशा' ही म्हण प्रसिद्धच आहे. याची जाणीव प्रत्येक मराठी व्यक्तीला आहेच. खाद्यावरून आडनावे मराठी माणसांना शोभूनही दिसतात. उदा. तुपे, तेले, हिंगे, भजे, वडे, वडाभात, गोळे, वरणे, शिरभाते इत्यादी.

मराठीत पशुपक्षी वृक्षवल्ल्लींवरून  आडनावे प्रचलित आहेत. असायलाही पाहिजे. कारण आपले संत तुकाराम महाराज म्हणूनच गेले की, 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' तर या प्रकारची उदाहरणे पाहू. वाघ, कोल्हे, लांडगे, डुकरे, पिंगळे, राजहंस, मोरे, कावळे, हळदे, झाडे, वडे, जडी, बुटी, मुके, पिंपळे, फुले, मोगरे, वाटाणे इत्यादी. मराठी लोक फार पूर्वीपासून पर्यावरणवादी आहेत हेच यावरून सिद्ध होते. आता गुणवाचक किंवा अवगुणवाचक आडनाव पाहू. वाघमारे, तितरमारे, खानझोडे, कीर्तने, लांडे, टकले, विडे, वाडे, खोले, बोबडे, आळशी, गुणे, अपराजित, रडके, तापस, रागीट, निर्मळ, सुंभ, समर्थ, दुबळे, चौकसे, चौरे इत्यादी.

काही आडनावे मात्र उगीच ठेवलेली वाटतात. ती उगाचच सांगण्यात अर्थ नाही. काहीही झाले तरी मराठी लोकांचीच आडनावे आहेत ना?

- डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे