Tuesday, November 17, 2015

माणसाला जीवन जगण्यासाठी काय लागते ?

माणसाला जीवन जगण्यासाठी काय लागते ? निस्संशयपणे----अपूर्णता , अज्ञान, गैरसमज, स्वप्न------हेच खरे आहे.  स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा , गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा.-----कित्तेकदा हे गाणे ऐकले अन् अचानक अर्थ गवसला , की मानवी सुखाची परिसीमा अपूर्णता, अज्ञान, गैरसमज, स्वप्न यातच सामावलेली आहे.

                                                           अपूर्णता हीच पूर्णता

मानवी जीवनात एवढेच कशाला संपूर्ण विश्वात अपूर्णते एवढे पूर्ण काहीही नाही. निसर्गाने सृष्टीतील कोणताही जीव परिपूर्ण बनविलेला नाही . जीवसृष्टी स्त्रीलिंगी, पुल्लिंगी यात विभागलीय. जेथे उभयलिंगी वा नपुंसकलिंगी जीव आहे तेथे अपरिहार्यपणे पूर्णत्व आहे असे म्हणू शकतो.पण उत्क्रांत होताना उभयलिंगी जीव अल्पतर होत गेले . म्हणजे पूर्णत्वापासून अपूर्णत्वाकडेच वाटचाल दिसतेय.          

असे म्हणतात कि मानवीमेंदू 1/6 टक्केच कार्यरत असतो. म्हणजे अपूर्णमेंदुच मानवीजीवन चालवतो.आजवर कोणत्याही मानवाने 100 टक्के मेंदूचा वापर करून जीवन व्यतीत केलेय असे सिद्ध झाले नाही. जगद्विख्यात नोबेल पारितोषिकविजेते भौतिकशास्त्रज्ञ आईनस्टाईन म्हणतात,माझ्या कार्यक्षम मेंदूचा फक्त 25 टक्के उपयोग मला करता आला. म्हणजे अपूर्णता जीवनसाफल्याची पूर्णता होय. अपूर्णतेमुळेच एक जीव दुस-या जीवाचा आसरा, सहारा घेत असतो.एक प्रजाती   दुस-या प्रजातीला पूरक ठरते म्हणजे कोणताच जीव परिपूर्ण नाही हेच खरे.         दुनियेत आढळणारी विविधता, जैवविविधता ही अपूर्णतांची विविधरूपे वा आविष्कार नव्हेत का? गुलाबाला सुगंध,रंग दिला पण काटेही दिले. मोग-याला रंग नाही, विड्याच्या पानाच्या वेलीला(नागवेलीला) फुले नाहीत , चंदनाला फळे नाहीत, हत्तीला चपळता नाही , सशाला शिंग नाही, हरिणाला भारदस्तपणा नाही, मोराला आवाज नाही, कोकिऴेला रूप नाही; खरंच अपूर्णतेमुऴे सृष्टी किती परिपूर्ण, उपयुक्त, मोहक, रमणीय झालीय ना। पूर्णता असती तर दुस-या कशाचीही गरजच नसती ना।    

फूल उमलते, भुंगे येतात, परागकण त्यांच्या पायाला लागतात. भुंगे इकडून तिकडे मधासाठी फिरतात,bत्यांच्या फिरण्याने परागकण या फुलांवरून त्या फुलांवर जातात. फुलांची फळे होतात. फळे पिकतात. पक्षी येतात. ते खातात. बिया जमिनीवर पडतात . ऊन्ह-पावसाने त्या रुजतात. त्यातल्या काही जगतात, त्यांची झाडे होतात. पुन्हा फूले, पुन्हा फळे-------अशाप्रकारे या निसर्गचक्रामध्ये नुसते झाड स्वतःला पुन्हा पुन्हा रुजवू शकत नाही, त्यासाठी भुंगा, पक्षी, प्राणी, सूर्यप्रकाश, जमीन,  पाणी, वारा हवेतच. कोणीही स्वयंपूर्ण नाही. म्हणूनच तर विविधतेने नटलेल्या या सृष्टीत रमणीयता आहे.
मानवी जीवन तर अतिशय अपूर्ण असल्यामुऴेच कुटुंब, समाज, राष्ट्र इत्यादिंच्या मदतीने त्याचे जीवन पूर्ण होते.
अपूर्णता हीच खरी पूर्णता होय , नाही का?
           
                                                  अज्ञान हेच मोठे ज्ञान आहे ।

असे म्हणतात कि, अज्ञानात सुख आहे. तिस-या टप्प्यात पोहचलेल्या दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तीला त्याच्या आजाराचे खरे ज्ञान झाले असेल तर उमेद खचून तो वेळे आधीच मरण पावतो. हेच त्याला आजाराबद्दल पहिलेपासून अज्ञानी ठेवले तर जगण्याचे दिवस वाढतात, त्रास जरी झाला तरी उमेद संपत नाही. रुग्णाचे सोडा, परीक्षार्थी बद्दल बघू या. परीक्षाजवळ आल्यावर ,"माझा अभ्यास पूर्ण झालाय" असा विश्वास ज्याच्यात असेल तो सुखाने परीक्षेला सामोरा जातो, मग भलेही त्याचा अभ्यास अपूर्ण असेल. म्हणजे अज्ञान असूनही त्याला समाधान असते म्हणून तो संकटांना सामोरा जातो. लहान, निरागस बालक सहजपणे वडिलांच्या बॉसशी बिनधास्तपणे बोलतो. अज्ञानामुळेच ना.! आजवरचा इतिहास सांगतो कि, किशोरवयीन बालके मोठमोठे पराक्रम करू शकले परिणामाबद्दल अज्ञान , दुसरे काय? स्वतःची कुवत, शक्ती, ताकद, बल पूर्ण ओऴखलेली व्यक्ती अभेद्य, अदम्य, अशक्यप्राय पराक्रम करूच शकत नाही. असले पराक्रम करण्यासाठी "अज्ञानी जिगरच "  कामी येतो. "मला हे सर्व येते" या (गैर का असेना) समजातूनच कोणतीही व्यक्ती कार्य करू शकते. या जगात ज्ञानापेक्षा अज्ञानामुऴे जास्त शोध लागले आहेत. भारतासाठी जगभ्रमण करायला निघालेली वास्कोदगामाची स्वारी दक्षिण अफ्रिकेच्या टोकाला पोहचली, मग कळले हा भारत नाही तर त्याने त्या भूभागाला  "केप ऑफ गुड होप"  म्हटले. भारत शोधायला निघालेला अमेरिगो अज्ञानामुळेच अमेरिकेत पोहोचला, अज्ञानामुळे नवी भूमी मिळाली. स्वतःच्या भूमीत पराभूत झालेला सिकंदर केवळ अनभिज्ञेमुळे स्वतःला जगज्जेता म्हणवून घेऊ शकला ना!

आता हेच बघा ना, डिग्री रूपी ज्ञान घेतले तरी जगरूपी पुस्तक ज्ञात होईल असे नाही. डिग्री मिळाल्यामुळे मी 'ज्ञानी'झालोय ही भावना होणे हेही अज्ञानाचे प्रगटीकरणच नव्हे का?  "पोथी पढे पढे पंडित हूआ न कोई" असे कबीर उगीच म्हणाले असतील काय?  उलट डिग्री घेणे म्हणजे विशिष्ट विषयांचे मर्यादित ज्ञान कमावणे अन् अमर्याद अज्ञानात खुश होणे असा अर्थ होत नाही काय? उलटपक्षी कोणतीही डिग्री न घेणे म्हणजेही विशिष्ट ज्ञानापासून वंचित राहाणे, म्हणजे अंशतः अज्ञानीच राहाणे , होय ना!  एकूण काय, शिका किंवा नका शिकू 'अज्ञान'चिरंतन आहे.
उद्या काय होणार याचे ज्ञान नाही म्हणून आज आपण सुखाने स्वप्न बघू शकतो ना ! आशा, अपेक्षा, स्वप्न जागविणारे अज्ञान हेच मोठे ज्ञान नव्हे का?"

                                           "गैरसमज" समाजधारणेचा पाया!

समज ही ज्ञानातून उपजते तर गैरसमज हा अज्ञानातून! जेवढा मोठा गैरसमज तेवढा सुखी समाज. अख्ख्या गावात माखनचोर, नटखट म्हणून गाजलेला कान्हा यशोदेसाठी साधाभोळाच होता, का?  यशोदेचा गैरसमज दुसरे काय!  आजही मातृत्वाच्या चष्म्यातून बघताना होणा-या (गैर)समजामुळे अख्ख्या आऴीत गाजलेलं बाळं, त्याच्या आईसाठी गुणी श्रावणबाळच असतो. गैरसमजावर आधारित समाजधारणेमुळेच  "आपला तो बाब्या
 दुस-याचा तो कारटा"  ही म्हण रूढ झाली ना! माझ्या सासुपेक्षा तिची सासू प्रेमळ आहे, किंवा उसकी साडी मेरी साडीसे सफेद कैसी,  किंवा other's garden are always green, किंवा (स्वतःची) पत्नी ही क्षणाची एम्टिव्ही अन् आयुष्यभराची डिडिमेट्रो असते किंवा गर्लफ्रेंड वा लिव्हीनपार्टनर बायकोपेक्षा समजदार असते, किंवा आमच्या ह्यांच्यापेक्षा तिचा नवरा जास्त केअरींग आहेत किंवा मराठी शाळांपेक्षा इंग्रजी शाळा गुणवत्तापूर्ण असतात किंवा सरकारी इस्पितळांपेक्षा खाजगी इस्पितळे चांगली सेवा देतात किंवा देशी वस्तुंपेक्षा विलायती वस्तू दर्जेदार असतात किंवा या राजकीयपक्षापेक्षा तो राजकीयपक्ष चांगला आहे, हे सर्व गैरसमज भारतीयांना दररोज जगण्याची नवी उमेद देतात हे सत्य नव्हे का? कुठल्याही क्षेत्रात जा वास्तवापेक्षा प्रतिमा मोठी ठरत नाही का? प्रतिमेच्या प्रेमात पडून (म्हणजे गैरसमजामुळेच)लोकं कोणा कोणाला डोक्यावर घेतात ना! म्हणजे जगण्यासाठी, समाजधारणेसाठी गैरसमज गरजेचे असतात. "तो माझ्यापेक्षा जास्त नशीबवान आहे, त्याला काहीही न कष्टता आयते मिळाते" अशा गैरसमजातून लोकं स्पर्धा, ईर्षा वगैरे करतात, समाज गतिमान होतो. "मी म्हणून सहन करते, दुसरी कोणी असती तर---- ,  मी फार सरळ आहे, माझ्यासारख्या सरळ लोकांची दुनियेला कदरच नाही, माझ्यावाचून पान नाही हालत" इ. इ गैरसमजुतींमुळे लोक संसार करतात, पुढे पुढे करतात, प्रगती करतात. एखादा रंग, खडा, वस्तु, क्रमांक वगैरे माझ्यासाठी "लकी" आहे. अमुक एका महाराजांचे म्हणणे अगदी खरे होते. अमुक ठिकाणचा ताबीज "पॉवरफूल" आहे, अमक्या-तमक्याच्या प्रेअरने रोग दूर होतो अशा अनेक गैरसमजुतींमुळे समाजात हवा, फॅशन, फॅड पसरतात. त्यातून काहींना पोट भरायचा धंदा मिळतो तर काहींना प्रतिष्ठा मिळते तर काहींना मानसिक बळ. मिळो बापडे,जो जे वांछील तो ते लाहो-------. अशाप्रकारे गैरसमज हा समाजजीवनाचा मोठ्ठा आधारस्तंभ आहे हे सिद्धच होते ना!

                                           
  स्वप्न-एक रम्य वास्तव-----

स्वप्न म्हणजे सत्यात न आलेले वास्तवच होय ! शेखचिल्ली, मुंगेरीलाल कां आवडतात? त्यांच्या स्वप्नाळूपणामुळेच. स्वप्न नसते तर क्षणोक्षणी आत्महत्याच झाल्या असत्या. डोळ्यात स्वप्न, मनात इच्छा, भावनांवर ताबा, हातात ताकद, डोक्यात ध्येय,  कृतीत सातत्य असेल तर "करलो दुनिया मुठ्ठी मे" सहज होते. डोके, शरीर जे करु शकत नाहीत , ते केवळ स्वप्नांमुळे पूर्ण होऊ शकते. ज्या डोळ्यात स्वप्न नसतात ते डोळे मृतप्रायच ठरतात. झोपेत, जागेपणी केव्हाही स्वप्न पाहाणे उत्तमच. स्वप्न पहाण्यासाठी झोपलेच पाहिजे, असेही नाही. उलट झोप उडवते तेच खरे स्वप्न. स्वप्न पहाणे व ते प्रत्यक्षात साकारणे यात महद् अंतर आहे. आपापल्या ठिकाणी दोन्हीही चांगलेच. स्वप्न पाहिली नाहीत तर साकारणार कशी? अन् साकारली तर ती स्वप्न कशी?  ते तर वास्तव होईल. वास्तवापेक्षा स्वप्न जास्त रिझवतात.स्वप्न साकार करण्यासाठी केलेला प्रवास अधिक उत्कण्ठावर्धक, सजग, जिवंत, रोमांचक असतो तेवढे वास्तव मनाला भिडत नाही.

आधुनिक शिक्षण पद्धतीत खरे तर असे धोरण असावे की, विद्यार्थ्याला काही नाही शिकवले तरी चालेल, जो तो आपापल्या अज्ञान, गैरसमज, अपूर्णता यातून शिकूनच घेईल पण प्रत्येक बालकाला भरपूर स्वप्न पहायला शिकवा. मोठमोठी स्वप्न त्यांच्या डोळ्यात, डोक्यात जागवा. आजूबाजूला अखंड, निरंतर, अविरत स्वप्नरंजन होऊ द्या. विद्यार्थीच कशाला, संपूर्ण देश स्वप्नमय करा. खरेच, स्वप्ना एवढे रम्य, मनोहर या विश्वात काहीही नाही. खरय ना?

एकूणच काय? मानवाला जगण्यासाठी अन्नवस्त्रनिवा-या पेक्षाही अपूर्णता,अज्ञान, गैरसमज, स्वप्न हेच जास्त उपयुक्त असतात.या चौघांचे कवच लाभलेला माणूस जास्त सकारात्मक,जास्त सुखी असतो.कमतरता,न्यून,उणीव याची जाणीव अजून काही नवे शोधायला प्रेरक ठरते.

डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे, हनुमाननगर, नागपूर

2 comments:

  1. एकदम मस्त madam ..... तुस्सी तो छा गये हो ब्लोगर विच ....
    ..

    ReplyDelete