#सहजोक्त
*महामानवाला अभिवादन*
(पूर्वी आमच्या शाळेत ६डिसेंबरचा कार्यक्रम मोजक्याच मंडळींना द्यायचे व ती मंडळी त्यांच्या आकलनानुसार बाबासाहेबांविषयी कमी नि आनुषंगिक विषयांवर जास्त बोलायची......दरवर्षी कार्यक्रम घेण्यात यायचा.....थोडी जुनी झाल्यावर मी अधिका-यांशी बोलले की "हा कार्यक्रमाचे आयोजन मी कां करू नये ? भारतीय स्त्री म्हणून माझेही कर्तव्य नव्हे कां? विशिष्ट लोकांसाठीच त्यांनी कामं केले, हे तुम्ही कां रुजवता मुलांमध्ये? " या स्पष्ट बोलण्यामुळे मला कार्यक्रम प्रमुख केले. शाळेतील विद्यार्थी व त्यांचे पालक अशा दोनहजारांच्या समुहासमोर मी भाषण केले .ते ऐकून शेकडो श्रोते मला भेटून आवर्जून सांगून गेले की आजवरचे उत्कृष्ट भाषण ऐकले. शाळेत सतत हा कर्यक्रम घेणारे ज्येष्ठ शिक्षक श्री. शंभरकरसर कौतुकाने म्हणाले ,"मॅडम,माझ्या निवृत्तीनंतरही हा कार्यक्रम दर्जेदार होईल अशी खात्री झाली बघा".
तेच इथे देतेय.14 April म्हणजे महामानव डॉ.बाबासाहेबांचा जन्मदिन.मन:पूर्वक अभिवादन करते.नि हा लेख समर्पित करते.)
नमस्कार,
मंचावरील मान्यवर व श्रोतृवृंद ,
आज सहा डिसेंबर आजपासून ५० वर्षांपूर्वी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्वाण झाले तेव्हापासून हा दिवस महापरिनिर्वाणदिन म्हणून पाळण्यात येतो.
पीएच्डी,एम्एस्सी,डिलिट् ,बार ऐट् लॉ.आदी पदव्यांना विभूषित करणारे डॉ.बाबासाहेब मूकनायक, बहिष्कृत भारत,जनता आदि वृत्तपत्रांचे संस्थापक संपादक होते.त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या व केलेल्या भाषणांचा संग्रह वीस ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे.भारतीय घटना एकहाती लिहून तयार करण्याचे महत्कार्य यांनी केले,त्याला तोड नाही.
वैचारिकक्षेत्र,अर्थशास्त्र, समाजशास्त्र,धर्मशास्त्र,तत्तवज्ञान ,कायदा,इतिहास,मानववंश ,,पत्रकारिता, संगीत,चित्रकला,उद्यानकला इत्यादि अनेक क्षेत्रात ते लीलया संचार करीत आणि आपल्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा ठसा त्यावर उमटवीत.
डॉ. बाबासाहेब हे कोण्याएका जातीचे-धर्माचे उद्धारक नसून संपूर्ण भारताचे महान लोकनेते होते. जेवढे जेवढे वाचावे तेवढे तेवढे त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाने आपले मन भारावून जाते.
विद्यार्थ्यांनी त्यांचे कोणते गुण घ्यावे तर निर्विवादपणे सांगता येईल की *अध्ययनशीलता*. त्या काळी साधनसुविधा नसताना, दोनवेळा पोटभर अन्नपण मिळत नसताना, घरी कुटुंबाची प्रचंड अोढग्रस्ती असतानाही ते १८/१८ तास स्वयंस्फूर्तीने अभ्यास करीत.
लंडनसारख्या थंड वातावरणात एका पावाच्या तुकड्यावर तासन्तास ग्रंथालयात वाचन व टिपणं घेण्याचे काम करीत.
विद्यार्थिदशेपासूनच ते अतिशय कुशाग्र, मेहनती व जागृक होते.अतिशय हालाखीच्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीतही त्यांनी धैर्य व चिकाटीने सतत कार्यमग्न राहून काम केले.स्वत:च्या उच्चशिक्षणाचा फायदा स्वत: वा कुटुंबियांसाठीच न करता जातिबांधवांच्या उन्नतीसाठी केला.
आज परदेशी गेलेली मुले तेथेच स्थयिक होतात ; हे पाहिल्यावर डॉ.बाबासाहेबांचे मोठेपण अजूनच अधोरेखित होते.
समाजजागृतीसाठी देशभर फिरावे लागे .अतिशय व्यस्त दिनचर्येतही वेळात वेळ काढून त्या त्या शहरांच्या ग्रंथालयाला भेट देत व तेथिल उत्तम नि दुर्मीळ ग्रंथ चाळीत असत.त्यांचा वैयक्तिक ग्रंथसंग्रह प्रचंड होता.
'बुद्ध आणि त्याचा धर्म' हे पुस्तक त्यांच्यातील अभ्यासु संशोधक व मूलगामी विचारवंत दाखवून देते.
*देशभक्ती* हा त्यांचा अजून एक घेण्यासारखा गुण आहे. नवस्वातंत्र्य काळी तत्कालीन नेत्यांसह त्यांचे वैचारिक-तात्त्विक मतभेद आहेत अशी चर्चा राष्ट्रिय -आ़तरराष्ट्रीय व्यासपीठांवर होत असे. एका परदेशी पत्रकाराने त्याविषयी विचारले असता, डॉक्टरांनी *"आमचे अंतर्गत प्रश्न आम्ही मिळून सोडवितो. बाहेरच्यांनी यात लक्ष देण्याची गरज नाही*" अशा स्पष्ट शब्दात सांगितले*"
*वैचारिकप्रगल्भता* हा त्यांचा गुणविशेष होता.
म्हणून 'हिंदुधर्मत्याग करणार' असे जाहीर केल्यावर ,अन्यधर्मियांनी प्रलोभने दाखवून सुद्धा भारतीय मातीतून जन्मलेला ,मध्यममार्गाचा प्रतिपालक असा बौद्धधर्म त्यांनी स्वीकारला.
खरोखर असे असामान्य-अलौकिक-महान् व्यक्तिमत्तव महाराष्ट्रात जन्मले नि आपल्या नागपुरात त्यांनी धम्मचक्कपवत्तन केले ; ही आम्हा नागपुरी लोकांसाठी खचितच अभिमानाची बाब आहे.
विद्यार्थिमित्रांनो , तुम्ही वर्षभर स्वत:च्या मनाने ,एकाग्रतेने स्वत:चा अभ्यास करून ,स्वयंस्फूर्तीने दर्जेदार ,चांगली अभ्यासेतर पुस्तके वाचणे ; हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
यावेळी तुम्हीच कार्यक्रमाचे आयोजन करा असे आदेश दिल्यामुळे एका अलौकिक प्रतिभेच्या विचारवंताचे विचारवैभव वाचण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल शाळेचे आभार व्यक्त करून वाणीला विराम देते.
जयभिम
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
नागपूर.
*
No comments:
Post a Comment