वृन्तस्थितस्य पुष्पस्य मित्रे वरुणभास्करौ ।
वृन्ताच्च्युतस्य तस्यैव क्लेशदहकरावुभौ॥
झाडाच्या देठावर असलेल्या फुलासाठी पाऊस न् उन्ह दोघेही मित्र (पोषक) असतात. तेच देठाहून तुटलेल्या फुलासाठी हेच दोघे त्रासदायक व तापदायक ठरतात.
लोकं तेच असतात , त्यांचा स्वभावही तोच असतो , त्यांची वागण्याची त-हाही तशीच असते ; मात्र आपल्या स्थितीनुसार त्यांच्या वागण्याचा आपल्यावर परिणाम होत असतो.
आता या श्लोकाच्या दाखल्यातून समजून घेऊ या.
तेच फूल , तोच पाऊस न् तेच उन्ह असतात. फूल जेव्हा झाडाच्या देठावर असते तेव्हा पाऊस न् उन्ह त्याला पोषक मित्र ठरतात . न् तेच फूल झाडापासून विलग झाले की पाऊस क्लेश देणारा न् उन्ह ताप देणारे ठरतात.
आपलं मन , भावना न् शरीर सुस्थिर व स्वस्थ असेल तर जगातील सर्वच बाबी (वास्तवात खडतर असूनही ) आपल्याला सुसंगत न् अनुकुल ठरतात. तेच आपणच अस्वस्थ (शरीर वा मनाने) असू तर सर्वच वातावरण , पर्यावरण (जरी बाहेरच्यांना ते सुसंगत वाटत असले तरी ) दूषित होऊन जाते आपल्यासाठी.
म्हणून " स्वस्थ" (म्हणजे स्वतःमध्ये स्थिर व बाह्य गोष्टींसाठी अलिप्त ) रहण्याचा सराव करायला हवा , प्रत्येकानेच ; नाही कां ? जेणे करून
बाह्य परिस्थिती /आलंबन यांचा परिणाम होणार नाही.
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.