Tuesday, December 1, 2020

#सहजोक्त.


वृन्तस्थितस्य  पुष्पस्य मित्रे वरुणभास्करौ ।

वृन्ताच्च्युतस्य तस्यैव क्लेशद‍हकरावुभौ॥ 


झाडाच्या देठावर असलेल्या फुलासाठी पाऊस न् उन्ह दोघेही मित्र (पोषक)  असतात. तेच देठाहून तुटलेल्या फुलासाठी हेच दोघे त्रासद‍ायक  व तापदायक ठरतात. 


लोकं तेच असतात , त्यांचा स्वभावही तोच असतो ,  त्यांची वागण्याची त-हाही तशीच असते ; मात्र आपल्या स्थितीनुसार  त्यांच्या वागण्याचा आपल्यावर परिणाम होत असतो. 


आता या श्लोकाच्या दाखल्यातून  समजून घेऊ या.

तेच फूल , तोच पाऊस न् तेच उन्ह असतात. फूल जेव्हा  झाडाच्या देठावर असते तेव्हा पाऊस न् उन्ह त्याला पोषक मित्र ठरतात . न् तेच फूल  झाडापासून विलग झाले की  पाऊस क्लेश देणारा न् उन्ह ताप देणारे ठरतात.


आपलं मन , भावना न् शरीर सुस्थिर व स्वस्थ असेल तर जगातील सर्वच बाबी (वास्तवात खडतर असूनही ) आपल्याला सुसंगत न् अनुकुल  ठरतात. तेच आपणच  अस्वस्थ (शरीर वा मनाने) असू तर सर्वच वातावरण , पर्यावरण  (जरी बाहेरच्यांना ते  सुसंगत वाटत असले तरी )  दूषित होऊन जाते आपल्यासाठी. 


म्हणून  " स्वस्थ"  (म्हणजे स्वतःमध्ये स्थिर  व बाह्य गोष्टींसाठी अलिप्त )  र‍हण्याचा सराव करायला हवा , प्रत्येकानेच  ; नाही कां ? जेणे करून 

बाह्य परिस्थिती /आलंबन यांचा परिणाम होणार नाही. 

©डॉ.प्रज्ञा देशपांडे.






 ‎ 

 ‎

2 comments: