'न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति।' असे श्लोकाचे अर्धवट पद उल्लेखून वेद-पुराणादी ग्रंथ कसे महिला विरोधी होते , प्राचीन हिंदुधर्म कसा अन्याय करणारा होता , आदींवर ठेवणीतले भाषण , लेखन वर्षानुवर्षे सुरु आहे. जनसामान्यांच्याही मनात तेच रुजवले जाते.
पण वरील श्लोक पूर्णपणे सांगितला जात नाही न् ऐकणारेही शोधत नाहीत.
एकूणच अन्याय , शोषण , उच्च-नीच आदी आवडीच्या गृहीतकांवर अनेकांची दुकानदारी जोमात सुरु राहते. असोत बापडे ! "जो जे वांछील तो ते लाहो । मानवी जमात!!"
हिंदुधर्म हा श्रुतिस्मृतिपुराणोक्त म्हटल्या गेला आहे. "बाबा वाक्य प्रमाणम्" , या धर्मात मान्य नाही. या ग्रंथामधील अनेक चिरंतन , त्रिकालाबाधित सत्य आजही सर्वांसमोर येत नाहीत. शास्त्रचर्चा ,धर्मचिकित्सा पूर्वी नेहमी होत असे. मधल्या काळात भारतीय ज्ञान परंपरा हेय ठरविल्या आणि भारतीयांची तेजस्विता हरपली.
आजकाल तर छिद्रान्वेषी दृष्टीनेच या ग्रंथांकडे पहण्याची फॅशन आली. मग काय? "नावडतीचे मीठ अळणी" , प्रमाणे पुराणग्रंथांतील सर्वच "फालतु" ठरवण्याची अहमहमिका लागली तर नवल काय ?
एकूणच धर्मग्रंथात व्यष्टी ते समष्टी सुखी व्हावे याविषयी सांगितले आहे. सांगण्याची पद्धत आजच्यापेक्षा वेगळी आहे. न् ते समजायला जरासा बदल स्वतःच्या गृहीतकांमध्ये करायला हवा.
जसे मॉडर्न लोकांनी विरोधाची धार तेज ठेवली तशीच (पुरुषसत्ताक) परंपरावाद्यांनी स्वतःला गैरसोयीच्या बाबी लपवून ठेवल्या. असो.
भगवान् वेदव्यासांनी अठरा पुराणे लिहिली. त्यातील एक स्कंदपुराण होय.
स्कंद पुराणाच्या माहेश्वरखण्डातील कौमारिकाखण्डच्या २३व्या अध्यायात कन्यागौरव केला आहे. तो पुढील प्रमाणे.
दशपुत्रसमा कन्या
दशपुत्रान्प्रवर्द्धयन्।
यत्फलं लभते मर्त्यः
तल्लभ्यं कन्ययैकया॥ २३.४६ ॥
एक कन्या दहा पुत्रांच्या बरोबरीची आहे. दहा मुले पोसून जे फळ मानवाला मिळते , तेच फळ एका कन्येच्या पोषणाने मिळते.
( एक पुत्री दस पुत्रों के समान है। कोई व्यक्ति दस पुत्रों के लालन-पालन से जो फल प्राप्त करता है वही फल केवल एक कन्या के पालन-पोषण से प्राप्त हो जाता है।)
चक्क पुराणात कन्येचा इतका मोठा सन्मान केला आहे.
अशा प्रकारची उद्धरणे शोधून आजच्या वाचकांसमोर ठेवायला हवीत. न् वाचकांनीही डोळसपणे चांगली उदाहरणं शोधायला हवीत.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment