#दंतकथा.
बुलबुलशा नावाचा बादशाह असतो. बादशाही पद्धतीने राज्य कारभार हाकत असतो. मनमर्जी , मनमौजी , मनस्वी असा बादशाह न् त्याचे झेलू सहकारी यांचे प्रचंड गुळपिठ असतं.
प्रजेतील बुद्धिमान जनता , अलिप्त न् जवळजवळ निष्क्रिय असते. सर्जनशील व उद्योगी जनला "दोन दे , चार काढ" , प्रकाराने राजाच्या सहकारीवर्गाशी जुळवून जगत असते. झुंडप्रिय न् सुकुमार बुद्धीची प्रजा फसफसणाऱ्या फेसाप्रमाणे राजस्तुती करत असतात. एकूण सर्व राजकारभार आलबेल सुरळीत सुरु असतो.
एकदा बंडू नावाचा बारा-पंधरा वर्षाचा मुलगा राजवाटिकेतील फुलं चोरताना पकडल्या जातो. बादशाह समोर हाजीर केल्या जातो. बंडू पुजारी कुटुंबातील आहे , कळल्यावर बुलबुलशा आदेश देतो ,' पाच हजार फटके खा किंवा आमच्यावर काव्य लिही' . बंडू म्हणतो की , 'मला कविता नाही रचता येत' . त्यावर बादशाह म्हणतो , पंडिताच्या कुळात जन्मला तर कविता रचता आलीच पाहिजे' .
फटके खाण्यापेक्षा कविता जुळवून बघू , असा विचार करतो. रचना करायला वेळ द्या अशी विनवणी करतो. बादशाह पण वेळ देतो.
'ट' ला 'ट' , नि 'र' ला 'र' करत कसा बसा बंडू शब्द जुळणी करतो. न् दरबारात म्हणतो.
दिसतो सगळी कडे सूर्यप्रकाशा
आमचा बुलबुलशा बुलबुलशा ॥
जिकडे तिकडे सुखाची वर्षा
आमचा बुलबुलशा बुलबुलशा ॥
आता तरी येशील का रे पावसा
आमचा बुलबुलशा बुलबुलशा ॥
झाडाझुडांवर बहर खाशा
आमचा बुलबुलशा बुलबुलशा ॥
बंडू करी काव्य कसाबसा
आमचा बुलबुलशा बुलबुलशा ॥
कवितेत अनेकदा आलेलं स्वतःचं नाव ऐकून बुलबुलशा अतिशय खूश होतो. न् स्वतःच्या गळ्यातील नवरत्न हार व वरतून हजार सुवर्णमुद्रा देऊन त्याचा सत्कार करतो. आणि पालखीतून त्याच्या घरी पोहचवून देण्याचा आदेश देतो.
बंडूची आई अत्यंत खूश होतो. शेजारी एक महाविद्वान् पंडीत रहात असतो. त्याच्या पत्नीला बंडूच्या सत्काराची गोष्ट कळते. 'यथातथा बुद्धीचा बंडू इतकी कमाई करू शकतो तर माझ्या नवऱ्याची तर सुपिक बुद्धी व प्रचंड विद्वत्ता आहे. त्याला तर नक्किच अधिक मिळेल' , असा विचार करून ती नवऱ्याच्या मागे लागते. 'पुस्तकं वाचन , ग्रंथलेखन सोडा. आजकाल कविता रचून जास्त मिळकत होते. राजावर कविता रचा ना ! ' शेवटी तो विद्वान प्रौढ-शैलीत एक प्रदीर्घ काव्य रचतो. नि राजदरबारात जातो.
बादशाहा समोर स्वतःचे काव्य अस्खलित म्हणून दाखवतो. बादशाह ते काव्य ऐकतो. अर्थात काव्य समजण्याची ना बादशाहाची पात्रता असते ना दरबाऱ्यांची ! बादशाह त्या विद्वानाच्या काव्याची यथेच्छ निंदा करतो , 'म्हणतो इतक्या शंभर ओळींमध्ये फक्त एकदाच , तेही शेवटी आमच्या नावाचा उल्लेख आला. हे काय काव्य आहे कां ? यापेक्षा तर बंडूचे काव्य कितीतरी सरस आहे.' आणि त्या विद्वानाला शंभर फटक्यांची शिक्षा सुनावतो.
तर असा असतो बादशाही न्याय !
#तात्पर्य ? अर्थात तुमच्या अनुभवाने , कल्पनेने सुचवाल तेच !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.