Sunday, April 10, 2022

सहजोक्त.

#राम राम . 

राम  शब्दात एक न्यारीच खुमारी आहे. 

त्रेता युगात झालेला राम  हा सर्व भारतीयांना आदर्शवत् राजा होता. मानवी मूल्ये , मर्यादा , पराक्रम  , व्यवस्थापन , नेतृत्व  आदी सर्व गुणांच्या समुच्चयाचे  एकत्र  मूर्त रूप म्हणजे  त्रेतायुगातील  सीताराम !   

त्रेतायुगातील रामाला आप्तांमुळे   वा परक्यांमुळे   अनेक संकंटांचा सामना करावा लागला होता.  प्रत्येक कसोटीच्या वेळी रामाचे धैर्य , विनम्रता , सातत्य , समाधानीवृत्ती आदी  गुण  अनुकरणीय आहेत . इतकेच  नाही तर संकट समयी  गुरुजन , मित्र वा स्नेहीजनांशी परामर्श करण्याचा , सांगितलेल्या मार्गावर चिकाटीने चालण्याचा  तसेच  सर्वांना घेऊन काम करण्याचा रामाचा स्वभाव म्हणजे सुसंस्कृत-यशस्वी व्यक्तिमत्वाचे  अनुसरणीय दर्शन होय . 

 विश्व विजेत्या बलवान रावणाशी  लढताना रामचे मनोधैर्य किंचित खचणं अगदी स्वाभाविक होते. त्यावेळी प्रत्यक्ष सूर्याने  देखिल त्याला प्रोत्सहित केले.

"राम राम महाबाहो 

शृणु गुह्यं सनातनम्।

येन सर्वानरीन् वत्स 

समरे विजयिष्यसि ॥"

 वेळोवेळी गुरुजनांचे मार्गदर्शन मिळणे  व त्याबरहुकूम  वागण्याची बुद्धी मिळणे , यासाठी देवाची कृपा जबरदस्त   हवीच हवी. 

 विष्णुचा अवतार राम  भारतीय संस्कृतीला भारतीयत्व प्रदान करतो , करत राहील. पण त्यासाठी प्रत्येक भारतीयाने स्वतःतील "राम" जपला पाहिजे.  "राम" समजून घेणे व रामत्व अंगी बाणणे या  प्रगत अवस्था आहेत. 

 

 फक्त त्रेतायुगातील रामच  "राम"  आहे , असे नाही. 

तर  राम म्हणजे  रमते इति ।  रम् + णः ।  किंवा  रम्यते अनेन इति । रम् + घञ्  ।  म्हणजे  मनोज्ञ > मनाला उमजणारा /रमवणारा  असा र‍ाम . 

 राष्ट्र , समाज , नातेसंबंध या सर्वांमध्ये रमता येणे , रममाण होणे म्हणजे खरे "राममय होणे"!   असा राम प्रत्येक मनात जिवंत राहिला तर  "यावच्चंद्रदिवारकौ" , आपण भारतीय  "सर्वेऽपि सुखिनः" होऊ यात शंका नाही.

जुन्या काळापेक्षाही आज अशी  रामोपासना करणे व्यष्टी  व समष्टी  दोहोंसाठी आवश्यक व अनिवार्य आहे.   शुद्ध पाण्याला दूषविण्यास थेंब भर गढूळ पाणी कारण ठरते. तद्वत् आपले भारतीयपण काही विखारी/विकारी मतांनी दूषित  होतात. 

 ते होऊ नयेत , यासाठी  रामदासांच्या शब्दांनुसार  रामालाच शरण जाणे इष्ट होय.

 

युक्ति नाही बुद्धि नाही। 

विद्या नाही विवंचिता॥

 नेणता भक्त मी तुझा।

  बुद्धी दे रघुनायका॥१॥


मन हे आवरेना की।

 वासना वावडे सदा॥ 

 कल्पना धावते सैरा। 

 बुद्धी दे रघुनायका॥२॥


बोलता चालता येना। 

कार्यभाग कळेचिना॥

 बहुत पीडिलो लोकी।

  बुद्धी दे रघुनायका॥३॥


तुझा मी टोणपा झालो। 

कष्टलो बहुतापरी॥

 सौख्य ते पाहता येत नाही। 

 बुद्धी दे रघुनायका॥४॥


नेटके लिहीता येना। 

वाचिता चुकतो सदा॥

 अर्थ तो सांगता येना।

  बुद्धी दे रघुनायका॥५॥


प्रसंग वेळ तर्केना।

 सुचेना दीर्घ सूचना॥

  मैत्रिकी राखता येना। 

  बुद्धी दे रघुनायका॥६॥


संसारी श्लाघ्यता नाही।

 सर्वहि लोक हासती॥

  वीसरु पडतो पोटी। 

  बुद्धी दे रघुनायका॥७॥


चित्त दुश्चित होता हे।

 ताळतंत्र कळेचिना॥ 

 आळसू लागला पाठी।

  बुद्धी दे रघुनायका॥८॥


कायावाचामनोभावे। 

तुझा मी म्हणवितसे॥

 हे लाज तुजला माझी। 

 बुद्धी दे रघुनायका॥९॥


आशा हे लागली मोठी।

 दयाळुवा दया करी॥

  आणीक नलगे काही।

   बुद्धी दे रघुनायका॥१०॥

   

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


3 comments: