Wednesday, April 27, 2022

#सहजोक्त.

 

सुभाषिते कालातीत असतात. मानवी प्रवृत्तींचे , भावनांचे प्रकटीकरण करणारी  अनेक सुभाषिते आहेत.  

खरा श्रीमंत कोण ?  यावर भरपूर चर्चा , लेखन वगैरे घडू शकते. पण अत्यल्प शब्दात समजावण्याची सुभाषितांची शैली खासच असते.

 आता हेच सुभाषित  बघा ना !

वयमिह परितुष्टा वल्कलैस्त्वं दुकूलैः 

सम इह परितोषो निर्विशेषो विशेष:

 स तु भवति दरिद्रो यस्य तृष्णा विशाला मनसि च परितुष्टे कोऽर्थवान् को दरिद्रः ॥   

शतक-त्रयी रचणारे भर्तृहरी हे प्राचीन काळातील प्रतिष्ठित व सदा विजयी  सम्राट होते.  राजपद सांभाळणारे  भर्तृहरी  व्याकरण , साहित्य विषयांतील तज्ज्ञ रचनाकार होते. "भारतीय शिक्षणातून सर्वांगीण व्यक्तमत्त्व विकास साधायचाच" , सिद्ध करणारे  हे उदाहरण आहे. असो.

"वैराग्यशतकम्" मधला हा श्लोक आहे. 

श्लोकाची पार्श्वभूमी थोडक्यात  अशी -   एक संन्याशी व राजा यांच्यात घडलेला हा प्रसंग . तो राजा खूप दानी व न्यायी असतो.  तर हा संन्याशी देखील आत्ममग्न , संतृप्त व  अतिशय वैराग्यमूर्ती असतो. ऐहिक दृष्ट्या अतिशय दारिद्यावस्थेत असलेल्या या वैराग्याला  सत्पात्री दान करावे , अशी राजा   इच्छितो. तुम्हाला काय हवे ते मागा , मी देतो. असे राजा म्हणतो. त्यावेळी संन्याशी , वरील श्लोक म्हणतो.  श्लोकाचा भावार्थ थोडक्यात असा -  

हे राजा , तू तुझ्या रेशमी वस्त्रांमध्ये खुश आहेस ,  तसा  मी वल्कले घालूनही संतुष्ट आहे.  संतुष्टीचा स्तर  दोघांमध्ये समानच आहे.  त्या संतुष्टीत काहीही भेद नाही. मग दरिद्री कोण ?  तर  ज्याची  हाव मोठी आहे तो.   आत्मतृप्त , आत्मसंतुष्ट , समाधानी व्यक्तींमध्ये  दरिद्री  वा श्रीमंत असा भेद  कसा  बरं असेल ? (कारण समाधानी वृत्ती  ही मनाची अवस्था आहे . )


वरील श्लोकात गरीबीची भलामण केलेली नाही , तसेच श्रीमंतीचा द्वेष केलेला नाही.

आजकाल ब्रँडेड वस्तु , हॉटेलिंग , शॉपिंग करणारी हायफाय जीवनशैली  वगैरे वगैरे असणे म्हणजे सुखी ,  प्रतिष्ठित समजतात.  पण दुर्दैवाने ,"समाधान, संतुष्टी" कोणत्याच मॉलमध्ये विकत मिळत नाही. भौतिक परिस्थिती काहीही असली तरी  मनातून समाधानी , संतृप्त असणे ही  दुर्लभ देणगी आहे. अर्थात , समाधानीवृत्ती  कष्टसाध्य सद्गुण आहे. 

श्रीमंत असो वा गरीब ;   समाधानी  व  निरोगी जीवन जगण्याचे सद्भाग्य विरळांच्याच नशिबी असते.    विकसित  , संपन्न देशात आजकाल satisfaction index मोजण्याचा प्रघात रूढ होत आहे.  भारतीय संस्कृती वा विचारसरणी पहिले पासूनच प्रगत होती , हेच वरील सुभाषित आपल्याला सांगते. नाही कां ? 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 



 

3 comments: