#बघ हं , हेही दिवस जातील !
काही दशकांपूर्वी समाजसेवक , स्वातंत्र्यसैनिक मोतिलाल छल्लाणी (बाबुजी) , नागपूरात प्रसिद्ध होते. स्वातंत्र्यसैनिकांना सन्मान व पेंशन मिळवून देण्याच्या चळवळीतील हे प्रख्यात नाव होते.
छल्लाणी काकांचा मुलगा उत्तम चित्रकार , छायाचित्रकार अविनाशदादा म्हणजे शरदचा (माझे पती) मित्र. अविनाशदादा ह्यांनी आईवडिलांचा समाजसेवेचा व सामाजिक संवेदना-सौहार्द्राचा वसा शेवट पर्यंत निभवला.
अविनाशदादांचे म्हणजेंच बाबुजींचे घर केळीबागरोडवर होते. घरी आरशावर "बघ बरं , हेही दिवस जातील!" हे वाक्य सुवाच्य अक्षरात लिहिले होते. अविनाशदादाचीच ही कलाकारी होती.
मला आठवतं की बाबुजींनी त्या वाक्याच्या मागचे तत्त्वज्ञान उलगडून सांगितले होते.
प्रत्येकाने आरश्यावरच हे वाक्य लिहावं , असं त्यांचं मत होतं . जेव्हा आपल्या मनात गर्व , माज , अहंकार येतो व आपण आढ्यतखोर होतो तेव्हा हे वाक्य चेतावणीचे वाक्य ठरते. बघ , जास्त ऊतमात करू नकोस , सर्वांशी माणुसकीने वाग कारण , हे दिवस जास्त काळ रहाणार नाहीत. हे दिवसही नक्कीच निघून जातील .
तर हेच जेव्हा आपण न्यूनगंडात , निराशेत व दैन्यावस्थेत असतो तेव्हा हेच वाक्य दिलासा देणारे असते. बघ बरे , हे वाईट दिवसही निघूनच जातीलच . कारण जीवनात कोणतीच गोष्ट स्थिर , चिरंतन नाही , मग तुझी दयनीय परिस्थितीही पालटणारीच आहे म्हणून नैराश्य झटकून टाक न् हातात आलेलं कर्तव्य मनापासून कर .
तेव्हा त्या वाक्याचे न् त्या मागील तत्त्वाचे गांभीर्य कळत नव्हते. पण आज अनेक उन्हाळे-पावसाळे बघितल्यावर वाटते की खरोखर वैयक्तिक ,कौटुंबिक , सामाजिक , आर्थिक वा कोणतीही परिस्थिती असो , ती चिरंतन नाहीच नाही . परिवर्तन हाच सनातन नियम आहे.
सखोल विचार केला तर "बघ बरे , हेही दिवस जातील!" असा अनुभव सर्वांनाच वेगवेगळ्या टप्प्यात आलेलाच असतो , नाही कां ?
कविकुलगुरु कालिदासाच्या त्रिकालाबाधित श्लोकाचा उल्लेख इथे समर्पक ठरेल.
कालक्रमेण जगतः परिवर्तमाना । चक्रारपंक्तिरिव गच्छति भाग्य-पंक्ति ।।
(स्वप्नवासवदत्तम् /१ / ४)
समय के साथ-साथ संसार परिवर्तनशील है । पहिये के अरों के समान भाग्य भी निरन्तर बदलता रहता है ।
बाबुजी छल्लाणीं व अविनाशदादाच्या स्मृतींना विनम्र अभिवादन .
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment