बालयोगिनी मुक्ताबाई.
"निवृत्ति-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई-एकनाथ-नामदेव-तुकाराम" , या गजरात टाळ-मृदंगाच्या संगतीने वारकरी पंढरपुरास जातात. संतांच्या मंदियाळीत स्त्री-संत तसेही कमीच , त्यातही नाम-गजरांमध्ये स्थान मिळविलेल्या मुक्ताबाई , या अद्वितीयच होय.
पैठण जवळील आपेगावच्या कुळकर्णी विठ्ठलपंत नि रुक्मिणीदेवी यांच्या पोटी चार अलौकिक संतरत्ने निर्माण झाली. उच्च-अध्यात्मिक साधक असलेल्या मायबापाच्या पोटी जन्माला आलेली ही चारही भावंडे , जन्मजात विवेकी सिद्ध अशीच होती. अपत्यांच्या नामकरणातूनही आई-बाबांचा अध्यात्मिक-अधिकार उमजतो. साधकाला सातत्यपूर्ण उपासनेतून संसारातील मायारूपी फोलपणा समजला की 'निवृत्ती' लाभते , निवृत्तीनंतर दृढोपासनेने 'ज्ञान'प्राप्ती होते. निवृत्तिपर आचरणासह परिपूर्ण ज्ञानाने साधक मोक्ष'सोपाना'रूढ होतो , अशी सर्वांगिण तयारी झालेला साधक जीवन'मुक्त' होतो . विठ्ठलपंत-रुक्मिणीबाई यांनी अपत्यांची नावे अनुक्रमे निवृत्ति-ज्ञानदेव-सोपान-मुक्ता अशी ठेवली.
अभंग-आख्यान-कीर्तन-प्रवचने तसेच संत-अभ्यासकांचे साहित्य इत्यादींतून कवडश्याप्रमाणे "मुक्ताबाई" यांचे चरित्र वाचकांना कळते. नावाप्रमाणेच मुक्ताबाई जीवनमुक्त बालयोगिनी होत्या.
यावनीसत्तेची नांदी सुरु होण्यापूर्वीचा तो काळ! यच्चयावत् जनता अनिष्टरूढी , गतानुगतिक कर्मकांडीय संभ्रमात वावरत होती. ख-या ज्ञानाला अोहोटी लागली होती. भक्तीचा बाजार भरला होता. विवेकी-सामंजस्य जणु लोप पावले होते. अशा कालावधित गुरुच्या आज्ञेने सन्यासवृत्ती सोडून गृहस्थाश्रमात परतलेले थोर साधक विठ्ठलपंत व त्यांची तितकीच साध्वी पतिव्रता पत्नी रुक्मिणीबाई यांच्या पोटी
अनुक्रमे शके ११९५ , ११९७ , ११९९ व १२०१ मध्ये ही चार भावंडे जन्माला आली. तीन भावंडांची लाडकी बहिण मुक्ताबाईं शके १२०१ म्हणजे इ. स. १२७९ (काहींच्या मते १२७७) मध्ये जन्मली .
तत्कालीन समाजाच्या भ्रामक रुढीप्रियतेने विठ्ठलपंत व रुक्मिणीबाईंना छळ-छळ छळले होते. संन्याश्याची पोरे म्हणून या भावंडांनाही समाज त्रास देत असे. समाजाने जणू वाळीतच टाकलेले हे कुटुंब ! अपत्यांना संस्कार व ज्ञान देण्यास दोघेही माता-पिता जागरुक होते. मुलांचे वडिलांजवळ शिक्षण सुरुच होते. सर्व कुटुंबीय मिळून त्र्यंबकेश्वराला प्रदक्षिणा घालण्यास जात असत. त्याच काळात निवृत्तीनाथांना गहनीनाथांचा गुरुमंत्र मिळाला. निवृत्तिनाथ आठ वर्षांचे होत आले तसे आई-बाबांना त्यांचा उपनयन संस्कार व्हावा असे वाटू लागले. पण आळंदीतील कोणीच ब्रह्मवृन्द यासाठी तयार होई ना . अनेक धर्मसभांमध्ये विठ्ठलपंत विनविण्यास जात. पण कोणीही होकार देत नसत. त्यातच आळंदीच्या ब्रह्मवृंदांनी देहान्त प्रायश्चित्त घेण्यास सांगितले , त्यानुसार दोहोंनी इंद्रायणीत देहत्याग केला न् चारही भावंडं अनाथ झाली. त्यावेळी त्यांची वयं अनुक्रमे १० , ८ , ६ व ૪ होती . मातृपितृच्छत्र विरहित कोवळ्या बालकांनी एकमेकांना सांभाळले. या सगळ्यांची अध्यात्मिक योग्यता तत्कालिन सगळ्या धर्ममार्तंडांहून अधिक होती यात शंका नाही.
सर्वात लहान , लौकिक-व्यवहारात अजाण , अबोध अशा मुक्ताबाई जनरीतीच्या वणव्याने लवकरच प्रगल्भ व परिपक्व झाल्या , त्यांचे बालपण संपूनच गेले. निवृत्तिनाथांनी तिन्ही भावंडांना गुरुदीक्षा दिली.
वारकरी-संप्रदायाचा पाया रचणारे , भागवत्धर्म-पताका रोवणारे , ज्ञानेश्वरीकार ज्ञानियांचा राजा , संत ज्ञानेश्वर या सर्व भावंडांहून अधिक प्रख्यात वाटतात. परंतु संत ज्ञानेश्वरांच्या तीनही भावंडांची योग्यता त्यांच्याच तोडीची होती , यात शंका नाही. या भावंडांनी ज्ञानेश्वरांना पूरक नि आश्वासक वातावरण अवती-भवती सतत ठेवले , शिवाय पाठीमागे वा सोबत राहून स्वतःच्या आत्मिक प्रगतीसह समाजाच्या अाध्यात्मिक प्रगतीची कास धरली.
बालयोगिनी मुक्ताबाईंनी वयाने लहान असूनही आपल्या मोठ्या भावंडांना मायेने सांभाळले. मुक्ताबाईंचे अवघे आयुष्य जेमतेम अठरा वर्षांचे होते. विविध अभंग , संतसाहित्यातून वेचून बघितल्यास मुक्ताबाईंचा जीवनपट अंदाजे थोडक्यात असा मांडता येईल. (घटनाक्रम आणि वय ऐतिहासिक सत्य पुराव्यांवर आधारित असेलच असे नाही .) साधरणपणे वयाच्या चौथ्या वर्षी आई-वडिलांचा मृत्यू , वयाच्या साडेचार-पाचव्या वर्षी पैठणच्या धर्मपीठासमोर काही कूट अभंग रचून म्हटले ,वयाच्या सहाव्या वर्षी ज्ञानदेवांच्या पाठीवर मांडे भाजून निवृत्ति दादाला खाऊ घालणे , विसोबा खेचरांचे गर्वहरण , वयाच्या आठव्या वर्षी ताटीचे अभंग सांगून ज्ञानदेवांना लडिवाळ उपदेश , नऊ ते अकरा वर्षे पर्यंत भावंडांसह वारी न् पंढरपुरात संतमेळाव्यात नामदेवांना उपदेश , गोरोबा काकांकडून भक्तसाधकांच्या तयारीची परीक्षा करवून घेतली , बाराव्या वर्षी चांगदेवांचे गर्वहरण व मुक्ताईंनी त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार करणे , चांगदेवांना उपदेश करणे. पुढे ज्ञानदेवांनी भावार्थदीपिका व अमृतानुभवाची रचना करणे , नंतर नामदेवांसह तीर्थाटनास जाणे . ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे एकवीसावे वर्षी संजीवन समाधी घेतली , त्यानंतर काहीच दिवसांत सोपानदेवांनी 'सासवड' येथे तर मुक्ताईंनी अठराव्या वर्षी 'मेहूण' येथे वैशाख कृष्ण दशमी , रविवार शके १२१९ मध्ये तापी-नदीकाठी समाधी घेतली. तीनही भावंडांना समाधी देऊन मग गुरु निवृत्तिनाथांनी शके १२१९ ज्येष्ठ वद्य द्वादशीला ब्रह्मगिरी पर्वतावर 'त्र्यंबकेश्वर' येथे समाधी घेतली.
काय विलक्षण योग म्हणावा ! एका वर्षांमध्ये चारही भावंडांनी योगबलाने संजीवन समाधी घेतली. मुक्ताबाईंच्या सदेह-मुक्त-समाधीचे वर्णन संत नामदेवांनी स्वतःच्या गाथेत असे केले आहे ,
"कडाडली वीज निरंजनी जेव्हा l
मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली l
वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई l
झाली मुक्ताबाई स्वरूपाकार l
एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी l
जेव्हा निरंजनी गुप्त झाली l
गेले निवारुनी आकाश आभुट l
नामा म्हणे कोठे मुक्ताबाई l"
अशा प्रकारे बालयोगिनी मुक्ताई यांचा जीवनपट छोटासा पण विलक्षण असाच आहे.
श्रीकृष्णाची अत्यल्पजीवी बहिण योगमाया जशी ज्ञानयोग-सौदामिनी होती , तद्वत अत्यल्प साहित्य-निर्मिती , अल्पायुषी जीवन असूनही मुक्ताईने संपूर्ण वारकरी सांप्रदायात अढळ गुरुपद स्वतःच्या कर्तृत्वाने प्राप्त केले आहे , यात शंका नाही.
मुक्ताबाईंच्या जीवनातील चार प्रसंग त्यांच्यातील तेजस्वी-योगिनीचा सविस्तर परिचय करून देतात . ते चार प्रसंग पुढील प्रमाणे ,
प्रसंग १ => आई-वडिलांच्या मायेला पारखे झालेली ही भावंड , एकमेकांना सावरत होती. भावंडांमधील वडिलभाऊ निवृत्तिदादाला एकदा मांडे खायची इच्छा झाली . साधक-योगी जरी असले तरी वय तसे कोवळेच होते ना त्या भावंडांचे ! मुक्ताबाई लागली मांड्याच्या तयारीला , त्यासाठी हवा होता खापराचा तवा . मग काय ? बिचारा छोटा जीव गावात ,"सगळीकडे खापराचा तवा देता कां ?" विचारत फिर-फिर फिरला . कोणालाही साधी कीव आली नाही. उलटपक्षी विसोबा चाटी यांनी , या भावंडांना तवा मिळूच नये अशी सोय केली . आता कसे मांडे खातात , बघू या गंमत! म्हणून लपून पाहू लागले. इकडे मांडे करता येणार नाही म्हणून मुक्ताबाई रडू लागली. तेव्हा ज्ञानदादा मदतीला धावला. त्याने मुक्ताबाईला मांडे करायला सांगितले न् ते योगबलाने स्वतःच्या पाठीवर भाजायला सांगितले. सर्व भावंडे आनंदाने मांडे खाऊन तृप्त झाली. इकडे गावातील विघ्नसंतोषी लोकं स्तंभित झाले. भावंडांची योगसिद्धता पाहून विसोबा शरण आले. ज्ञानेश्वरांनी त्यांना उपदेश केला . सोपानदेव व मुक्ताबाईंनी त्यांना
बोध केला. संतसाहित्याच्या एका मतप्रवाहानुसार विसोबा खेचर हे सोपानदेवांचे शिष्य , तर दुस-या मतानुसार मुक्ताबाई या विसोबांच्या गुरु होत.
प्रसंग २=> पैठणचे धर्मपीठ गाजवून परत येताना भावंडांनी गावोगावी कीर्तन-प्रवचने केली. पुणतांबे गावी आले असता , चौदाशे वर्षांचे सिद्धयोगी चांगदेव , गुहेमध्ये ध्यानस्थ होते. समाधीतून बाहेर आल्यावर हे योगी कलेवरांना जीवदान देत असत. त्यानुसार गुहेच्या बाहेर अनेक कलेवर ठेवलेली होती. ज्ञानेश्वरांच्या सांगण्याहून मुक्ताबाईंनी ती कलेवर जीवंत केली. आणि ती भावंडं पुढील मार्गाला निघाली. समाधी संपल्यावर चांगदेवांना शिष्यांकडून सारे कळले. बालवयात चारही योगी भावंडांची साधना बघून चौदाशे वर्षांचे चांगदेव मनातून चांगलेच स्तिमित झाले. इतक्या अधिकारी पण लहान वयाच्या ज्ञानदेवांना नेमकं काय मायना लिहावा , असा संभ्रम पडून कोरेच पत्र पाठविले. ते कोरे पत्र पाहून भावंडांचा अभिप्राय होता की , इतकी तपश्चर्या करूनही चांगदेव कोरेच राहिले. मग ज्ञानदेवांनी पासष्ट श्लोकांची रचना करून त्यांना धाडली, तीच चांगदेव-पासष्टी होय. त्या पासष्ट श्लोकांचा अर्थ चांगदेवांना कळाला नाही. या भावंडांना भेटायला ते निघाले . 'आपण मोठे योगी' , या भावनेने वाघावर बसून आले. तीनही भावंडांसह भिंतीवर बसलेले ज्ञानेश्वर योगदृष्टीने त्यांचे हे भाव जाणून भिंतीला 'चल' म्हणतात. ती निर्जीव भिंत भावंडांना घेऊन चालू लागते. चांगदेवांना हे सर्व पाहून भावंडांच्या योग्यतेची न् स्वतःतील न्यूनाची जाणीव होते . ते ज्ञानदेवांना शरण येतात. ज्ञानदेवांच्याच मतानुसार ते मुक्ताबाईंकडून अनुग्रह घेतात. मुक्ताईने त्यांना पासष्टी समजावून सांगितली. चौदाशे वर्षे योगतपस्या करून जे साध्य झाले नाही , ते गुरु मुक्ताई यांच्या उपदेशाने क्षणात आकळले. ज्ञानचक्षु उघडले , जणु नवा जन्म झाला .
याचे वर्णन करताना चांगदेव म्हणतात ,
"चांगा जन्मला माध्यान्ह काळी ।
मायबापे दोन्ही नाहीशी जाली ॥१॥
मुळीच चांगा नाहीसा जाला ।
मुक्ताई म्हणे चांगया भला भला ॥२॥
वटेश्वर चांगा मुळी लागला ।
पोसणा घेतला मुक्ताईने ॥३॥"
चौदाशे वर्षांचे चांगदेवांना , दहा-अकरा वर्षांच्या मुक्ताईने आईसारखे सांभाळले , मुक्तिमार्गावर गतिमान केले , ते चांगदेवांच्या अभंगातून आपल्याला कळते ;
"निर्गुणाचे डाहाळी पाळणा लाविला ।
तेथे सुत पहुडला मुक्ताईचा ॥१॥
निज निज बाळा न करी पै आळी ।
अनुहात टाळी वाजविते ॥२॥
तेथे निद्रा ना जागृती भोगी पै उन्मनी ।
लक्ष तो भेदुनि निजणा तो ॥३॥
निभ्रांत पाळी पाळणा विणवुनी ।
मन हे बांधोनि पवन दोरा ॥૪॥
एकविस सहस्र सहाशे वेळे बाळा ।
तोही डोळा स्थिर करी ॥५॥
निद्रा ना जागृती निजसी काई ।
परियेसी चांगया बोले मुक्ताबाई ॥६॥
अतिबालवयातच जिचे बालपण संपले , सुख-दुःख , मानापमान या सर्वांच्या पलीकडे ती कधीच गेलेली होती , म्हणूनच चांगदेव-मुक्ताई संवादात सांगतात ,
"सुखाचे शेवटी दुःख आले भेटी ।
भेटलियासाठी तेही नुरे ॥१॥
सुख ते कवण दुःख ते कवण ।
दोन्ही अज्ञान करी पारे ॥२॥
मुक्ताई म्हणे चांगया चेई ।
स्वयंभू चेईला वटेश्वरी ॥३॥ "
बालयोगिनी मुक्ताबाई या जन्मजात योगिनीच होत्या हेच त्यांच्या अभंगातून जाणवते.
चांगदेव हे निर्विवाद मुक्ताईचे शिष्य होते , तसे विसोबा खेचरही होते कां ? याबद्दल संतसाहित्यिकांमध्ये दुमत आहे. चांगदेवांचा एक अभंग नेमकं काय ध्वनित करतो ?
"अविनाश पाळणा अव्यक्ते विणीला ।
तेथे पहुडला योगिराज ॥१॥
जो जो जो जो म्हणतसे माया ।
साकारातीत निजरे चांगया ॥२॥
सोहं सोहं षट्चक्रन्यासे ।
तुज परिसे देता , मीच न दिसे ॥३॥
ऐसी निद्रा तुज लागो दे पुत्रा ।
मुक्ताई खेचरा उपदेशी मंत्रा ॥૪॥
प्रसंग ३ =>
संत , सिध्द ,योगी जरी असले तरी ही भावंडं अतिशय कोवळ्या मनाची न् सात्विक होती. तत्कालीन समाजाच्या विखारी असहिष्णुतेने कधीतरी त्यांची मनं पोळली जात. सा-या जगासाठी ज्ञानीयांचा राजा ठरलेले ज्ञानेश्वर एकदा भीक्षा मागण्यास गेले. दूषणे , हलके शब्द , कुटाळक्या आजवर ते सहनच करीत होते. पण यावेळी आईवरूनही कोणीतरी अपमान केला. वैरागी पण मातृहृदयी ज्ञानदेव खोलवर दुखावले न् तडक कुटीत येऊन ताटी बंद करून स्वतःला कोंडून घेतले. तिघेही भावंडं गोंधळली , दुःखी झाली. त्यावेळी मुक्ताबाईंनी बेचाळीस अभंग रचून ज्ञानेश्वरांना त्यांच्या उद्विग्न मानसिकतेतून बाहेर काढले , इतकेच नाही तर पुढील अजरामर साहित्य-लेखनाची त्यांची मनोभूमी तयार केली. हेच अभंग पुढे ताटीचे अभंग म्हणून ख्यात पावले.
चिंता क्रोध मागे सारा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा
योगी पावन मनाचा
साही अपराध जनाचा ।
विश्व रागें झाले वन्ही
संती सुखें व्हावें पाणी॥
शब्द शस्त्रें झालें क्लेश
संती मानावा उपदेश।
विश्व पट ब्रह्मदोरा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा॥
ब्रह्म जैसें तैशा परी
आम्हा वडील भूतें सारी।
अहो क्रोधें यावें कोठे
अवघे आपण निघोटे॥
जीभ दातांनी चाविली
कोणें बत्तीशी तोडीली।
मन मारुनी उन्मन करा
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
शोषित-पीडित-वंचित बालकांच्याच काय मोठ्यांच्याही तोंडी इतकी समंजस-विवेकी-भाषा अशक्य वाटते , ही भाषा केवळ सिद्धयोगी , पूर्णब्रह्मस्वरूपी विभूतींचीच असणे स्वाभाविक आहे !
प्रसंग ૪ => "नामदेव गाथा" हा ग्रंथ तत्कालिन समाजाचे , व्यक्ति-विशेषांचे , स्थानांचे यथार्थ चित्रण करणारा प्रामाणिक ग्रंथ आहे. नामदेवांनी स्वतःचे सुद्धा अतिशय परखड व वास्तविक वर्णन केले आहे. स्वतः नामदेवांनी अभंगांतून मुक्ताईंच्या अधिकाराविषयी अभंग लिहिले आहेत. एकदा ज्ञानेश्वरादी भावंडे तत्कालिन प्रसिद्ध संतांच्या मेळाव्यात भेटले. प्रथम-दर्शनीच निवृत्तिनाथांनी संत नामदेवांना नमस्कार केला. मग ज्ञानेश्वरांनी व सोपनादेवांनीही केला . कोणी नमस्कार केला की आपणही त्यांना नमस्कार करायचा , अशी वारकरी-सांप्रदायात रीत आहे. नामदेवांनी या तिघांनाही नमस्कार केला नाही , उलट मुक्ताबाई नमस्कार करेल अशी वाट पाहू लागले. निवृत्तिनाथांनी देखिल मुक्ताबाईंना नमस्कार करायला सांगितले. परंतु त्यांनी नमस्कार तर केला नाही , पण सगळ्यांसमोर जे काही सुनावले ते नामदेवांनी अभंगात मांडले ,
अखंड जयाला देवाचा शेजार l
कारे अहंकार नाही गेला ll
मान अपमान वाढविसी हेवा l
दिवस असता हाती घेसी दिवा l
परब्रह्मासंगे नित्य तुझा खेळ l
आंधळ्याचे डोहाळे का बा झाले l
कल्पतरू तळवटी इच्छिती ते गोष्टी l
अद्यापि नरोटी राहिली का l
घरी कामधेनु ताक मागू जाय l
ऐसा द्वाड आहे जगा माजी l
म्हणे मुक्ताबाई जाई ना दर्शना l
आधी अभिमाना दूर करा ll
संत नामदेवांना बहुतेक सर्व संत मान देत असत. अखंड हरिसंकीर्तनात दंग असलेले नामदेव स्वतःला श्रेष्ठ भक्त समजत होते. त्यांचा अहंकार मुक्ताईंच्या लक्षात आला. अजूनही संत नामदेवांवर गुरुकृपा झाली नव्हती. ही बाब त्यांच्या संतपदासाठी न्यूनत्वाची होती. हे जाणून मुक्ताईंनी योजना केली. संत गोरा कुंभार हे सर्व मंडळीत वयाने नि अधिकाराने थोर . मुक्ताबाईंनी त्यांना सर्व विठ्ठलभक्तांची योग्यता तपासायला सुचवले. हातात उलथणं घेऊन गोरोबाकाका सर्वांच्या डोक्यावर थापटत होते. जेव्हा नामदेवांची वेळ आली तेव्हा त्यांनी अोरडणे सुरु केले , ते पाहून गोरोबा म्हणाले ,
"गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई ।
सुन्नेभरि नाही भाजियेला ॥" (ना. गा. १३३३.८)
हे सर्व अपमानास्पद वाटून नामदेव तेथून पळाले ,
" मागे पुढे पाहे पळत तातडी ।
आला उठाऊठी पंढरीसी ॥" (ना. गा. १३३६.२)
" नामदेव म्हणे देवा कवणा शरण जाऊ।
कोणा मी होऊ शरणागत ॥" (ना.गा. १३૪७.५) अशी नामदेवांची अवस्था झाली. ज्ञानदेवांच्या सल्ल्याने विसोबा खेचर यांच्या शरण गेले. पुढे याच नामदेवांनी भागवद्धर्म पताका पंजाबा पर्यंत रोवल्या .
वरील चार प्रसंगातून मुक्ताईंचे स्वतंत्र , मातृहृदयी , कणखर , धैर्यशील व्यक्तिमत्त्व अधोरेखित होते. कर्तृत्ववान् भावंडांची तितकीच ताकदीची सक्षम बहीण आपल्याला यातून उमजते.
स्वतः विषयी न सांगणे , तत्कालिन समाजाची रीत होती. त्यामुळे प्रकाशित साहित्याद्वारे प्रख्यात संत सोडले तर इतर संत व त्यातही स्त्रीसंत यांच्या विषयी लोक-कथा , संप्रदाय-मान्य वदंता यातूनच माहिती मिळते. कधी कधी ती फारच धूसर असते.
ज्ञानेश्वरांनी वा सोपानदेवांनी मुक्ताईचा उल्लेख आपल्या अभंगातून केलेला दिसत नाही. निवृत्तिनाथांच्या तुरळक अभंगातून (सकल संत गाथा , निवृत्तिनाथांचे अभंग २६ ,२९ ,३०) मुक्ताईं विषयी थोडेसे कळते.
योगी चांगदेव व संत नामदेवांच्या अभंगातून आपल्याला मुक्ताई अधिक उलगडते.
सकल संत गाथेतील मुक्ताई-विरचित अभंगातूनही त्यांचे व्यक्तिमत्व जरासे आकळते.
उत्तरवर्ती संतसाहित्य-संशोधकांनी अशा संतांवर अधिक अध्ययन करणे सुरू ठेवले आहे , ही एक जमेची बाजू होय. उत्तरवर्ती अभ्यासकांपैकी एक
वामन दाजी ओंक यांनी मुक्ताबाईचे एक हिंदी पद संकलित केले आहे ते असे –
वाहवा साहेबजी l सद्गुरुलाल गुसाईजी
लाल बीज मो उदीला काला, औठ पिठसो निला l
पीत उन्मनी भ्रमर गुंफा रस झुला बाला l
सहस्त्र दल मो अलख लिखाये, आज लौ परमाना l
जहां तहा साधू, दसवा आप ठिकाना l
सदगुरु चेले दोनो बराबर, येक देशमो भाई l
एकसे ऐसे दरसन पायो महाराज मुक्ताई l
वरील अभंगावरून , मुक्ताबाईंनी मराठी अभंगरचनेबरोबरच काही हिंदी पदेही रचली असावीत , असे म्हणण्यास वाव आहे.
संत म्हणजे खरेतर जीवनमुक्त सिद्ध योगीच असतात. संतांना जातीपातीतच काय स्त्री-पुरुष-आदी भेदांमध्ये गोवणे म्हणजे बुद्धीभेद करणे होय. वारकरी सांप्रदायातील श्रेष्ठ संतांच्या मांदियाळीतील , मूर्धन्य व ललामभूत संत बालयोगिनी मुक्ताबाईंचे चरित्र वाचनीय तर आहेच , मननीय व आचरणीयही आहे .
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
नागपूर .