#जयंती.
जशी जशी हनुमान जयंती जवळ येतेय, तसा तसा एक संदेश प्रसारित होतोय की, जयंती नव्हे जन्मोत्सव म्हणावे. गेल्या वर्षी ही असा संदेश वाचण्यात आला, नि यंदाही वाचला!
हनुमान चिरंजीव आहेत. म्हणजे त्यांना मरण नाही. पण त्यांचा जन्म झालंय. मग जन्मोत्सव होणारच ना! मग जयंती? ती चूक कां? जन्मोत्सव की जयंती? काय खरे? काय म्हणावे? अशी द्विधा होते अशा वेळी.
मराठी शब्द आपण सहज उपयोगात आणतो. बरेचदा ते शब्द कसे तयार झाले? याविषयी आपल्याला नीट माहिती नसते. माहित करून घेण्याची गरजही नसते. अनेक मराठी शब्दांच्या व्युत्पत्ती मराठी व्याकरणापेक्षा संस्कृत व्याकरण व निरक्तात सहज सापडतात. संस्कृत व्याकरणानुसार अर्थ समजून घेणे सर्वांना शक्य नाही. मग असे संभ्रम पसरणे सोईचे होते. असो.
जयंती विषयीचा संदेश वाचून मी विचारात पडली. जरा पुस्तकातून शोधाशोध केली. थोरामोठ्याशी चर्चा केली. त्यावरून माझं मत इथे मांडतेय.
मुळात "जयंती" हा शब्द संस्कृतच आहे, हे नक्कीच. मूळ धातू "जय्" याचा अर्थ जिंकणे. जयंती असे मराठीत लिहितात तर संस्कृतात जयन्ती असे लिहितात .
'जयन्ति' असाही एक शब्द संस्कृतात आहे. ते क्रियापद तृतीय पुरुषी बहुवचनी असून 'जिंकतात' असा त्याचा अर्थ आहे.
मराठीतील जयंती शब्दासाठी "जयन्ती" हा लेखनपर्याय आहे. 'जयंती' शब्दाचा 'जन्म' शब्दाशी तसा संबंध नाही, अक्षर साम्य वगळता.
संस्कृतात "जयन्ती" शब्द कृदंत आहे. ते स्त्रीलिंगी एकवचनी असून त्याचा अर्थ "जिंकणारी", असा होतो. या कृदंताचा उपयोग विशेषण म्हणून करतात. उदाहरणार्थ
"जयन्ती मंगला काली, भद्रकली कपालिनी|
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वहा स्वधा नमोस्तुते नमोस्तुते ||"
या श्लोकात जयंती म्हणजे जिंकणारी असाच अर्थ आहे.
हनुमानाची किंवा कोणत्याही थोर व्यक्तिमत्वाची जयंती असो, "जयन्ती" शब्दाचा अर्थ घेताना वरील अर्थाने घ्यावा .
"स जातो येन जातेन
याति वंश: समुन्नतिम् |
परिवर्तिनि संसारे
मृत: कॊ वा न ज्ञायते ||"
ज्याच्या जन्मामुळे वंश व कुळाचा उद्धार होतो, तोच जन्मला. बाकी, सतत बदलणाऱ्या या जगात कोण जन्मला काय किंवा मेला काय? दखल कोण घेणार?
तर अशा थोरामोठ्यांच्या जन्माने साधारण तिथी सुद्धा "जयन्ती" ठरते. पुण्य संपादन करून मनुष्य लोकांतून स्वर्गात प्रयाण करण्याच्या तिथीला पुण्यतिथी म्हणतात.
'शब्दकल्पदृमात' जयंती शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे.......
जयं पुण्यञ्च कुरुते
जयन्तीमिति तां विदुः ।
रोहिणीसहिता कृष्णा
मासे च श्रावणेऽष्टमी ।।
अर्द्धरात्रादधश्चोर्द्ध्वं
कलयापि यदा भवेत् ।
जयन्ती नाम सा प्रोक्ता
सर्व्वपापप्रणाशिनी ।।
जी जय व पुण्य करते, तिला जयन्ती म्हणून जाणतात. श्रावणात कृष्ण पक्षातील अष्टमी, रोहिणी नक्षत्र, अर्धरात्रीच्या आधी व नंतर जेव्हा एका कलेनंही जी असते, तेव्हा तिला जयन्ती म्हणतात. सर्व पापं नाशणारी ती असते.
तर सारासार विचार करता, सगळेच सजीव जन्म घेतात, जन्मोत्सव सर्वांचाच असतो. कोणाचा मोठ्ठया प्रमाणात तर कोणाचा अत्यल्प प्रमाणात!
पण जन्मलेल्या कोणाचीही जयंती साजरी करायला त्याचे कर्तृत्व महत्त्वपूर्ण ठरते. हनुमान आपले आराध्य आहेतच म्हणून त्यांची जयंती साजरी करायलाच हवी.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
खूप छान माहिती दिली मॅडम!
ReplyDeleteधन्यवाद
Deleteधन्यवाद
DeleteAbsolutely perfect. Well written as well.
ReplyDeleteThank you.
DeleteThanks, to all
ReplyDelete