Saturday, September 7, 2024

#सहजोक्त.

 करंजी-मोदक.

'अन्न हे पूर्णब्रम्ह', मानणारी आपली संस्कृती. आपले सर्वच सणवार, हे खऱ्या अर्थाने उत्सव असतात. बाह्य आणि आंतरिक आनंद ओसंडून वहावा, याची पूर्ण सोय आपल्या प्रत्येक उत्सवात दिसते. तसंच व्यक्तिगत उपासनेपासून ते सामाजिक उपासनेतून सकारात्मकता जपण्याचे कसबही जपताना दिसतात आपले सण.

आज गणेश स्थापना. गणपतीबाप्पासाठी 21 मोदक तळत होती. सासूबाईंचे वाक्य आठवले.

'बहिणी शिवाय भाऊ असू नये. मोदकासोबत एक तरी करंजी करावीच करावी.' मग केली करंजी! 

 देवीच्या नवरात्रात नुसत्या सोळा करंज्या करून भागात नाही. एक तरी मोदक तळावा,  म्हणतात. बहिणाला भाऊ हवाच.

करंजी म्हणजे बहिणीचे प्रतीक आणि मोदक म्हणजे भावाचे प्रतीक.

आपली संस्कृती कन्या-पुत्र दोहोंचाही सन्मान करणारी होती प्राचीन काळापासून. म्हणूनच तर अशा रूढी वर्षानुवर्षे घराघरातून पाळल्या जात असत ना? आपली संस्कृती प्रत्यक्ष शास्त्रापदेश देते पण प्रतीकातून, वर्तन सुधारण्यासाठी प्रेरणा देते. समजून उमजून सुयोग्य वर्तनाची संधी देते. 


पूर्वी "अष्ट पुत्रा सौभाग्यवती हो", म्हणत असताना त्या आठ अपत्यात कन्या गृहीत होतीच होती.  "ज्येष्ठा गौर"  मिरवत आणण्यासाठी घरची कन्या हवीच हवी. भाच्याची जावळे आत्याच्याच मांडीवर काढायचा दंडक होता.

बाळाचे नाव आत्याच कानात सांगेल. तसेच उपवर वधू वा वराच्या मागे मामानीच उभे राहायचे असते. मुंजीबंधन वेळी बटूच्या मागे मामाच उभा राहतो. अन्नप्राशन मामाच्याच मांडीवर आणि हातून करायचे. लग्नातील वधूची पिवळी अष्टपुतळी साडी मामानीच नेसवायची. तर तिसरे वर्ष लागले की आत्याने भाचीला रेशमी हिरवा परकरपोलका शिवायचा, तसेच हिरवी गरसळी (माळ) घालायची. रूढ धार्मिक प्रसंगात भाऊबहिणी महत्वाचे आहेतच. याचाच अर्थ प्रत्येक घरी भावाला बहीण आणि बहिणीला भाऊ हवाच हवा.

दाक्षिणात्य काही जातीत, मुलगी नसलेल्या घरी मुली देऊ नये, असा दंडक होता.


मूळ रूढी-परंपरा काळानुसार बदलविल्या गेल्या. संयुक्त कुटुंब विलग झाले. कुटुंब लहान होता होता, (अपत्यांची संख्या ) आठाचे चार, चाराचे तीन तीनाचे दोन, दोनाचे एक आणि आता तर एकही नको  असे झालेय. 

बरे इतकी कुटुंब छोटी छोटी होऊनही देशाची लोकसंख्या बेसुमार वाढलीय!!  त्यामुळे छोट्या कुटुंबाची 'सुरक्षितता' (विशेषतः सामाजिक /मानसिक /भावनिक) दावणीवर लागली आहे. 


कुटुंबं व्यवस्थेच्या मुळातील हेतू, कारणे काळाच्या ओघात धूसर झाली. 

सोईनुसार अर्थ लावणे आणि हवे ते बदल करणे सुरु झाले. शिवाय 'जुने ते सर्व कर्मकांड आणि वाईटच', असे मत सुशिक्षित लोकांना पटू लागले. 

जसे, वरदक्षिणा ही रूढी काळाच्या ओघात हुंडा म्हणून विकृत केल्या गेली, तर हक्काची "साडीचोळी" ही रूढी नष्टच केल्या गेली.


जुने ते सगळे छानच होते कां? सांगता येत नाही. कारण तत्कालीन समाजाला योग्य अशा त्या रूढीपरंपरा होत्या.  पण सगळ्याच पूर्णपणे वाईट निश्चित नव्हत्या, हे मात्र 100% खरे. 


गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून बऱ्याच घरात एकच अपत्य आहे. त्यामुळे आत्या, मामा, काका, मावशी वगैरे नाते नव्या पिढीच्या प्रत्यक्ष अनुभवात नाही. चुलत-चुलत, मावशीच्या नणंदेच्या पुतण्या, आत्याच्या जावेची मुले, आत्तेसासू, मामेसासू, साटेलोटे वगैरे तर फारच गोंधळायला होते. नात्याची ही बहुपदरी वीण, मानलेल्या नात्यातून काही अंशी समजते. पण त्या नात्यात तितके नैसर्गिक वात्सल्य असेलच असे नाही. म्हणून तर "गुड टच, बॅड टच" शिकवावे लागते, लहानमुलांना.


 भावंडातील परस्पर अनुबंध -पुस्तके वाचून- समजत नाही. "शेअरिंग इज केअरिंग" हे कृत्रिमरित्या शिकवावे लागते. आपोआप रुजत नाही. एकाच शाळेत शिकणारी भावंडे, परस्परांची काळजी घेत असत , जडणघडण आपोआप होत असे. धोके, खाचखळगे आपोआप लहानांना मोठ्यांकडून कळत असत. संगोपन, सहवेदना वगैरे घरूनच अंगवळणी पडत. सहजीवनाचे शिक्षण घरातून आणि शाळेतूनही मिळत होते.


"करंजी-मोदक" ही नुसती खाद्य संस्कृती नव्हे तर कुटुंब व्यवस्था जपणारी सामाजिक संस्कृतीही आहे. नेमकी मधल्या पिढीने क्षणिक सुखासाठी वा अज्ञानातून सामाजिक वीण उसावली. 

परिणाम आता समाजात दिसतोय, होय ना?

"करंजी-मोदक" संस्कृती पुन्हा प्रतिष्ठित होऊ दे, हीच गणपतीबाप्पाच्या चरणी प्रार्थना.

बुद्धी दे गणनायका 🙏🙏🙏

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर.




6 comments:

  1. खूप छान

    ReplyDelete
  2. वाह.. अतिशय सुंदर.. रूढी आणि संस्कृतीविषयी माहिती देणारा वाचनीय लेख
    .. प्रज्ञाताई 🌹👍🌹👏

    ReplyDelete
  3. खूप छान ग!

    ReplyDelete