1) अंभोरा
काल बरेच वर्षांनी 'अंभोरा' येथे जाणे झाले.
नदीवरचा पूल, नवी लिफ्ट, पुलावर सर्वत्र दिव्यांचा झगमगाट, गाड्याच गाड्या सगळीकडे , प्रचंड गर्दी, कोणत्याही जत्रेच्या ठिकाणी असतात, तशी खाण्यापिण्याची, वस्तूंची दुकानें, बकालपणे पसरलेला कचरा, गर्दीचा बेशिस्त वावर, सेल्फी/रील करीत फिरणारी गर्दी असे सारे दृश्य पहिले.
अजूनही हे पर्यटनस्थळ विकसित होतेच आहे. भौतिक विकास प्रक्रिया सुरूच आहे. आशा करू या की जितका भौतिक विकास गतिमान होतोय, तितकाच गुणवत्तापूर्ण विकास येथील स्थानिक मानवी समुदायाचा होईल आणि येथे येणारे पर्यटकसुद्धा जबाबदार, सजग होतील.
दहा-बारा वर्षांपूर्वी माझ्या कारने आईबाबांना नेले होते, तेव्हा इथे पूल बनविणे सुरु होते. तेव्हाचा तो नजारा बघून आईने म्हटले होते,'आपलं अंभोरा वाटत नाही'.
आताचे अंभोरा बघून काल तर मला गलबलून आले, फ्लड लाईटच्या झगमगाटात, मंद समईच्या सोज्वळ प्रकाशतील आमचे 'लक्ष्मीनारायण मंदिर' जणू हरवून गेले.
वास्तविक वर्तमानात व्यावसायिक भरभराटीत येऊ पाहणाऱ्या 'धार्मिकपर्यटन स्थळाने', जुन्या अनवट, साध्यासुध्या , सात्विक, आपुलकी जपणाऱ्या आमच्या अंभोऱ्याला स्वप्नवत करुन टाकले!
काल तिथे फिरून फिरून मी लहानपणी अनुभवलेलं माझं गाव, मोडकळीस आलेला आमचा वाडा, ते गर्द झाडीझुडी असलेले विस्तीर्ण आंगण, आणि नदीपर्यंत पाऊणशेच्या वर दगडी पायऱ्या असलेले शांत मंदिर शोधत होती. घराच्या मागचा मोठ्ठा वृक्ष आजही तसाच आहे, फक्त आता तिथे 'आपलं' घर नाही. मंदिराच्या बाजूने नदीच्या पात्रात हळूच नेऊन सोडणारी उतरंडी पायवाट आता अर्ध्यातच तुटली आहे कारण नदीचा प्रवाह अधिक उंच झालाय. घराच्या जागेवर आता स्वच्छता संकुल बांधले सरकारने. पूर्वेकडून मंदिरात प्रवेश घेण्यासाठी मार्गच उरला नाही, पाणीच पाणी सर्वत्र झालंय. आता मंदिराच्या वीसपंचेवीस पायऱ्या शिल्लक आहेत. कतळाचा कोरीव गरुडखांब बुडाला वाढलेल्या नदीच्या पात्रात. टेकडीवजा बेटावर असलेले चैतन्येश्वर मंदिर, आता भरीव पुलाने मोठया विस्तृत रस्त्याला जोडले आहे. चैतन्येश्वर आणि आमच्या मंदिराच्या मधून पूर्वी झुळझूळ वाहणारा उथळ प्रवाह आता पूर आल्यागत मोठा पण संथ झालाय. आमच्या मंदिरा मागे असलेली शेत, जंगल आता उरलेच नाही. सर्वत्र अनिर्बंध मानवी वावर जोरात सुरु आहे.
अजून काय होतं असं तेव्हा, जे अजूनही मनात रेंगाळत आहे?
पुढच्या भागात सांगते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर.
नमस्कार
ReplyDelete🙏🙏🙏
Deleteहे सगळीकडेच होत आहे. कालाय तस्मै नमः..
ReplyDeleteMilind bhusari
Deleteखरंय
Deleteअशा मनाच्या कोपऱ्यात असलेल्या आठवणी कितीही नाही म्हटलं तरी आनंद देतातच... कधी लिहून कधी अव्यक्त राहून
Deleteभौतिक विकास
ReplyDelete✅✅
Deleteतीर्थक्षेत्र आता पर्यटनक्षेत्र झालेली आहेत...
ReplyDeleteउपासनाहीन, अनुष्ठान विरहित मंदिरं त्यांची आभा गमावत चालली आहेत...भाविकांची जागा आता पर्यटक घेत आहेत... सगळं कसं पॉश, झगमगीत आणि स्टार लेव्हल चं हवंय...
हं, खरंय
DeleteSundar
ReplyDelete🙏🙏🙏
ReplyDeleteनशीब जुना वाडा दिसला, आतातर गावे ही ओळखता येणे कठीण झाले आहे. शहरातील सारखे रस्ते दिशाभूल करु लागले आहेत.
ReplyDelete🙏🙏🙏 वाडा नाहीय आता
Deleteवा खूप सुंदर वर्णन
ReplyDelete🙏🙏🙏
ReplyDeleteपुरातन आणि नवीनतम हा संघर्ष काळाची गती आणि निर्मिति-स्तिथि-प्रलय या प्राचीन तत्वाच्या सत्यतेची जाणीव करुन देतो. या कालातीत सत्याचे उत्कृष्ट वर्णन.
ReplyDelete