Wednesday, January 15, 2025

#विसरसीमेच्या स्मरणकुपीतून......

 

2) अंभोरा 

  आयुष्यात घडलेले प्रसंग, भेटलेल्या व्यक्ती, अनुभवलेल्या घटना या स्मृतीतून कधीच जात नाहीत. फक्त कालौघात त्यावर धूळ बसते, इतकेच. पण काही कारणाने ती धूळ झटकल्या गेली,

की मूळ स्मृती जशीच्या तशी समोर येते.


अंभोऱ्याला आमचे लक्ष्मीनारायणाचे प्राचीन मंदिर (250+वर्षे जुने ) असल्यामुळे घरातील मंडळी आम्हाला घेऊन जायची तिथे. अंभोऱ्याला आमच्या देवळाजवळ,  गावाच्या शेवटच्या टोकाला, नदीकाठी पण टेकाडावर असं चार तसम्याचे आमचे घर होते. मी बघितले तेव्हा ते जीर्ण, आणि खचलेले होते. पण त्या घरात राहणारे राजुकाका मुंजे आणि  मुंजेआजी  नेहमीच ते घर नीटनेटके ठेवायचे. आंगणत सकाळी सडासारवण, तुळशी भोवती रांगोळी, ओसरी, माजघर, स्वयंपाक घर सारवून स्वच्छ ठेवलेले असे. 

मुंजे आजी माध्यम बांध्याच्या, सावळ्या आणि अतिशय शिस्तप्रिय, कडक, अत्यंत कष्टिक होत्या. 1967पासून  मुंजे आजी (श्रीमती वत्सला अंबादास मुंजे ) , आजोबा छोट्या राजुकाका सह  इतक्या खेडेगावात आमच्या मंदिराचे पुजारी आणि व्यवस्थापक म्हणून राहत होते .  अंबादास आजोबांच्या मृत्यु नंतर  आजीने अतिशय शिस्तीत राजुकाकाचे  पौरोहित्य शिक्षण नागपुरातील अंबादासपांडे गुरुजी यांचेकडून करुन घेतले. आजही राजुकाका 'गुरुजी' म्हणून पंचक्रोशीत चांगले नाव कमावून आहे.

माझ्या आईचे माहेर म्हणजे मुंजे. पण मुंजे आजी आणि आईकडील मुंजे घराणे यांच्यात आडनावशिवाय काहीच सबंध नाही. 

परंतु मोठीआई (आईची आई =श्रीमती रत्नप्रभा भास्करराव मुंजे )  मुंजे आजीला बहीण आणि राजुकाकाला पुत्रवत समजत होती.  गंगा दशहरा म्हणून दहा दिवस आजीचा मुक्काम अंभोऱ्यात असे. एकदोनदा अस्मादिकांचाही मुक्काम आजी सोबत म्हणून अंभोऱ्यात झालाय लहानपणी. 

तेव्हा खेड्यात बराच वेळा लाईन नसायची. घरात झिरोचे किंवा कमी व्होल्टचे पिवळे लाईट असायचे. शक्यतो सर्व कामे दिवसा, उजेडी करायचे. पाखरे निजली की आपणही निजून जायचे. 

मोठी आई पोथ्या पुराण वाचायची. वाती वळत बसायची. भाज्या निवडून ठेवायची. मुंजे आजी त्यांचे दैनिक कामे नेटाने करायच्या. राजुकाका देऊळ स्वच्छ करून देवाची पूजाअर्चा करून परिसरातील यजमानाकडे पूजेला निघून जायचा.  

माझ्या बरोबरीचे सोडा, बोलायलाही कोणी नसायचे.  मग मुंजे आजी मला फुले तोडून आण, फुलांचे हार कर अशी कामे सांगायच्या. त्या नदीवर गेल्या की मलाही घेऊन जायच्या. नदीवर कपडे कसे धुवायचे, हे प्रात्यक्षिकासह मला शिकवले त्यांनी.  नदीत भोंवरे कुठेय? उथळ पाणी कुठेय? शेवाळलेले खडक कुठेय? हे सर्व त्या आजी पाण्यात कपडे धूता धूता सांगायच्या.   

अंभोऱ्यात माझा मुक्काम बराच वेळ  नदीच्या पाण्यात किंवा आमच्या देवळाच्या सभामंडपात असायचा. मनसोक्त गाणे जोर जोरात म्हणायचे.  एकटीनेच भेंडया खेळायच्या.  नदीच्या काठी बसून दगड नदीत भिरकवायचे, किती तरंग निघाले, ते मोजायचे. वाळूतून शिंपले, शंख गोळा करायचे. मोठ्या शिंपल्याला दगडावर घासून  बटाटे-सोलणी तयार करायचे. मध्यम आकाराचे शिंपले, तिखट-मिठाच्या पाळ्यात चमचा म्हणून वापरायला गोळा करायचे. उगवत्या सूर्याची, पाण्याला सोनझळाळी  देत पसरणारी किरणे बघायची , तसेच वाळूत देऊळ, घर वगैरे तयार करायचे. आकाशातून  उडणारे, आकार बदलणारे  थवे बघत शांतपणे घंटोंशी बसून राहायचे. हवेचा आवाज ऐकायचा.  वेगवेगळ्या झाडांच्या पानांच्या सळसळीचे आवाज वेगवेगळे असतात, ते नीट ऐकायचे.  विविध पक्षी बघायचे. शिवाय सकाळ संध्याकाळी देवळात  स्तोत्र, अभंग म्हणायचे. ना कुठली चिंता, ना घाई, ना काळजी! इतकी फुरसत पुन्हा  कधी मिळालीच नाही.

कोणतेही साधने, वस्तु, खेळणे यांच्या शिवाय स्वतःच स्वतःची करमणूक करून घेण्याची कला, या काळात साधून गेली. कोरोना काळात याचा खूप उपयोग झाला. 

तेव्हा अंभोरा इतकं छोटं खेडे होते की जीवनावश्यक वस्तु आणायलाही कुही पर्यंत जावे लागे. आठवडी बाजार सुद्धा मेंढ्याला (मेंढा नावाचे गाव ) भरायचा. त्यामुळे वस्तु, पदार्थ अत्यन्त काटकसरीने वापराचे प्रशिक्षण आजीच्याच हाताखाली मिळाले.  

नकळत जीवनोपयोगी किती तरी गोष्टी या काळात सहज समजल्या. आज मागे वळून बघताना जाणवते की, अतिशय समृद्ध आणि विविधतापूर्ण बालपण जगायला मिळाले.  

इतकी छान मंडळी छोट्या कालावधीसाठी कां असेना, आयुष्यात आली, यासाठी देवाचे मानावे तितके आभार कमीच आहे.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर.



10 comments:

  1. लेख आवडला ताई

    ReplyDelete
    Replies
    1. निसर्गाच्या सान्निध्यात कीती छान बालपणी ची दिवस घालवले ताई तुम्ही....

      Delete
    2. हो ना, मी भाग्यवती आहे, देवाची कृपा. 🙏🙏🙏

      Delete
  2. तू लिहिलेल्या सर्व आठवणी वाचून मलापण मी वाशिम ला आजोळी जायचे आजी मामा मामी बरोबर रहायचे त्याची खूपच आठवण झाली.खरंच लहान पणीच्या आठवणीत मन हरवून गेले.

    ReplyDelete
  3. तू पण लिही ना, बालपणीचा काल सुखाचा

    ReplyDelete
  4. ह्या लहानपणीच्या आठवणी म्हणजे आपला खजिना असतो जन्मभरीचा। हवा तेंव्हा उघडा,एकटेपणा जवळ फिरकत सुद्धा नाही।

    ReplyDelete
  5. या लेखमालिके मुळे माझ्या बालपणी घ्या आठवणींना उजाळा मिळाला. लहानपणी दिवाणखान्या च्या रुंदी चा पंखा बाहेर बसून दोरीच्या मार्गे हल़वत राहणारा अर्दली ही आठवला.‌ उत्कृष्ट लिहत रहावे.

    ReplyDelete
  6. फार छान आठवणी वाचतांना मला माझे आजोळ .. :..
    . . . . . :.अकोट आठवले नरसिंह महाराजा चे मंदीर झोपडी आणि बरच काही

    ReplyDelete
  7. फारच छान. अगदी सगळे प्रसंग डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहिले.

    ReplyDelete