Sunday, July 23, 2017

#सहजोक्त

#सहजोक्त.
ययातीचे वंशज.

संयम-नियम उरतात सारे शब्दात फक्त
मोह-मायाचे जंजाळ सुटता सुटत नाही.॥

उतार वयातही लवकर उतरत नाही
जवानीच्या जोशाचे हँगोव्हर सरता सरत नाही.॥

पहावे  तिकडे व्यापून आहे
तारुण्याच्या ज्वाळा
नवतरूणांनाही लाजवतात  या तारूण्यकळा ॥

विज्ञानयुगाने वाढविलेत ययातीचे वंशज
तारुण्य जपण्यात जो तो सजग ॥
 अनुभवाने आता केसही पिकत नाहीत.
प्रगल्भता तर कोर्स करूनही मिळत नाही ॥

सारी कडे नुसता जवानीचा जल्लोश
संस्कारानेच संभाळावा स्वत:चा होश ॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर.





Saturday, July 15, 2017

#सहजोक्त.

#सहजोक्त
मन ! मणामणाचे अोझे लादणारं वा मनामनातून उमेद जागवणारं ,अजीवशास्त्रीय गात्र ! मन कुठे आहे हे कोणीच सांगू शकत नाही. शरीर-रचना-शास्त्रात मनाला स्थानच नाही. तरीही मनाचं अस्तित्व  कोणीही नाकारत नाही.
मन,मानस ,मानसिक,,मनोविकास,मनोविकार,मनोभूमिका ,मनोभावना,मनोवैज्ञानिक ,मनोकामना  मानसशास्त्र इत्यादी शब्दपसारा मनामुळेच निर्माण झालाय.
जगातील प्रत्येक भाषेत 'मन' या विषयावर भरपूर साहित्य निर्माण झाले आहे.
संस्कृतात वेदवाङ्मयात 'शिवसङ्कल्पसूक्त' आहे, ज्याच्या प्रत्येक ऋचेची शेवटची पंक्ती 'तन्मे मन: शिवसङ्कल्पमस्तु' ही आहे .या अोळीचा सरळ अर्थ 'ते माझे मन शिवसंकल्पाने युक्त असावे.' असे म्हटले आहे.
व्याकरणशास्त्रावर आधारित एक विनोदी श्लोक आहे.
      मनो नपुंसको मत्वा प्रियायै प्रेषितं मया
      तत्रैव अरमत तत् हता पाणिनिना वयम् ॥
      याचा भावार्थ असा कि ,मनाला नपुंसक समजून ('ते मन 'ना  म्हणून) मी प्रियेकडे पाठवले. ते मन तिच्यातच रमून गेले.पाणिनींनी आम्हाला फसवले.
      असे हे मन संकल्प-विकल्पाचे आगार आहे.
      ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ,मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण "
       रामदास स्वामी म्हणतात ,'अचपळ मन माझे नावरे आवरीता'
      या शिवाय त्यांनी मनाचे श्लोक लिहिले ज्यात ,
      "मना सज्जना भक्तिपंथेची जावे" म्हटले आहे.
      बहिणाबाई म्हणतात ,'मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर ,किती हाकला हाकला फिरी येये पिकावर '।
      गौतमबुद्धांच्या  धम्मपदात ,
      "मनो पुब्बंगमा धम्मा मनो सेट्ठा मनोमया
      मनसा चे पदुठ्ठेन भासति वा करोति वा ॥ "
      हिंदी सिनेमा तर मनावरच जगतोय असे म्हटले तर वावगं ठरू नये.
      अगदी जुन्या काळापासून ते आतापर्यंत मन या विषयावर किती तरी गाणी आहेत.
      आठवता आठवता मन आनंदीत होतं नि न अाठवल्यामुळे निराश होतं.
      १)मेरे मन ये बता दे तू किस अोर चला है तू .
      २)मन तडपत हरि दरशन को आज
      ३) मन रे तू काहे न धीर धरे
      ४) इतनी शक्ति हमे देना दाता ,,मन का विश्वास          कमजोर हो ना ।
      ५)नाचे नम मोरा मगन . . .
      ६)ए मेरे उदास मन चल दोनो कही दूर चले.
      ७) मेरा मन कहने लगा पास आके न तू दूर जा
      ८) कोरा कागज था ये मन मेरा
      ९)मित ना मिला रे मन का
      असे हे मन वास्तवात असो अथवा नसो प्रभावी आहेच.मन नसेल तर विश्वच शून्य ठरते. मन असेल तर शून्यातून विश्व निर्मिते.
      हे मन शुभ संकल्पाने युक्त ,निरागस ,आनंदी असावं हीव मनोमन प्रार्थना  !
     ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
   
     
     
    

Saturday, July 8, 2017

#सहजोक्त.

#सहजोक्त.
🙏गुरुपोर्णिमा🙏

     सन्ति मे गुरवो राजन् बहवो बुद्धयुपाश्रिता:
     यतो बुद्धिमुपादाय मुक्तोsटामीह ताञ्छृणु॥ ३२॥
     पृथिवी वायुराकाशमापोsग्निश्चन्द्रमा: रवि:
     कपोतोsजगर: सिन्धु: पतङ्गो मधुकृद् गज:॥३३॥
     मधुहा हरिणो मीन: पिङ्गला कुररोsर्भक:
     कुमारी शरकृत् सर्प ऊर्णनअभि: सुपेशकृत् ॥३४॥
     एते मे गुरवो राजंश्चतुर्विंशतिराश्रिता:
     शिक्षा वृत्तिभिरेषामन्वशिक्षमिहात्मन:॥३५॥
     श्रीमद्भागवताच्या एकादश स्कंधाच्या सप्तमाध्यातील या ओळी आहेत. हा अध्याय "अवधूतोपाख्यान"  नावाने प्रसिद्ध आहे. यदुराजाने ज्ञानसंपूर्ण,तरूण,तेजस्वी ,त्रिकादर्शी अवधूताला निर्भय व मुक्तपणे वावरताना पाहून ," आपण विद्वान असून निष्पाप बालकासमान शुद्ध-सात्विक बुद्धी कुठून प्राप्त केली "?असे विचारले ,  त्यावरचे उत्तर म्हणजे वर दिलेले श्लोक अाहेत.
     याच अवधूताला पुढे दत्तोपासकांनी श्रीदत्तगुरू म्हटले. जगाचे गुरुतत्त्व म्हणजे श्रीगुरुदेवदत्त. त्यांना  ज्ञानप्राप्तिसाठी चोवीस गुरुंची गरज पडली.सारी सत्ता,ऐश्वर्य ,तारूण्य,शक्ती असून जगात अलिप्त-विरक्त -निरागसपणे निर्भय जगण्याचे ज्ञान त्यांना या गुरुंनी शिकविले. गुरुंनी शिकवले म्हणण्यापेक्षा अवधूत स्वयंप्रज्ञेने शिकले हे जास्त सयुक्तिक ठरेल.
     त्याकाळात (आपल्या आधुनिक नजरेने) जास्त विकास (भौतिक) नव्हता ,असे मानले तर ; आज सर्वच कक्षा रुंदावल्या आहेत हे स्वीकारणे गरजेचे आहे. "तंत्रविद्येचा सुकाळू" झालाय. वायफाय सगळीकडे हवेच स्टे कनेक्टेड साठी. मग ज्ञानप्राप्तिसाठी त्याचा मुक्त वापर करावा ना!
     जर श्रीदत्तात्रेयांना २४ गुरू लागले तर आपल्या सारख्या सामान्यांना किती ? सोपे त्रैराशिक मांड़ावे ज्याचे त्याने. क्षणाक्षणाने ज्ञानकण वेचावेत नि ज्या स्रोतापासून ते ग्रहण केले त्या गुरुतत्वाला मनोमन कृतज्ञतेने नमावे. हीच खरी गुरुदक्षिणा,शिष्यभाव.
     तेच खरे गुरुवंदन.
     ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
     नागपूर
     ९.०७.२०१७
     रविवार.

#शब्दचिंतन .

#शब्दचिंतन.
" तारतम्य" हा शब्द कानी आला नि विचारचक्र सुरु झाले. बोलताना सहज उपयोगात आणतात हा शब्द. तारतम्य म्हणजे पोच ,विवेक ,वागण्यातील समज ,प्रगल्भता  अशा अनेक अर्थच्छटा त्यातून अपेक्षिल्या जातात.
मुळात हा तद्धित प्रकारातील भाववाचक शब्द आहे. 'तर-तम' या दोनप्रत्ययांपासून  तो तयार झालाय.  तुलना करताना जो प्रत्यय योजतात तो "तर" प्रत्यय.
उदाहरणार्थ उत्तर ,अधिकतर ,उच्चतर,लघुतर ,
महत्तर ,प्रियतर हे मुळातील तत्सम शब्द तर पुढे मराठीकरणात तयार झालेले बद्तर ,बेहत्तर इत्यादी.
सर्वोच्चता दाखवणारा "तम" हा प्रत्यय आहे. उदाहरणार्थ उत्तम,सर्वोत्तम ,महत्तम ,लघुत्तम , प्रियतम,दीर्घतम इत्यादी .
याच दोन प्रत्ययांचे समानार्थी दोन प्रत्यय आहेत ;
तर =इयस्   नि तम=इष्ठ
दोन्हीची उदाहरणार्थ श्रेष्ठ ,ज्येष्ठ ,कनिष्ठ ,गरिष्ठ ,
श्रेयस् ,प्रेयस् कनियस्
मराठीकरण झालेले स्वादिष्ट ,चविष्ट ,गप्पिष्ट ,कोपिष्ट  इथे मुळातील प्रत्ययातही मराठीकरण केलेय.
तर हे दोन प्रत्यय "तर-तम" इंग्रजीतील " ER-EST" ( comparative & superlative degree)  आहेत.
"याहून अधिक चांगले नि सर्वात चांगले" हे कळून वागण्याची पात्रता म्हणजे तारतम्य .कोणत्याही परिस्थितींत स्वार्थापुरता नाही तर सर्वबाजूने अधिक चांगले काय? सर्वोत्तम काय?  हे कळण्याची लायकी विकसित करणे म्हणजेच तारतम्य !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
नागपुर.

Friday, July 7, 2017

#सहजोक्त

#सहजोक्त.

  माझा अद्वैत दोन-अडीच वर्षांचा असतानाचा किस्सा .
मी दुपारी शाळेत गेलेली ,शरद त्याच्या कामावर गेलेला. घरात आजी नि अद्वैत.
जेवणानंतर  दुपारचा आराम करून दोघेही  टिव्ही पहात बसायचे. मग आजी चहा करणार नि अद्वैतला बोर्नव्हिटा देणार. हे ठरलेलं .  आमचं घर किरायाचं , तीन खोल्या सरळ एका लायनीत ,समोर व मागे गच्ची ,अशी रचना. त्या दिवशी आजीने नेहमी प्रमाणे समोरचे दार बंद केले नि अद्वैतला घेऊन स्वयंपाक घरात गेल्या. त्याला बोर्नव्हिटा पाजला , स्वत: चहा पिला; मग त्या कपबश्या-भांडी धुवायला मागच्या गॅलरीत गेल्या.इकडे स्वयंपाक घरात बसलेल्या लहानग्या अद्वैतच्या डोक्यात खट्याळपणा आला.त्याने मागच्या  गॅलरीत उघडणारे स्वयंपाकघराचे दार आतून लाऊन घेतले.
आजीला  कळले नाही. काम करून त्या वळल्या बघतात तर अद्वैतने आतून कडी लावलेली.
त्या घाबरून गेल्या.त्या "अद्वैत ,दार उघड",असं जोरजोरात म्हणू लागल्या. आजी घाबरलीय ,अोरडतेय हे बघून अद्वैतला मजा वाटू लागली. तो आतमध्ये जोरजोरात हसत होता. आजीला काळजी वाटू लागली कारण आत छोटा अद्वैत अडकलाय ,त्याला कडी लावता येत होती पण उघता येत नव्हती.इकडे अद्वैतला वाटत होतं ,"मी अाजीला कोंडलं ".आजी अोरडतेय त्याचं गांभीर्य याला नव्हतं ,ह्याला गंमत वाटत होती.
बराच वेळ झाला .आजी अोरडलतेय आजूबाजूला सगळे कामावर गेलेले. आमची मागची गॅलरी तशी स्वतंत्र ,कुठून उतरणं शक्य नव्हतं .आजीसाठी तर रडकुंडीचीच वेळ होती.शेवटी माझा  बारावीत शिकत असलेला चुलतभाऊ अोरडण्याचा आवाज ऐकून मागच्या पाईपला धरून वर चढला .खिडकीतून अद्वैतशी बोलू लागला ,"अद्वैत ,दार उघड".
तर हा मामाला हासत हासत सांगू लागला ,"मामा ,मी आजीला कोंडलय तर आजी बघ कशी रडतेय !"शेवटी पियुष(माझा भाऊ) ने अवजारे आणली व बाहेरून कडी कापली. दार उघडले. दुपारी दोन तासापासून सुरू असलेला गोंधळ संपला. आजीला काही सुचत नव्हतं .पियुषने परिस्थिती नीट हातळली. संध्याकाळी मी आली. हा पठ्ठ्या धाव्वत येऊन मला बिलगला. हसून ,"मी आजीची गंमत केली" असं सांगू लागला. आजी अजून सावरली नव्हतीच.
शेवटी त्याला मांडीवर घेतलं ,लाड केला मग कलाकलाने समजावून सांगितले .मग त्याला कळले.
हा किस्सा तर लहान मुलं ,त्याचे छोटे आकलन नि त्यानुसार वर्तन यावरचा आहे.पण व्यवहारातही अशी अनेक (वयाने) मोठी नि आपल्याच समजूतीने स्वत:ला कोंडून घेणारी तरी "मी दुस-याची अडवणूक केलीय " असं समजणारी अनेक ‍आढळतात . होय ना!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर.

Tuesday, July 4, 2017

#सहजोक्त.

सप्तरंगी आयुष्य


04-07-2016
08:36


"मैंने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने,सपने सुरिले सपने-------------"
मुकेशचे कातर,हळवे सुर कानी पडतच मनावर अलवार मोरपीस फिरू लागते.स्वप्नक्षणांतून अलगद, हळूच बाहेर आल्यावर विचारी मन विचारात पडते-------.सातरंगाचे स्वप्न म्हणजे काय? तानापिहिअनिजा या सातरंगाचे ? कसे? स्वप्न तर सोनेरी- रुपेरी-चंदेरी असते ना?बर ,निवडायचेच तर आयुष्य निवडावे ना,स्वप्न कशाला?स्वप्न जे सत्यात उतरत नाही अन् अवतरले तर स्वप्न उरत नाही! असे स्वप्न,तेही " इस्टमरकलरमध्ये"?कां?कशाला??
आयुष्य म्हणजे काय? कोणी म्हणतं" चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही ." कोणी सांगतात," आयुष्य हे चुलीवरच्या कढईतले कांदेपोहे" . तर कोणाच्या मते "
" एक धागा सुखाचा अन् चार धागे दु:खाचे
जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे",
कोणी काहीही म्हणोत,जन्मापासून सुरु झालेले ते मृत्युपर्यंत चालणारे,एकेरी वाहतूक म्हणजे आयुष्य!आयुष्य प्रत्येकालाच असते .प्रत्येकाचे आयुष्य वेगळे असते.थोरमहात्म्यांपासून लहानसहानांपर्यंत ,नामदारांपासून ते इनामदारांपर्यंत सगळे जे जगतात ते आयुष्य! कोणाचे आयुष्य इतरांना प्रेरक ठरते तर कोणाचे इतरांच्या खिजगणतीतही नसते .थोरांचे आयुष्य"जीवनचरित्र्य " लिहिण्याजोगे तर कोणाचे किड्यामुंगीसारखे श्रेयहीन !आयुष्य आयुष्यच असते ना? एखाद्याचे सप्तरंगी तर एखाद्याचे गडद काळे असे का? पुन्हा तोच भुंगा--- सप्तरंगी म्हणजे??
सप्तरंगी आयुष्याचे स्वप्न सुंदर असेल काय? एका रंगाचे,एकसुरी आयुष्य नकोच ,यात दुमत नाही.कोणता रंग असावा ,ह्या निवडीची संधी प्रत्येक वेळी लाभतेच असे नाही. पण जो रंग समोर आला तो मनापासून उपभोगावा,हे मात्र अगदी खरं च।
तसे पहायला गेले तर " सप्तरंग" सुद्धा आभासच ना? पांढ-यारंगातून सात रंग निघतात,पुन्हा पांढ-यातच विलीन होतात .पांढ-या रंगाचा अभाव म्हणजे काळा रंग !चैतन्यरूपी पांढरा रंग प्रत्येकाला जन्मत: मिळालाय .प्रत्येकाचे विचार म्हणजे त्याचा प्रिझम. विचारांच्या प्रिझममधून ज्याच्या त्याच्या कलानुसार ,कोणांनुसार पांढरारंगरूपी चैतन्य परावर्तित होते.आणि कमी -अधिक,घट्ट- विरळ,दीर्घकालिक - अल्पकालिक असे सात रंग तयार होतात. शेवटी पुन्हा पांढ-यारंगात एकवटतात.
आपण दुस-याच्या आयुष्यातील सप्तरंगी क्षणांचे छायाचित्र डोळ्यात ठसवतो,वर विचार करतो ," व्वा,काय सप्तरंगी आयुष्य आहे याचे ! माझे मात्र -----)".। फोटोअल्बममध्ये हसरी स्मरणचित्रे असतात.नेमके हसरे क्षण कॅमेरात बद्ध केलेले असतात फोटोरूपाने !ते कितीही वेळा पाहिले तरी हसरेच असतात. पण आयुष्य म्हणजे फोटो नाही ना !दुस-याचे क्षणिक हसरे फोटो पाहून आपले आयुष्य नीरस वाटते. Others garden are always green. ही मानवी प्रवृत्ती स्वाभाविक आहे.
पण " विचार बदला,जीवन बदलेल". हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आपण स्वत: प्रिझम आहोत,देवाने चैतन्य रूपी पांढरा किरण दिलाय .सकारात्मक दृष्टिकोणातून तो किरण शरीररूपी प्रिझममधून परावर्तित होऊ द्यात .बघा आपले आयुष्य कसे सप्तरंगी बहरते ते !दुस-याकडून सप्तरंगाच्या स्वप्नाची अपेक्षा करायची गरजच पडणार नाही. मन सहज गुणगुणेल ,
" मैंने मेरे लिये ही सात रंग का जीवन चुना, जीवन सुरीला जीवन -----।
© डॅा प्रज्ञा  देशपांडे।

Saturday, July 1, 2017


#सहजोक्त.

# सहजोक्त.

चराचर सृष्टी गरजेवरच आधारलीय
गरज प्रत्येक जिवाला असतेच

पशूंना कदाचित शारीरिक  असते
किंवा भावनिकही भूक असते

मानव उन्नत प्राणी म्हणून त्याला
मानसिकही गरज असते

विकासासह जीवन जगताना
भौतिक गरजांच वाढत जातात

ख-या माणुसकीची गरज अाता
दुर्मीळ आणि  नकोशी झालीय.

कसेही वागून गरज भागवणे
पशुत्व शाबूत असल्याची जाण.

गरजे पुरता गोड वागणे
सहज मानवी स्वभावाचे वाण

गरज नसतांनाही साथ देणं
देवत्वाचे लक्षण महान.

आंतरबाह्य देवाचा धावा करणे
भक्ताची अविरत गरज आहे.

भक्ताची भक्ती अखंड टिकविणे
देवपणाची ही पारख आहे.

म्हणून अकारण भक्ताच्या हाकेला
धावण्याची देवालाही गरजच आहे

पशु-मानव-देव या देखील मानवी
गरजेच्या तीन अवस्था आहेत.

पशुपासून देवत्वा पर्यंत विकास
करण्याची आज खरी गरज आहे.

आज खरी गरज आहे.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर.