आताशा मनाला हेच भावतं ,
कां तर कोण जाणे ?
फुलांनी लगडलेली झाडं बागेतच असू दे ,
घर मात्र सजवते मी प्लास्टिकच्याच फुलांनी
किती खरे वाटतात ना ,
अगदी झाडावरच्या ताज्या बहराचे !
शिवाय सुकणे ,कोमेजणे अन् त्यावर डास लागणे ,
अशा भानगडीपण नसतात या गुच्छांना ,
अजून मोठ्ठा फायदा त्यांचा सदा टवटवितपणा !
नसेना कां सुगंध त्यांना,
एअरफ्रेशनर लावलाय घरी ,तो काय शोभेला?
म्हणूनच आताशा मनाला हेच भावतं ,कां तर कोण जाणे ?
फेसबुक-व्हॉट्सॅप मधून मैफिली गाजवणे ,
लाईकवर लाईक मारत फ्रेंडलिस्ट वाढवणे,
चर्चांचे फड , चॅटिंगची झड उगा समोर रेटणे,
मन:पूत फोटो वा वाट्टेल ती बातमी जशी मला वाटेल तशी केव्हाही पोस्टणे,
अाताशा हेच सुखं वाटतं ,कां तर कोण जाणे ?
ती नातेवाईक मंडळी घरी येणार म्हणजे घराला पहिले आवरणे ,
खातीरदारी करता करता जिवाला उगाच थकवणे .
त्यांचे ते आंबट-तुरट-कडवट चेहरे नि तेच तेच पाल्हाळ बोलणे,
जरा म्हणून गोड कोणी भासातूनच मनात जपणे , हे सारं सारं कसं सिरियलमध्येच बरं वाटतं ,पण आताशा मला खरच वास्तवाहून आभास भावतो !
आताशा मनाला हेच भावतं ,कां तर कोण जाणे !
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.
नागपूर
No comments:
Post a Comment