Tuesday, January 15, 2019

तीन कविता

जे घडून गेले आहे ,बिघडवून गेले आहे
 खंत तयाची  मजला आजही सलते आहे.
 जे कधीही घडणे नाही ,वास्तव जन्मी अवघ्या
 उगाच मन कां रमते बघून स्वप्नी तयाला  ॥१॥
 निराश नीरस अवघे जेव्हा घेरून येती मज क्षण
आठवून मग स्वप्निलसे क्षणी उजळे माझे मन
 घडले ,गेले भूत जाहले कशा उगा हो साठवण
भूत-भविष्य सब झूठ न्  सत्य वर्तमान चिरंतन ॥२॥©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

  क्षण क्षण करता करता भरकन वर्षे सरून गेली
हिशेब करीत जगण्याची सवय मात्र तशी राहिली
किती जगलो किती जगू? हे ही नीट माहीत नाही
यालाच आता जगणं म्हणून काळ पुढे लोटत राहील ॥©डॉ. प्रज्ञा देशपांडे



आशेचा दोर न् स्वप्नाकांक्षेची भरारी
करावी अशी  संक्रमणाची तयारी

भविष्यगगनी निळ्या या अथांग
करावा विहार मुक्त आणि उदंड

असावा परि संध चक्रीसवे जो
जोडोनी धागा स्नेहाळसा तो

नको ताटतूट ,नको भरकट
असो बंध भूमीवरि मजबुत

  नाते धरेशी  घट्टसे वर्तमानी
    नि आस भावी जपोनि मनी
   ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment