Thursday, January 23, 2020

#सहजोक्त.




चिन्तन .
गेले पंधरावीस दिवस प्रकृति-अस्वास्थ्य होते. अद्वैतच्या आग्रहामुळे प्रायव्हेट डॉक्टरकडे न जाता  मेडिकल कॉलेज-इस्पितळात जायचे ठरवले. माझ्या सुदैवाने माझी मामी डॉ. राधामुंजे मेयोमध्ये प्राध्यापक व विभागप्रमुख आहे. तसेच आमच्या कॉलनीतच राहणारी वहिनी डॉ. क्षमा केदार ह्या देखील प्राध्यापक व स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. वहिनीशी बोलणं झाल्यावर तपासण्या करण्यासाठी तिच्याच सोबत गेली. स्वतः वहिनी अतिशय निष्णात डॉक्टर आहे. तिने अतिशय काळजीपूर्वक सर्व चाचण्या करवून घेतल्या , निदान केले.
तीन वर्षांपूर्वीपासून असलेली छोटीशी सिस्ट काढून टाकायची , शस्त्रक्रिया करून , असे ठरले. खरेतर या पूर्वी खाजगी इस्पितळातून दोनदा ती काढूनही परत वाढली होती. वहिनीच्याच संदर्भाने शस्त्रक्रिया विभागाचे प्राध्यापक डॉ. नंदागवळी यांनी व्यवस्थित तपासणी करून सांगितले की गेल्या शस्त्रक्रियांमध्ये कदाचित  पूर्णपणे न काढता , जरासा अंश राहून गेल्यामुळे परत परत गाठ वाढली. आपण ती मूळातून काढू , मग परत दुखणे उद्भवणार नाही.
आमच्या अद्वैतचा फक्त न् फक्त मेडिकल कॉलेजातील सरकारी डॉक्टरांवर विश्वास असल्यामुळे (कारण काही प्रायव्हेट डॉ. चे वाईट अनुभव त्याने घेतले आहेत.)  , तो मला घेऊन गेला .

मेयोतील सर्जिकल काँप्लेक्स अत्याधुनिक व अद्ययावत आहे. संपूर्ण बिल्डिंग प्रशस्त , उजेडी व बरीच स्वच्छ अाहे. सरकारी नियमानुसार सर्व चाचण्या केल्यानंतर शस्त्रक्रिया झाली.
प्रमुख डॉ. नंदागवळी न् त्यांची चारपाच जणांची विद्यार्थीचमू , शिवाय नर्सिंग स्टाफ  , परिचर असा मोठा फौज फाटा होता. अॉपरेशन पूर्वी मला पूर्ण कल्पना दिली , फाईल लिहून दिली.  नंतर मलाच नाही तर सोबत आलेल्या अद्वैतलाही पूरेपूर समजावून सांगितले गेले , अौषध कसे घ्यायचे  ते लिहून तर दिलेच शिवाय दोघांनाही समजावून सांगितले. वहिनी व मामी दोघीही फोनवरून संपर्कात होत्याच . सर्जरी विभागात (मी तिथे रुग्ण असताना) माझा माजी विद्यार्थी डॉ. प्रांजल मेश्राम होता. त्यानेही माझी सुश्रुषा केली.
दोन दिवसांनी परत तपासणीसाठी बोलावले होते. तेव्हा जनरल अोपीडीत मी व अद्वैत गेलो. माझ्या आधी एक ग्रामीण स्त्रीरुग्ण तेथे होती. डॉ. नंदागवळी अतिशय शांतपणे त्या महिलेला  समजावून सांगत होते. तिच्या शंकांचे समाधान करीत होते. दोन दिवसांपूर्वी मला व्हिआयपी ट्रिटमेंट मिळतेय असे वाटले होते , पण तसं नाहीय. इथे प्रत्येक रुग्णाला सुयोग्य निदान करून  उपचार दिल्या जातो.
सरकारी इस्पितळातील प्रत्येक रुग्ण नोंद ही "आर् .टी. आय." अंतर्गत येते.
माझा  "सरकारी" व्यवस्थेवरचा विश्वास दृढ करायला , हा प्रसंग पुरेसा होता.

या पंधरावीस दिवसांत तीन वेळा मी तिथे गेली . सर्वच डॉक्टर , व त्यांचे  रुग्णांशी वर्तन पाहून समाधान वाटले.
पंधरा जणांची सोय असलेल्या वॉर्डात पन्नासाहून अधिक रुग्ण दाखल होतात शिवाय बहुतांश रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये असलेला स्वयंशिस्तीचा अभाव  इत्यादी अनेक कारणांमुळे  सरकारी व्यवस्था अतिशय ताणली जाते.  पण येथील प्रत्येक प्राध्यापक व विद्यार्थी डॉक्टर तसेच परिचारिका व इतर घटक  "रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग " समजून अविरत खिंड लढवत असतात. पद्व्यूत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी चक्क ३०-३० तास सतत काम करीत असतात , हे अमानवीय पण कटुवास्तव आहे (हा स्वतंत्र लेखविषय आहे) !!!

 (पन्नाशीला आली म्हणून)
वहिनी व मामीच्या सल्ल्यावरून माझ्या सर्वच चाचण्या केल्या होत्या . म्हणजे सोनोग्राफी,
मेमोग्राफी , ईसीजी , एक्सरे , काही रक्तचाचण्या , फुफ्फुसचाचणी वगैरे वगैरे !  या सगळ्या व शस्त्रक्रिया यांचे बील किती व्हावे ?? चक्क ८० रुपये फक्त.  (इतरत्र कदाचित  अर्ध्यालाखाने बील केले असते. शिवाय  मेनोपॉझल प्रॉब्लेममुळे  हार्ट ,शुगर ,थायरॉईड ,कँसर , गर्भाशय काढा वगैरे वगैरे अशक्य-शक्यता सांगून  सुतावरून स्वर्ग गाठत नसली खुळं डोक्यात घातली असती , ती वेगळीच  )
अजून एक अनुभव आवर्जून सांगावा असा आहे.  क्षमावहिनीच्याच  संदर्भाने रेडिअोलॉजी विभागाच्या डॉ. अनघा देशपांडे यांनी अतिशय काळजीपूर्वक चाचण्या केल्या. इतकेच नाही तर काळजी कशी घ्यायची तेही समजावून सांगितले. त्या विभागात अतिशय तुफान भीड होती. जवळ जवळ एक तास मी तेथे होती.दीड-दोनशे महिलांची तपासणी माझ्या आधी निश्चित झाली असेल. डॉ. देशपांडे व त्यांची विद्यार्थीचमू , प्रत्येक रुग्णाची  तितक्याच आत्मियतेने तपासणी करत होत्या. 
  अखंड सेवेत असलेले हे डॉक्टर , खरोखर देव आसतात.

सरकारी डॉक्टर रुग्णांच्या अलोट गर्दीमुळे इतके व्यग्र असतात , त्यामुळे रिपोर्ट मॅनिप्युलेट करणे , संभाव्यरोगांची भली मोठी यादी देऊन भिववणे  , जास्तीची अौषधी घ्यायला लावणे , असले पैसे उकळू कामं ही सरकारी-मंडळी करत नाही. (शस्त्रक्रियेनंतर सात दिवसांचे अौषध दिले होते. दोन दिवसांनंतर पुनर्तपासणी वेळी चक्क तीनच दिवसांनंतर सर्व अौषधी बंद करायला सांगितल्या डॉक्टरांनी , कारण रिकव्हरी त्यांच्या अपेक्षेपेक्षा झपाट्याने झालेली होती.)

गेल्या काही दिवसात नव्याने साक्षात्कार झाला , तो असा ....
(१) मी पूर्ण टॅक्स भरते , त्यामुळे सरकारी सेवा व व्यवस्था हा माझा प्रथमाधिकार आहे.
(२) सरकारी दवाखाना असो वा शाळा , येथील नियुक्त्या या नियमानुसार व   अर्हता प्राप्त व्यक्तींच्याच होतात.
(३) रुग्णांचे वैविध्य व अलोट गर्दी यामुळे येथील डॉक्टर खाजगीपेक्षा प्रचंड अनुभवी असतात.
(૪) एकाच परिसरात सर्वच विभाग असल्यामुळे , इतरत्र धावाधाव करावी लागत नाही.
(૪)  माझ्याप्रमाणेच  शिकलेल्या , मध्यम वर्गीय , उच्चमध्यमवर्गीयांनी गांभीर्याने सरकारी व्यवस्था उपयोगात आणायचे ठरवले तर त्या बंद न पडता , विकसित होतील . अधिकाधिक सरकारी नोक-या तयार होतील.
(५)  अभिजन वर्गाने सरकारी सुविधांचा प्राधान्याने उपयोग करायचे ठरवले तर सरकारी इस्पितळात ज्या काही थोडेफार वाईट प्रथा चालतात (स्टॉक संपणे , मशिन बंद पडणे वगैरे )  , त्या सर्व बंद होतील , कारण जन-रेटा .
(६) आज सरकारी शाळा बंद पडत आहेत , सरकारी दवाखान्यांना प्रशिक्षित मनुष्यबळ  पुरेसे मिळत नाही. तर दुसरीकडे खाजगीकरण जोमाने होतेय.
सरकारी व्यवस्था कोलमडत आहेत.
या सर्व दुष्टचक्राला आपण म्हणजेच "सामान्य नागरिक " जबाबदार आहोत.
(७) सरकार कोणतेही असो , जनमानसिकतेच्या बाहेर जाऊ शकत नाही.  मराठी शाळा वाचवा म्हणून आंदोलने करणे चूक नाही पण "मोठ्यांच्या मुलांनाच चांगले शिक्षण न् आम्हाला कां नाही ?" अशी मानसिकता करून  य़च्चयावत् सर्वच जनता 'सिबिएस्सी' हवे म्हणू लागली तर सरकार काय करेल ?   मराठी शाळा किंबहुना सरकारी शाळा  कशा टिकतील ?
जनमानसिकतेने आत्मसन्मान गमावलेल्या सरकारी वा सरकारमान्य शाळा , न्यूनगंडातच क्षीण होता आहेत.
सरकारी शाळांसारखेच सरकारी इस्पितळे , वाहतुकसेवा , दळणवळण सेवा , पोस्टसेवा वगैरे वगैरे.
(८) सरकारी सेवांचा लाभ घेणे ही "बिलोडिग्निटी" न समजता प्रथमाधिकार समजले तर विकराल रूप धारण करणारी  बेरोजगारी कमी होईल. 

भारतासाख्या खंडप्राय देशाच्या तुलनेत छोटासा असलेला भूतान देश य‍ा बाबतीत आदर्श घेण्यासारखा आहे.
तेथील राजाने स्वतःचे अपत्य सरकारी इस्पितळात होऊ दिले . सरकारी शाळेत शिकायला पाठवले. राजाचे बघून इतर खासेमंडळी सुद्धा सरकारी शाळेसह व्यवस्थांचा  लाभ घेऊ लागली. त्यामुळे तेथील खाजगीकरण बंद झाले . आणि चांगल्या सुविधा , अत्यल्प दरात सर्वांना लाभू लागल्या. शेवटी सामान्यांची बचत म्हणजे देशाची बचतच ना ! 

सगळ्यांनीच विशेषतः टॅक्स देणा-यांनी सरकारी व्यवस्थेचाच उपयोग करायला हवा. सरकारी व्यवस्थेत अनेक त्रुटी आहेत पण सर्वच जण वापरू लागले तर त्या दुरुस्तही होतील ना ! 
माझं तर निश्चित ठरलय , प्रत्यक्ष स्वानुभवातून मी  शक्य तेव्हा यापुढे  सरकारी व्यवस्थेचीच कास धरीन.
माझ्याकडून ही छोटीशी सुरुवात , बघू या कोण कोण या जाणीव-जागृतीत सहभागी होतं ते !!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Monday, January 20, 2020

अतुल्य भारत !

अतुल्य भारत !

लंदन देखा
पैरिस देखा
और देखा जापान
माईकल देखा, एल्विस देखा
सब देखा मेरी जान
सारे जग में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान
दूसरा हिंदुस्तान

ये दुनिया एक दुल्हन
दुल्हन के माथे की बिंदिया
ये मेरा इंडिया
आई लव माई इंडिया
आधुनिक काळातही  भारत-प्रशंसेची अनेक  फिल्मी ,गैरफिल्मी गाणी  नव्या पिढीच्या तोंडी सहज बसलेली आहेत.

आसेतु-हिमाचल पसरलेला विस्तीर्ण देश म्हणजे भारत. भारत ,भारतदेश ,भारतवर्ष ,भारतमाता , हिंदुस्थान ,इंडिया अशा विविध नावांनी अोळखल्या जाणारा आपला हा विशाल देश .

आपल्या देशाचे मूळ नाव भारत , जे पुराणकाळातील  एका पराक्रमी राजा (सम्राट भरत , दुष्यंत-शकुंतलेचा पुत्र) यांच्या नावावरून ठेवले गेले , असे म्हणतात. तर  भारत या शब्दाची अशी ही व्युत्पत्ती करतात ->   'भा म्हणजे  (ज्ञानाचे) तेज , रत म्हणजे मग्न" भारत म्हणजे नेहमीच ज्ञानाच्या तेजात मग्न असणारा देश. 
असा आपला भारत देश जगातील अतिप्राचीन संस्कृती टिकवून ठेवलेला अद्वितीय देश आहे.
आज जगात अस्तित्वात असलेल्या अनेक देशांना स्वतःचा भूगोल आहे पण इतिहास नाही . काही देशांना भूगोल-इतिहास आहे पण संस्कृती नाही. तर काही देशांना भूगोल-इतिहास-संस्कृती असूनही वैविध्याने परिपूर्ण शाश्वत वारसा नाही. अशा मानवी जगांमध्ये माझा भारत देश भूगोल-इतिहास-संस्कृती-वैविध्यपूर्ण शाश्वत वारसा यांनी संपन्न आहे.   लाखो-हजारों वर्षांचा समृद्ध वारसा असलेल्या भारताचा 'मी' नागरिक आहो , ही निर्विवादपणे  सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.  ब्रह्मवैवर्त पुराण , खंड ૪ ,अध्याय ९७  यात म्हटले आहे ,
'दुर्लभं भारते जन्म , मानुषं तत्र दुर्लभम् ।
अनेकजन्म तपसा संभूय भारते द्विजः ॥
अर्थात भारतात जन्म मिळणे ही दुर्मिळ घटना आहे , त्यातही मानवीजन्म मिळणे अधिक दुर्लभ आहे. त्यातही अनेक जन्मांच्या तपश्चर्येनंतर  द्विज (म्हणजे वेदादी ज्ञानार्जन करणारे ऋषी-मुनी ) या श्रेणीत जन्म लाभतो.
आधुनिक युगातील अतुल्य भारत =  भारत  हा भौगोलिक , सांस्कृतिक , ऐतिहासिक आदी अनेक आयामांनी अतिशय अतुलनीय व एकमेवाद्वितीय आहे.  आता यातील एकेका आयामांचा विचार करू.

• भारताचे भौगोलिक स्थान असे वैशिष्ट्यपूर्ण आहे की येथे विविध ऋतु , नैसर्गिक स्थाने , हवामान-विभिन्नता , वैविध्यपूर्ण भूरूपे इत्यादी इत्यादी अनेक बाबींमधील वेगवेगळेपणा भरभरून दिसून येतो. भारत कोणत्या अक्षांश-रेखांश  श्रेणीत  येतो ? भारत कोणत्या कटिबंधात येतो ? भारतातील विविध भूरूपे व प्रसिद्ध स्थाने कोणती ? भारतातील जागतिक वारसास्थळे कोणती ? भारतातील प्रमुख नद्या व उपनद्या कोणत्या ? भारतातील खनिज संपत्ती , याविषयी पीपीटी तयार करा. भारतीय वन्यजीव-वैविध्य , यावर स्लाईडशो तयार करा . भारतातीय रेल्वे व भारतातील पर्वतावलींची नावे सांगा ? भारतातील पठारी प्रदेश व तेथील जीवनमान , याविषयी सचित्र प्रदर्शनी आयोजित करा.   भारतीय समुद्र-किनारा व खाडी याविषयी माहिती संकलन करा . भारतातील अभयारण्ये व राखीव जंगल यांची सचित्र माहिती गोळा करा. थरचे वाळवंट व भारतीय जनजीवन यांच्यावर टीपा लिहा. भारतातील पर्यटनव्यवसायातील आवाहने व संधी यावर आपले मत काय ?   अशा अनेक प्रश्नांची उत्तरे भारताताचे भौगोलिक अतुल्यत्व  आपल्याला पुरेपुर जाणवून देतील.  वरील सर्व प्रश्नांची उत्तरे माहितीच्या अधिकृत स्रोतातून गोळा करणे जास्त सयुक्तिक ठरेल.

• भारताचा गौरवशाली इतिहास विस्मयकारक आहे. परचक्राच्या आक्रमणामुळे जगातील अनेक देश , संस्कृती व धर्म धराशायी झाले . भारतातही पडझड झाली , बरीच हानीही झाली पण तरीही  गरिमा आजही अबाधित आहे. आजही "भारत" उभा आहे कारण त्याचा भक्कम पाया अजूनही अबाधित आहे.  भारतीय गौरवशाली इतिहास जाणून घ्यायचा असेल तर  अधिकृत माहिती देणारे  अनेक पुस्तके , वेबसाईट , सोशलमिडिया साईट उपलब्ध आहे. उदाहरणार्थ भारतीय शिक्षणमंडळ द्वारे प्रकाशित धर्मपालजी लिखित दहा पुस्तकांचा संच  , लेखक श्री. प्रकाश पोळ यांचे , "भारतीय ज्ञानाचा खजिना" , फेसबुक कम्युनिटी पेज 'इतिहासाच्या पाऊलखुणा' इत्यादी.  आपण सर्व भारतीय एका तेजस्वी ज्ञानपरंपरेचे वारस आहोत , हे आत्मभान सर्वांनाच असणे गरजेचे आहे .

श्री. प्रशांत पोळ यांच्या पुस्तकाच्या आधारे  भारतीय इतिहासातील काही निवडक तथ्य इथे वानगी दाखल देत आहे.
१. पेशावर/रावळपिंडीपासून ते जावा-सुमात्रा (इंडोनेशिया) पर्यंतच्या भूभागावर सन २०० BC ते  सन १००० अशी सुमारे १२०० वर्ष संस्कृत ही भाषा बोलली जायची.
२. 'तक्षशिला' विद्यापीठात जगभरातून विद्यार्थी शिकायला यायचे. चाणक्य, पाणिनी ही त्यापैकी काही विद्यार्थ्यांची नावे. जहाज बांधणी शास्त्रापासून वैद्यकापर्यंत आणि खगोल शास्त्रापासून धातू शास्त्रापर्यंत असे सुमारे २५ विषय तिथे शिकवले जायचे. एकावेळी १०,००० विद्यार्थी बसू शकतील एवढे मोठे तिथे सभागृह होते.
३. 'मगध' राज्यातले (आताचे बिहार) नालंदा विद्यापीठ ही असेच. चीनमधला युआन श्वांग तिथे राहून १० वर्षे शिकला आणि त्यावेळच्या बऱ्याच नोंदी त्याने करून ठेवल्या आहेत. पुढे १२०० साली खिलजीने ते विद्यापीठ जाळून टाकले आणि सगळे पुरावे नष्ट झाले.
४. आपला शिक्षण आणि व्यापार ह्या दोन्हीमध्ये जगात पहिला क्रमांक होता. एक्स्पोर्टसाठी जगात आपला २९% शेअर होता आणि आजतागायत हे रेकॉर्ड ब्रेक झाले नाही. युरोपिअन इतिहाज्ज्ञांनी तशा नोंदी त्यांच्या इतिहासात करून ठेवल्या आहेत.
५. कर्नाटकातले 'हंपी' हे शहर तर जवळपास जगाचीच राजधानी होते. (१४०० साल) त्याचं टाऊन प्लॅनिंग जागतिक दर्जाचं होतं. रस्त्यावर भाजी विकायला बसतात तसे लोक सोनं चांदी विकायला बसायचे आणि लोक भाजीपाल्यासारखे ते विकत घ्यायचे अशी नोंद परदेशातल्या इतिहासतज्ज्ञांनी करून ठेवली आहे.
६. 'ऋग्वेद' हा जगातला सगळ्यात जुना ग्रंथ. ५००० वर्षांपेक्षा जुना. त्यातल्या उपनिषदांमधल्या सूक्तांमध्ये आणि श्लोकांमध्ये सूर्याचे पृथीपासूनचे अंतर आणि प्रकाशाचा वेग लिहून ठेवला आहे.
७.  'सिरीभूवलय' ग्रंथ - हा ग्रंथ कोणत्याही भाषेत/ लिपीत लिहिलेला नाही तर अंकांमध्ये लिहिलेला आहे. हे अंक १ ते ६४ असे आहेत. ते विशिष्ट पद्धतीनं वाचले की विशिष्ट भाषेत विशिष्ट ग्रंथ वाचता येतो.  मूळच्या १६,००० पानी ह्या  ग्रंथापैकी १२७० पानेच सध्या उपलब्ध असून मूळ ग्रंथात ५६ अध्याय असताना त्यातल्या ३ अध्यायांचीच उकल (डी-कोडींग) आजपर्यंत होऊ शकली आहे. १८ लिप्या आणि ७१८ भाषांत हा ग्रंथ वाचता येतो. रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, गणित, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, इतिहास, वैद्यक, तत्वज्ञान ह्यासारख्या विषयांवरील ग्रंथदेखील त्यातच वाचता येतात.
८. 'कटपयादी'   (सर्व  अक्षरांना एक एक अंक देऊन त्याचं कोष्टक करून ती भाषा वापरण्याची संकल्पना म्हणजे 'कटपयादी' संख्या संकल्पना) सूत्राच्या मदतीने 'पाय' ह्या गणिती संकल्पनेबद्दलचं आपलं संशोधन, पायची किंमत दशांशाच्या ३१ व्या स्थानापर्यंत काढून ती एखाद्या श्लोकात एम्बेड करणं ह्यासारखी जबरदस्त माहिती पुस्तकात मिळते.
९. 'डोसा' हा पदार्थ २००० वर्ष जुना आहे तसेच मसाल्यांपासून ते रेशीम, धान्य इत्यादी आयटम्स सगळ्या जगात एक्स्पोर्ट व्हायचे.. ह्याबद्दलची सविस्तर माहिती पुस्तकात वाचायला मिळते.
१०. गुजरातेत असलेल्या सोमनाथ मंदिराजवळ एक स्तूप आहे जो ३००० वर्ष जुना आहे (कार्बन डेटिंग पद्धतीनुसार) आणि त्यावर एक संस्कृत श्लोक आहे. त्याचा अर्थ आहे 'इथून पुढे  दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषा काढली असता मध्ये कोणताही मोठा भूखंड  येत नाही'. ह्याचाच अर्थ आपले लोक जगभर फिरत होते. 'वास्को द गामा' हा त्याच्या जहाजापेक्षा पाच पट मोठ्या भारतीय जहाजांच्या मदतीनं भारतापर्यंत पोहोचला. मात्र भारताचा शोध त्यानं लावला असं आपला इतिहास आपल्याला शिकवतो ! १८०० सालच्या सुमारास ब्रिटिशांनी आपल्या जहाज बांधणी कारखान्यांना बंदी घातली आणि आपले जहाज बांधणी शास्त्राचे सर्व ज्ञान लयाला गेले.
११. थायलंड मधल्या एअरपोर्टवर समुद्र मंथनाचा मोठा देखावा उभा केला आहे. सिंगापूरचे आधीचे नाव सिंहपूर होते. यूरोपमध्ये बोलली जाणारी 'केल्टिक' भाषा, रशिया जवळच्या युक्रेन देशातल्या मुर्त्या, इराक-सीरिया प्रदेशातले 'येझदी' लोक, कंबोडिया, व्हिएतनाम मधली मंदिरे, शिल्पे ही सगळी भारतीय रूपे आहेत.
१२. प्लास्टिक सर्जरीचा शोध आपण लावला आहे आणि त्यालाही २००० वर्षे झाली.

• सांस्कृतिक भारत   = संस्कृती हा शब्द अनेक अंगांनी योजला जातो.  संस्कारांची सातत्याने ,पिढी दरपिढी जपणूक ज्यातून होते ती संस्कृती , असे ढोबळमानाने म्हणता येईल . संस्कृती ही रहाणीमान , भाषा , पेहराव , खानपान सवयी ,  रूढी ,परंपरा , सामाजिक रचना इत्यादींतून ठळकपणे जाणवते . बरेचदा धर्म व संस्कृत  , धर्म व भाषा यांची सरमिसळ होते . ती होणे एका मर्यादे पर्यंत गरजेचेही आहे. पण कधी कधी जागतिक इतिहासात अशी काही उदाहरणे सापडतात की धर्मापेक्षा भाषा वा संस्कृती जास्त प्रभावी झालेली दिसते.
अनेक धर्मांची मुख्यालये वा उगमस्थांमध्ये पालन केल्या जाणारे धर्मसंस्कार , जगात अगदी तंतोतंत पालन केल्याच जातात , असे स्पष्ट आढळून येत नाही. किंबहुना देश-काल-परिस्थिती नुसार तेथे  बदल अपरिहार्यच असतात. अशी अनेक उदाहरणे सहज सापडतात . त्यांची जंत्री करून मानवी समूह व त्यावरील धर्मप्रभावावर परिणाम करणारे घटक समजून घेणे रंजक उपक्रम तर आहेच , शिवाय  मानवीबुद्धीची समायोजन क्षमता व समूहवर्तनाची मानसिकता यावरही प्रकाश टाकते.
वैदिक-संस्कृती पासून ते आजतागायत अनेक स्थित्यंतरे व सरमिसळ झालेला आपला देश आजही सांस्कृतिक-समायोजनात जगात अव्वल आहे.  नवता स्वीकारण्याची भारतीयांची क्षमता अफाट आहे.

• भारताची खाद्य संस्कृती =
आसेतुहिमाचल पसरलेला आपला भारत सुजलाम् सुफलाम्  असून खाद्यविविधतेने नटलेला आहे. धान्य-कडधान्ये  -भाजीपाला , फळेफळावळे , सुकामेवा इत्यादी सर्वच बाबतीत वैविध्य दिसून येते.  भारतातील प्रत्येक प्रांताची , भागाची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती आहे.  वानगी दाखल काही भागातील खाद्यपदार्थांची संक्षिप्त माहिती देत आहे.

१. महाराष्ट्र - पुरणपोळी , झुणका-भाकरी, वांग्याचे भरीत हे प्रसिध्द आहेत . ज्वारी , बाजरीचे भाकरी , सर्व प्रकारचे कडधान्य पालेभाज्या यांचा समावेश असतो.

२ . दिल्ली - मुघलांची राजधानी असलेल्या दिल्लीत बादशाहांच्या  काळात एकेकावेळी दीडशे प्रकारचे भात बनत होते. आज चांदणी चौकातील पराठे, काबाब, कचोरी, चत , कुल्फी  हे खास पदार्थ आहेत.

३. गुजरात - शाक रोटी, खिचडी, कडी, दोकला, हंडवा, ठेपला, खाकरा हे गुजराती लोकप्रिय पदार्थ आहेत.

४. जम्मू- काश्मीर - काश्मिरी जेवणावर मध्य आशिया, उझबेकिस्तान येथील खाद्य संस्कृतीचा प्रभाव आहे.  खाद्य  दही, तेल, मसाले इत्यादींचा जास्त तर कांदा लसणाचा कमी वापर होतो.

५. दक्षिण भारत (आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक केरळ)- इथल्या साउथ इंडियन डिशेश जगप्रसिध्ध आहेत. इडली-सांबर, वडा- सांबर, नारळाची चटणी, भात, उथ्थप्प हे प्रसिध्द आहेत.

६. झारखंड- बेन्गणी चोप ही प्रसिध्ध डिश  आहे. इथले भाहुतेक पदार्थ भातापासून बनवतात

७.  मध्य प्रदेश- इंदोर उज्जैन येथे दुधाचा वापर मुबलक प्रमाणात होता. पोहे जिलेबी लस्सी उसाचा रस दल बाफला इत्यादींची खासियत आहे.

८. पश्चिम बंगाल- मासे भात मुख्य अन्न आहे त्याचप्रमाणे बंगाली मिठाई प्रसिध्द आहे.

९. बिहार - मिट्टी, चोखा हे सातूच पीठ, गव्हाच्या पीठाचे पदार्थ दल्पुरि, मालपुवा बालुशाही, हे पदार्थ प्रसिध्द आहे

१० ओडीसा - मांसाहार जास्त खाल्ला जातो. पख्ल, दल्मा, कट्टा, भात इत्यादी पदार्थ प्रसिद्ध आहे.

११ उत्तर प्रदेश - कबाब, कोरमा, बिर्याणी, रुमाली रोटी, पराठा इत्यादी पदार्थंचा समावेश असतो.

१२ मणिपूर - भात पालेभाज्या मासे मुख्य अन्न आहे. सोयाबीन चा जास्त वापर करतात. मणिपुरी लोक आपल्या दारात भाज्या पिकवतात.

१३ मेघालय- येथे लोणचे, मिनील सोंग, भाताचे पदार्थ प्रिय आहेत.

१४ पंजाब - पंजाबी जेवण जगभर प्रसिध्द आहे. पराठे, लस्सी पनीरच्या भाज्या मक्के कि रोटी, सरसो का साग, तंदुरी इत्यादी जेवणाची खासियत आहे.

१५ राजस्थान - बेसन चा मोठ्या प्रमाणात वापर करतात, दल भाती खाडी धीवर पनच्कुत ,लापशी, कदिबुन्दि बिकानेरी भुजिया दल्कचोरि प्रसिद्ध आहे.

१६ उत्तराखंड - पालक मेथीचा भरपूर वापर करतात डाळी कडधान्य सोयाबीन झोळी कापा रायते हे प्रसिद्ध पदार्थ आहे

१७ गोवा - मासांचे अनेक प्रकार करतात पाव सोलकडी मोगागाठी भात केक इत्यादी गोवन जेवणाची गोडी इथल्या पदार्थांना असते.

या प्रांतातील खाद्य वैशिष्ट्यांसह  जाती-धर्मातील विशिष्ट खाद्य पदार्थ प्रख्यात आहेत.  उदाहरणार्थ मारवाडी दालबाटी, कांजीवडे आदी ,ब्राह्मणी कढी , गोडामसाला , मुसलमानांचा शिरखुर्मा ,नागपुरचा सावजी जेवण , कोल्हापुरचा तांबडा-पांढरा रस्सा ,  छत्तीसगढी आदिवासींची लालमुंग्यांची चटणी , सारस्वतांचे सामिष पदार्थ , कोकणातील उकडीचे मोदक  इत्यादी इत्यादी.
भारतात अतिप्राचिन काळापासून ते आज पर्यंत देशविदेशातील लोकं भारतात मसाल्याचे पदार्थ व विविध खाद्यपदार्थ यांच्या आकर्षणाने येत असतात.

• भारताची वस्त्र संस्कृती =  खंडप्राय पसरलेल्या देशात  अतिशय प्राचीन काळापासून वस्त्रवैविध्य आढळते.  वनस्पतीजन्य धाग्यांपासून वस्त्र निर्मितीतर सामान्य आहेच शिवाय पशु-कीटक ,धातू  , यांपासून धागे तयार करून त्यांच्या मिश्रणातून वस्त्र निर्मितीचे कौशल्य भारतातील प्राचीन कौशल्याचा नमुना आहे.
साडी हे भारतीय संस्कृतीतील महावस्त्र व मानबिंदू . त्यातील वैविध्य जगाला थक्क करते.
वेगवेगळ्या  शैलीतील  साड़्यांमध्ये कांजीवरम साड़ी, बनारसी साड़ी, पटोला साड़ी आणि  हकोबा इत्यादी विशेष आहेत. मध्य प्रदेशाची  चंदेरी, महेश्वरी, मधुबनी छपाई,  आसामची  मूंगा रेशमी , अोरिसाची  बोमकई,  राजस्थानाची  बंधेज म्हणजे बांधणी व कोटा साडी , गुजरातची  गठोडा, पटौला, बिहारची  तसर, काथा, छत्तीसगढ़ची कोसा रेशमी, दिल्लीची  रशमी साड़ी ,  झारखंडची  कोसा साडी  , महाराष्ट्राची  पैठणी ,इरकल हिमरू, तमिलनाडुची  कांजीवरम, उत्तर प्रदेशाची  तांची, जामदानी, जामवर ए तसेच  पश्चिम बंगालची  बालूछरी  व कांथा टंगैल आदी  प्रसिद्ध साड़्या आहेत.

कोसा ,रेशीम ,खादी ,लोकर , जरतारी ,भरजरी ,पश्मिना , तात ,ज्युट असे अनेक धागे भारतात अतिशय प्राचीन काळापासून तयार केल्या जात असे. शिवाय धाग्यांना रंग देण्याचे कसबही बरेच जुने आहे. या शिवाय रेशमी-कापडी धग्यांमध्ये धातूचे पातळ तार करून वस्त्र निर्माण करण्याची कला हे तर भारतीय कौशल्याचे अद्वितीय प्रकटीकरण आहे.
अशा प्रकारे वस्त्रनिर्मितीतील अतुल्यता हा भारतीयांच्या प्राचीन वारश्याचाच परिपाक आहे.

भारताची अतुल्यता =
  याशिवाय भारताची संस्कृती जाणून घेण्याची अनेक परिमाणे आहेत . त्यांची थोडक्यात यादी पुढील प्रमाणे
  १) गीत-
  २)वाद्य-
  ३) नृत्य
  ૪)चित्रकला
  ५)शिल्पकला
  ६) धातुकला
  ७) काष्ठ कला
  ९) रांगोळी
  १०) मूर्तिकला
  ११) विहिर-तलाव बांधणी
  १२) मंदिरस्थापत्य
  १३) उद्यानविद्या
  १૪) कलाकुसरीचे सामान निर्मिती
  १५)  पशुपालन व संगोपन
  १६) मर्दन शास्त्र
  १७) आयुर्वेद
  १८) निसर्गोपचार

  इत्यादी अनेक कौशल्ये भारतीयांना वंशपरंपरागत पद्धतीने आत्मगत झालेली आहेत. काळाच्या अोघात त्यातील अनेक कौशल्ये लुप्त होत आहेत. त्याचे पुनरुज्जीवन व विकसन करणे अत्यंत गरजेचे आहे.

भारताची अतुल्यता = आपला भारत हा जगातील एकमेवाद्वितीय देश आहे  , याबद्दल सामान्य नागरिकांपासून शासनापर्यंत सगळ्यांचे एकमत आहे. अनेक उत्तमोत्तम बाबींमुळे जगभरातील पर्यटकांना आकर्षून घेण्याची क्षमता भारतात आहे. याची जाणीव होऊन भारतीय पर्यटन विभागाने २००२ मध्ये "अतुल्य भारत !" , हे अभियान सुरु केले. या अभियानामुळे पर्यटन व्यवसायात निरंतर वृद्धी होत आहे.  २०१०च्या आकडेवारी नुसार  भारतात ५.५८ मिलियन विदेशी पर्यटक व  ६५००૪   भारतातील पर्याटक  यांनी भारतातील विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. पर्यटन व्यवसायाने २०१० मध्ये  भारताला अंदाजे   ६.२३% GDP. इतका व्यवसाय मिळवून दिला तर ८.७८% इतके रोजगार क्षेत्र  निर्माण करून दिले.
२०१२च्या नोंदींनुसार  भारतातील सात ताजमहाल , कोणार्क सूर्य मंदिर , नालंदा , स्वर्णमंदिर -अमृतसर , मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर , तवांगमठ ,  जैसलमेर किल्ला ही स्थाने पर्याटकप्रिय ठरली. २०१૪ पासून भारतीय प्रशासनाने व्हीसा धोरणांमध्ये अनेक अामूलाग्र बदल केले , ज्यामुळे विदेशी पर्यटकांना प्रवास करणे सोपे झाले. तेव्हापासून भारतीय पर्यटन व्यवसाय दिवसोंदिवस  वाढत आहे.

भारताची  भौगोलिक  अतुल्यता =
जगात  जवळ जवळ २३१ देश आहेत . त्यात भारत हा एकमेवाद्वितीय देश आहे.

भारताचे अधिकृत  नाव भारत गणराज्य, इंग्रजीमध्ये (  Republic of India)   आहे . भारत , दक्षिण आशियातील   भारतीय उपमहाद्वीपातील  सगळ्यात मोठा  देश आहे .पूर्णपणे उत्तरगोलार्धात असलेला  भारत, भौगोलिकदृष्ट्या विश्वातील सातवा सगळ्यात  मोठा  व  लोकसंख्येच्या दृष्टीने  जगातील दुसरा  मोठा देश आहे. भारताच्या पश्चिम-उत्तर (वायव्य ) सीमेवर पाकिस्तान, उत्तर-पूर्वेला (नैऋत्य) चीन, नेपाल  आणि  भूतान , पूर्व सीमेवर  बांग्लादेश आणि  म्यान्मार  हे देश आहेत . हिन्दी महासागर ह्याच्या दक्षिण दिशेला आहे. भारताच्या  दक्षिण-पश्चिमेला  मालदीव, दक्षिणेला श्रीलंका व  दक्षिण-पूर्वेला इंडोनेशिया ,या देशाशी  भारताच्या  सामुद्रिक सीमा जुळलेल्या आहेत.  भारताच्या उत्तरदिशेची सीमा हिमालय-पर्वताने व्याप्त आहे. तर  दक्षिणेची सीमा  हिन्दीमहासागर आहे . भारताच्या  पूर्व दिशेला में बंगालची खाड़ी आहे तर  पश्चिमेला अरबी समुद्र आहे.  हिमालयातून उगम पावणारी गंगानदी पूर्वेकडे वाहत जाऊन जेथे समुद्राला मिळते ,तो गंगासागर . तर हिमालयातूनच उगम पावणारी सिंधुनदी  जेथे सागराला मिळते तो सिंधुसागर  होय.
जगातील मोजक्या पर्यावरण संपन्न देशांपैकी आपला भारत एक देश आहे.  यात  हिमाच्छादित प्रदेश , नदीखोरे , पर्वतीय प्रदेश , डोंगराळ प्रदेश , पठारी प्रदेश , वाळवंटी प्रदेश , मैदानी प्रदेश , समुद्र किनारी प्रदेश इत्यादी वैविध्य आहे.
भारतात सहा प्रकारचे हवामानी प्रदेश आहेत , जसे अल्पाईन (ध्रूवीय प्रदेशासम थंड)  , उष्णकटीबंधीय , शीतोष्ण  हवामान , आर्द्र हवामान ,अर्धशुष्क व शुष्क .
   भारतातील हिमाच्छादित प्रदेश म्हणजे जम्मू-काश्मीर , सिक्किम , हिमाचलप्रदेश ,उत्तराखंड  हे आहेत.
   भारतात पुढील नदी खोरे प्रसिद्ध आहेत , जसे गंगाचे हजारो मैल पसरलेले सुपीक खोरे .  या शिवाय नर्मदा , यमुना ,कावेरी , वैनगंगा ,कृष्णा ,सिंधु ,तापी , गोदावरी , प्राणहिता ,तुंगभद्रा , पेरियार ,चंबळ इत्यादी अनेक नद्यांच्या खो-यांमुळे भारत हा सुजल-सुफल व सस्यश्यामल झाला आहे यात शंकाच नाही.
   राजस्थानातील थरचे वाळवंट हे जगातील प्रसिद्ध वाळवंटांपैकी एक आहे. त्याचे क्षेत्रफळ जवळजवळ १७५००० इतके किलोमिटर असून त्याचा काही भाग पाकिस्तानात आहे.
   अंदमान-निकोबार , लक्षद्वीप ही द्वीपसमूहे भारताच्या भूवैविध्यात भर टाकतात.
   भारतात ज्वालामुखी प्रवण प्रदेशही आहेत . दख्खनचे पठार , गुजराथ चा काही भाग , अंदमानातील  काही भाग , हरियाणाचा काही भाग तसेच हिमालय पर्वत पायथ्याचा काही भाग असे भूभाग विशेषत्वाने सांगता येतील.
वसंत , ग्रीष्म   , वर्षा ,शरद ,हेमंत , शिशिर  असे  सहाही ऋतु अनुभवायला मिळतात असा आपला भारतदेश  आहे.
विविध भूरूपे ,भूप्रदेश ,विविध हवामान ,ऋतुचक्र इत्यादींच्या विविधतेमुळे भारत हा निसर्गसंपन्न देश आहे.  जागतीक वारसा स्थळे म्हणून जाहीर केलेल्या युनेस्कोच्या यादीत ३० भारतीय-पर्यटन स्थळांना जागा मिळाली.


भारत एक राष्ट्र =

भारताचा राष्ट्रध्वज  हा तिरंगा आहे. तर  राष्ट्रवाक्य  "सत्यमेव जयते" (संस्कृत) म्हणजे  सत्याचाच विजय होतो. भारताचे राष्ट्रगान जन गण मन (हिन्दी) तर राष्ट्र गीत  (संस्कृत)
वन्दे मातरम्   हे  आहे.

भारताची  राजधानी  नवी दिल्ली ही आहे . भारत हा बहुभाषिक देश आहे . भारतात जवळपास २०० प्रमुख भाषा व अंदाजे ८०० बोलीभाषा आहेत.  जवळ जवळ ५८ भाषांमध्ये शालेय शिक्षण उपलब्ध आहे. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत .    आठव्या अनुसूची नुसार भारतातील  मान्यताप्राप्त राजभाषा बावीस भाषा आहेत.
अासामी , बंगाली , बोडो , गुजराथी ,डोगरी , कन्नड़, काश्मीरी , कोंकणी , मैथिली , मणिपुरी , मल्याळम , मराठी , नेपाळी , उडिया , पंजाबी , संस्कृत , संथाली , मैतेयी ,  सिन्धी , तामिळ  , तेलुगू , उर्दू . 
भारताची बहुभाषिकता हे भारताचे  बलस्थान आहे.
  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

Tuesday, January 7, 2020

#चिंतनात्मक लेख.


आहार व आरोग्यशास्त्र
• प्रस्तावना
"काऊ ये , चिऊ ये ,दाणा खा ,पाणी पी ,भुर्कन उडून जा !" किंवा  " इथे इथे बस रे मोरा ,बाळ घाली चारा ,चारा खा ,पाणी पी ,भूर्कन उडून जा"!   लहान बाळांना खाऊ घालताना हमखास सांगण्याच्या या गोष्टी !
नवजात बालकाचा  पहिला परिचय हा आईच्या दुधाशी होतो. बाकीची समज येण्याआधी त्याला आईचा वात्सल्यपान्हा व स्पर्श  पुरेपुर समजतो. अशा प्रकारे मानवाचा आहाराशी अर्भकावस्थेपासून परिचय व संबंध येतो. "अन्नाने शरीर वाढते " याचे प्रात्यक्षिक म्हणजे , अर्भकाचा विकास होणे.
आहार , अन्न ,खाद्य , भक्ष , भोजन ,घास, कवळ ,खाऊ ,भातकं असे अनेक शब्द आपण व्यवहारात नेहमीच योजतो.  गोळाबेरीज अर्थ सारखा असला तरी प्रत्येक शब्दाचा मूळ स्रोत व अर्थच्छटा वेगळी आहे.   खाण्या विषयीचे शब्द व त्यांचे मुळ धातू पुढील प्रमाणे आहार (आ+हृ = ) , अन्न (अद् ) , खाद्य (खाद् ) भोजन (भुज्) , भक्ष्य (भक्ष्)  , घास (घास् )   , खाऊ व भातकं हे खास मराठी शब्द समजण्यास हरकत नाही. हे शब्द जरी तसे समानार्थी असले तरी ते कसे व कुठेही न वापरता  अौचित्याने  वापरले जातात.

• अन्न विचार.
मूलभूत गरजांपैकी अन्न ही अत्यंत निकडीची मानवी गरज आहे.
अन्नाने केवळ शरीर पोषण होते असे नाही तर एकूण व्यक्तिमत्वाला समतोल करण्याची तकद अन्नात आहे.
जसा आहार तसा विचार ,
जसा विचार तसं वर्तन ,
वर्तनातून  जडण-घडण ,
व्यक्तिमत्वा मुळ जाण
आहार  हाचि एक करण ॥
म्हणून आहार ,अन्नशास्त्र व आरोग्य याचे ज्ञान असणे ही काळाची गरज आहे.

• मराठी संस्कृती व आहार
फार जुन्या काळापासून आपल्या मराठी लोकांना आहार व आरोग्य यांचे साहचर्य वा समप्रमाण  ज्ञात होते. मराठी खाद्या संस्कृती व मराठी थाळी ही समतोल आहाराचे उदाहरण म्हटली जाते.
लिंबू , मीठ , चटणी , कोशिंबिर , पंचामृत , भाजी , पातळभाजी , सार , कढी , वडे-भजी ,सांडगे, पापड ,  गोड पदार्थ , वरण ,भात ,पोळी ,ताक इत्यादी सर्व घटक जेवणात असायचे. इतकेच नाही तर ताटात ते वाढण्याची ठराविक पद्धत असे ,ज्यावरून पदार्थांचे जेवणात किती प्रमाण असायचे हे ही ठरायचे.  विविध ऋतुंमध्ये नेमके तेच पदार्थ घरी केल्या जायचे ,ज्याची शरीराला गरज आहे. उदाहरणार्थ ,संक्रांतीला तिळगुळ ,गणपतीला मोदक , दिवाळीत पुरणपोळी , वगैरे .
जुन्या काळी अन्न हे पूर्ण ब्रह्म या भावनेतून शिजवले व खाल्ले जात असे.
(जिज्ञासुंनी डॉ. जयश्री पेंढरकर यांचा १ नोव्हेंबर २०१३ ला महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रकाशित झालेला लेख वाचावा ).
खाद्यसंस्कृती विषयक परंपरा व रूढी या गतानुगतिक न्यायने समाजात अखंड सुरु असतात. कालौघात त्यांची विज्ञाननिष्ठता तपासून योग्य परंपरांचा आदर केल्या गेला पाहिजे.

• अन्न विषयक कथा
जुन्या काळी मुलांना कहाण्या-गोष्टी सांगितल्या जायचे . गोपाळकृष्ण हे आबालवृद्धांचे लाडके दैवत . त्याच्या कहाण्या मुलांना आवडतात. नंदराजाचा मुलगा बाळकृष्ण व त्याचा दादा बलराम  हे दोघेही सामान्य प्रजाजनांच्या मुलां सोबत रोज गायी चारायला जंगलात जायचे . हे वर्णन किती मनोवेधक आहे , होय ना ? मग दुपारी ते सगळे बाळगोपाल यमुनेच्या काठी भोजनाला बसत. कोणी अति गरीब ,तर कोणी बरे ,कोणी सधन तर कृष्ण स्वतः अतिश्रीमंत ; तरीही कृष्ण स्वतः सगळ्यांच्या शिदोरी (आजकालं डब्बा) एकत्र कालवून देत असे . मग सगळ्याना समान वाटणी करून देत असे. हाच गोपालकाला.  या छोट्याश्या कथेतून कितीतरी गोष्टी सहज सुचवल्या गेल्या. जेवण ,हे समान असावे ,सर्वांना सकस व पुरेसे मिळावे. एकत्र जेवण्याने अन्न जास्त धकते व अंगी लागते. एकीची भावना बळावते.

• भोजन मंत्र
जुन्या काळी एकत्र कुटुंब पद्धती असताना , घरोघरी जेवणाच्या पंक्ती असत. त्यामुळे अन्नसंस्कार ,सहभोजनाचा आनंद व परस्पर जिव्हाळा सहज वाढत असे. शिवाय ,अतिथींची सुद्धा सोय सहज होत असे.
अशा सहभोजनाच्या पंक्ती सुरु होताना भोजनमंत्र म्हटले जायचे. त्या मंत्रांतून सुचारित्र्याचे संस्कार अोघात केले जायचे.
(१) मुखी घास घेता करावा विचार
कशासाठी मी अन्न हे सेवणार
घडो माझिया हातुनी देशसेवा
म्हणोनि मिळावी मला शक्ती देवा.
(२)  वदनी कवळ घेता
नाम घ्या मातृभूचे
सहज स्मरण होते
आपुल्या बांधवांचे
कृषिवल कृषिकर्मी
राबती दिनरात
श्रमिक श्रम करोनि
वस्तु या निर्मितात
करुनि स्मरण तयांचे
अन्न सेवा खुशाल
उदरभरण आहे
चित्त होण्या विशाल ॥
(३)  साईं इतना  दीजिये
ज्या में  कुटुंब समाय ।
मैं भी भुखा ना रहूँ
साधु न भुखा जाय ॥ (संत कबीर)

• शाळा , एक संस्कार केंद्र.
आता एकल वा विभक्त अशा बदललेल्या कुटुंबसंस्थेमुळे  शाळा हेच सर्व चांगले संस्कार करण्याचे ठिकाण आहे. त्यामुळे सहभोजन , समवर्तन , राष्ट्रप्रेम रुजविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. त्यासाठी खालील गोष्टी आवर्जून कराव्यात.
•  शाळेत मधल्या सुट्टीत सगळे विद्यार्थी एकत्र येतील .
•   हात-पाय-तोंड स्वच्छ धूतील .
•   संपूर्ण वर्ग गोलाकार करून वा आमने-सामने पंगत करून आपले जेवण करतील .
•   जेवताना कविता , श्लोक , सुविचार यांचे समजपूर्वक सादरीकरण करतील .
•   सगळेजण मिळून मिसळून संपूर्ण भोजनाचा आस्वाद घेतील .
•   उजव्या हाताने नीट जेवतील.
•   आजुबाजुला अन्न सांडवीणार नाहीत .
•   पानात उष्टे टाकणार नाहीत.
•   ताट / डबा नीट स्वच्छ करतील .
•    जेवणानंतर  जेवणाची जागा स्वच्छ करतील.
•     हात व तोंड विशेषतः दात पूर्ण काळजी घेऊन स्वच्छ करतील .
•     त्यानंतर हात व चेहरा स्वतःच्या रुमालाने पुसतील .
•     डबा वा जेवणाचे सामान नीट पिशवीत भरतील .
•     रुमालाची घडी करून योग्य जागी ठेवतील .
•      जेवणानंतर जेवणात काय अन्नघटक होते? , ते कसे तयार करतात ?
•      त्यात पोषकतत्वे किती ?
•      धान्य उगवणारे , अन्न शिजवणारे  सगळे घटक याविषयी प्रकट शब्दातून जाहीर कृतज्ञता व्यक्त करतील .
•   दररोज आनंदाने व मैत्रीपूर्ण वातावरणात जेवण होईल .
• सणवारां विषयी माहिती सांगून त्या दिवशी कोणता विशेष पदार्थ शिजवितात , त्याचे पौषकमूल्य व ऋतुनुसार उपयुक्तता तसेच परिसरातील स्थान याबद्दल रंजक माहिती अत्यल्प शब्दात सांगावी.
• जर कोण्या विद्यार्थ्याचा जन्मदिवस असेल तर कल्पक योजना करून सहकार-सामंजस्य-सौहार्द भावना रुजवावी.
सहभोजनाचा कल्पक वापर करून विद्यार्थ्यांना उत्तम संवेदनशील मानव बनविता येते , हे लवकरच चांगल्या शिक्षकांच्या अनुभवाला येईल .


• अन्नविषयक म्हणी वा वाक्प्रचार
मराठी ही समृद्ध ज्ञानभाषा आहे. तिच्यात  अनेक विषयांवर दैनिक व्यवहारातून , अनुभवातून म्हणी व वाक्प्रचार निर्माण झाले आहेत . म्हणी वा वाक्प्रचारांच्या मागील कारण शोधणे वा अर्थ शोधणे  ; भाषा प्रगल्भ करायचे साधन होय. अन्न विषयक  वानगी दाखल इथे काही देत आहे. अधिकाधिक संग्रह करणे , उपक्रमासाठी योग्य ठरेल .
• खायी त्याला खवखवे.
• आधी पोटोबा मग विठोबा.
• खायला काळ न् भुईला भार.
• खायला कोंडा ,निजेला धोंडा.
• कोंड्याचा मांडा करणे.
• बाई मी सुग्रण न् केलं आज शिकरण .
• खाल्ल्या अन्नाला जागणे.
• खाली पेट भजन न भाये गोपाला.
• अन्न हे पूर्णब्रह्म.
• बोलाचिच कढी ,बोलाचाच भात.
• धीर धरा , मी खीर करते , साबुदाण्याची.
• रांधता येईना अोली लाकडे.
• हातावर पोट घेऊन जगणे.
• पाठीवर मारा पण पोटावर मारू नका.
• अन्नान्न दशा होणे.
• अन्नासाठी दाही दिशा ,आम्हा फिरविशी जगदीशा.
• देवाला वास न् माणसाला घास.
• घासातला घास देणे
• एक तीळ सात जणांत वाटून खाणे.
• असतील शिते तर जमतील भुते .


• प्राचीन संस्कृती व अन्नविषयक विचार.
अतिशय प्राचीन काळापासून भारत हा ज्ञानगुरु होता. आहार ,अन्नशास्त्र ,खाद्य संस्कृती  विषयक उल्लेख अनेक ग्रंथातून केलेला आढलतो.

उपनिषद् म्हणते ," आहारशुद्धौ सत्वशुद्धिः ।" (शुद्ध आहाराने बुद्धी शुद्ध होते.)
ऋग्वेदात म्हटले आहे की ,"केवलाघो भवति केवलादि।" (एकटा खाणारा  पापी असतो )
शतपथ ब्राह्मण ग्रंथात , " अन्नं प्राणः । अन्नम् आयुः ।"  ( अन्न म्हणजेच प्राण , अन्न म्हणजे आयुष्य )
तैत्तिरीय उपनिषद् म्हणते ," अन्नं न निन्द्यात् । तद् व्रतम् । अन्नं न परिचक्षीत । तद् व्रतम् । अन्नं बहु कुर्वीत । तद् व्रतम् ।॥ ( अन्नाची निंदा ,नासाडी करू नये. अन्न वाढवावे , हेच व्रत आहे.
तैतरीय उपनिषद ,कठोपनिषद् मांडुक्योपनिषद्  यातील शांतीमंत्र असा आहे ,
"ॐ सह नाववतु।सह नौ भुनक्तु।सह वीर्यं करवावहै।तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॥ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥"  (आपण एकमेकांचे रक्षण करावे ,एकत्र जेवावे , एकत्र पराक्रम करावा ,आमचे अध्ययन-अध्यापन तेजस्वी होऊ दे ,आमच्यात द्वेषभाव नकोत.)
अशा प्रकारे वेदात अन्न व आहार विषयक अनेक उद्धरणे आहेत.
श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथातही आहार विषयक अनेक उल्लेख आहे.
"अन्नाद्भवति भूतानि।" ३.१૪ (अन्नापासून जीव निर्माण होतात.)
भुञ्जते ते त्वघं पापा  ये पचत्यात्मकारणात् ।३.१३ (जे स्वतःपुरतं शिजवून खातात , ते पाप खातात. )
याशिवाय अनेक श्लोक ,सुवचने ,सुभाषिते संस्कृत साहित्यात आढळतात ,ज्यातून आहार व आरोग्य या विषयी सखोल चिंतन करता येते. इंटरनेटच्या वा ग्रंथालयाच्या माध्यमातून आरोग्य विषयक सुभाषितांचा संग्रह करता येईल .

• आयुर्वेद व आहार .
आयुर्वेद  हे निव्वळ शास्त्र नसून जीवन पद्धती आहे. रोगोपचार हे त्याचे मुळ ध्येय नसून स्वस्थ माणसाचे स्वास्थ्य टिकविणे हे उद्धिष्ट्य आहे.  आयुर्वेदाचे प्रयोजन असे सांगतात ," प्रयोजनं चास्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणमातुरस्य विकारप्रशमनं च।"
त्यामुळे आयुर्वेदाचा भर नैसर्गिक  जीवनशैलीने आहार-विहार-विचार यातून स्वास्थ्यलाभ यावर आहे. आयुर्वेदात पथ्य-अपथ्य-कुपथ्य  ,विषमद्रव्य यावर व आहार या विषयावर अनेक ग्रंथ व ग्रंथातील प्रकरणे खर्ची घातली आहेत.
इथे काही ग्रंथांची नावे देत आहे.
वैद्यकीय सुभाषित संग्रह
चरक संहिता
सुश्रुत संहिता
आयुर्वेदीय हितोपदेश
आयुर्वेदीय सूत्र
माधवनिदान  इत्यादी इत्यादी.
आयुर्वेदाचे आहार विषयक अत्यंत महत्वपूर्ण सूत्र असे आहे ," यस्य देशस्य यो जन्तुः , तज्जातस्यौषधिहितम् ।"  म्हणजे जो ज्या भागात जन्माला आला तेथील चराचर-जीवाजीव सृष्टी हीच त्याचे अौषध असते. म्हणजे कोकणातील व्यक्तीसाठी पित्तशामक आमसुल असेल तर विदर्भातील व्यक्तीसाठी तेच कार्य बोरफळ करते.
"अन्न हे निव्वळ जिभेचे चोलचे पुरवून पोट भरणे नसून तेच अौषध आहे." हे तत्व आयुर्वेद व आहार विषयक प्राचीन ग्रंथांनी पुरेपूर पाळले.
भारतात प्रांता प्रांतात आढळून येणारे खाद्य वैविध्य हे त्याचेच द्योतक आहे. गतानुगतिक न्यायने परंपरा-रुढींमध्ये  भारतीय आहारशास्त्र अडकले आहे. त्याचे तटस्थ संशोधन करून आधुनिक काळाच्या बदललेल्या संस्कृतीला झेपेल या पद्धतीने पुनर्मांडणी करायला हवी.
आयुर्वेदिक ग्रंथांशिवाय संस्कृत व तमिळ अादी जुन्या भाषांमध्ये अन्न निर्मिती संदर्भात अनेक उत्तमोत्तम ग्रंथ रचले गेले आहेत. त्यांचा कालवधी इ.स च्या पहिल्या शतकापासून ते १५/१६ व्या शतकापर्यंत आहे. त्यातील काही नावे -> नलपाकदर्पणम् , मनसोल्लास  इत्यादी होय.
या शिवाय कुठेही न लिहिलेले पण वाडवडिलांच्या आचारपरंपरेने ,मौखिक स्वरूपात किती तरी मोठे घान भारतीयांना उपलब्ध झाले आहे. हे अनेक दाखल्यांतून सिद्ध होते . जसे सर्दी झाली तर आल्याचा वापर . खोकला झाला की सुंठ ,  जंत असेल तर वावडिंग /हिंग/कडुलंब /कळमेघ , पोटातील वायु =अोवा ,उष्णता शामक जीरे  , जखम झाली तर हळद , सुज असेल तर आंबेहळद ,थंडाव्यासाठी गुलकंद ,चंदन , खश  असे घरगुती उपाय सर्रास केल्या जातात घरोघरी.
या घरगुती उपयांचेही  शास्त्रशुद्ध संशोधन करणे गरजेचे आहे.

• आहार शास्त्र व करियर
दुसरे महायद्ध झाल्यावर जागतिक समीकरणे वेगाने बदलली.  देशोदेशीचे पारंपरिक  व्यवसाय , ज्ञानशाखा माघारल्या गेल्या . नवे नवे क्षितिज दिसू लागले. भारतात बंगालचा दुष्काळ ,जगाच्या इतर भागातील कुपोषणग्रस्त प्रदेश , दुष्काळ-अकाळ ग्रस्त प्रदेश इत्यादींमुळे  अन्नशास्त्र  , अन्नतंत्रज्ञान , कृषिविद्या ,आहारशास्त्र , गृहविज्ञान इत्यादी नवनवीन ज्ञानशाखा निर्माण झाल्या.  भारताचा विचार करता भारतात कृषिव्यवसाय  प्रमुख उपजीविका साधन आहे. तरीही भारतात अन्नधान्याचा तुटवडा पडतो . कारण अन्नधान्यांची साठवणुक व वितरण अजूनही सुयोग्य पद्धतीने होत नाहीय. रस्ते-महामार्ग विकास , धान्यगोदामे , कोल्डस्टोअरेज वगैरेंचे जाळे वेगाने विणले जात आहे व वितरणातील न् साठवणुकीतील तृटी कमी करण्याचा पुरेपुर प्रयत्न करीत आहे. गेल्या काही वर्षात  "अन्नप्रक्रिया मंत्रालय" स्वतंत्र करून भारताने "अन्नाची हमी" विषयी आम्ही सकारात्मक आहोत हे सिद्ध केले आहे. वाढती लोकसंख्या ,जनजागृतीचा अभाव  ,  शास्त्रशुद्ध तंत्रज्ञनाचा प्रभावी वापर न करणे , ह्या मोठ्या आव्हानांना सामोरे जात ,भारत सरकार अन्नप्रक्रिया उद्योगांना भरपूर सहकार्य करून प्रोत्साहन देत आहे.  भारतातील जैवविविधता ,उत्पादन क्षमता , सर्वंकष हवामान आदी बलस्थानांचा वापर करून अन्न प्रक्रिया उद्योगाद्वारे देशाला  अन्नसंपन्न व अन्न निर्यातदार देश करणे ही काळाची गरज आहे.


• शालेय स्तरावर अन्न शिक्षण विषयक जागृतीची आवश्यकता
कृषिप्रधान व धान्य उत्पनानार वरचा क्रमांक असतानाही  भूकबळीच्या समस्येने भारताला ग्रासलेलं अाहे. कारण  देशभरात बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी होत असल्याचंह स्पष्ट झालं आहे.
अन्नाचा अपव्यय हे भारतातल्या भूकबळी समस्येचं मुख्य कारण आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार भारतात 40 टक्के अन्न वाया जातं. या खाण्याचं रुपांतर पैशात केलं तर रक्कम 50 हजार कोटी रुपये एवढी भरेल असं आकडेवारी सांगते.आकडे बाजूला ठेवले आणि आजूबाजूला पाहिलं तर अन्नाचा अपव्यय होतो, हे आपल्याही लक्षात येईल. लग्नसोहळे, हॉटेल्स, कौटुंबिक तसंच सामाजिक कार्यक्रम आणि घरीही प्रचंड प्रमाणावर अन्न टाकलं जातं. हे अन्न वाचवून गरजूंना दिलं तर अनेकांची उदरभरणाची सोय मार्गी लागेल.
हे सगळे भीषण वास्तव आहे . यावर मात करायची असेल तर अन्नाविषयक जागृती व अन्न-रक्षणासाठी मानसिकता ही संस्कारक्षम अशा बालवयातच करायला हवी . .





• जागतिक अन्न दिवस  व भारत

1945 साली स्थापित संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटना (Food and Agriculture Organization -FAO) चा स्थापना दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
अन्नाच्या मर्यादित साठ्याकडे पाहता उत्पादन वाढविण्याची गरज वाटायला लागली. या चित्राला पाहता संयुक्त राष्ट्रसंघाने 16 ऑक्टोबर 1945 रोजी रोममध्ये ‘अन्न आणि कृषी संघटना (FAO) ची स्थापना केली. उपासमारीला संबोधित करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता फैलावण्यासाठी सन 1980 पासून 16 ऑक्टोबरला 'जागतिक अन्न दिवस' साजरा करण्याचे सुरू केले गेले. यांच्या प्रयत्नाने जगभरात अन्नविषयक कायदे , नियम , नियामकसंस्था , संशोधक संघटना आदी निर्माण झाले.
भारतातही "अन्नवैज्ञानिक व तंत्रज्ञ संस्था" सुरु होऊन अनेक वर्षे झाली. या संस्थेच्या प्रयत्नांनी जनसामान्यांमध्ये अन्नविषयक जागृती निर्माण केल्या जाते. आज  भारतात अन्नतंत्रज्ञान  विषयक   पदविका , पदवी,पदव्यत्तर शिक्षण  अनेक  विद्यापीठांतून उपलब्ध आहे. भारतात आज "अन्नतंत्रज्ञान" ही ज्ञानशाखा हॉट करियर म्हणून बघितली जाते.