Thursday, January 23, 2020

#सहजोक्त.




चिन्तन .
गेले पंधरावीस दिवस प्रकृति-अस्वास्थ्य होते. अद्वैतच्या आग्रहामुळे प्रायव्हेट डॉक्टरकडे न जाता  मेडिकल कॉलेज-इस्पितळात जायचे ठरवले. माझ्या सुदैवाने माझी मामी डॉ. राधामुंजे मेयोमध्ये प्राध्यापक व विभागप्रमुख आहे. तसेच आमच्या कॉलनीतच राहणारी वहिनी डॉ. क्षमा केदार ह्या देखील प्राध्यापक व स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. वहिनीशी बोलणं झाल्यावर तपासण्या करण्यासाठी तिच्याच सोबत गेली. स्वतः वहिनी अतिशय निष्णात डॉक्टर आहे. तिने अतिशय काळजीपूर्वक सर्व चाचण्या करवून घेतल्या , निदान केले.
तीन वर्षांपूर्वीपासून असलेली छोटीशी सिस्ट काढून टाकायची , शस्त्रक्रिया करून , असे ठरले. खरेतर या पूर्वी खाजगी इस्पितळातून दोनदा ती काढूनही परत वाढली होती. वहिनीच्याच संदर्भाने शस्त्रक्रिया विभागाचे प्राध्यापक डॉ. नंदागवळी यांनी व्यवस्थित तपासणी करून सांगितले की गेल्या शस्त्रक्रियांमध्ये कदाचित  पूर्णपणे न काढता , जरासा अंश राहून गेल्यामुळे परत परत गाठ वाढली. आपण ती मूळातून काढू , मग परत दुखणे उद्भवणार नाही.
आमच्या अद्वैतचा फक्त न् फक्त मेडिकल कॉलेजातील सरकारी डॉक्टरांवर विश्वास असल्यामुळे (कारण काही प्रायव्हेट डॉ. चे वाईट अनुभव त्याने घेतले आहेत.)  , तो मला घेऊन गेला .

मेयोतील सर्जिकल काँप्लेक्स अत्याधुनिक व अद्ययावत आहे. संपूर्ण बिल्डिंग प्रशस्त , उजेडी व बरीच स्वच्छ अाहे. सरकारी नियमानुसार सर्व चाचण्या केल्यानंतर शस्त्रक्रिया झाली.
प्रमुख डॉ. नंदागवळी न् त्यांची चारपाच जणांची विद्यार्थीचमू , शिवाय नर्सिंग स्टाफ  , परिचर असा मोठा फौज फाटा होता. अॉपरेशन पूर्वी मला पूर्ण कल्पना दिली , फाईल लिहून दिली.  नंतर मलाच नाही तर सोबत आलेल्या अद्वैतलाही पूरेपूर समजावून सांगितले गेले , अौषध कसे घ्यायचे  ते लिहून तर दिलेच शिवाय दोघांनाही समजावून सांगितले. वहिनी व मामी दोघीही फोनवरून संपर्कात होत्याच . सर्जरी विभागात (मी तिथे रुग्ण असताना) माझा माजी विद्यार्थी डॉ. प्रांजल मेश्राम होता. त्यानेही माझी सुश्रुषा केली.
दोन दिवसांनी परत तपासणीसाठी बोलावले होते. तेव्हा जनरल अोपीडीत मी व अद्वैत गेलो. माझ्या आधी एक ग्रामीण स्त्रीरुग्ण तेथे होती. डॉ. नंदागवळी अतिशय शांतपणे त्या महिलेला  समजावून सांगत होते. तिच्या शंकांचे समाधान करीत होते. दोन दिवसांपूर्वी मला व्हिआयपी ट्रिटमेंट मिळतेय असे वाटले होते , पण तसं नाहीय. इथे प्रत्येक रुग्णाला सुयोग्य निदान करून  उपचार दिल्या जातो.
सरकारी इस्पितळातील प्रत्येक रुग्ण नोंद ही "आर् .टी. आय." अंतर्गत येते.
माझा  "सरकारी" व्यवस्थेवरचा विश्वास दृढ करायला , हा प्रसंग पुरेसा होता.

या पंधरावीस दिवसांत तीन वेळा मी तिथे गेली . सर्वच डॉक्टर , व त्यांचे  रुग्णांशी वर्तन पाहून समाधान वाटले.
पंधरा जणांची सोय असलेल्या वॉर्डात पन्नासाहून अधिक रुग्ण दाखल होतात शिवाय बहुतांश रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये असलेला स्वयंशिस्तीचा अभाव  इत्यादी अनेक कारणांमुळे  सरकारी व्यवस्था अतिशय ताणली जाते.  पण येथील प्रत्येक प्राध्यापक व विद्यार्थी डॉक्टर तसेच परिचारिका व इतर घटक  "रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग " समजून अविरत खिंड लढवत असतात. पद्व्यूत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी चक्क ३०-३० तास सतत काम करीत असतात , हे अमानवीय पण कटुवास्तव आहे (हा स्वतंत्र लेखविषय आहे) !!!

 (पन्नाशीला आली म्हणून)
वहिनी व मामीच्या सल्ल्यावरून माझ्या सर्वच चाचण्या केल्या होत्या . म्हणजे सोनोग्राफी,
मेमोग्राफी , ईसीजी , एक्सरे , काही रक्तचाचण्या , फुफ्फुसचाचणी वगैरे वगैरे !  या सगळ्या व शस्त्रक्रिया यांचे बील किती व्हावे ?? चक्क ८० रुपये फक्त.  (इतरत्र कदाचित  अर्ध्यालाखाने बील केले असते. शिवाय  मेनोपॉझल प्रॉब्लेममुळे  हार्ट ,शुगर ,थायरॉईड ,कँसर , गर्भाशय काढा वगैरे वगैरे अशक्य-शक्यता सांगून  सुतावरून स्वर्ग गाठत नसली खुळं डोक्यात घातली असती , ती वेगळीच  )
अजून एक अनुभव आवर्जून सांगावा असा आहे.  क्षमावहिनीच्याच  संदर्भाने रेडिअोलॉजी विभागाच्या डॉ. अनघा देशपांडे यांनी अतिशय काळजीपूर्वक चाचण्या केल्या. इतकेच नाही तर काळजी कशी घ्यायची तेही समजावून सांगितले. त्या विभागात अतिशय तुफान भीड होती. जवळ जवळ एक तास मी तेथे होती.दीड-दोनशे महिलांची तपासणी माझ्या आधी निश्चित झाली असेल. डॉ. देशपांडे व त्यांची विद्यार्थीचमू , प्रत्येक रुग्णाची  तितक्याच आत्मियतेने तपासणी करत होत्या. 
  अखंड सेवेत असलेले हे डॉक्टर , खरोखर देव आसतात.

सरकारी डॉक्टर रुग्णांच्या अलोट गर्दीमुळे इतके व्यग्र असतात , त्यामुळे रिपोर्ट मॅनिप्युलेट करणे , संभाव्यरोगांची भली मोठी यादी देऊन भिववणे  , जास्तीची अौषधी घ्यायला लावणे , असले पैसे उकळू कामं ही सरकारी-मंडळी करत नाही. (शस्त्रक्रियेनंतर सात दिवसांचे अौषध दिले होते. दोन दिवसांनंतर पुनर्तपासणी वेळी चक्क तीनच दिवसांनंतर सर्व अौषधी बंद करायला सांगितल्या डॉक्टरांनी , कारण रिकव्हरी त्यांच्या अपेक्षेपेक्षा झपाट्याने झालेली होती.)

गेल्या काही दिवसात नव्याने साक्षात्कार झाला , तो असा ....
(१) मी पूर्ण टॅक्स भरते , त्यामुळे सरकारी सेवा व व्यवस्था हा माझा प्रथमाधिकार आहे.
(२) सरकारी दवाखाना असो वा शाळा , येथील नियुक्त्या या नियमानुसार व   अर्हता प्राप्त व्यक्तींच्याच होतात.
(३) रुग्णांचे वैविध्य व अलोट गर्दी यामुळे येथील डॉक्टर खाजगीपेक्षा प्रचंड अनुभवी असतात.
(૪) एकाच परिसरात सर्वच विभाग असल्यामुळे , इतरत्र धावाधाव करावी लागत नाही.
(૪)  माझ्याप्रमाणेच  शिकलेल्या , मध्यम वर्गीय , उच्चमध्यमवर्गीयांनी गांभीर्याने सरकारी व्यवस्था उपयोगात आणायचे ठरवले तर त्या बंद न पडता , विकसित होतील . अधिकाधिक सरकारी नोक-या तयार होतील.
(५)  अभिजन वर्गाने सरकारी सुविधांचा प्राधान्याने उपयोग करायचे ठरवले तर सरकारी इस्पितळात ज्या काही थोडेफार वाईट प्रथा चालतात (स्टॉक संपणे , मशिन बंद पडणे वगैरे )  , त्या सर्व बंद होतील , कारण जन-रेटा .
(६) आज सरकारी शाळा बंद पडत आहेत , सरकारी दवाखान्यांना प्रशिक्षित मनुष्यबळ  पुरेसे मिळत नाही. तर दुसरीकडे खाजगीकरण जोमाने होतेय.
सरकारी व्यवस्था कोलमडत आहेत.
या सर्व दुष्टचक्राला आपण म्हणजेच "सामान्य नागरिक " जबाबदार आहोत.
(७) सरकार कोणतेही असो , जनमानसिकतेच्या बाहेर जाऊ शकत नाही.  मराठी शाळा वाचवा म्हणून आंदोलने करणे चूक नाही पण "मोठ्यांच्या मुलांनाच चांगले शिक्षण न् आम्हाला कां नाही ?" अशी मानसिकता करून  य़च्चयावत् सर्वच जनता 'सिबिएस्सी' हवे म्हणू लागली तर सरकार काय करेल ?   मराठी शाळा किंबहुना सरकारी शाळा  कशा टिकतील ?
जनमानसिकतेने आत्मसन्मान गमावलेल्या सरकारी वा सरकारमान्य शाळा , न्यूनगंडातच क्षीण होता आहेत.
सरकारी शाळांसारखेच सरकारी इस्पितळे , वाहतुकसेवा , दळणवळण सेवा , पोस्टसेवा वगैरे वगैरे.
(८) सरकारी सेवांचा लाभ घेणे ही "बिलोडिग्निटी" न समजता प्रथमाधिकार समजले तर विकराल रूप धारण करणारी  बेरोजगारी कमी होईल. 

भारतासाख्या खंडप्राय देशाच्या तुलनेत छोटासा असलेला भूतान देश य‍ा बाबतीत आदर्श घेण्यासारखा आहे.
तेथील राजाने स्वतःचे अपत्य सरकारी इस्पितळात होऊ दिले . सरकारी शाळेत शिकायला पाठवले. राजाचे बघून इतर खासेमंडळी सुद्धा सरकारी शाळेसह व्यवस्थांचा  लाभ घेऊ लागली. त्यामुळे तेथील खाजगीकरण बंद झाले . आणि चांगल्या सुविधा , अत्यल्प दरात सर्वांना लाभू लागल्या. शेवटी सामान्यांची बचत म्हणजे देशाची बचतच ना ! 

सगळ्यांनीच विशेषतः टॅक्स देणा-यांनी सरकारी व्यवस्थेचाच उपयोग करायला हवा. सरकारी व्यवस्थेत अनेक त्रुटी आहेत पण सर्वच जण वापरू लागले तर त्या दुरुस्तही होतील ना ! 
माझं तर निश्चित ठरलय , प्रत्यक्ष स्वानुभवातून मी  शक्य तेव्हा यापुढे  सरकारी व्यवस्थेचीच कास धरीन.
माझ्याकडून ही छोटीशी सुरुवात , बघू या कोण कोण या जाणीव-जागृतीत सहभागी होतं ते !!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment