Saturday, August 29, 2020

#सहजोक्त.

 


#सहजोक्त.

बाईचे वय हा फारच कळीचा मुद्दा असतो. कोणत्याही स्त्रीला तिचे वय विचारणे हा शिष्टाचाराचा भंगच नसून  फार मोठा अपराध  आहे , असं समजतात. 

"आँटी मत कहो ना !" हे केवळ स्त्रियांसाठीच असतं , असं कुटाळ , कुविचारी मंडळी मानतात. 'संतुर' हे महिलास्पेशल समजतात , हीपण पुरुषी मानसिकताच.   बाकी  "प्रत्येकालाच मिरवताना चिरतारुण्य हवे असते न् जबाबदारी पडली की वृद्धत्वाचे फायदे हवे असतात !"  , हे ही समाजात दिसते. 


जोक , टोमणे सोडून द्या . पण क्वचित विरळच  स्त्री स्वार्थकेंद्री वागते. बहतेक सगळ्याच स्त्रिया आपलं कुटुंब , आप्त स्वकियांचा गोतावळा लीलया सांभाळत , नोकरी/उद्योग  वगैरे करीत घराला हातभार लावत असतात. या सगळ्यांमध्ये त्या घरातल्यांची शुश्रुषा  परिचर्या करतात न् स्वतःकडे हमखास दुर्लक्ष करतात . कोणी प्रामाणिकपणे कबूल करो अथवा न करो , स्त्रियाच संसाराचा कणा असतात. सगळ्यांसाठी झिजता झिजता तिचे आयुष्य संपून जाते.  नेमकी स्वतःसाठी न् स्वतःपुरता ती जगतच नाही . मग  प्रश्न पडतोच की तिचे  नेमके वय काय मानावे ? 



  यावर उपाय सुचला . कोणत्याही स्त्रीचे वय दोन पद्धतीने मोजावे. 

  आणि महत्त्वाचे म्हणजे जिचे वय मोजायचे आहे तिला महिला न म्हणता मुलगी म्हणावे !

  

  पद्धत क्रमांक १ > 

  तसं जगातील समस्त मुलींचे कमाल वय १६ हेच असते , हा ठराव कायद्याने संमत करून घ्यावा. सोळाव्या वर्षांच्या नंतर फक्त अनुभव  वाढत असतो.

जसं  => वय १६ वर्षे  + अनुभव ३૪ वर्षे. 

 महिलेचे वय  ५० वर्ष ठरविणारे शुद्ध वेडे असतात , त्यांना कायद्याने कठोर शिक्षा देण्याची तरतूद असावी. 


पद्धत क्रमांक २ > 

तिला पहिले अपत्य ज्या वर्षी झाले , तेच  तिचे कायमचे वय . कारण आई म्हणून  बाळासोबत तिचाही नवाच जन्म होत असतो. तिचे व्यक्तिगत प्राधान्यक्रम केवळ अपत्याभोवती   फिरत असतात.   पूर्वीची ती न् नंतरची ती पार वेगळीच असते. 

जसे  => तिला  २६ व्या  वर्षी  अपत्य झाले . म्हणजे स्वतंत्र व्यक्ती म्हणून ती कायम २६ वर्षांचीच मानावी. अपत्यजन्मानंतर तिच्यातील  "आई" पण जन्माला आली ना !  म्हणून जसे जसे मूल वाढेल तसे  तसे आईचे वय  ठरवायचे.   म्हणजे ती  किती वर्षांची ? तर मुलाच्या  आईपणाच्या वयाचीच !!  

तिचे वय  २६ +१ 

२६+२ .....या प्रकारे मोजावे. उगाच  ૪० /५० असं अविवेकी मोजणी करू नये.


अजून कोणाला कोणती पद्धत सुचत असेल तर नक्की सांगा. 

तर हे झाले "महिला-वय-महात्म्य"! 

पुरुषांनाही  उगाच मन कोतं करून घेऊ नये .  वय मोजण्याचे विविध उपाय  त्यांनीही सुचवावेत.  एखादा लेख "त्याचे वय" यावरही लिहिता येईल.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.



 


Tuesday, August 4, 2020

#सहजोक्त.

.

 पूर्वार्ध

जगात सद्गुणांना प्रतिष्ठा मिळाली तुझ्याच मुळे.
तूच नात्यांचे सुंदर बंध जपायला शिकविले.
 
त्यागाची परिसीमा स्वचारित्र्यातून गाठलीस तू . 
वै-याशीही कसे वागावे हे ही शिकविलेस तू.

सर्व सुरळीत असताही  अल्पसंख्यांकाच्या आरोपास बधला.
बहुसंख्य सोबत असूनही , असंतुष्टांना झेलत बसला.

स्वतःच्या चांगुलपणात तुझा तूच अडकला. 
परिटाचे काय गेले? आप्त-स्वकीय भरडला. 

कर्तव्यकठोर भूमिकेने  तुझ्या अर्धांगिनीची परवड झाली.
 पितृगृही जन्माच्या हक्कापासून लवकुशही वंचित झाली  .
 
कळवळले मन सीतेचे पण तिने सारे पचवले.
 शेवटी सल उरात ठेऊन तिथेच भूम्यार्पण केले. 
 
 सर्व दुःख , सर्व सल पचवून तू रामराज्य घडवण्यात मग्न झाला .
 सर्वस्व अर्पून , लोकरंजनात रमला न् जनहृदयी राम झाला.
 
 जन मनात वसला राम , अयोध्या मात्र आढ्य झाली.
 जिथे तिथे शंकासुराचा बाणा उगारत सुटली.
 
 तू होता तोपर्यंत सर्वत्र राम होता
 नंतर केवळ नावातच  सत्य उरला.
 
 उत्तरार्ध 


तू होता तोपर्यंत सर्वत्र राम होता
 नंतर केवळ नावातच  सत्य उरला.


असे वाटून  प्रतिष्ठितकलियुगात अयोध्या शेफारली.
 सीताचारित्र्य सोडा चक्क जन्मभूमीवरच शंका घेऊ लागली.
 
 तेव्हा सुद्धा अल्पसंख्यांकरंजन केले होते रामानी.
 तोच वसा चालविला नंतर येणा-या शासकांनी. 
 
 दुष्टांचे काय गेले ?आरोपास्त्र उगारत सुटले .
वर्षानुवर्षे तेच सल , तेच पीळ, जनतेनी अनुभवले.

  सीतेचा वसा जपत भूमी दान करून टाका.
 निर्लज्ज आरोपकर्त्यांनी असा सूर  लावला .

  न्यायालयातील अग्निपरीक्षा शेकडो वर्षे चालली.
आरोपकांची हवस तरीही संपता संपली नाही.

तेव्हा एकच परिट होता , आता हजारो झाले.
त्रेतायुगातून कलियुगात प्रगत पुरोगामी झाले .

 न्याय झाला , मुक्त झाली जन्मभूमी  प्रिय रामाची.
 आरोपकांना बक्षिसी द्या हो सीताजन्मस्थानाची  .
 
धरणीमाते उदार होऊन घे की त्यांना पोटात.
शंकासुरांचा नाश करूनि यावे रामराज्य विश्वात .

मर्यादापुरुषोत्तमच्या मंदिराची    अयोध्येत स्थापना  व्हावी.
कोदंडधारी रामाने आक्रमकांना कायमची अद्दल घडवावी. 
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
५.८.२०२०
नागपूर

Saturday, August 1, 2020

सहजोक्त. कविता

असेच सौख्य नांदू दे 
 असेन  मी जरी नसेन मी ॥ध्रु॥
नको तडाखा उन्हचा 
असो ही सावली सदा 
स्नेह शिरवा पावसाचा
तृप्तसा अलवार साचा ॥१॥

 ही फुले उमललेली
बहरल्या वृक्षवेली
दिनरात असावी अशी
समृद्ध सोज्वळ सन्निधी ॥२॥

सुसंगतीचे सुख हे
सर्वदा तुज लाभू दे
सर्व सुखाचे हो घडे
चरणी तुझ्या अर्पू दे॥३॥

भोवती राशी सुखाच्या
नित्य बरसो रे तुझ्या
निमिष तरी विरहाचा 
व्याकळावा तूझ्या मना॥૪॥

परिपूर्त असूनि क्षण असा
 एक अवघा तो असावा
 ज्यामुळे आयुष्य सारे
 मज विना व्यर्थ व्हावे ॥५॥
  
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

 

लो लो लागला

  🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏 #श्री रेणुका मातेची आरती. ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यां...