मोठ्या भावाला शालेय अभ्यासक्रमात संस्कृत श्लोक होते. तो पाठ करायचा , आमच्या कानी पडायचे. एक श्लोक न् श्लोकापेक्षाही त्याचा अर्थ कायमचा लक्षात राहिला . तो श्लोक असा होता.
आपद्गतं हससि किं द्रविणान्धमूढ: लक्ष्मीः स्थिरा न भवतीति किमत्र चित्रम् |
एतान् प्रपश्यसि घटान् जलयन्त्रचक्रे रिक्ता भवन्ति भरिता भरिताश्च रिक्ताः ||
संपत्तीने अंध झालेल्या [गर्विष्ठ] मूर्खा, संकटात सापडलेल्या या [गरीब माणसाला] तू कां हसत आहेस? अरे लक्ष्मी [कधी कोणाकडे] कायम राहत नाही यात आश्चर्य काय? रहाटगाडग्याच्या चाकावर असलेले हे घडे तू पाहतच आहेस, की रिकामे असलेले घडे भरतात आणि भरलेले रिकामे होतात.
रोजच जगताना अनेक प्रसंगी हा श्लोक आठवतो ,अनुभवाला येतो व पटतो . दाणदाण चालताना , किडेकिटुक चिरडल्या जातात याचे भान हत्तीला नसते पण किटकाचा जीव तळमळतो . भर्र वेगाने जाणारी कार , पायदळ चालणा-यांच्या अंगावर चिखलफेक करून सुसाट निघून जाते. पायी चालणारा फजित पावतो , हे त्या कारचालकाच्या गावी असेलच असे नाही.
यौवन-धनसंपत्ती-प्रभूत्व-अविवेकिता आदी हवेहवेसे (?) गुण असल्यावर माणसाचे सहज वर्तन कारचालकाप्रमाणेच असते न् ते तसे आहे , याचे त्याला नकळत भूषणही वाटत असते.
"आपण पर्फेक्ट , आपण मेहनतीने कमावले , आपण कर्तृत्ववान , आपली आपकमाई , आपण परोपकारी , आपण सहृदय , आपण न्यायी , आपण चुकीचे वागतच नाही" असे ठामपणे वाटणारी अनेक व्यक्तिमत्वे "कारचालक" मानसिकतेत जगत असतात. यांच्या "सर्वोत्तमतेचे" बळी यांच्या आजुबाजूला विखुरले असतात न् संधीची वाट पहात असतात.
कवि भास म्हणतात...
कालक्रमेण जगतः परिवर्तमाना । चक्रारपंक्तिरिव गच्छति भाग्य-पंक्ति ।।
आपल्या वागण्याने आपण कितेकांना दुखवले , डावलले , उठवले , त्रस्त केले याची जाणीव नसणे , हेच अशा महान (!) लोकांचे विशेष असते. या सर्वच नरोत्तमांचे भान इथे सुटलेले असते की परिवर्तन हे काळाचेच दुसरे रूप आहे न् ते अटळ आहे.
वर सांगितलेल्या सुभाषिताच्या अर्थाला पूरक अनेक सूक्ती भाषांमध्ये आढळतात.
(१) हे हेमकार परदुःख विचारमूढ....
(२) माटी कहे कुम्हार से, तु क्या रोंदे मोय। एक दिन ऐसा आएगा, मैं रौदूंगी तोय।।
(३) की तोडिल्या तरु फुटे आणखी भराने...
अशा अनेक सूक्ती कां निर्माण झाल्या ? तर असं वागणं पूर्वापार घडत आलय म्हणूनच ना !
आज सासुरवाशीण असलेली सून पुढे आपल्या सुनेला थोडाफार तसाच सासुरवास करते. रॅगिंगला नाव ठेवणारे आजचे फ्रेशर्सही पुढच्या बॅचचे रॅगिंग घेतातच घेतात. न् अशा प्रकारे लोकं आपली वेळ विसरून गतानुगतिकपणे तसेच वागतात , ज्याचा त्रास त्यांनी स्वतः अनुभवला असतो.
पैसा-अधिकार वगैरे पचवणं , ऊतमात न करणं ; हे अन्न पचवण्या इतकं सोप्प नाही. "अहंकाराचा वारा न लागो माझिया अंगा" , हे आत्मसात केलेल्यालाच पैसा-अधिकार पचवता येऊ शकतो.
काल डावलल्या गेलेले , आज ईप्सित स्थान लाभल्यावरही उन्मत्त न होता ऋजुतेने वागतील तरच खरे संस्कारी ठरतील न् खरी सुसंस्कृत पिढी घडेल , यात शंका नाही.
नाही तर
"रिक्ता भवन्ति भरिता भरिताश्च रिक्ताः।" असं रहाटगाडगं अखंड सुरूच राहील.
प्राचीन काळापासून चालत आलेली ही "मत्त-मानसिकता" जाणूनच सर्वज्ञ भगवान बुद्ध म्हणाले असतील कां ,
"न हि वैरेण वैराणि शम्यन्ति ह कदाचन ।
अवैरेण च शम्यन्ति एष धर्मो सनातनः ॥"
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
🙏🙏
ReplyDelete"नको गं, नको गं" आक्रंदे जमीन...
ReplyDeleteही तात्यासाहेबांची कविता...
आणि
"अबला न माझी ही माता रे..."
ही तात्यारावांची कविता...
ही पोस्ट वाचून दोन्ही आठवल्या.
कुणाचे दिवस कधी पालटतील सांगता येत नाही. तरीही गर्वोन्मत्त मनुष्य आपण आपल्या आसपास पाहतोच! ��
धन्यवाद
Delete