#तोच चंद्रमा नभात.....
मराठी साहित्य त्याच्या उत्तम साहित्यगुणांनी कायमच श्रेष्ठ ठरले आहे. मराठी कविता सुद्धा याच साहित्याची देण आहेत. काही काही कवितांचे भावगीत म्हणून ध्वनिमुद्रण झाले न् त्या कविता अक्षरशः अजरामर झाल्या. मराठीत अशा अनेक कविता आहेत.
आता हेच बघा ना . शांता शेळके यांनी लिहिलेले , सुधीर फडके यांनी यमन-रागात गायलेले व संगीत दिलेले विख्यात मराठी भावगीत . हे भावगीत न ऐकलेला मराठीमाणूस विरळच असेल.
तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी एकान्ती मजसमीप तीच तूही कामिनी !
नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे छायांनी रेखियले चित्र तेच देखणे जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहिनी ॥१॥
सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे? मीही तोच, तीच तूही, प्रीति आज ती कुठे?
ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी॥२॥
त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणावाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी॥३॥
सुधीर फडकेंच्या आवाजातील तपःपूत आर्तता , पार्श्वसंगीताच्या कातर सुरावळी आणि गीतातील शब्द , या तिघांचाही मेळ असा काही जुऴला आहे की आंतरिक एकात्म सहज साधलंय त्यातून !
श्रुंगार हा रसांचा राजा म्हटल्या जातो . श्रुंगार रसाचा स्थायी भाव "रती" म्हटल्या जातो. श्रुंगार रसाचे दोन भेद आहेत . (१) संयोग श्रुंगार म्हणजे ज्यात दोहोंचे मिलन वर्णिल्या जाते. (२) विप्रलंभ श्रुंगार म्हणजे ज्यात वियोग दर्शविला जातो.
हे गीत श्रुंगार-रसाचे आहे असं सामान्यतः मानतात. पण खरेच ते तसे आहे कां ?
शांताबाईंच्या उत्तमोत्तम काव्यांपैकीचे हे एक काव्य ! या गीतात , नायिकेला उद्देशून नायकाच्या भावना शब्दातून व्यक्त झाल्या आहेत . शब्द आणि भावनांची सुबक गुंफण यात दिसते.
काव्यप्रकाश नामक ग्रंथात एक श्लोक आहे , तो असा -
‘यः कौमारहरः स एव हि वरस्ता एव चैत्रक्षपास्ते चोन्मीलितमालतीसुरभयः प्रौढाः कदम्बानिलाः ।
सा चैवास्मि तथापि तत्र सुरतव्यापारलीलाविधौ रेवारोधसि वेतसीतरुतले चेतः समुत्कण्ठते॥
या श्लोकात -चैत्ररात्री , उमलत्या मालती फुलांचा सुगंध , तो घनदाट कदंबवृक्ष , तीच नायिका आणि नायक , त्याच त्यांच्या श्रुंगारलीला वगैरे असूनही नायिकेला नर्मदेतीरीचे त्यांचे मीलन स्मरत आहे - असे वर्णन आहे.
या श्लोकाचा विस्तारित , सुसंस्कृत आणि कुलीन भावानुवाद , या गीतातून आपल्याला अनुभवायला मिळतो. बरीच उदाहरणे अशी आहेत की संस्कृतसाहित्यातून कल्पना / प्रसंग घेऊन त्यावर संस्कृत साहित्यापेक्षाही सरस मांडणी मराठीत आढळते. (जगद्विख्यात उदाहरण आपल्या ज्ञानेश्वरीचेच आहे.) हे गीतही त्याच पठडीतले !
काव्यप्रकाशात नायिका धीटपणे व्यक्त होतेय तर शांताबाईंच्या घरंदाज काव्यात नायक धीटाई करतोय.
तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी एकान्ती मजसमीप तीच तूही कामिनी !
या दोन पंक्तीतही वरील श्लोकाप्रमाणे चंद्र , चैत्राची रात्र , एकांत आणि संगतीला नायिका आहे.
पण काव्यात प्रणयी-शब्द-साज चढवावा तो शांताबाईंनीच ! चैत्रयामिनी व कामिनी हे शब्द यमक जुळवायलाच घेतले , असे नाही . यामिनी म्हणजे रात्र . पण अर्थच्छटा अशी की जिच्यातून प्रहर सहज सरतात ती म्हणजे यामिनी. सहाजिक आहे , प्रेयसी सह एकांतात असता रात्र भरकनच सरणार ! इथे 'यामिनी' शब्दाहून समर्थ-समर्पक शब्द अशक्यच ! तसेच सहचरीसाठीही "कामिनी" शब्द केवळ यमक जुळवायला नव्हे ! [अतिशयेन कामः अस्या अस्ति इति । काम + इनिः + ङीप् । ) अतिशयकामयुक्ता नारी । इत्यमरः] जिची स्वतःची कामेच्छा जागृत आहे अशा मनस्थितीतील पत्नी म्हणजे कामिनी. इथे काव्याची सरसता , शब्दांची श्रीमंती , शब्दांतील अर्थांचे ऐश्वर्य वगैरे दीपवून जाते.
नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहिनी ॥१॥
प्रणयी जीवांना जे जे हवं ते सारं यात वर्णिलं आहे. नीरवता , धुंद चांदणं , सावल्यांची सुरेख रेखाचित्रे , तोच जाईचा मांडव न् तीच त्या फुलांच्या सुगंधाची मोहिनी ! संस्कृतश्लोकात "मालती" म्हटले आहे. इथं या काव्यात फक्त एकच छोटीशी चूक आहे . चैत्रात जाई उमलत नाही , फार फार मोगरा असू शकतो. पण हरकत नाही , वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने अचूक नसेल तरी प्रणयीभावनांच्या दृष्टीने अतिशय अलवार वर्णन ठरतेय. जाईची फुलं नाजुक व मंद-धुंद सुवासिक असतात. त्यांचे उमलणे आणि कामिनीचे उमलणे यातील मदधुंदता सुंदरच टिपली आहे शांताबाईंनी !
इथंवर हे काव्य हळुवार प्रणयी विकसित होतय आणि......
सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे? मीही तोच, तीच तूही, प्रीति आज ती कुठे?
ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी॥२॥
सारं सारं तसेच , अगदी तसेच आहे. नायकही तोच नि नायिकाही तीच आहे. पण कां बरे ती धुंदी , ती प्रीती दिसत नाहीय ? ती आर्तताही नाही न् उघड्या डोळ्यांनी बघावं असं हे स्वप्नही नाही .
कां ? कां ? कां ?
वरच्या श्लोकातील संयोग श्रुंगार इथे संपलाय . पण विप्रलंभ श्रुंगारही स्पष्ट नाही.
मानवी वर्तनाची मानसिकता या कडव्यात व पुढच्या कडव्यात अधोरेखित होते.
त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी॥३॥
नायक-नायिकेचे मन जुळलेलेच आहे. दोघेही एकांती जवळच आहेत. सारं वातावरण प्रणयी आहे. परंतु नवथरतेची नाविन्यता आता संपली आहे. सरावाने नवतेवर मात केली आहे. हेही मान्यच ! असा अनुभव सर्वच दंपतींना येतो.
"भंगल्या सुरातून गीत व सुकलेल्या फुलातून गंध कधीच मिळत नाही." असे म्हणत शांताबाईंना नेमकं काय सुचवायचे आहे ? सर्व काही स्वाधीन , स्वामित्वातील असूनही कां असा विसंवादी सूर ?
शेवटच्या दोन ओळींतून केलेला अनपेक्षित रसभंग , या काव्याला वेगळ्याच उंचीवर नेतो की हळुवार उमलणाऱ्या संवेदनेचा व्यावहारिक मनोभंग करतो ? हे ज्याचे त्यानेच ठरवावे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
सुंदर.
ReplyDeleteधन्यवाद
DeleteThis comment has been removed by a blog administrator.
DeleteKhupch mast ..Pradnya
ReplyDeleteधन्यवाद
Deleteकाव्यातुन निर्माण होणारे भाव मनाला मोहून जातात. सुंदर लेखन.👍👍
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसहज सुंदर लिखाण...👌👌👌
ReplyDelete