१ वनस्पती
यस्यां समुद्र उत सिन्धुरापो
नानावीर्या अौषधीर्या बिभर्ति ।
गिरयस्ते पर्वता हिमवन्तोऽ-रण्यं
ते पृथिवी स्योनमस्तु॥
अशा प्रकारचे समुद्र ,पर्वत ,वनस्पती जंगल युक्त पृथ्वीचे वर्णन ऋषींनी अथर्ववेदात (१२।१।३,२,११) केले आहे.
'अन्न-वस्त्र-निवारा', ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत असे समाजशास्त्र म्हणते. वरील तीनही गरजा वनस्पतींशिवाय अपूर्ण आहेत , असे म्हटले तर वावगे ठरू नये. मानवी अन्नाचा मोठा भाग वनस्पतीजन्य आहे जसे भाजी ,फळे ,धान्य आदी . वस्त्र ही गरज सुद्धा वनस्पतींपासूनच पूर्ण होते बव्हंशी. कापुस ,ताग ,बांबु इत्यादी झाडांपासून पूर्वापार वस्त्र निर्माण केल्या जातात. मानवी उत्क्रांतीपासून ते आज वर मानवाने निवारा म्हणून वृक्षांचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष उपयोग केला आहे ,भविष्यातही करणारच आहे. अशा प्रकारे सर्व प्रकारे वनस्पतींवर आधारलेले मानवी जीवन वनस्पतींनी सांभाळले ,जोपासले व भरभराटीला नेले आहे ,यात दुमत नाही.
अश्मयुगापासून ते आताच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत मानव आणि वनस्पती यांचा अतिप्राचिन परस्पर संबंध विविध आयामांतून अभ्यासण्या सारखा आहे.
१) वैज्ञानिक आयाम
विज्ञानयुगाच्या सुरुवाती पासून वनस्पतींचा अभ्यास करणा-या विद्याशाखेला "वनस्पती शास्त्र" असे म्हणतात. या विद्या शाखेत वनस्पतींचे वर्गीकरण पासून ते अंतररचना ,कार्य ,उपयोग इत्यादींचा अभ्यास होतो .विज्ञानाच्या प्रगतीसह या शाखेचाही विकास झाला व पुढे त्याच्या अनेक शाखा-उपशाखा विकसित झाल्या. आजमितीला त्यांची संख्या डझनाहून अधिक असण्याची शक्यता आहे. "वनस्पतींना जीव असतो ,त्यांनाही भावभावना असतात" हा वनस्पतीशास्त्रातील मूलभूत सिद्धांत डॉ. जगदीशचंद्र बसु या भारतीय शास्त्रज्ञानी १८९७ मध्ये मांडला. आजही जागतीक स्तरावर वनस्पतीशास्त्र व त्याच्या सर्व शाखांमधील भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान उल्लेखनीय व महत्वपूर्ण आहे.
२)पर्यावरणीय आयाम
विज्ञानयुगाचा एक नकारात्मक परिणाम म्हणून मध्यय़ुगाच्या उत्तरकाळी भौतिक सुबत्ता वाढीमुळे वसाहतवाद ,यांत्रिकीकरण,युद्ध ,स्पर्धा आदी मानवी दोष उद्भवले. याच मानवी दुर्गुणांमुळे वृक्षतोड,निर्वनीकरण आदी वाढीला लागले . परिणामस्वरूप प्रदूषण ही समस्या निर्माण झाली. याच समस्येवर मात करण्यासाठी मग पर्यावरण शास्त्र निर्माण झाले. वृक्षसंवर्धन ,संरक्षण हा पर्यावरणशास्त्राचा एक महत्वपूर्ण भाग आहे.
आदीम काळापासून अनेक वर्षांपर्यंत भारतीयांच्या अंगवळणी असलेला "इकोफ्रेंडली" हा शब्द सध्याच्या काळात परवलीचा झाला. विविध देशांतील सांस्कृतिक ,पारंपारिक मनोभूमी लक्षात घेऊन जनजागृती करून वृक्ष-संवर्धानाचे कार्य याच विद्याशाखेच्या प्रगत शाखांद्वारे सुरु आहे.
३) सामाजिक आयाम .
मानवी समूह देश-काल-परिस्थितीत स्वतःचे जीवनमान सांभाळत काही रुढी-परंपरा जपतात. या सामजिक रूढीपरंपरांतून सभोवतालच्या मानवी जीवनासह वृक्ष-पशु-पक्षी आदी मानवेतर जीवने देखील समृद्ध होतात. अनेक सामाजिक मान्यतांमुळे बरेचदा पर्यावरणावर बरावाईट परिणाम होतो. भारत हा विविधतेने नटलेला समृद्ध देश आहे. येथे सामाजिक विविधता विपुलतेने आढळते तद्वत् वृक्षादी पर्यावरणाचे रक्षणासंबंधी सुद्धा वैविध्य आढळते. भारतातील अनेक आदीम जमातींमध्ये झाडांचे महत्व आढळून येते. तुळस ,दुर्वा ,बेल ,पळस ,केळ ,आंबा ,नारळ,कमळ ,नागवेल आदी वनस्पती त्यांच्या धार्मिक महत्वामुळे समाजमान्य व संरक्षित आहेत.
"शेतातील पहिले पीक देवतेला समर्पित करून सृष्टी देवतेविषयी कृतज्ञता दर्शविणे " हीच भावना भारताच्या विविध भागात वेगवेगळ्या नावांने उत्सवस्वरूपात साजरी केली जाते. जसे आसामात बिहू ,केरळात अोणम ,महाराष्ट्रात दिवाळी व अक्षय तृतीया इत्यादी. या उत्सवांच्या निमित्त्याने वनस्पतींचे महत्व जाणून घेणे इष्ट .
भारतात ऋतु-काळ-स्थानानुसार अनेक सणसमारंभ समाजात रूढ झाले आहेत. जसे होळी ,संक्रांत ,पोळा , हादगा-भुलाबाई-भोंडला ,दसरा ,नवरात्र ,दिवाळी , पीकपेरणीचा सण इत्यादी.कृषिसंस्कृतीशी निगडित असलेल्या या सर्व सणांमधून मानवाचे निसर्गाशी असलेले मुळ बंध जाणून घेणे आजच्या आधुनिक युगात जास्त गरजेचे आहे. या सर्व सणांद्वारे समृद्ध पर्यावरण,खाद्यसंस्कृती ,मानवाचा मानवांशी आंतरसंबंध निकोप वाढावा हेच या सणांचे मुळ उद्दिष्ट असावे. पुढे पुढे या सणांना विशिष्ट धर्माशी जोडण्याचा प्रयत्नातून मूळ उद्दिष्ट हरवल्या सारखे झाले .
महाराष्ट्रात " देवरायी " नावाचा पर्यावरणरक्षक असा अद्वितीय सामाजिक उपक्रमही धर्माशी जोडल्या गेला. महाराष्ट्राच्या काही भागात देवासाठी मोकळी जागा सोडली जायची . अशा जागांवर विविध वृक्ष उगवायचे ,वृक्षांमुळे पशु-पक्षी-किटक यांचा अधिवास तयार होई. मानवाला प्रतिबंधित केले असल्यामुळे अशा देवरायी ह्या सर्वोत्तम पर्यावरणीय अधिवास व जैवविविधतेची उदाहरणे ठरत होत्या. "देवाची भूमी "या सामाजिक भावनेमुळे तिचे रक्षण आपसूक होत असे. अशा देवरायींमुळे स्वाभाविकच आजुबाजुचे मानवी जीवन निरोगी व निसर्गसंपन्न होत असे.
૪) आर्थिक आयाम .
जीवन जगण्यासाठी "आर्थिक गरज" महत्वपूर्ण आहे. वनस्पतींमुळे आर्थिक हित जोपासल्या जाते. शेती ,फळबागा ,उपवन ,वन यांच्या द्वारे माणसाला जीवनमान उंचावणारे धन-पैसा प्राप्त होतो. वृक्ष-वनस्पती हे जवळ जवळ सर्वच भारतीयांचे आर्थिक उलाढालीचे प्रत्यक्ष स्रोत आहेत.
५) धार्मिक आयाम
धारणात् धर्मः म्हणजे समाजाला धारण करणारा धर्म . मानवी समाजाला ऐहिक व पारलौकिक सुख मिळवून देणारा ,मानवाची मानसिक-भावनिक जडण-घडण करणारा धर्म . जगात अनेक धर्म आहेत. ऋग्वेदात (,"एकं सद्विप्राः बहुधा वदन्ति ।"१।१૪६।૪६) म्हटल्या प्रमाणे सर्वच धर्म वनस्पतींचे रक्षण करावे अशीच शिकवण देतात. भारतातील काही प्रमुख धर्मांत वृक्ष-संरक्षण विषयक काय दृष्टीकोण आहे ,याचा थोडक्यात धांडोळा घेऊ या. (येथे धर्माचा क्रम अकारविल्हे नुसार दिला आहे. )
अ) इस्लाम धर्म
भारताबाहेर उगम पावलेला आणि आता भारतातही प्रस्थापित झालेला इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कुराण (२२।१८) मध्ये "सूर्य ,चंद्र,तारे ,पर्वत ,झाडे व चरजीव ,अल्लाने निर्माण केले " , असे म्हटले आहे. मुहंमद पैगंबरांच्या अनेक उद्धरणांतून वृक्षांचे महत्व सांगितलेले दिसून येते. हजरत मुसाला पैगंबरांच्या शुभ सूचना वृक्षामार्फत मिळाली असा उल्लेख आहे. हादिस अल् बुखारी यात "पैगंबरांनी स्वतःला खजूरवृक्ष म्हटले आहे". तुळस या झाडाला रेहान म्हणतात व जो 'जन्नत का पौधा' आहे असे मानतात.
आ) ख्रिस्ती धर्म
युरोपात उद्गम पावलेला ख्रिस्ती धर्माचा बायबल हा पवित्र धर्मग्रंथ आहे. जगभरात पसरलेल्या या धर्माचा ख्रिस्मस हा सण जगभरात साजरा होतो.या सणात सजविला जाणारा ख्रिसमसट्री भारतातही सर्वज्ञात आहे. बायबलच्या न्यायिनो ९.८ NHT यात "सर्व झाडांनी अॉलिव्हच्या झाडाला राजेपद दिले" असा उल्लेख आहे. यहोवाच्या यशयाहमधील अनेक भजनांत वृक्षांचा सन्मानपूर्वक उल्लेख आहे.
ई) जैन धर्म
भारतीय विचारपरंपरेत भारतभूमीतून निर्माण झालेला जैन धर्म अहिंसावाद ,अनेकान्तवाद इत्यादी सद्ययुगाला उपकारक अशा अनेक सिद्धांतांचा जनक आहे. जैनांचे चोवीस तीर्थंकर होऊन गेले . या चोवीस तीर्थंकरांचे वृक्ष चिह्न म्हणून चोवीस झाडांचा उल्लेख आहे.आद्य तीर्थंकर ऋषभदेव यांचे वटवृक्ष हे चिन्ह आहे तर अंतीम तीर्थंकर महावीर यांचे सालवृक्ष हे चिन्ह आहे. मुळातच अहिंसावादी अशा या धर्मात वृक्ष संवर्धन वेगळा सांगायची गरजच नाही.
उ) बौद्ध धर्म
संपूर्ण जगाला अहिंसेचा आर्य अष्टांगिकमार्ग दाखविणारा अस्सल भारतीय मुशीतून निर्माण झालेला धर्म म्हणजे बौद्ध धर्म . गौतमाला प्रथम ध्यान ,द्वितीय ध्यान शेतात जांभळाच्या झाडाखाली व अंतीम संबोधी पिंपळाच्या झाडाखाली मिळाली. पालीभाषेतील *त्रिपिटक* ग्रंथांमध्ये भगवान बुद्धांचे उपदेश संग्रहित केले आहेत. भगवान गौतम बुद्धाचा जन्म लुंबिनी वनात झाला. त्यांचे सर्व जीवनयापन धर्म-प्रसार करताना वन-उपवनातून प्रवास करीत संपूर्ण प्रांतात ,नगरांत झाले. त्रिपिटकांमध्ये विशेषतः मझ्झिम निकायात अौषधी वनस्पतींचे वर्णन आले आहे. राजा बिंबिसार व भगवान बुद्ध यांचा राजवैद्य असलेला जीवक-कुमारभृत्य हा वनस्पतींपासून अौषधे तयार करण्यात अतिशय निष्णात होता. याच्या ज्ञानाचा सन्मान म्हणून अष्टांग-आयुर्वेदातील बालरोग-शाखा ,कौमारभृत्य नावाने अोळखल्या जाते. चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे शिलालेख इतिहासात प्रख्यात आहेत. त्यातही अनेक ठिकाणी वृक्षारोपण व संगोपनासाठी राजाज्ञा दिलेली आढळते.
अशा प्रकारे निसर्गासह नेहमीच साहचर्य बाळगणारा हा धर्म , वृक्ष-वनस्पतींसाठी उदारमतवादीच राहिला आहे.
ए) हिंदु धर्म
"आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः"
, जगात जे जे मंगलमय आहे ते माझ्यात येऊ दे ,अशी मूळभावना घेत जगणारे भारतीय बहुसंख्य लोक हिंदु-आचार- पद्धतीचा स्वीकार करतात. निरीश्वरवादी ते अनेकेश्वरवादी , सगुणसाकार ते निर्गुण निराकार इत्यादी प्रकार-उपप्रकार या धर्मात सामावले आहेत. या धर्मांत अनेक देवता व त्यांचे आराध्य वृक्ष विख्यात आहेत, जसे शंकराला बेल ,गणपतीला दुर्वा ,विष्णुला तुळस इत्यादी. या धर्मात नित्यनैमित्तिक उपसनांमध्ये वृक्षाला अतिशय महत्वपूर्ण स्थान आहे.
भगवद्गीतेत स्वतः भगवान कृष्ण म्हणतात ,"मासानां मार्गशीर्षोऽहम् ऋतूनां कुसुमाकरः"। अर्थ असा की "मी महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आहे (यात वनसृष्टीला नवजीवन लाभते ) तर ऋतुंमध्ये फुलांना बहर येणारा वसंतऋतू मी आहे."
हिंदूधर्मातील कोणतीही पूजा-व्रतवैकल्ये फुले-फळे-पाने यांच्या शिवाय पूर्ण होत नाही. सुपारी ,नारळ ,केळ,आंबा ,तुळस ,बेल ,दुर्वा याशिवाय अनेक वनस्पतींचा उपयोग वेगवेगळ्या पूजांमध्ये केल्या जातो. अर्थात पूजा नीट करण्यासाठी ही सर्व वृक्षराजी परिसरात असायलाच हवी. अशा प्रकारे वृक्षाला स्वतःच्या सामाजिक-धार्मिक-कौटुंबिक जीवनात महत्वपूर्ण स्थान देणारे हिंदु हे नेहमीच वनस्पती-संगोपकच असतात.
६)सांस्कृतिक आयाम
" जगा व जगू द्या" हे सर्वसमावेशक तत्व प्रत्यक्षात आचरणात आणणारे आम्ही भारतीय ,संपूर्ण विश्वात आमच्या एकमेवाद्वितीय संस्कृतीमुळे विशेष ठरतो.
जगातील विविध धर्म निर्माण होण्यापूर्वी पासून गंगा-यमुना-सरस्वती-गोदावरी-नर्मदा-सिंधु-कावेरी आदी नद्यांच्या काठी उगम पावलेली आपली भारतीय संस्कृती तिच्या समृद्ध व वैविध्यपूर्ण वारश्यामुळे जगात आदरणीय ठरली आहे.
आसेतु-हिमाचल पसरलेला आपला देश, या संस्कृतिक बंधामुळे एकसंध आहे.
एखाद्या देशाचा सांस्कृतिक वारसा जाणून घ्यायचा असेल तर तेथील लोककला , पुरातत्व-स्थळे , गड-किल्ले-लेणी-वास्तु-मंदीर आदी बघणे जसे गरजेचे आहे तसेच साहित्य मग ते मौखिक वा लिखित स्वरूपात असो यांचाही विचार करायला हवा.
भारतातील अनेक मंदिरे- लेण्या येथे वृक्षाचे शिल्प आहेतच , अजिंठा आदी लेणींमध्ये रंग तयार करण्यासाठी वनस्पतींचा स्रोत उपयोगात आणला होता असे म्हणतात.
भारतात अनेक प्रकारच्या लोककला आहेत.वादन-नर्तन-चित्रकला आदी अनेक कलांमध्ये वनस्पतींचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने कसा होतो हे बघणे फार रंजक ठरेल.
भारतातील अनेक प्रांतात पारंपरिक पध्दतीने वस्त्र निर्माण करणे व त्याला रंगवणे हे सारे वनस्पतींच्या सहायानेच केले जाते.
मौखिक वाङ्मयातून मानव-वनस्पती यांचे संबंध दर्शवणारे विपुल साहित्य आढळून येते. यांचे संकलन करणे सुद्धा मनोरंजक उपक्रम ठरेल.
लिखित साहित्यातून तर वनस्पतीसृष्टीच्या मनोरम वैविध्याचा परिचय होतो.
संपूर्ण भारताच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा विचार करता ,सांस्कृतिकसंपन्नतेत आपण काकणभरसरस आहोत यात शंका नाही.महाराष्ट्रात होऊन गेलेल्या रामदेवराय-कृष्णदेवराय ,वाकाटक ,सातपर्णी आदी राजवटींनी महाराष्ट्राची भूमी सुजल-सुफल व सस्य श्यामल केली. शिवरायांनी तर कृषिक्षेत्र ,सिंचनक्षेत्र ,वनक्षेत्र यांच्यासाठी विशेष धोरणच राबवले होते.
महाराष्ट्रातील लोकहितदक्ष राजवटीं शिवाय इथल्या संतपरंपरा ,विविध सांप्रदाय आणि वारकरी पंथ आदींमुळे साहित्यातून तर वृक्षप्रेम दिसतेच शिवाय वर्तणुकीतूनही वृक्षप्रेम दिसून येते. "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे "म्हणणारे तुकोबा काय किंवा "कांदामुळा भाजी अवघी विठाई माझी" म्हणणारे संत सावता महाराज काय ; पर्यावरणाशी एकरूप झालेली थोर मंडळी होती.
अशा प्रकारे सांस्कृतिक आयामामुळे वृक्ष-संवर्धन होण्यास सहाय्य होते.
वर आपण विविध आयामांमुळे वनस्पती-विश्वावर काय परिणाम होतो हे थोडक्यात पाहिले.
आधुनिक विज्ञान जसे वनस्पती विषयक अभ्यास करते तसाच अभ्यास आपल्या पूर्वजांंनी अनेक वर्षांपूर्वी करून ठेवला आहे. या दोहोंचा दृष्टिकोण जरी भिन्न असला तरी दोहोंच्याही अभ्यासाचे महत्व कमी होत नाही.
प्राचीन भारतीयांचे हे ज्ञान मुख्यतः संस्कृत ,पाली ,प्राकृत आदी भाषांमध्ये आहे. आता आपण थोडक्यात काही ग्रंथाचा परिचय करून घेऊ .ह्या पैकी ब-याचशा ग्रंथांचा आधारभूत विषय वनस्पती हा नसून इतर विषय आहेत , हे लक्षात घेतले पाहिजे .
१) वेद वाङ्मय= वेद ,हे जगातील प्राचीन ज्ञानग्रंथांपैकी एक आहेत. वेद हा भारतीयांचा मूळ सांस्कृतिक-ठेवा आहे.
प्राचीन ऋषी-मुनी वनात राहून निसर्गचिंतन करीत असत. त्यातून त्यांनी निसर्गपोषक-पूरक अशी जीवनशैली विकसित केली होती. वेदांचाच एक भाग म्हणजे आरण्यके होत ,जी अरण्यात राहूनच शिकावी असा दंडक होता. वेदांत अनेक ठिकाणी वनस्पतींचा आदराने उल्लेख केलेला आढळतो.
ऋग्वेदात अश्वत्थ वृक्षापासून भांडे बनविणे ,अन्न प्रक्रिया ,प्रकाश संश्लेषण आदींचा उल्लेख आहे.वेदांमध्ये पिंपळ ,सोमलता,अपामार्ग ,पाटा,पृश्निपर्णी,ऋषभ,मधुला,शमी,गुग्गुळ ,उदुंबर ,दर्भ ,अश्वत्थ,शतावर,
अजश्रुंगी ,आदी वृक्षांही उल्लेख आहे.
"नमः वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः (यजु.१६।१७)"
"अौषधीरिति मातरस्तद्वो देवीरूपब्रुवे (यजु.१२।७८)
"अतस्त्वं देव वनस्पते शतवल्शो विरोह ।
सहस्रवल्शा वि वयं रुहेम ॥ (यजु.५।૪३) [हे वनस्पती अौषधी , आम्ही तुमचा प्रभाव जाणतो, तुम्ही शेकडो शाखांनी वाढा , ज्यामुळे आम्ही हजारो शाखांमध्ये वाढू .]
अथर्ववेदात अौषधी-वनस्पती ,कृषी विषयक माहिती आहे.
ऋग्वेदात वृक्ष ,अोषधी (अौषधी वनस्पती) व वेली असे तीन प्रकारात वनस्पतींचे विभाजन केले आहे . 'करीर' नावाचा निष्पर्ण वनस्पतींचा विशेष वर्ग दिला आहे. अथर्ववेदात हेच आठ वर्गात विभाजन केले आहे.
"वेद व वेदांग हे सर्व विश्वाचे ज्ञानभंडार आहे," अशी परंपरावाद्यांची श्रद्धा आहे. आज आधुनिक परिप्रेक्ष्यातून या प्राचीन विद्यांचा पुनर्विचार व मांडणी होणे गरजेचे आहे.
२)अमरकोश = समानार्थी शब्दांचा हा प्राचीन कोश आहे. यात वृक्षासाठी काही पर्यायी शब्द दिले वरवर वाचताना ते समानार्थी वाटतात .पण या प्रत्येक शब्दातून झाडाचा एकेक गुण दिसून येतो. जसे पादप (मुळांनी पाणी पिणारा ), महिरूह (जमीनीवर उगवणारा) ,शाखी (फांद्या असलेला) ,विटपी (कक्षीगत कोंब असलेला) , तरु ((जमीन फोडून बाहेर येणारा) ,वृक्ष( छाटल्या जाणारा) . म्हणजे त्याकाळी साहित्यातूनही वनस्पतींचे गुणधर्म मांडलेले आढळतात .
३)महाभारत = श्रीव्यासांनी रचलेले हे महाकाव्य. याचा मुख्यविषय जरी पांडव विजय असला तरी यातील काही भागांमध्ये (भीष्मपर्व ,शांतिपर्व , अनुशासनपर्व आदी) वनस्पतींविषयी मार्गर्शनपर भरपूर साहित्य आहे.
वक्त्रेणोत्पलनालेन यथोर्ध्वं जलमादते ।
तथा पवनसंयुक्तः पादैः पिबति पादपः ॥(महाभारत-शांतिपर्व-अध्याय१८૪, श्लोक १६) यात मुळांद्वारे वा-याच्या सहायाने वृक्ष पाणी पितात असे स्पष्ट सांगितले आहे . आधुनिक वनस्पतीशास्त्रात याला *अॉस्मॉसिस* म्हणतात.
याच अध्यायात १८ व्या श्लोकात प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया ध्वनित होते.
"तेन तज्जलमादत्तं जरयत्यग्निमारुतौ ।
आहारपरिणामाच्च स्नेहो वृद्धिश्च जायते ॥"
वृक्ष व जलाशयांचे महत्व जाणून युधिष्ठिराला पितामह भीष्म सांगतात ,
"तस्मात् तडागे सद्वृक्षा रोप्याः श्रेयोऽर्थिना सदा ।
पुत्रवत्परिपाल्याश्च पुत्रास्ते धर्मतः स्मृताः ॥"
भीष्मांनी वृक्षांना धर्मपुत्र मानले आहे.
वनस्पतींना जीव आहे , त्या श्वास घेतात ,त्यांना भावना आहेत असे महाभारताच्या शांतिपर्वात सुचवले आहे.
૪) वृक्षायुर्वेद = पांडुलिपीत उपलब्ध झालेला हा ग्रंथ सुरपाल यांनी रचला आहे असे म्हणतात. त्यांच्या विषयी याहून अधिक माहिती उपलब्ध नाही. या ग्रंथात साठ पृष्ठ असून ३२५ श्लोकामधून वृक्ष संबंधी महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे. या ग्रंथात १७० वृक्षांचे सविस्तर-सांगोपांग विवरण केले आहे. या ग्रंथात बीज निर्मिती ,खरेदी ,रक्षण ,रोपण ,जमिनीचे प्रकार ,मशागत ,सिंचन व त्याचे प्रकार ,उद्यान विद्या आदींवर प्रकाश टाकला आहे.
५) बृहत्संहिता = वराहमीहिर हे थोर शास्त्रज्ञ भारतात (५०५इ.स.) होऊन गेले. त्यांचा १०६ अध्यायांचा बृहत्संहिता हा ग्रंथ विश्वकोशा सारखा असून विख्यात आहे.यात खगोल ,गणित , पर्जन्यमान ,वास्तुशास्त्र ,या शिवाय अत्तर निर्मिती , रत्न -मोती , लग्न-परिवार व परस्पर संबंध आदीं शिवाय वृक्षसंबंधीही माहिती दिलेली आहे. बृहत्संहितेच्या ५५व्या अध्यायातील सहाव्या श्लोकात कलम करण्याचे तंत्र सांगितले आहे.
"अजातशाखान् शिशिरे ,जातशाखान् हिमागमे ।
वर्षागमे च सुस्कंधान् , यथा दिक्स्थान् प्ररोपयेत् ॥"
याचा अर्थ असा की शाखाहीन वृक्षावर शिशिर ऋतुत ,नुकत्याच शाखा तयार झालेल्या झाडावर शीतकाळी तर परिपूर्ण वाढलेल्या शाखांच्या झाडावर पावसाळ्यात कलम करावी.
६) शारंगधर पद्धती = तेराव्या शतकात शारंगधर रचित भल्या मोठ्या ग्रथाचे नाव शारंगधर पद्धती हे आहे. १६३ विभागांमध्ये विभागलेल्या ६३०० श्लोकांचा हा ग्रंथ आयुर्वेद शाखेचा प्रमुख ग्रंथ आहे. यातील एक भाग म्हणजे "उपवनविनोदः" हा होय. या अध्यायात वृक्षचिकित्सा व उपचार हा मुख्य विषय आहे. या अध्यायाच्या १७५व्या श्लोकात असे म्हटले आहे की ,
"नराणामिव वृक्षाणां वातपित्तकफ़ाद्गदाः ।
सम्भवन्ति निरूप्यातः कुर्यात्तद्दोषनाशनम् ॥" मानवांप्रमाणेच झाडांमध्येही वात-पित्त-कफ-दोषांमुळे रोग निर्माण होतात ,हे जाणून उपचार करावेत .
७) मझ्झिम निकाय = पाली त्रिपिटकाचा महत्वाचा भाग म्हणजे मझ्झिमनिकाय. यात अनेक ठिकाणी भगवान बुद्धांनी अौषधी वनस्पतींची उपयोगिता सांगून त्यांचे रक्षण करावे , हे सांगितले आहे.
८)स्फूट ग्रंथ = सुभाषितरत्नभांडागार , पंचतंत्र ,जातककथा , पुराणवाङ्मय ,मनुस्मृती ,अभिजात संस्कृत साहित्य आदी विविध ग्रंथातूनही वृक्षांसंबंधी माहिती मिळते.
वर उल्लेखलेल्या ग्रंथांशिवाय आयुर्वेदाचे अनेक ग्रंथांमध्ये वनस्पतींविषयी भरपूर माहिती आलेली आहे. मानवी आरोग्यासाठी वृक्ष उपयुक्त असल्यामुळे वृक्षांना आयुर्वेदात महत्वाचे स्थान दिले आहे.
या शिवाय
• पाराशर संहिता
• कश्यपीयकृषिसूत्र
• पराशर तंत्र
• कृषितंत्र
आदी अनेक ग्रंथ वृक्ष विषयक माहिती देतात.
"छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे ।
फलान्यपि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषाः इव ॥"
स्वतः उन्हात राहून दुस-यांना सावली व फळे देणारे वृक्ष हे सत्पुरूषच आहेत.
अशा प्रकारे मानवांचे मानवत्व सर्व प्रकारे जोपासणारे वृक्षवनस्पतींचा भारतीय दृष्टिकोणातून अभ्यास करणे गरजेचे आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment