Thursday, August 25, 2022

#सुभाषित-सहजोक्त.

 

संपूर्णकुम्भो न करोति शब्दम् 

अर्धो घटो घोषमुपैति नूनम् ।

विद्वान्कुलिनो न करोति गर्वं

जल्पन्ति मूढास्तु गुणैर्विहिनः ॥

पाण्याने पूर्ण भरलेला घडा , आवाज करत नाही. अर्धवट रिकाम्या घड्यातून आवाज येतो.  विद्वान , कुलीन लोकं कधीच गर्व करीत नाहीत मात्र मूर्ख , गुणहीन लोकं उगाच प्रौढी मिरवतात. 

याच अर्थाची मराठीत नेहमी प्रचलात  असलेली म्हण , "उथळ पाण्याला खळखळाट भारी"  सर्वांच्याच कानावर पडलेली आहे.  त्याच अर्थाची इंग्रजी म्हण  , "empty vessal make much noice." 

याच आशयाचा हिंदी शेर  मध्यंतरी वाचनात आला. 


झूठी शान के परिंदे ही ज्यादा फड़फड़ाते हैं.!! 

बाज़ की उडान में कभी आवाज़ नहीं होती ॥ 

तोच आशय वेगवेगळ्या भाषेत किती वेगवेगळ्या शब्दांतून न्  कल्पनेतून व्यक्त झाला आहे ना ?

संस्कृत श्लोकांतून घट हे उदाहरण दिलंय तर मराठीत नदीचे उथळ पात्र  सांगितले आहे. इंग्रजीत साधारण पात्र सांगितले आहे. हिंदीत मात्र , बहिरी ससाणा व सामान्य पक्षी यांच्या तुलनेतून स्पष्ट केले आहे.

गर्व करणं , माजणं हे कुलीन व्यक्तिमत्त्वाला शोभत नाही.  जे घरंदाज नसतात , त्यांना लवकरच गर्व होतो. 

साधारणपणे  अशा आशयाचे अनेक संस्कृत सुभाषितं आहेत.

आता हेच बघा 


शरदि न वर्षति गर्जति,

वर्षति वर्षासु नि:स्वनो मेघ:।

नीचो वदति न कुरुते, 

न वदति सुजन: करोत्येव॥

शरद ऋतुतील ढगं नुसते गर्जतात पण बरसत नाहीत. वर्षाऋतुतील ढगं बरसतात पण आवाज करत नाहीत. नीच (कमस्सल, निम्न विचारांचे लोक)  नुसते बोलतात ,  वागणुक मात्र नसते.  हेच सज्जन घरंदाज बोलत नाहीत पण कृती मात्र नक्की करतात.  "गर्जेल तो बरसेल काय ?" या मराठी म्हणीची आठवण होते.


अगाधजलसञ्चारी गर्वं नायाति रोहितः।

अङ्गुष्ठोदकमात्रेण शफरी फर्फरायते ॥

अथांग खोल पाण्यात संचारणारा मासा कधीच गर्व करत नाही.  उथळ पाण्यातली शफरी ( मासोळीचा एक प्रकार)  मात्र फर्फर आवाज करते. म्हणजे तिला गर्वाची बाधा होते. 

    अर्धा हळकुंडाने पिवळे होणारे अनेक असतात.  पण जे "लंबे रेस  के घोडे"    असतात ,  त्यांनी समोर समोर उधळणाऱ्या वरातीच्या घोड्यांकडे लक्ष देऊ नये. 

    ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 



Monday, August 22, 2022

#सहजोक्त.

 

आईन्स्टाईनची आई. 

जगद्विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन , सर्वज्ञात आहेतच . त्यांचा सापेक्षता सिद्धांत विज्ञानापासून , सामान्यव्यवहार तसेच आध्यात्म वगैरेतही लागू पडतो.  आधुनिक विज्ञानातील त्यांचे योगदान अद्वितीय आहे. 


भारतात वैज्ञानिक व मूलसंशोधक ,  चिकित्सक अभ्यासक कां तयार होत नाहीत ?  याची अनेक करणं अतिशय परखड तार्किकतेने अनेक जण मांडतांना दिसतात. 

 रूढीवाद ,  गतानुगतिकता ,  अतिश्रद्धा , देवलासीपण  वगैरे वगैरेंवर  (विशेष करून हिंदुंच्या अस्मितेवर ) ठपका ठेवला जातो.   यात अजिबातच तथ्यांशच नाही , असे नाही. पण याच कारणांनी वैज्ञानिक मानसिकता घडत नाही , हे मात्र धादांत खोटे आहे.   गेल्या ७६ वर्षांत आपण वैज्ञानिक मानसिकता निर्माण करू शकलो नाही आणि त्याचे खापर हजारो वर्षांच्या बऱ्या-वाईट सवयींवर फोडणे  , योग्य नाहीच. 


'महान् विभूती जन्माला यावेत पण ते शेजाऱ्याच्या घरी' कारण त्यासंबंधीची तोशीष , कष्ट , हाल-अपेष्टा किंवा अपमान सहण्याची ताकद गमावून बसलो असतो , आपण.  

म्हणून वैज्ञानिक , मूलभूत चिंतक आपल्या देशात कमी प्रमाणात असतात. आहेत त्यांचाही सन्मान रखण्यात आपली दानत कमी पडते. असो.

मध्यंतरी कुठेतरी वाचलेली कथा थोडक्यात अशी - 

ख्यातकीर्त व लब्धप्रसिद्ध झाल्यावर आईंन्स्टाईन आपल्या आईच्या घरी येतो.  त्याची लाडकी आई स्वर्गवासी झालेली असते.  आईचे कपाट आवरताना त्याला त्याची शाळा सोडल्याचा दाखला व हेडमास्तराचे पत्र दिसते. तो पत्र वाचतो व  डोळ्यातून घळघळ पाणी यायला लागते.  त्याला सारं बालपण लख्ख आठवतं.  लहानपणी त्याची शाळा सुटते. आणि आई त्याला घरी शिकवते.  'आई , मी शाळेत कां नाही जायचं ?' हे विचारणाऱ्या बाल-आईन्स्टाईनला आई नेहमी समजावत असते की ,' बेटा , तुझ्या हेडमास्तरांनी सांगितले की तू विशेष बुद्धिमान आहेस आणि सामान्य मुलांसारखे सर्वसामान्य शिक्षण तुला नको द्यायला. म्हणून तुझी विशेष तयारी मीच करून घेते.'  छोटा अल्बर्ट विश्वास ठेवतो व आईच्या मार्गदर्शनात प्रगती करतो. पुढे विख्यात विद्यापीठातून उच्चशिक्षण घेतो...... हातातील चिठ्ठी गळून पडलेली असते. चिठ्ठीत लिहिले असते की , ' इतक्या निर्बुद्ध मुलाला आम्ही शिकवू शकत नाही'. 


जगाला महान् वैज्ञानिक लाभला , तो नक्कीच त्याच्या बुद्धी, चिकाटी , कष्ट व धैर्यामुळे ;  यात शंका नाहीच .  पण विचार करा , हेडमास्टरांच्या शेऱ्याने आई खचून गेली असती किंवा निराशेतून समोर शिकणं बंदच केलं असतं किंवा मुलावर वैतागून त्याला सरळ कामधंद्याला लावलं असतं तर ?   

 शिक्षण, विज्ञान, देवतावाद वगैरे वगैरेंच्या पलीकडे आहे मानवी संवेदना.  संवेदनेतून  समोरच्यामध्ये सर्जकता , अभियोग्यता निर्माण करणे म्हणजे खरी अध्यापन प्रक्रिया आहे. बाकी शाळा, ट्यूशन , पुस्तके,  गॅजेट्स वगैरे  साधनं आहेत.  

   आईन्स्टाईन घडवणारे शिक्षण देण्यापेक्षा  घरोघरी , प्रत्येकाची 'आईन्स्टाईनची आई' ही मानसिकता घडवली तर ?   

   विचार करा व प्रतिक्रिया द्या. 

   ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 


Saturday, August 20, 2022

#सुभाषित-सहजोक्त.


अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च 

अजापुत्रं बलिं दद्यात्  , देवो  दुर्बलघातकः॥ 

एक भक्त होता. 'माझं कामं करून दे , मग तुला हवं ते बळी देईल' असं देवाला कबुल करतो. काम झाल्यावर देवाला विचारतो ,

भक्त =  'तुला बळी कशाचा देऊ? घोडा देऊ कां ?' 

देव =  नको .

भक्त = हत्ती देतो.

देव= नको, नको.

भक्त= मग वाघ  देऊ कां ?

देव =  नको रे बाबा , अजिबात नको.

भक्त = मग काय द्यावं बळी म्हणून ?

देव = शिंगही नसलेलं बकरीचे पिलू दे. 

यावरून सुभाषितकार म्हणतात की देव हा दुर्बलांचा घातक असतो. 

'God helps those who help themselves' अशी इंग्रजी म्हण आहे. 

स्वतःच स्वतःचे रक्षण करणाऱ्याचे रक्षण देव करतो . 'दे गा घरी ,खाटल्यावरी' म्हणणाऱ्याला देव काहीच देत नाही.  

आत्मरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. 'शरीरम् आद्यं खलु धर्मसाधनम् ।'  म्हणजे  'याचि दही याचि डोळा' सर्व प्राप्त करायचे असेल तर  स्वतःवरच निर्भर रहावे. आत्मनिर्भरता फारच महत्त्वाची.     स्वतःचे आत्मरक्षण ,  आत्मसन्मान वगैरे  आपल्यालाच करावे लागते.  देवही ते  करू शकत नाही मग ग्रह-तारे वगैरें फारच दूरचे आहेत.  

मग ? देव आहे की नाही ? जगात चांगुलपणा नाहीच कां ?  कोणावरच विश्वास ठेवू नयेच कां ? असे विचार आणू नये मनात.  

देव आहे  व त्यानेच सर्वोत्तम रचना म्हणून आपल्याला मानवी देह-बुद्धी दिली.  त्या बुद्धीचा वापर करून , शरीराने कष्ट करून  हवं  मिळवायला देवानेच सक्षम बनवले आहे. 

  जगात सर्वत्र चांगुलपणा आहे पण त्यासाठी  आपण फारच चांगले असणं गरजेचे आहे. 'जैसी दृष्टी , वैसी दृष्टी'  हेच खरे. 

  आत्मविश्वास  ठासून भरला असेल तरच दुसऱ्यावर विश्वास ठेवावा पण विसंबून राहू नये , कारण 'जो दुसऱ्यावरी विश्वासला , त्याचा कार्यभाग बुडाला' हे खरेच आहे.

"Survival of the fittest"  हे  जगाचे तत्त्व आहे. याबाबत जग फारच निष्ठुर असते.  म्हणून 

"ख़ुदी को कर बुलंद इतना 

कि हर तक़दीर से पहले 

ख़ुदा बंदे से ख़ुद पूछें 

बता तेरी रज़ा क्या है।" 

जगाच्या या विशाल पसाऱ्यात आपलं अस्तित्व देवाने निर्माण केलं . आता ओळख निर्माण करणे हे आपल्याच हातात आहे.  आपल्या कर्तृत्वाने असे कार्य करायला हवे की देवालाही त्याची दखल घेणं भाग पडेल.  

©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 


 

 


Friday, August 19, 2022

#सुभाषित-सहजोक्त.


ईक्षणं द्विगुणं प्रोक्तं भाषणस्येति वेधसा।

अक्षिणी द्वे मनुष्याणां  जिव्हात्वेकैव निर्मिता॥

दोन-दोनदा नीट बघावे. (परिपूर्ण विचार करून मगच)  बोलावे. यासाठीच ब्रह्मदेवाने मानवाला डोळे दोन दिलेत पण जीभ मात्र एकच दिली. 

सध्याचा जमाना स्मार्ट व फास्ट आहे.  या सुभाषितालाही काळानुरूप स्पष्ट करणं गरजेचं आहे.

कानांनी ऐकणे , डोळ्यांनी पहाणे ,  वाणीने  बोलणे , नाकाने सुंघणे , त्वचेने स्पर्शणे ही सर्व ज्ञानप्राप्तीची साधनं आहेत. यासर्वांच्या यथायोग्य  मदतीने मन+बुद्धी यांच्याद्वारे  अनुभवसंपन्न व्यक्तिमत्व विकसित होते.   

दिसलं काही , वाचलं काही , कोणाचं ऐकलं की चट्दिशी आपली एक्सपर्ट कॉमेंट ठोकणं वा (शब्द वा कृतीतून) भडक प्रतिक्रिया देणे अजिबात योग्य नाही.  पाचही ज्ञानेंद्रियांच्या प्रक्रियेतून बुद्धीने निर्णय घेवून बोलले , वागले  तरच सार्थक होतं . नाही तर , 'बोल बोल नाऱ्या........' अशी अवस्था होते.  


 दोन हात , दोन पाय  ,  उपस्थ (जननेंद्रिय)  , पायु( गुदद्वार)   आणि जीभ   हे  पाच कर्मेंद्रियं आहेत. मुखातील वाणी जशी ज्ञानेंद्रिय आहे तशी मुखातील जीभ कर्मेंद्रिय आहे.

 जीभने चव कळते , उच्चारण नीट होण्यासाठी जीभ हवीच हवी.  तर ही जीभ एकच असून कधी कधी  बत्तीशीला पुरून उरते.  कधी ?  जेव्हा ,"क्रियेविण वाचाळता" घडते तेव्हा. 

 हातांनी सतत कार्यरत रहावे . म्हणजे कार्यकुशलता , कार्यमग्नता अत्यावश्यक आहे. ज्याचे पाय स्थिर  (म्हणजे नुसते बसून रहातात),  त्याचं मन सतत फिरत रहाते (अस्थिर असते) .  म्हणून पायांनी  सतत फिरत रहावे.  मन भिरभिरण्यापेक्षा हात-पाय जास्त क्रियाशील ठेवावे.

असे वागले तर जीभ योग्य प्रमाणातच उचकटेल ; नाही तर ठरलंच आहे ,' उचलली जीभ लावली टाळ्याला'! 


बत्तीशी जबड्यात घालाणे , बत्तीशी दाखवणे  वगैरे लीला जीभेच्या फाजीलतेने घडून निष्क्रिय माणसाची फजिती होऊ शकते. 

म्हणून , दोन-दोनदा पहा , विचार करा , पहिले कृती करा मगच बोला.  "आधी केले , मग सांगितले" , हेच वागणं योग्य.

'बोलून विचारात पडण्यापेक्षा  विचार करून बोलावे' हे सतत ध्यानात ठेवावे. 

 समर्थांनी सांगूनच ठेवलंय , "केल्याने होत आहे रे , आधी केलेची पाहिजे". 

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

Friday, August 5, 2022

#सुभाषित-सहजोक्त.



विद्या ददाति विनयं 

विनयाद् याति पात्रताम् । 

पात्रत्वात् धनमाप्नोति

 धनात् धर्मं ततः सुखम् ॥

 सुभाषिते जितकी वाचत जावीत , तितके त्यांच्या अर्थच्छटा  अधिकाधिक भावतात न्  नकळत मनात घर करतात , पुढे कृतीतही उतरतात . 'जसे मनी तसे वर्तनी'!  म्हणून शालेय क्रमिक पुस्तकांत संस्कृत सुभाषितांचे संग्रह दिले आहेत.

 आता हेच सुभाषित बघू या. 

 शालेय स्तरावर या सुभाषिताचा अर्थ अतिशय सोपा वाटतो. 

 विद्येने विनम्रता मिळते , विनम्रतेने पात्रता लाभते . पात्रतेमुळे धनलाभ होतो. धनलाभामुळे धर्मलाभ व त्यातूनच सुख लाभते.   

   विद्या म्हणजे नुसत्या पदव्या हा अर्थ अपेक्षित नाही. बुद्धिमत्ता वाढविणारे शिक्षण घेणे म्हणजे विद्याभ्यास होय. आज मानसशास्त्राचा भरपूर विकास झाला आहे. आजकाल मानवी बुद्धिमत्ता फक्त  बुद्ध्यांकाने(IQ)  ठरत नाही.  (EQ ) भावनांक , ( SQ ) सामाजिक-संवेदनशीलत्व (AQ ) आपत्ति-समायोजकत्व उत्तरोत्तर महत्त्वाचे असतात. 'मेरीटवीर' म्हणजे उच्च बुद्ध्यांक असलेली मंडळी बरेचदा उत्तम (एंप्लॉई) नोकरदार  होतात . तर EQ, SQ , AQ   उत्तम असलेली मंडळी  उद्योजक , लोकनायक वगैरे होतात.  

   जी ह्यासर्व स्तारांतील बुद्धिमत्ता वाढवते तीच खरी विद्या. अशी विद्या प्राप्त केलेली व्यक्ती नेहमीच विनयी असते.  व्यक्ती विनयी म्हणजे 'फक्त अंगी नम्रता असलेला' , इतका संकुचित अर्थ नाही.  

   यथा “ जितेन्द्रियत्वं विनयस्य कारणं गुणप्रकर्षो विनयादवाप्यते । गुणप्रकर्षेण जनोऽनुरज्यते जनानुरागप्रभवा हि सम्पदः ॥ “ इत्युद्भटः ॥अथ विनयप्रशंसा । “  विद्येमुळे विनम्रता अंगी बाणली की मन-भावना-शरीरावर नियंत्रण करता येते. मन व भावनांवर ताबा मिळाला की सुप्त गुण वाढतात.  गुणांमुळे लोक आकर्षित होतात. लोक प्रभावित झाले की संपत्ती सहज मिळते.  

 अशी विनयशील व्यक्ती "पात्र" ठरते. पात्रतेमुळेच धनलाभ होतो. समाजधारणेसाठी धर्म असतो. धन मिळाले की समाजाच्या भल्यासाठी उपयोगी होते. फक्त स्वतःपुरता किंवा स्वतःच्याच कुटुंबा पुरता  जगणाऱ्याला कधीच आंतरिक समाधान-सौख्य लाभत नाही.  म्हणून कमावलेल्या संपत्तीचा मोठा हिस्सा  परोपकारासाठी खर्चावा. त्यातच खरे सुख असते.  

 हा श्लोक व त्याचा अर्थ समजून-उमजून यथाशक्ती कृतीत आणला तर 'उद्धरेदात्मना आत्मा' नक्कीच साधेल. 

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

Wednesday, August 3, 2022

#सुभाषित-सहजोक्त .


यद्यपि खदिरारण्ये 

गुप्तो वस्ते हि चम्पको वृक्षः ।

तदपि च परिमलमतुलं

दिशि दिशि कथयेत् समीरणस्तस्य ॥

 सुभाषिते ही संस्कृतभाषेने दिलेली अनमोल संपत्ती आहे. मानवी व्यक्तिमत्त्वाला निव्वळ परिपूर्त करते असे नाही तर समृद्धही करते.  जीवनाला आवश्यक परंतु नगण्य अशा अनेक छोट्या छोट्या पैलुंवर अत्यल्प शब्दांतून मार्मिक भाष्य करण्याचे कसब सुभाषितात असते.  या मार्मिक भाष्यातून आपलं जीवन समृद्ध करावं की वाचून सोडून द्यावं , हे पात्रावर अवलंबून आहे.

 आता वरचेच सुभाषित बघा ना !

 खैराच्या (ज्याच्यापासून काथ/कात बनवतात ते झाड) जंगलात चाफ़्याचे झाड लपून जरी बसले तरी त्याच्या फुलांचा अतुलनीय  सुगंध , वारा दिशा दिशांना सांगत सुटतो. 

 चाफ्याच्या झाडाला फुले येई पर्यंतच ते झाड गुप्त राहू शकते. कारण त्याच्या  पाने-शाखा वगैरेंना सुवास नाही. पण फुले बहरली की त्याचा वनवास , अज्ञातवास संपतोच संपतो. मग त्याला लोकमान्याता , लोकप्रियता मिळते . चाफ्याला फूलं तर येणारच ना !   मग 'तावत्काल प्रतीक्षस्व'। 

  फुलं येण्या इतपत पोषण स्वतःचे स्वतः मिळवावेच लागते , फुले येण्या इतकी प्रौढता लाभावी लागते  आणि हे सर्व होण्यासाठी  बरेच वर्ष  धीर-शांततेने काळ जाऊ द्यावाच लागतो. 

 संत कबीराचा दोहा आहे -

 धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय, माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय।

 शंभर  घागरी पाणी टाका , खत टाका , वज करा पण झाडाला फळ त्याचा ऋतु आल्यावरच येईल.  त्यामुळे शांत समाधानाने वाट बघत स्वतःला कणाकणाने समृद्ध करत राहणे , योग्य ठरते.     

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 

Monday, August 1, 2022

सहजोक्त.

 श्रावण महिना सुरु झाला.  'यंदा शंकराची स्तोत्र वाचावी' , असे मनात आले.  घरी संग्रहात असलेल्या स्तोत्ररत्नावलीत  आदि शंकराचार्य विरचित अकरा स्तोत्र आहेत.  

शंकराचार्यांच्या  सर्वच  रचना अत्यंत प्रासादिक आहेत.  या श्रावणात मूळ संस्कृत-स्तोत्र , अर्थ   व जिथे योग्य वाटेल   तिथे   टिपण्णीसह लिहाव्या , असे मनात आले. त्यानुसार आज पहिले स्तोत्र , " शिवमानसपूजा"  याबद्दल लिहीत आहे. 

  लहानपणीच ऐकून ऐकून  हे स्तोत्र पाठ केले आहे , पुढे अर्थ कळल्यावर तर अत्यंत आवडीच्या पैकी एक आहे. 

  " मानसपूजा"  हा प्रकारच  रमणीय आहे. एका स्थानी बसून मनापासून मनातल्या मनात  षोडशोपचारी पूजा करणं , ही कल्पनाही किती रंजक आहे ना !  देवतेशी मानसिक-सायुज्यता मिळाल्याशिवाय  अशी रचना शक्यच नाही.  म्हणूनच ही रचना पूर्णपणे समजून उमजून म्हणायला हवी.   तादात्म्य ठेवून जर ही मानसपूजा केली तर खरी-खुरी पूजा केल्याचे समाधान व इप्सित फळ नक्कीच मिळते.

 

शिवस्तोत्राणि  – शिवमानसपूजा


रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरं 

  नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनम् । 

  जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा 

  दीपं देव दयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम् ॥ १॥

  शिवशंभूची मानस पूजा करताना शंकराचार्य  म्हणतात -

  रत्नजडित  आसन , हिमजलाने स्नान , नेसायला विविध- रत्नांनी  विभूषित दिव्य वस्त्र ,   कस्तुरीच्या सुगंधाने युक्त चंदन लेपन ,   जातिपुष्प (जाई-जुईची फुले) , चाफा , बेलाची पाने  यांच्या सह विविध फुलांच्या रचना   तसेच धूप व दीप वगैरे सर्वच गोष्टी , हृदयातून कल्पिल्या आहेत .   हे देवा , हे  दयानिधे , हे पशुपते ,    तू या सर्वांचा स्वीकार कर.  


सौवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकम् |

 शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं

 ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु ।। २ ।

नवरत्न-खचित सुवर्णपात्रात तूप , खीर  ,  दूध-दही युक्त पाच प्रकारचे खाद्य  , केळी (रम्भाफल) , सरबत (पानक)  , (वाळा वगैरे सारख्या)  शाकयुक्त  तसेच  कापूर व खडीसाखर घातलेले रुचिकर पाणी , तांबूल  वगैरे सर्वच मी माझ्या मनातून रचले व अर्पण केले आहे . हे प्रभो , कृपया स्वीकार कर.. 


छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा । साष्टाङ्ग प्रणतिः स्तुतिर्बहुविधा ह्येतत्समस्तं मया सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो ॥ ३ ॥ 

छत्र ,   दोन चामर (चँवर)  , छोटा पंखा ,  स्वच्छ आरसा ,  वीणा-भेरी-मृदंगादींचा  गोंगाट   , शिवाय गीत आणि नृत्य तसेच साष्टाङ्ग नमस्कार , विविध प्रकारे स्तुती  आदी सर्व मी  संकल्पपूर्वक समर्पत करत आहे.   हे सर्वव्यापी  प्रभो  शंभो , तू  ह्या सर्वांचा स्वीकार कर.


आत्मा त्वं गिरिजा मतिः सहचराः प्राणाः शरीरं गृहं ।

पूजा  ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः । 

सञ्चारः पदयोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरो।

 यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम् ॥ ४ ॥

हे शंकरा ,  माझा आत्मा म्हणजेच तू. माझी बुद्धी म्हणजेच पार्वती , माझे पंचप्राण म्हणजेच तुझे सहचरगण होय. माझं शरीर म्हणजेच तुझे घर होय.  विषयभोगांच्या रचना,  केवळ तुझी पूजा होय.  माझी झोप म्हणजे समाधीस्थिती होय.  मी पायांनी जोही संचार करतो , तो सर्वच तुझी प्रदक्षिणा होय. माझ्या  वाणीतून स्फूट होणारं सारं सारं , तुझेच स्तोत्र होय. मी जी जी  कर्मे करतो , ती सगळी तुझीच आराधना आहे. 


करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधम् ।विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व

जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो ||५|

 हात-पायांद्वारे , शरीराद्वारे ,  कर्मांद्वारे , श्रवण-नयनाद्वारे वा मानसाद्वारे घडलेले विहीत असो किंवा अविहित , सर्वच प्रकारच्या अपराधांना तू क्षमा कर. करुणेच्या सागरा , हे महादेवा  , हे शंभो , तुझा जय जयकार असो.

॥इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचिता शिवमानसपूजा समाप्ता॥

   पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये यांच्यामध्ये मन हे उभयात्मक मानले गेलेले अकरावे इंद्रिय असते.  मनाच्या आदेशानुसार ही पाच कर्मेंद्रिये आपले काम पार पाडीत असतात. "मानसपूजेचा" मुख्य आधार मनच आहे.  मनाच्या संकल्पाने जे जे केले जाते ते सर्व फलद्रूप  होतेच  . म्हणून  मानसपूजा करणे हे सध्याच्या वेगवान युगात फारच सुलभ व समाधानदायक आहे. 

  ©डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे.