विपदि धैर्यमथाभ्युदये क्षमा
सदसि वाक्पटुता युधि विक्रमः ।
यशसि चाभिरुचिर्व्यसनं श्रुतौ
प्रकृतिसिद्धमिदं हि महात्मनाम् ॥
महात्मा कोणाला म्हणावं ? महात्मा नेमका कसा असावा ? यावर चर्चासत्र घडू शकतील आजकाल.
संस्कृत सुभाषिते म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्लीच असतात. मानवी बुद्धी , वर्तन व भावना यांचे व्यक्तिसापेक्षता बघून त्या त्या स्तरावर उन्नयन करण्याची विलक्षण क्षमता सुभाषितांमध्ये आहे.
आता वरचाच श्लोक बघा ना !
"महात्मा" होण्याची नैसर्गिक , स्वाभाविक लक्षणे या श्लोकात सांगितली आहेत.
संकटात धैर्य (धीर धरण्याची क्षमता)
भरभराटीच्या काळात क्षमाशीलता ,
सभेमध्ये वाक्पटुत्व ,
युद्धप्रसंगी पराक्रम गाजवणे ,
यश मिळाल्यावर अभिरूचीसंपन्नता , ज्ञानसंपदानाचेच व्यसन अथवा छंद
हे गुण ज्याच्यात उपजत वा सहज अंगीकृत आहेत , तोच महात्मा.
संकट म्हणजे अस्मानी-सुलतानीच नाही
तर व्यक्तिगत-कौटुंबिक-सामाजिक किंवा
आर्थिक-शारीरिक-मानसिक वगैरे कोणतेही कां असेना ? 'धीर सोडू नये', कळत असून वळत नाही ; असे सामान्य लोकं. तर अशाही परिस्थितीत स्वतःला शांत ठेवू शकणारे दृढसंकल्पित लोकं , नक्कीच महान असतात.
(डाऊन फॉल) अडचणीच्या काळात निरुपायाने समायोजन करणारे अनेक सामान्यजन असतात. पण परिस्थिती अनुकूल असून , सत्ता हाती असल्यावरही दुसऱ्यांविषयी क्षमाशीलता , थोरपणाचेच लक्षण आहे.
चारचौघांमध्ये वा जाहीर कार्यक्रमात , आपले मत वा भूमिका संयत शब्दांतून ठामपणे मांडण्यात थोरवी आहे.
युद्धासाठी शत्रुदेशच हवा असे नाही. सामान्यांच्या संसारात युद्धप्रसंग नेहमीच येतात. आपल्या मानसिकतेच्या बाहेरची कोणतीही विचारधारा , आपल्याला युद्धप्रवण करते. वेगळ्या विचारधारेचा आपण (अज्ञान-अहंकार) नेहमीच विरोध करतो. मानसिक-कायिक-वाचिक विरोध कायमच सुरु असतो आपला मनातल्या मनात. या मानसिक-युद्धात सर्वात जास्त खच्चीकरण होते ते आपल्याच स्वास्थ्य व सर्जनशीलतेचे! हेच जिंकणे इथे विक्रम या शब्दांतून अभिप्रेत आहे.
यशस्वी (सक्सेसफुल) व्यक्ती सदभिरुचिपूर्ण असाव्यात. "पद राजाचे न् डोहाळे भिकेचे" असं व्हायला नको.
ज्ञानार्जनाचे व्यसनच हवे. कोणत्याही वयात औपचारिक वा अनौपचारिक शिक्षण , हे वृत्तीतच असायला हवे.
वर सविस्तर सांगितलेले गुण ज्याच्यात आहेत (उपजत अथवा अर्जित, संपादित) तोच खरा महात्मा.
आता हे डोक्यात ठेऊन किती महात्मे वा किती टक्के महात्मपणा ,आपल्या आजूबाजूला शोधा बरं दिसते ? आले कां कोणी डोक्यात /डोळ्यासमोर ? शोधा शोधा ....
आता जरा स्वतःला शोधा . यातले किती गुण आपल्यात आहेत ? किती सहजसाध्य आहेत न् किती कष्टसाध्य आहेत ? याचा प्रामाणिक विचार करा.
महात्मा होणं आता आपल्याच हातात आहे , नाही कां ?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment