Tuesday, December 24, 2024

#सहजोक्त ~शब्दचिंतन.

 

काशी -वाराणसी -बनारस.

नावात काय नाही? नावातच सर्व आहे.  किंवा 'ते सर्व'  त्यात आहे , म्हणून 'ते' त्याचे नाव आहे, नाही कां?

काशी ऊर्फ वाराणसी  ऊर्फ बनारस असे तीन नावं असलेले भारतातील धार्मिकदृष्ट्या अत्यन्त महत्वाचे एक शहर आहे. 

वर ऊर्फ लिहिले म्हणजे ही तीन नावे  पर्यायवाची आहेत काय? अजिबात नाही. कसे 👇👇 वाचा.


#काशी =>>  या शब्दाची संस्कृत व्युत्पत्ती 👇अशी 

[काशते शिवत्रिशूलोपरि ।  

काशृङ्   दीप्तौ + अच् गौरादित्वात् ङीष् ।  काश +   इन् ङीप् वा ।  

अथवा 

काशयति प्रकाशयतीदं   सर्व्वं या । 

 काश् + णिच् अच् गौरादित्वात्   ङीष् ।  स्वनामख्याततीर्थम् । ]

प्रलयकाळी  साक्षात शंकर, आपल्या आवडत्या काशीनगरीला त्रिशूलावर उचलून घेतात. पृथ्वीवरील सर्वात चकाकदार नगरी म्हणून "काशी" तीर्थनगरी होय.

अयोध्या, मथुरा, माया, काशी,  कांची,  अवंतिका।

पूरिवती, चैव सप्तैताः मोक्षदायिकाः ॥ 

पुराणकाळापासून या सात नगरी प्रख्यात आहेत. यात काशीचेही नावं आहे.

काशी ही सनातन (सर्वात प्राचीन ) नगरी आहे. प्रलयकाळात सर्व जग लयाला जाते आणि त्या नंतर नवीन सृष्टी तयार होते. फक्त काशी हीच अशी शंकराची लडकी नगरी आहे, जिचा लयच होत नाही कारण शंकर तिला उचलून घेतात.


#वाराणसी =  काशी नगरीला वाराणसी हे नावं तिच्या भौगोलिक वैशिष्ट्यामुळे पडले आहे.

"वरुणा" नावाची गंगेची उपनदी  प्रयागराज जिल्ह्याच्या 'फूलपुर' गावातून उगम पावते. जवळ पास 100 किलोमीटर प्रवास करून साराय मोहना भागाजवळ 'आदिकेशव' घाटाजवळ ती गंगेला मिळते.

"असी" नदी वाराणसीच्या कंदवा भागातून निघून चितईपुर, करौंदी, करमाजीतपुर, नेवादा, सराय नंदन, नरिया, साकेत नगर नगवा या भागातून जवळ जवळ आठ किलोमीटर प्रवास करून अस्सी घाटावर गंगेत मिळते. 

तर अशा रितीने, वरुणा आणि अस्सी या दोन नद्यांच्या मधील भूभाग म्हणजे "वाराणसी", हे नाव प्रसिद्ध झाले.


#बनारस =>>   साहित्यशास्त्रात नऊ रस प्रसिद्ध आहेत.

श्रृंगार-वीर-करुणाद्भुत-हास्‍य-भयानका: । 

बीभत्‍सरौद्रौ शान्‍तश्‍च रसा: नव प्रकीर्तिता: ।। 

साहित्यशास्त्रात  शृंगार , वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बिभत्स, रौद्र, शांत 

 हे नऊ रस आहेत.

अन्नपदार्थात सहा रस  प्रसिद्ध आहे. 

षड्रसा: पुरुषेणेह भोक्तव्या: बलमिच्छता |

अम्लस्तिक्त: कषायश्च मधुरो लवणः कटुः ||

अम्ल =आंबट,  तिक्त = कडू, कषाय =तुरट, मधुर =गोड, कटु =तिखट असे सहा रस जेवणात नेहमीच असायला हवा, ज्यामुळे समतोल आहार मिळेल. 

तर असे सर्व क्षेत्रातील  बना-बनाया  'रस' आस्वादण्यास सहज उपलब्ध आहे आणि येथील (प्राचीन काळातील ) जनसामान्य त्यात कुशल होते ; म्हणून "बनारस" हें  या शहराचे सार्थ नाव आहे. 

[अतिप्राचीन काळी]या शहरातील सर्वच लोकं रस उपभोगण्यास सक्षम  होते म्हणून ते 'रसिया' म्हणजे रसिक आहे. 

तर अशा रितीने  काशी हें नाव, शहराचे अध्यात्मिक+धार्मिक महत्त्व दर्शविते.

वाराणसी हें नाव, शहराची (तत्कालीन ) भौगोलिक व्याप्ती दर्शविते.

तर 14 विद्या आणि चौसष्ट कला यांचे माहेरघर असलेल्या या शहरातील लोकांची वृती/स्वभाव सांगणारे नाव म्हणजे बनारस.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर.




Saturday, September 7, 2024

#सहजोक्त.

 करंजी-मोदक.

'अन्न हे पूर्णब्रम्ह', मानणारी आपली संस्कृती. आपले सर्वच सणवार, हे खऱ्या अर्थाने उत्सव असतात. बाह्य आणि आंतरिक आनंद ओसंडून वहावा, याची पूर्ण सोय आपल्या प्रत्येक उत्सवात दिसते. तसंच व्यक्तिगत उपासनेपासून ते सामाजिक उपासनेतून सकारात्मकता जपण्याचे कसबही जपताना दिसतात आपले सण.

आज गणेश स्थापना. गणपतीबाप्पासाठी 21 मोदक तळत होती. सासूबाईंचे वाक्य आठवले.

'बहिणी शिवाय भाऊ असू नये. मोदकासोबत एक तरी करंजी करावीच करावी.' मग केली करंजी! 

 देवीच्या नवरात्रात नुसत्या सोळा करंज्या करून भागात नाही. एक तरी मोदक तळावा,  म्हणतात. बहिणाला भाऊ हवाच.

करंजी म्हणजे बहिणीचे प्रतीक आणि मोदक म्हणजे भावाचे प्रतीक.

आपली संस्कृती कन्या-पुत्र दोहोंचाही सन्मान करणारी होती प्राचीन काळापासून. म्हणूनच तर अशा रूढी वर्षानुवर्षे घराघरातून पाळल्या जात असत ना? आपली संस्कृती प्रत्यक्ष शास्त्रापदेश देते पण प्रतीकातून, वर्तन सुधारण्यासाठी प्रेरणा देते. समजून उमजून सुयोग्य वर्तनाची संधी देते. 


पूर्वी "अष्ट पुत्रा सौभाग्यवती हो", म्हणत असताना त्या आठ अपत्यात कन्या गृहीत होतीच होती.  "ज्येष्ठा गौर"  मिरवत आणण्यासाठी घरची कन्या हवीच हवी. भाच्याची जावळे आत्याच्याच मांडीवर काढायचा दंडक होता.

बाळाचे नाव आत्याच कानात सांगेल. तसेच उपवर वधू वा वराच्या मागे मामानीच उभे राहायचे असते. मुंजीबंधन वेळी बटूच्या मागे मामाच उभा राहतो. अन्नप्राशन मामाच्याच मांडीवर आणि हातून करायचे. लग्नातील वधूची पिवळी अष्टपुतळी साडी मामानीच नेसवायची. तर तिसरे वर्ष लागले की आत्याने भाचीला रेशमी हिरवा परकरपोलका शिवायचा, तसेच हिरवी गरसळी (माळ) घालायची. रूढ धार्मिक प्रसंगात भाऊबहिणी महत्वाचे आहेतच. याचाच अर्थ प्रत्येक घरी भावाला बहीण आणि बहिणीला भाऊ हवाच हवा.

दाक्षिणात्य काही जातीत, मुलगी नसलेल्या घरी मुली देऊ नये, असा दंडक होता.


मूळ रूढी-परंपरा काळानुसार बदलविल्या गेल्या. संयुक्त कुटुंब विलग झाले. कुटुंब लहान होता होता, (अपत्यांची संख्या ) आठाचे चार, चाराचे तीन तीनाचे दोन, दोनाचे एक आणि आता तर एकही नको  असे झालेय. 

बरे इतकी कुटुंब छोटी छोटी होऊनही देशाची लोकसंख्या बेसुमार वाढलीय!!  त्यामुळे छोट्या कुटुंबाची 'सुरक्षितता' (विशेषतः सामाजिक /मानसिक /भावनिक) दावणीवर लागली आहे. 


कुटुंबं व्यवस्थेच्या मुळातील हेतू, कारणे काळाच्या ओघात धूसर झाली. 

सोईनुसार अर्थ लावणे आणि हवे ते बदल करणे सुरु झाले. शिवाय 'जुने ते सर्व कर्मकांड आणि वाईटच', असे मत सुशिक्षित लोकांना पटू लागले. 

जसे, वरदक्षिणा ही रूढी काळाच्या ओघात हुंडा म्हणून विकृत केल्या गेली, तर हक्काची "साडीचोळी" ही रूढी नष्टच केल्या गेली.


जुने ते सगळे छानच होते कां? सांगता येत नाही. कारण तत्कालीन समाजाला योग्य अशा त्या रूढीपरंपरा होत्या.  पण सगळ्याच पूर्णपणे वाईट निश्चित नव्हत्या, हे मात्र 100% खरे. 


गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून बऱ्याच घरात एकच अपत्य आहे. त्यामुळे आत्या, मामा, काका, मावशी वगैरे नाते नव्या पिढीच्या प्रत्यक्ष अनुभवात नाही. चुलत-चुलत, मावशीच्या नणंदेच्या पुतण्या, आत्याच्या जावेची मुले, आत्तेसासू, मामेसासू, साटेलोटे वगैरे तर फारच गोंधळायला होते. नात्याची ही बहुपदरी वीण, मानलेल्या नात्यातून काही अंशी समजते. पण त्या नात्यात तितके नैसर्गिक वात्सल्य असेलच असे नाही. म्हणून तर "गुड टच, बॅड टच" शिकवावे लागते, लहानमुलांना.


 भावंडातील परस्पर अनुबंध -पुस्तके वाचून- समजत नाही. "शेअरिंग इज केअरिंग" हे कृत्रिमरित्या शिकवावे लागते. आपोआप रुजत नाही. एकाच शाळेत शिकणारी भावंडे, परस्परांची काळजी घेत असत , जडणघडण आपोआप होत असे. धोके, खाचखळगे आपोआप लहानांना मोठ्यांकडून कळत असत. संगोपन, सहवेदना वगैरे घरूनच अंगवळणी पडत. सहजीवनाचे शिक्षण घरातून आणि शाळेतूनही मिळत होते.


"करंजी-मोदक" ही नुसती खाद्य संस्कृती नव्हे तर कुटुंब व्यवस्था जपणारी सामाजिक संस्कृतीही आहे. नेमकी मधल्या पिढीने क्षणिक सुखासाठी वा अज्ञानातून सामाजिक वीण उसावली. 

परिणाम आता समाजात दिसतोय, होय ना?

"करंजी-मोदक" संस्कृती पुन्हा प्रतिष्ठित होऊ दे, हीच गणपतीबाप्पाच्या चरणी प्रार्थना.

बुद्धी दे गणनायका 🙏🙏🙏

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर.




Wednesday, July 3, 2024

 #सहजोक्त.

जनापवादमात्रेण,

न जुगुप्सेत चात्मनि।

जानीयात्स्वयमात्मानं,

यतो लोको निरङ्कुशः।।


मराठी अर्थ = लोकनिंदा होईल या भीतीने स्वतःला लपवू नका, झाकोळून घेऊ नका. आपणच आपले गुण-बलस्थाने तसेच न्यून जाणून असतो. लोकांचे बोलणे, निरंकुश असते.

भावार्थ: 

लोक निंदा से स्वयं को निंदनीय न समझें। वस्तुतः प्रत्येक व्यक्ति अपने दोष-गुणों का यथार्थ मूल्यांकन स्वयं ही कर सकता है। क्योंकि इसका संबंध जीवन की अंतरंगता से है। समाज बहिरंग वृत्ति से राग द्वेष तथा लाभ हानि के आधार पर मूल्यांकन करता है। यह मूल्यांकन अविचारित निरङ्कुश होता है।


 हा अनुभव  बरेचदा येतो, होय ना? 

कोणी सर्जनशील, सुज्ञ, समंजस, सुशील, हितचिंतक, समाजमान्य असतो.  तरीही कुठल्याश्या खुसपट बाबी शोधून किंवा नसलेला भूतकाळ उखरून गावभर नलस्ती करणारे, छिद्रांवेषी असे अनेक लोकं भोवताली असतात. शिवाय हलक्या कानाचेही अनेक असतात, जे अशा लोकांचे ऐकतात. हीनमनोवृत्तीची ही जमात! 'चुगल्या करणं' हेच त्यांचे सामूहिक मनोरंजनाचे साधन असते . 

बोलणाऱ्याचे तोंड धरता येत नाही, की ऐकणाऱ्याचे कान झाकता येत नाहीत.

 समोरच्याचा आत्मविश्वास कमी करण्यासाठीची ही त्यांची खेळी असते.

अशा परिस्थितीत स्वतःच्या सद्कर्मावर विश्वास ठेवावा. आपल्या चांगल्या वर्तनात किंचितही बदल करू नये. काही दिवसांनी हे निंदक उघडे पडतात. हे त्रिवार सत्य आहे.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, May 10, 2024

#सहजोक्त.

 


#तुकोबा नावाचे जीवनविद्यापीठ.


संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, माझे आवडते संत. कारण त्यांचे अभंग  साहित्य अभ्यासक व्यक्तींसाठी  मौलिक अध्यासन आहे.

आजकाल अलक, सिक्स वर्ड स्टोरी वगैरे साहित्य प्रकार प्रचलित आहेत.

पण तुकोबांनी त्या काळात अत्यन्त अल्प शब्दात, तेही चार ओळीच्या काव्यातून कित्येक कथा  आपल्या गाथेतून सांगितल्या आहेत.

आता हाच श्लोक बघा ना!👇👇



माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥१॥

काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥

शुकें नळिकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥२॥

तुका म्हणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव कांहीं तेथें ॥३॥



माकड मदाऱ्याच्या फशी कां पडतो? तर मोहामुळे.  नेमके निसटण्याच्या वेळी फुटाण्यात मन गुंतले आणि कायमचा जेरबंद झाला. माकडावर अन्याय आहे कां, शिकाऱ्याने केलेला?  नाही !

"जीव: जीवस्य जीवनम् |"

माकडाच्या जवळ क्षमता होती, तरी हा मोहाचा बळी ठरला! शिकाऱ्याचे जीवन शिकारीवरच असणार, हो की नाही?

तीच गत फिरत्या नळीवर लटकणाऱ्या पोपटाची आहेत. स्वतःच्या पंखाचे बळ विसरून नळीच्या फिरण्याने घाबरून अजून अजून गुलामगिरीत अडकण्याचं खापर शिकाऱ्यावर फोडणे चूकच, नाही कां?



 'यह मजबूर है, किंतु आप नही', अशा आशयाची  पुढील पंक्ती आहे.......


'तुका म्हणे एक ऐसे पशुजीव ।

न चले उपाव कांहीं तेथें ॥३॥'


मानव हा विचारी, विवेकी असतो, असंच तुकोबांना वाटत असावे.


पोपट आणि माकडाची कथा भरमसाठ शब्दात सांगता येते, सांगितलीही जाते.

पण इथे या अभंगात चार ओळीत, सोप्या शब्दात सांगितली आहेत.

शिवाय तात्पर्य काढायची मुभा वाचकाच्या सदसदविवेकबुद्धीवर सोपवली आहेत.  जीवनाच्या ज्या ज्या म्हणून क्षेत्रात असाल तेथे तेथे, हा अभंग, दृष्टांतासारखा योजून द्राष्टांतिक समजून घेता येईल.

आणि जीवनमान सुधरवता येईल.

म्हणून तर संत तुकाराम महाराज, "जगद्गुरु"  आहेत.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, April 13, 2024

#सहजोक्त -

 चाफेकळी 

परवा सकाळी फिरताना वादळाने पडलेली चाफ्याची फांदी दिसली. कळ्यांनी लगडलेली  ती  फांदी मी घेऊन आली. घरी आल्यावर ओल्या मातीत खोचून टाकली. आज फुरसतीत फांदी बघितली. थोडी सुकली, थकली वाटली.

कळ्यांनी पण माना टाकल्या जराशा. एक कळी मातीत पडली. मी उचलली आणि बघू लागली. अर्थात फोटो काढलाच.

चाफ्याची कळी म्हणजे चाफेकळी. लाल आणि मोठ्या पाकळ्याच्या चाफ्याची नाजूक आणि सुंदर अशी चाफेकळी बघून मन प्रसन्न झाले.


चाफ्याच्या झाडाच्या निमित्त्याने मन आठवणीच्या हिंदोळ्यावर झूलू लागले.


आमच्या घरी (माहेरी ) पिवळसर पांढरा आणि गुलाबीसर लाल असे दोन चाफ्याची झाडे होती. निष्पर्ण झाल्यावर फुलांनी बहरायचा. फुलांचा सडा पडायचा. त्याच्या काळ्या जरा छोट्या आणि जाड होत्या. शेजारच्या घरी मोठ्या पण पातळ पांढऱ्या पाकळ्यांचा चाफा होता. कॉलनीत एके ठिकाणी गडद लाल चाफाही होता.  तेव्हा चाफेकळीकडे निरखून पाहावे, असे सुचलेक नाही. फक्त फुलं गोळा करायची, हार ओवायचे, इतकेच. फारतर झाडावर चढायचे. पण झाडावर चढले की आजी ओरडायची की, "ते झाड कच्चे असते, पडशील, उतर" वगैरे.

आज कळीचे निवांत निरीक्षण करताना 

बालवाडीत शिकवलेली कविता आठवली. ती अशी...


अरंगळी,करंगळी,

मधले बोट, चाफेकळी,

अंगठा, तळहात,

मळहात, मनगट, 

कोपरा, खांदा,

गळागुटी, हनुवटी,

तोंडाचं बोळकं, 

शेम्बडाचं नळकं,

काजळाच्या डब्ब्या,

देवाचा पाट,

देवाच्या पाटावर चिमण्यांचा किलकिलाट.

बालवाडीत ही कविता साभिनय म्हणत असू.


पुढे -मराठी साहित्य, कविता वाचताना-  चाफ्याचे झाड आणि फुलांचा वेगवेगळ्या संदर्भात उल्लेख आलेला, पहिला.

शृंगारिक काव्यात नायिकेच्या नाकाला चाफेकळीची उपमा देतात.  तर कधी नवतारुण्यवती नायिकेलाच चाफेकळी म्हटले आहे.

आज सर्वांगसुंदर चाफ्याची कळी पाहिल्यावर या उपमांची सार्थकता पटली.




बालकवी यांची, " तूं तर चाफेकळी!" अपूर्ण कविता बघा ना!


"गर्द सभोंतीं रान साजणी

 तूं तर चाफेकळी!

काय हरवलें सांग शोधिसी 

या यमुनेच्या जळीं?"


ती वनमाला म्हणे "नृपाळा, हें तर माझे घर;

पाहत बसतें मी तर येथें जललहरी सुंदर,

हरिणी माझी, तिला आवडे फारच माझा गळा;

मैना माझी गोड बोलते, तिजला माझा लळा.

घेउनि हातीं गोड तिला त्या कुरणावरतीं फिरे--

भाऊ माझा, मंजुळवाणें गाणें न कधीं विरें""

रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतिल रमणी! तुला;

तूं वनराणी, दिसे न भुवनीं तुझिया रूपा तुला.

तव अधरावर मंजुळ गाणीं ठसलीं कसलीं तरी;

तव नयनीं या प्रेमदेवता धार विखारी भरी!क्रीडांगण जणुं चंचल सुंदर भाल तुझें हें गडे,

भुरु भुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळे उडे.

अर्धस्मित तव मंद मोहने, पसरे गालावरी;

भुललें तुजला हृदय साजणी, ये चल माझ्या घरीं.

"सांज सकाळीं हिमवंतीचे सुंदर मोतीं धडें;

हात लावितां परि नरनाथा तें तर खालीं पडे.

ती वनबाला म्हणे नृपाळा "सुंदर मी हो खरी, --.........




आरती प्रभू यांच्या कवितेतही "चाफेकळी"चा उल्लेख आहे.


तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी, 

तू बहरांच्या बाहूंची…

ऐल राधा, तू पैल संध्या, 

चाफेकळी प्रेमाची….

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी, 

तू बहरांच्या बाहूंची….

तू नवी जुनी, तू कधी कुणी,

 खारीच्या ग डोळ्यांची….        

 तू हिरवी कच्ची, तू पोक्त सच्ची, 

तू खट्टीमिठ्ठी ओठांची….

 एकूण काय तर नवमल्लिका, कमलनयना, वगैरे वगैरे फुलांच्या उपमा जशा विख्यात आहेत, तसे चाफेकळी सुद्धा जराशी ख्यातकीर्त 

आहे, असे म्हणायला वाव आहे.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.



Monday, January 8, 2024

#सहजोक्त.




अहिंसा १.० आणि २.०


अहिंसा ही फार मोठी शक्ती आहे.  शक्तिमान, बलवान माणूसच खरा अहिंसेचा  पुजारी असतो. आपण बलाढ्य असलो की आपल्या कोणीही वाटेला जात नाही. अर्थात अहिंसा प्रस्थापित होते. पूर्वापार आपला देश असाच सर्वश्रेष्ठ अहिंसक होता.


अहिंसा १.० :


नवस्वातंत्र्य काळात "एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करावा", अशा आदर्शवादी तत्वज्ञानाचे अंधनुकारण केल्या गेले. तेव्हा आपली सैनिकीशक्ती बऱ्याच वरच्या क्रमांकाची होती. आपल्या समोर चीनने "अहिंसक तिबेट" गिळंकृत केला. आम्ही आपले अहिंसक बनून  "हिंदी-चिनी भाई भाई" करत राहिलो.  आम्ही 1965 जिंकूनही युनो मध्ये अपील करून बसलो, काश्मीर धुमसत राहिले. 


व्यक्तिगत पातळीवर  सुद्धा स्वतःची कुवत विचारात न घेता "मी तुला माफ करतो, मी अहिंसक आहे"! असे ऐकवणे हास्यास्पद ठरते. दुबळ्या अहिंसेच्या अंधानुकरणाचे अनुषंगिक फळ म्हणजे खलप्रवृत्ती वाढीला लागणे , सज्जनशक्ती तटस्थ होत होत भिरू होणे, हे होय. आणि ही स्थिती देशासाठी घातक असते. दुबळ्यांची अहिंसा, स्वतःच्या बचवासाठी केलेला पलायनवाद  असतो. 


अहिंसा २.० :


मालदीव नावाच्या छोट्या देशातील तीन मंत्र्यांनी आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांची नालस्ती केली. सामान्यलोकांनी त्यावर प्रतिक्रिया म्हणून सोशलमीडियावर "बॉयकॉटमालदीव" अभियान सुरु केले.

योगायोग बघा, आपल्या विश्वसंचारी पंतप्रधानांचा दौरा  नेमका लक्षद्विपला  झाला.  आणि बॉयकॉट मालदीव पासून सुरु झालेले अभियान "चलो लक्षद्विप" पर्यंत पोहोचले.


भारत जगातील सर्वांत मोठी ग्राहकशक्ती आहे. भारतीय पर्यटकांवर अनेक देशांची आर्थिकघडी अवलंबून आहे. मालदीवही त्यातील एक. भारतीय पर्यटकांनी आपला मालदीव दौरा भराभर रद्द करणे सुरु केले. आर्थिक नुकसान लक्षात येताच तीनही मंत्र्यांना डच्चू  देत मालदीव सरकारने शरणागती पत्करली. ही आपल्या बलाढ्य क्रयशक्तीची कमाल आहे. सामान्य लोकांनी अहिंसक मार्गाने हिसका दाखवला!


पंतप्रधानकार्यालय, विदेश-मंत्रालय आदींना

कोणतीही प्रतिक्रिया द्यावी लागली नाही की निषेध व्यक्त करावा लागला नाही, धमकी, डटावणीचीही गरज पडली नाही! लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेमुळे "सापही मेला आणि लाठीही तुटली नाही" असे झाले.


खरोखर आपला देश  बदलतो आहे. देश खऱ्या अर्थाने समर्थ अहिंसक होत आहे. आत्मभान वाढते आहे. 


"राजा कालस्य कारणम् |" असे महाभारतात म्हटले आहे. 


©डॉ. प्रज्ञा देशपांडे.