Monday, January 30, 2017

भाषा -एक विचार

भाषा (भाष्, बोलणे पासून)
 "जी बोलल्या जाते ती भाषा" या अर्थाने हा शब्द आहे.
 अन् खरे तर "भाषा"शब्दाची हीच मूळ व्याख्या आहे ,
तसेच बोलणे ,संबाद साधणे हेच तिचे मूळ उद्दिष्ट आहे.
बोली,उपभाषा,प्रमाणभाषा,शुद्धभाषा,मिश्रभाषा,
प्राचीनभाषा,आधुनिकभाषा,ज्ञानभाषा इत्यादि प्रकार हा म्हणजे शब्दविलास होय.
अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा ,तसेच कामक्रोधहर्षादि मूळभावनांच्या पूर्ततेसाठीच भाषेचा उपयोग असतो.
अस्मिता-साहित्य-संस्कृती इत्यादि म्हणजे फ़ुटलेले घुमारे आहेत. ते चूकीचे आहेत ,असे अजिबात नाही .
पण "खाली पेट भजन न भाये गोपाला" हे त्रिकालाबाधित त्रिवार सत्य आहे.

भाषेचा उगम केव्हा झाला?
प्राचीनतम भाषा कोणती?
कोण्या भाषेतून कोणती भाषा जन्मली?
सर्वाधिक बोलली जाणारी भाषा?
मूलनिवासी भाषा कोणती??
श्रेष्ठ  भाषा कोणती??
आजची मृतभाषा कोणती?
जागतिकभाषा कोणती??

अशा प्रश्नमालिका सोडविण्याचा या लेखाचा उद्देश नाही आणि ह्या'"अनादि-अखंड-अनंत"प्रश्नमालिका सोडविण्या इतपत दांडगी माझी प्रज्ञा नाही नि भाषिकव्यासंग ही नाही!! असो.

एक सामान्य व्यक्ती म्हणून "भाषा " बाबत  माझे विचार व्यक्त करीत आहे.

 कोणतीही भाषा १००%नवी नाही नि १००%जुनी ही नाही.
 आई ज्याप्रमाणे अपत्याला जन्म देते त्या प्रमाणे कोणी एक भाषा कोण्या एकाभाषेला जन्म देत.
  नाही.

  भाषा  ही भूगोल-समाज-कालसापेक्ष असते.

  प्रत्येक व्यक्ती तीच  भाषा वेगळी-वैशिष्ट्यपूर्ण बोलत असते.
 भाषेचे मूळ, शब्द आहेत तर शब्दांचे मूळ ध्वनि म्हणजे नाद होय.
  " मुख" हेच नाद प्रगटीकरणाचे मूळ साधन आहे. जगात जितके लोक आहेत त्या सगळ्यांची मुखरचना भिन्न व वैशिष्ट्यपूर्ण आहे.त्यामुळे उच्चारणशैली प्रत्येकाची भिन्न असते.
   साध्या 'अ'चे उदाहरण बघू. कोमल-मध्यम-तीव्र ,लघु-गुरु-प्लूत, सानुनासिक-अननुनासिक याप्रकारे अठरा भेद होतात. त्यात व्यक्तिवैशिष्ट्याने अगणित उच्चार तयार होतात.
   इथेच "भाषा-अंतर" व्हायला खरी सुरवात होते. म्हणून तर म्हणतात ,"नवा वाणी मुखे मुखे"!
  भाषिकभेदाची सुरवात इथेच होते.

  उदाहरणार्थ त्रयोदशी>तेरस>तेरा
  अक्षय्य>अख्खय>आखजी>आख्खा
  आषाढी>आखाडी
  यमुना> जमना
  बर मग ठिक आहे> बर्मगठिका
  देवयानी>देबजानी
  इंद्रवर>इंदिवर
  अमरेंद्र>अमरिंदर
  लुप्त हंसा> लुप्तांझा
  अोनामा >अोम् नम:
  अोनामासिधम> अोम् नमो सिद्धम्
  अशाप्रकारे उच्चारण भेद हे भाषा-विभाषेचे मूळ कारण असावे असे वाटते.

  मानवीवंशापासूनच भाषेचा जन्म झाला असावा. वर सांगितल्या प्रमाणे भाषांतर होता होता अनेक भाषा तयार झाल्या असाव्यात.त्यामुळे कोणत्या भाषेतून कोणता शब्द आला हे ठरवणे कष्टसाध्यच आहे.
 शिवाय शक्याशक्यते नुसार या भाषेतील शब्द
  त्या भाषेत जाऊन परत या भाषेत येऊ शकतोच ना.  तसेच या दोन्ही भाषेतून तिस-या भाषेत या सर्व शब्दांसह तिचा स्वतंत्र शब्द असू शकतोच ना.

उदाहरणार्थ  पक्षी (संस्कृत) > पख्खी(पाली) >पक्षी ,पाखरू (मराठी)

  [पालीपासून संस्कृत झाली की संस्कृतपासून पाली ,मराठी आधी का या भाषा ,या वादात पडाण्यासाठी ही उदाहरणे दिली नसून मला याच भाषा ज्ञात आहेत. इतर भाषांचा अभ्यास  नाही .म्हणून याच भाषांची उदाहरणे मी देते.]

  पूर्वी दळणवळण साधने तितकी उपलब्ध नव्हती. शिवाय तंत्रज्ञानही प्रगत नव्हते. त्यामुळे एकच भाषा वा मर्यादित बोली यांच्याद्वारे व्यवहार होत होते.देवाण-घेवाण क्वचितच होत असे.
आज सगळीच वर्दळ वाढलीय .त्यामुळे मानवांप्रमाणे भाषांचाही प्रवास-प्रगती वाढतेय यात शंका नाही.
 मग शब्द-शैली-ढब-तंत्र यांची देवाण-घेवाण होणे अपरिहार्य आहेच.
मानवीसमूहाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे "अहंपण"! मी-माझे-मम यातूनच ममत्व निर्माण होते. त्यातून भाषाही सुटत नाही.
पण कधी कधी मानवी प्रवृत्तीपेक्षाही शब्दांची विष्णुवृत्ती-(हा धार्मिक शब्द नाही ,शिरण्याची प्रवृत्ती)-अधिक तीव्र असते.
त्यामुळे कोणत्याही भाषेतील शब्द कुठल्या भाषेतील शब्दांशी साम्य बाळगतील हे सांगता येत नाही. उदाहरणार्थ निअर (जवळ या अर्थाने) इंग्रजी भाषेतील शब्द त्याच अर्थाने पण उच्चार वेगळा 'निअरे' राजस्थानीत आढळतो.
 असे अनेक उदाहरणं कोसो दूरच्या भाषांमध्ये सापडतात.
कोणी कोणाचा शब्द घेतला यावर वाद करण्यापेक्षा भाषा शब्दसमृद्ध झाली हा परिणाम मोठा नाही कां?

मी माझ्या भाषेत परके शब्द घेणार नाहीच हा दुरभिमान आहे तसेच अधिकाधिक परकेच शब्द योजीन हा ही कणा नसल्याचा पुरावा आहे.
 इथे विवेक हवा. माझ्या मूळ भाषिक- अस्तित्वाला धोका न आणता ,भाषिकप्रवृत्तीला जपत जपतच मी शब्द स्वीकारीन  असा दृष्टिकोण असावा.
तसेच माझ्या भाषेतील याच अर्थाचे सर्व शब्द त्याच्या इतर अर्थच्छटांसह जपत नव्या शब्दाची भर घालण्यात कमी पणा वाटू नये.
गरज भासल्यास कोणत्याही भाषेतून शब्द आयात करावे .
तसेच आपल्या भाषेतील शब्द सहज
दुस-या भाषेत पेरावे.
शेवटी भाषा ही बोलण्यासाठी (टचटच नाही) हे मूळ उद्दिष्ट कोणीच विसरू नये.
जगा -जगवा -जगू द्या.
तद्वत
 बोला- बोलू द्या-बोलवा
 (सर्वा मुखी मंगल बोलवावे मधिल बोलवा... )
हेच सूत्र महत्वाचे.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


Tuesday, January 24, 2017

प्रकृती



सूर्य तळपतो आकाशात
सगळ्यांना जीवन देतो.
स्वत:तील उष्मा चराचरात पसरवतो.
कामच त्याचे ते की, किरण
पसरवून सगळ्यांना ऊर्जित करतो !
सकाळी कोवळा ,दुपारी चंड
 नि परतीच्या वेळी मृदू असे
 कमीजास्त तेज करणे
त्याचे त्याला छान साधते.
गरजेचे ही आहे तसे वर्तन
 त्याच्या दिनक्रमासाठी.॥१॥


सृष्टीतील वैविध्य प्रतिसाद
देते त्याला विविधतेने.
त्यांचेही बरोबरच आहे,
सजीवपणाचे लक्षण जपतात बिचारे.
झाडे बहरतात ,कधी करपतात.
कळी उमलते ,फूले कोमेजतात.
पक्षी उडतात, कोटराचा आश्रय घेतात.
जेवढे जीव तेवढे प्रतिसाद.
याला जीवसृष्टीतील संसारचक्र म्हणतात.॥२॥

पण ही वसुंधरा याच
घटकांनी नाही ना बनलेली.
वसू आहेत अनेक म्हणून तर
वसुंधरा म्हणवते ना स्वत:ला.
मूळात ती मृण्मयी आहे.
मातीचेच तिचे वैभव.
 मातीचेही प्रकार प्रकार
जपते एकाच न्यायानेपण.
चिकणमाती ,खडकाळ माती
,सुपीक माती,बंजर माती ,
वालुकामय कोरडी माती.
प्रत्येक मातीची धारणा वेगळी .
अनेक धारणांना एकवटून
 धरा सार्थ ठरते.॥३॥

वाळू तशी रूप मातीचे, मूळ दगडाचे
,गुणाने रेताड,हातातून सुटणारी ,
कायम अलिप्त राहणारी.
पाण्यात राहून कोरडेपणाच जपणारी .
अवगुण हा तिचा खरा गुण ठरतो,
कारण पक्केघर बांधायलाहि
 फारच कामाची .
वालूकामय वाळवंट
स्थितप्रज्ञेने जपणारी.॥૪॥

तळपणारा सूर्य सहज गतीने
तापवतो वाळूला.
पहिले तर ती जाम पेटतच नाही .
आधीचा थंडपणा सोडतच नाही
. मात्र संतत प्रखर किरणांनी
 तिला हा सतत तापवतो .
तपश्चर्येने त्याच्या ,कण नि कण मोकळा
 होऊन ती ताप ताप तापते .
॥५॥

याचे बरे ,हा जातो मावळतीला .
ती मात्र  अंगार झेलत
भाजते आतून स्वत:लाच.
तापून अधिकच कोरडी
नि अणुमय होते.
याला पुन्हा आश्चर्य वाटते की
कशाला साठवते बरे ही  उष्णता ?
मी तर तापवून मावळतो नेहमी सारखा !॥६॥

कसे समजावे याला?
तिच्या तरी कुठेय नशिबी अोलेपण?
 कशी बरे अपेक्षिता तिच्यातून शितलपण?
तुझ्या -तिच्या प्रकृतीतच खरा फरक आहे.
 गुण-अवगुण सारे मानण्यावर अवलंबून आहे.
कोणी तापते जगात म्हणून संतापणारे ही आहेत.
 स्वभावाचा वेगळेपणा ही पण  प्रकृतीच आहे.॥७॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
२૪.१.२०१७

Sunday, January 22, 2017

पिक्चर-एक पाहाणे.....

२३.१.२०१७

पिक्चर-एक पाहाणे.
आज शेवटचा पेपर...संपेल परीक्षा..आनंद..
त्याहून अधिक आनंद ,,,उद्या बाबा आम्हा भावंडांना पिक्चर दाखवणार आहेत याचा व्हयचा.
 कारण दरवर्षी प्रमाणे वर्षाला फक्त एकच सिनेमा बाबा दाखवायचे .वर्षभर चातकासारखी वाट पहायची.टिव्ही नव्हते ,बाकीची "माहितीतंत्रज्ञान साधने"गावी नव्हतीच.
पिक्चर नव्हे पिच्चर,सिनेमा नाही सिनिमा,टॉकिज नाही टाकिज,थिएटर नाही थेटर ...पण आनंद मात्र किंचितही कमी नव्हता.
 तिकिट मिळेल ना?? की एडव्हांसबुकिंग करायचे? हा मोठ्या भावाला पडणारा प्रश्न.
आम्ही बेफिकिर."सिनेमा पाहायचा"  इतकच स्पष्ट ध्येय !
 कुठे? किती वाजताचा?कोण्या दिवशीचा??बाल्कनी की थर्डक्लास??असले फ़ालतु स्टेटसवाले प्रश्न कधीच डोक्यात येत नसत.
घरी येणारे पाहूणे परतताना लहानभावाच्या हाती एक रुपाया ठेवायचे. पोळ्याला दोन्ही भावंडं फ़िर फ़िर फिरायचे बैल घेऊन,,,बोजारा जमायचा पाSSच रूपये.कधी चुकून अतिश्रीमंत नि उदार पाहूणे आले तर दहा रूपये हाती पडायचे. असे सगळे पैसे साठवून ठेवायचे.
चिल्लर मोह म्हणजे नंबरवाली कुल्फी,आईसगोला,पानिपुरी,भेळ,जेम्स वगैरे टाळायचे वर्षभर ...कारण उन्हाळी सुट्ट्यात खूप (म्हणजे २ किंवा तीन) सिनिमे पहायचे अाहेत.
एरवी वर्षभर भावंडांची "टॉम &जेरी" आपापसात कायम असायचे.सारखे तूतूमैमै असणारच. पण "पिच्चर" हा वादातीत विकपॉईंट.साठवलेले पैसे जरा जास्त खुळखुळले तर आई मागायची तिला अडचण असेल तेव्हा.परतीच्या कबूलीने द्यायचो.कधी परत मिळायचे .कधी "चांगले नाही वागले ",शिक्षा म्हणून पैसे जप्त..ना बालहक्क ना बालहट्ट . जास्त आक्रस्ताळेपणा करताय कां रे??म्हणून अधिक शिक्षा( प्रसंगानुरूप) मिळण्याची शक्यता जास्त.
आम्ही तीन भावंड ,,, शेजारी समवयस्क दोघे जण. असे साधारण पाच जण मिळून उन्हाळ्यात सिनेमा बघायला जायचो.
तेव्हा पाहिलेले प्रत्येक सिनिमे आठवतात. म्हणजे कथानक जास्त नाही आठवत पण सिनेमा पाहाण्यासाठी केलेली मेहनत कायम स्मरणात आहे.
शान नावाचा त्याकाळी बिगबजेट(लाखरूपये खर्च करून तयार झालेला)गाजलेला पिक्चर पहायला आम्ही गेलो,,तीन भावंड नि शेजारचा मुलगा. सकाळी ९चा शो ,"भारी भीड मे चल रहा है"माहित असल्यामुळे सकाली सातलाच घरातून पायी पायी निघालो. लाईनीत उभे झाले भाऊ. मला लेडिजच्या लाईनीत उभे केले. लहान भाऊ लक्ष ठेऊन होता ,कोणाचा नंबर पहिले लागेल त्याला धाव्वत जाऊन पैसे द्यायचे. जसं खिडकीशी आली तसं तिकिटं संपलेली. ९चा शो पार फुल्ल.मग काय १२च्या शोच्या लाईनीत लागलो. तोही नाही मिळाला.भूक लागलेली,,१रूपया प्लेट समोसे ,,दोन प्लेट घेऊन चौघांनी खाल्ले. पैसे कमी पडत होते. मग थोड्या अंतरावर मामा आजोबांची बँक होती. त्यांना मागायला गेलो.पिच्चर तर पाहायचाच होता. तेव्हा सुदैवाने मोबाईल तर नव्हतेच शिवाय घरोघरी फोन पण नव्हते. घरच्यांना कळवावे इतकी अक्कलही त्या धुंदीत नव्हती. शिवाय मोठा भाऊ(दीड वर्ष मोठा) सोबत म्हणजे फार सुरक्षितच की.शेवटी ३ ते ६ च्या शोची तिकिटं मिळाली.
मस्तच पिच्चर होता."जिते है शान से....मरते है शान से" गाणं... तो शाकाल... ती फायटिंग... वॉव मस्तच .... तहान भूक सगळे विसरून पिच्चर एंजॉय केला चौघांनी.
परतलो घरी ,सकाळी सात ते सायंकाळी सात "बेबीज् डे आऊट" सारखे.दारात पाऊल ठेवल्या बरोबर आजीने थोबकाडात दे दणाण केले.कॉलनीतील शेजारी पाजारी गोळा झालेले होते.मुले हारवली की काय? अशी काळजी होती त्यांना. आम्ही "शानसे" आलो नि आमची पार "शानच" घालवली घरच्यांनी.
शालेय जीवनात मोजून ५ /६ सिनिमे पाहिले असतील,भावंडांनी मिळून.
प्रत्येक पाहाणे अविस्मरणीयच आहे.
आज साधनसंपन्नता प्रचंड आहे. लग्झुरिअस टॉकिज आहेत. नेटबुकिंगची सोय आहे. पण लहानपणचे ते थ्रिल नाहीच.
मध्यमवर्गातिल ते श्रीमंत क्षण आज लखपती/ करोडपती असलेले भावंड अजूनही विकत घेऊ शकलो नाही.........,
श्रीमंतीतील गरीबीची  किव येते.
गेले ते दिवस... राहिल्या त्या आठवणी.


©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

सक्ति विश्रांतिचि...

२२.१.२०१७
आज २६ दिवस झालेय ,घरात सक्तीचा आराम करतेय .
अजून १९ दिवस बाकी आहेत.
पावलाचे फ्रॅक्चर हे निमित्त कारणीभूत ठरले या सक्तीच्या विश्रांतीला.
रोज रोज घर>शाळा> संस्कृत परिवार>सामाजिक संस्था>सोशलमिडिया >बोर्डाची कामे अशा अनेक आघाड्यावर एकाच वेळी वावरण्याची सवय.
'आपण केलेच पाहिजे' ही कर्तव्यभावना स्वस्थ बसूच देत नव्हती. शिवाय व्यक्त होण्यासाठी स्वान्तसुखाय लेखन ...एकूण "नाच ग घुमा" ही मी माझी स्वत:हून केलेली "खुदखुशी"च आहे.
चोविस तासातील १०/१२तास प्रत्यक्ष कामं नि उरल्या वेळात झोप येई पर्यंत  मनन-चिंतन- लेखन .
या दैनंदिन चर्येचा कधी कधी वैताग यायचा.वाटायचे सगळं सोडून द्यावे ,लपून जावे ,,पळून जावे. पण "जिना यहा ,मरना यहा ,इसके सिवा जाना कहा..."
अपरिहार्यपणे स्वीकारावीच लागलेली नि मग त्याचीच सवय झालेली गतिमानजीवन शैली.

पाय तुटायचे निमित्त काय झाले ,चालत्या गाडीला खिळच बसली.आराम करायची संधी चालून आली.
पण खरं सांगू ?
 सक्तीचे काहीही ......मनाला मानवतच नाही. सक्तीचा रामराम , सक्तीचे कामं ,सक्तीची हमाली ,सक्तीची वसूली ,सक्तीचे मनोरंजन , सक्तीचा आराम .......नको ,नको,नकोच.

 खरे तर या काळात - वेळेशी स्पर्धा नाही. काळ-वेळ-वार काही काही बघाचे काम नाही. धावपळ नाही. दगदग नाही. गोंगाट-गोंधळ नाही. शांत - सरळ- सात्विक -नियमित दिनचर्या सुरु आहे.
तसा विचार केला तर मनाजोगं वागायला मिळतय खरं आता.पण म्हणतात ना....मूळ स्वभाव बदले ना.
ही अशी दिनचर्या सक्तीने मिळाली, हे एक उगाचचे मोठं दु:ख.
असो , वेळे अभावी काही अपूर्ण राहिलेली कामं आता पूर्ण करायची संधी मिळाली.
 या सक्तीच्या एकांतामुळे माझ्यातल्या मला नव्याने जाणण्याची संधी मिळाली." विपश्यना" करणे सुरु झाले.
"मी केलेच पाहिजे नाही तर कसं होईल?" या भावनेचे पार निराकरण झाले. सगळे जग तसेच सुरळीत गतिमान आहे ,माझ्यावाचून काहीही फरक पडत नाहीय हे पाहून पहिले धक्का बसला ,मग वैताग झाला ,,मग फार वाईट वाटले ,मग कुढत कुढत स्वत:ला शोधायला लागले. चिंतन वाढवले. मग कुठे सत्य स्वीकारायला मन तयार झाले. अाता स्पष्ट जगण्याचे तंत्र कळले ( वळते किती ते काळच ठरवेल. )
सूर्य तळपतील,चंद्र झळकतील
तारे अपुला क्रम आचरतील
असेच वारे पुन्हा वाहतील
होईल काही काय अंतराय??
रामकृष्ण ही आले गेले
त्याविन जग कां अोसची पडले
कुणी सदोदित सुतूक धरले
मग काय अडकले मज शिवाय??
मी जाता राहिल कार्य काय?
जन पळ भर म्हणतील हाय हाय !!

ही कविता शाळेत चाफेकर बाईंनी अप्रतीम शिकवली होती.
 या शांत- आत्ममग्नतेच्या काळात तिच्यातील आर्तभाव हृदयाला भेदून गेले.

खरच मध्ये मध्ये सिंहावलोकन करण्यासाठी असा पॉज मोड गरजे आहे ,नाही?

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Wednesday, January 18, 2017

शब्द चिंतन.......चिन्ता....

16.11.2016

 शब्द चिंतन........

चिंता ,काळजी ,फिकीर ,वरी
एकाच अर्थाचे शब्द आहेत वेगवेगळ्या भाषेतील?? होय ना ? असे वाटते पण अर्थच्छटा वेगळ्याच आहेत.

चिंता म्हणजेच काळजी असे समजतात साधरणपणे.
काळजी पूर्णपणे मराठमोळा शब्द.
त्याचा बाजच वेगळा.काजळी नि काळजी सारखी अक्षरे पण भिन्न क्रम.
परिणामही भिन्न.अर्थ तर वेगळाच.

दिव्याचा प्रकाश न पोहचता जो धूर (न दिसताही) जमा होतो त्याची काजळी तयार होते. ती काळी असते.
जेव्हा विचार कृतीत उतरत नाही फक्त डोक्याला कुरतडतो तेव्हा काळजी लागते.

काजळीने सभोवतालचा पटल/पृष्ठभाग काळवंडतो तर काळजीने मुख(कमल /चंद्र)पटल काळवंडतो.

चिंता पण घोर लावते. चिंता >चिंतन>चिंतणे>चित्त यांचा सहसंबंध आहे कां ?? नक्कीच.
 चिंत् या मूळधातूची ही विविध रूपं..................चिंता मनात ढवळाढवळ करते पण.........
 त्यातून बाहेर पडण्याचे साधक-बाधक उपाय सुचवते. आपल्या अनुभवातून ते सफ़ल वा विफल ठरतात.हा चिंतेचा विषयच नाही ,नशिबाचा म्हटल्या जातो समाजात.
फिकीर हा फार्सी शब्दाचे मराठीकरण आहे .फ़िकर चे फिकीर झाले.म्हणून जिवाचा गुंता कमी झाला नाही.

डोन्टवरी हा परवलीचा शब्द झालाय आजकालच्या मराठीत ,थ्यँक्यू सारखा. नुसता वरी वापरायचा नाही. वरवरच वापरायचा...
शब्द काहीही योजा ....परिणाम मात्र स्वत:ला अपेक्षित ठेवा म्हणजे झाले.
मन काळवंडू नये इतकी दक्षता घ्याच.
 ©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, January 17, 2017

शब्दचिन्तन ...अथ

#शब्दचिंतन
पैसा ,धन ,वित्त ,अर्थ ,रुपया ,कमाई ,आय-व्यय,श्री .,मूल्य ,संपत्ती ,ऐश्वर्य.....

पैसेवाले ,धनवंत ,वित्तकोष ,रुपयेवाले ,आयकर ,धनी,श्रीमान् ,श्रीमंत ,ऐश्वर्यवान् / ऐश्वर्यवती

साधारणत: पहिल्या ओळीतले -व्यवहारात उपयोगात येणारे ,जीवन सुखी होण्याचे साधन मानतात तर
 दुस-या ओळीत -उपरोल्लिखित साधनयुक्त व्यक्तिविशेषण आहेत.
मन,वन,जन,तन,गण अश्याच प्रकारचा धन शब्द वाटतो.
तन म्हणजे वाढणारं ,
गण म्हणजे मोजलेलं ,
मन म्हणजे  मनन करणारं.
मन हे क्रियात्मक नि संवेदनात्मक इंद्रिय आहे.
 जन म्हणजे जन्माला आलेले ...
....तसाच धन असेल कदाचित् .
 संस्कृतात पाच हजाराहून जास्त मूळ धातू आहेत प्रत्येक शब्द हा त्या मूळधातूंपासून वेगवेगळ्या प्रक्रियांतून तयार होत असतो.
काळाच्या ओघात भाषा-अंतर होत गेले. मूळ धातूंचा अर्थ वा प्रक्रिया कळेनासी झाली.
 ( वेळ नाही ,ही अनध्यायाची मोठी सबब.) असो . धन महत्वाचे ,प्रक्रिया काही कां असेना!!!
वित्त म्हणजे प्राप्त केलेलं .
इथे इच्छा व प्रयत्न दोन्ही अपेक्षित आहेत.
अर्थ म्हणजे इच्छित ,,वांछित .
अर्थ् या मूळ धातूपेक्षा प्रार्थ् हा उपसर्गयुक्त धातू अधिक प्रचलित आहे. प्रार्थना म्हणजे प्रकर्षाने केलेली अर्थना ( इच्छा) .
ज्यात इच्छाच नाही त्यात "अर्थ" कसा??
रुपया हा शब्द अर्थविस्तार प्रकारात मोडतो.
रुप्यकचा रुपया झाला.पूर्वी चांदीचा रुपया होता. पूर्वी म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी.
 मानवतेच्या अवमूल्यनासह रुपयाचेही झाले. आज नाणं जरी चांदीचे नाही तरी रुपयाच म्हटले जाते. हेच अर्थविस्तार .
आय म्हणजे मिळकत. वि+आय=व्यय म्हणजे गेलेली कमाई.
श्री म्हणजे लक्ष्मी.
संपत्ती -आपत्ती-विपत्ती हे विविध उपसर्गपूर्वक पत्ती कृदन्त होय. योग्य रितीने (भाळी) पडली तर संपत्ती . उलटी पडली तर आपत्ती नि विरुद्ध झाली तर विपत्ती.
कमावणे पासून कमाई. कम्-काम म्हणजे भौतिक सुखाची इच्छा . इच्छा तेथे मार्ग. कमाई त्याचसाठी करतात अनेक जण.
ऐश्वर्य शब्दाचा ऐशशी सबंध नाही. ईश् = नियंत्रण ठेवणे,ईश्वर जो नियंत्रण ठेवतो तो. ईश्वराचे सारे ते ऐश्वर्य. असा तो मूळ अर्थ. मग "तळे राखेल तो पाणी चाखेल" या न्यायाने ईश्वर म्हणजे सर्वशक्तिमान. अन् त्याचे हे ऐश्वर्य.
मूल्य म्हणजे मुळचे ,मूळयुक्त. मुळात असेल तरच  येणार नाही तर आडात नाही तर पोह-यात कुठून..
मूल्यच नाही ते सारं अमूल्य.
वाला/वाली ,वान्/ वती ,मान्/ मती हे सगळे प्रत्यय "ज्याच्या जवळ आहे ,असा जो तो/ ती". या अर्थाने येतो.
कोष म्हणजे ज्यात गुंततो तो ,,वित्त गुंतलेते वित्तकोष ( बँक)
एकंदरित वित्त नाही म्हणजे आपत्तीच. अर्थ नाही म्हणजे अनर्थ ठरलेला.
शब्द कोणताही वापरा  ,माणुसकीचे अवमूल्यन होऊ नये इतके बघा.
असो......इतका अर्थ शब्दचिंतनाने केला.
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

अहं पणा

खरंच या जगामध्ये किती असंख्य जग आहे!
प्रत्येक जीव त्याच्या त्याच्यात जणु छोटं विश्व आहे ।।१।।

प्रत्येकाचे मीपण ,प्रत्येकाचे अस्तित्व
प्रत्येकाची जिजीविषा,प्रत्येकाची कथा-व्यथा।।२।।

एवढा विश्वाचा व्यापक पसारा
पण" मी" समोर छोटाच ठरतो
प्रत्येकाच्या" मी "ला जणु
विश्वव्यापकपणा येतो।।३।।

क्षण- विचार -स्वभाव - परिस्थिती
सारे काही बदलत असते
आज जे सत्य असते
उद्या तीच परिकथा ठरते ।।४।।

माझे अनुभव ,माझा अभिमान
कवटाळत माणूस जगत असतो
विशाल- वैश्विक आनंदाला
फाटक्या ठिगळाने तोलत असतो।।५।।

चिन्मय -चिरंतन-असीम आनंद
सा-या विश्वात पसरला आहे
"मी " च्या क्षुद्रपणात
मानव मात्र गुरफटलाय।।६।।

प्रत्येकाचे जग,प्रत्येकाची सृष्टी
प्रत्येकाचं विश्व,लखलाभ असो ज्याचे त्याला
अनंत काळ अन् विस्तृत पृथ्वीतलावर
मोजदादीला फुरसत कोणाला ? ।।७।।

    डॅा प्रज्ञा देशपांडे 

Thursday, January 12, 2017

कुणी कुणाचे नाही

कुणी कुणाचे नाही .........

कुणी कुणाचे नाही
       येथ रे
कुणी कुणाचे नाही।धृ।।

जोवर होता वृक्ष बहरला ,
पक्षी गाती गाणी।
दुष्काळी तो एकाकी तरु
 गातो विराणी ।।१।।

निळसर पाणी तुडुंब जलाशय,
जीवा संजीवनी।
पाणी आटता किंवा दूषिता,
गटारगंगा म्हणी ।।२।।

दुग्धदायिनी सवत्स धेनु ,
गोमाता हो जनी।
बाखड होता जराग्रस्त ती
 कत्तलखान्या गणी ।।३।।

पैसा सत्ता संपत्तीमुळे,
मानव श्रेष्ठ म्हणी ।
परिस्थितीचा नूर पलटता
 काय तया मोजणी ।।४।।

नात्यांमधले गोड गोडवे
संधी अनुलक्षुनी ।
पिळ पडता प्रतिकूलतेचे
 कोण कुणाला सही ।।५।

येताना एकाकी आलो
 रमलो या जीवनी।
परत पुन्हा एकाकी परतण्या
 विषाद कां रे मनी।।६।


Wednesday, January 11, 2017

देवा,सांभाळ तुझे देवपण......



देवाशप्पथ खरे सांग,तू आहेस का रे देवा?
रात्रंदिन करते मी  सतत तुझाच धावा।।१।।

आजवर तू अनेकांना लावले असशील नादी।
नेहमी असेल वाढती तुझ्या भक्तांची रे यादी।।२।।

कुणाकुणाच्या कशाकशावर तू नक्की भाळला असशील !
जे जे शक्य ते ते सर्व नक्कीच त्यांना दिले असशील।।३।।

भक्त सुद्धा तुझ्या कृपेने झाले असतील तुष्ट।
तुझ्या मांदियाळी त्यांनी केल्या असतील पुष्ट।।४।।

देवा तुला देखील असेल ना रे स्वत:चा संसार?
नक्कीच तुझ्या भक्तांपाई रखुमाबाई बेजार ।।५।।

देवा तुझे देवत्व कर की  रे सिद्ध।
अंधाराने उजेड कधी होतो का रे विद्ध ।।६।।

पुरे की रे आता अदृश्यरूपी जगणे।
प्रगट कर स्वत:ला हेच एक मागणे।।७।।

सदान् कदा चिंतनात भक्त तुझ्या दंग।
तू मात्र उलाढाल्या जगाच्या करण्या गुंग।।८।।

देवा तुला खरं सांगते देवत्व तुझे सांभाळ।
करु नको भक्ताच्या भक्तीची तू आबाळ।।९।।

दुनियादारी,संसार-पाणी पुरे की रे आता ।
तू असता भक्ताला कशाला हवी चिंता?।१०।।

भक्तवत्सल म्हणवतोस ना?दाखव की खरे रूप।
दुनियेच्या या मायाजाळात मिळतात फसवे खूप ।।
११।।
जुन्या काळी म्हणे देव घेई भक्ताची परीक्षा ।
कसास उतरून तूच कर देवपणाची रक्षा ।।१२।।

खरा देव असशील तर स्वत्वाला जाग।
भक्तासाठी कर की थोडातरी त्याग।।१३।।

भक्ताच्या हृदयात तू असतोस विराजमान।
भक्तालाही तुझ्या मनात आहे कां रे स्थान?।१४।

भक्त गुंती सदा कदा तुझ्या भक्तीमधी।
 धरना त्याचा ध्यास तू पण  कधी कधी।१५।।

भक्तामुळेच देवाचा होता खरा देव।
याची तरी देवा तू नीट जाणिव ठेव।।१६।।

आम्ही ठरलो मर्त्यजीव एक दिवस मरणार।
अमर तू इथेच रहून देवत्व कसे टिकवणार?।१७।।

म्हणून सांगते देवा ,जप अमरत्वाचे स्थान ।
भक्ताच्या भक्तीचा बाळग जाज्वल्याभिमान।।१८।।
©Dr.Pradnya Deshpande

Monday, January 9, 2017

महानुभाव पंथातील व्रतवैकल्ये (?)

महानुभाव पंथातील व्रतवैकल्ये (?)

प्रास्ताविक
        भारतदेश अनेक पंथ, उपासना पध्दतीने नटलेला सर्वांग परिपूर्ण विचारधारांनी प्रगल्भ झालेला देश आहे. भारतातील अनेक पंथामध्ये
'महानुभाव पंथ' हा अतिशय वैशिष्टपूर्ण असा पंथ आहे.

पंथाविषयी वैशिष्टे :-
        या पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर आहेत.
 त्यानांच 'सर्वज्ञ' असेही म्हणत असत.
 त्यांचे गुरु गोविंदप्रभू होते.
 नागदेवाचार्य, केशिराजव्यास, कविश्वरव्यास, महादाईसा इत्यादी अनेक प्रसिद्ध महानुभावी आहेत. या पंथाचा प्रमुख ग्रंथ 'लीळाचरित्र' हा होय. त्याशिवाय सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, स्मृतिस्थळ, महादाईसाचे धवळे इत्यादी साहित्य प्रसिद्ध आहे.

       या पंथाची अनेक वैशिष्ट्ये आहेत.
त्यातील पहिले वैशिष्ट्य म्हणजे यांचे मराठी भाषाप्रेम. या पंथाचे बहुतेक साहित्य मराठी व काही साहित्य हे संस्कृत भाषेत लिहिलेले आहे, पण प्रामुख्याने मराठीतच. प्रथम आचार्य भटोबास म्हणजेच नागदेवाचार्य हे मराठीसाठी फारच आग्रही होते. केशिराजव्यास हे संस्कृतचे विद्वान होते. त्यांनी  संस्कृतमध्ये ग्रंथ निर्माण केले, आणिक ग्रंथ निर्मितीसाठी ते आचार्यांच्या परवानगी साठी गेले होते, पण भटोबासांनी त्यांना स्पष्ट सांगितले की "तुमचे अस्मात कस्मात मी नेणे गाः मज चक्रधरे निरुपिली मराठीः तियाची पुसा "

          याशिवाय पंथाची इतर वैशिष्ट्ये या प्रमाणे
१) या पंथात जातीभेद नाही.
२) स्री षुरुष समानता आहे.
३) उच्च निच हा भेद नाही.
४) गरीब श्रीमंत हा भेद नाही.
५) कर्मकांड मानत नाही.
६) विटाळ चंडाळ इत्यादी मान्य नाही.
७) द्वैतवादी पंथ आहे.
      महानुभाव पंथातील व्रतवैकल्ये 
      मूळात या पंथाला व्रतवैकल्ये या शब्दाचेही वावडे आहे. आणि इतर उपासना पंथामध्ये जसे व्रतवैकल्ये असतात तशी या पंथामध्ये नाहीत.
 परंतु पंथ सुरळीत चालावा, उपासना अखंड असावी या करिता काही क्रिया चक्रधरानी अनुयायांसाठी आचारावयास सांगितल्या. त्याला 'विधि' असे म्हणतात. ज्या क्रिया आचारायलाच हव्या त्याला 'विधि' तर ज्याचे आचरण निषिद्ध आहे त्याला 'निषेध' असे म्हणतात. सामान्यपणे लीळाचरित्रात जसे सांगितले आहे तसे आचरण करणे अभिप्रेत आहे. जे त्याप्रमाणे वागतात त्यांना अनुसरला असे म्हणतात.
        या पंथामध्ये जे संन्यस्त अनुयायी आहेत. त्यांच्यासाठी कडक विधि आहेत. हे विधी दोन प्रकारचे आहेत.
 १) नित्य विधी
 २) निमीत्त विधी
        नित्य विधी खालीलप्रमाणे आहेत
१] अटन
२] विजन
३] भिक्षा
४] भोजन
५] स्मरण
६] प्रसादसेवा
७] निद्रा
 
'हे सात नित्य विधी एकांकी व बहुतांच्या सांगाती असताही करावे.' असे सांगितले आहे.
 हे विधी नित्य नेमाने करावे असे सांगितले आहे.
       या सात नित्य विधींची माहिती थोडक्यात अशी -
अटन :- अटन म्हणजे फिरणे. पण हे पुन्हा तीन प्रकारचे आहे
१] स्थानवंदन करीत फिरणे :- चक्रधरस्वामींच्या लीळाचरित्रात ज्या ज्या स्थानांचा उल्लेख आलाय त्या त्या ठिकाणी जाणे.
२] अधिकारी लोकांशी भेटणे :- पंथामध्ये जे ज्ञातविरक्त असतील त्यांचे दर्शन घेण्यासाठी जाणे.
३] निरुद्देश फिरणे :- ईश्वर शोधनी विरहित अन्य कोणताही हेतू न ठेवता फक्त फिरणे
विजन :- एकांतात राहणे, चक्रधरस्वामीचे स्मरण करणे. याला विजन असे म्हणतात.
भीक्षा :- सर्वज्ञ चक्रधरानी भीक्षा मागावी अशी आज्ञा केली आहे पण त्यासाठी अनेक अटी सांगितलेल्या आहेत. "प्राणासी आहार द्यावा इंद्रियांसी न द्यावा" हे फारच महत्त्वाचे तत्व आहे. शिजविलेलेच अन्न मागावे, चातुरवर्ण्य चरैदभैक्षम्......म्हणजेच चारही वर्णीयांकडे भेदभाव न पाळता भीक्षा मागावी. भीक्षा मागताना एका घरी ' क्षण एक उभेया रहावे ' एक क्षण म्हणजे साधरणतः बावीस वेळा एक विशिष्ट 'नाम मंत्रजप' करीत एवढा वेळ होय.
    शिवाय उत्सव, मंगलकार्यप्रसंग, श्राध्द असेल अश्या घरी भीक्षेस जाऊ नये. महानुभाव पंथ संपुर्णपणे शाकाहारी होय. ज्या घराच्या परीसरात कोंबडीची विष्ठा दिसेल त्या घरात भीक्षा मागू नये. भीक्षा केव्हा मागावी तर
 "निर्धुम नगर झालेया गावांत भीक्षे रीगीजे"
म्हणजे स्वयंपाक होऊन त्या घरच्यांची जेवणे वैगरे आटोपल्यानंर भीक्षा मागावी. म्हणजे फक्त पोटापुरते मिळेल. शिवाय "भीक्षा मागुनी नदीतीरा जाऊनी भोजन करावे" म्हणजेच कोणत्याही गोष्टींचा अगदी पाण्याचाही संग्रह करु नये. अपरिग्रह वृत्तीने जगण्यासाठीच भीक्षा मागावी.
        स्मरण :- महानुभावांचे आराध्य चक्रधर असले तरी ते मात्र 'पंचकृष्णा'ची भक्ती करतात. गोपालकृष्ण-श्रीदत्तप्रभू-चक्रपाणी-गोविंदप्रभू-चक्रधरस्वामी अशी पंचकृष्ण परंपरा आहे. पंथीय अनुग्रह घेऊन 'पंचनाम' जप माळ धारण करून करावा. त्यातही
"पाचा गुण नामी त्रिकाळ स्मरिजे पाचवे ते निरंतर स्मरिजे"
अशी आज्ञा आहे. या विषयी सूत्रपाठात उल्लेख आहे तो असा,
"पश्चाता प्रहरी उठिजे तो सारस्वत काळ देवता ह्रदयासी ये"
अशा प्रकारे स्मरणाचे महत्त्व येथे विषद केले आहे.
       प्रसादसेवा :- हा विधी सुध्दा या पंथाचे आगळे वेगळे पण सांगणारा आहे. स्थानपोथीत सर्वज्ञ कुठे थांबले कोणत्या लीळा कुठे घडल्या याचा उल्लेख आहे. त्या ठिकाणच्या पाषाणाला 'विषेश' असे म्हणतात.
 सर्वज्ञ आणि गोविंदप्रभू या दोघांचे वस्र, दात, नख, केस, इत्यादींचे अवशेष म्हणजे 'प्रसाद' होय.
 विशेष प्रसादाला नमस्कार आणि त्रिकाळ प्रसादसेवा ही करायलाच पाहिजे. या शिवाय ही सेवा करताना तेथील लीळा आठवाव्यात आणि नित्यदिनीचा पूजावसर आठवावा. यालाच प्रसादसेवा असे म्हणतात.
      निद्रा :- सर्वज्ञांचे त्यांच्या लीळांचे स्मरण करीत झोपावे. कारण
 'यथा निद्रीस्त मागीले अध्यासेसीची उठी'
 म्हणजे
'जेणे अनुलक्षेसी निजला तेणेची अनुलक्षेसी उठिला' असे असते. म्हणजे झोपतांना ज्याचे स्मरण करावे तेच उठताना आठवते. यासाठीच सर्वज्ञांच्या लीळांचे स्मरण करीत निजावे, कारण निद्रेचा काळ हा
 'ईश्वर प्रणिधनात' सत्कारणी घालावा.

अशा प्रकारे हे सात नित्य विधी आहेत. नित्यविधींना 'माहेर' म्हटले आहे, कारण या विधीत स्वेच्छा, उत्स्फूर्तता असते.
       नैमित्यविधी :- काही निमीत्ताने केल्या जाणाऱ्या विधीना 'निमित्त्य विधी' असे म्हणतात. 'निमित्त्य विधीना' सासर असे म्हणतात. कारण येथे सक्ती कठोरपणा आहे. निमित्त्य विधी पुढीलप्रमाणे आहेत.
१] संग :-
पंथाच्या श्रध्देने जो कोणी नवा व्यक्ती येईल त्याला संग द्यावा. "नवेयासी संग द्यावा" असे सुत्र येथे सांगितले आहे.
२] सांगात :-
पंथाचे जे ज्ञानी अधिकारी
 [ ज्ञातविरक्त ] आहे त्यांचा समागम करावा. त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. या बाबत सुत्र असे "ज्ञाता विरक्तांचा सांगात करावा"
३] भेट :-
पंथाचे तीर्थक्षेत्रे आणि आधिकारी [ज्ञातविरक्त] यांची भेट घ्यावी ती भेट अवचित किंवा बुध्दया जाऊन करावी. या संबंधी सुत्र सांगते "भ्रमत भ्रमता भेटी का आपजउनी भेटी"
४] सुश्रुषा :-
 जेष्ठ साधक व अशक्त रुग्ण अश्या पंथातील अनुसरलेल्या साधकांची वेळ प्रंसगी सेवा करावी. यालाच सुश्रृषा असे म्हणतात. "आपल्या पडीलीयाची सुश्रृषा करावी" असे सुत्र येथे या बाबत सांगता येते.
       वरील सर्व विधी हे पुर्वकालीक अनुसरलेल्या, संन्यस्त साधकांसाठी सांगितले आहेत. पण पंथाच्या प्रपंच करणाऱ्या उपासकांसाठी सुध्दा काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत.
   उपासकांसाठी विधी :- या पंथाच्या सांसारीक उपासकांचे चार प्रकार मानण्यात येतात.
१] नामधारक/संसारीक साधक :-
 असे उपासक नुकतेच अनुग्रह घेतलेले व पंचनाम माहित असलेले असतात.
२] वेधवंत :-
असे उपासक पंथाचे पूर्वज्ञान पंथाला आकर्षित होऊन पंथात आलेले असतात.
३] बोधवंत :-
या प्रकारचे उपासक पंथाविषयी संपुर्ण ज्ञान बाळगून असतात. आणि पंथीय श्रध्दा पूर्ण आदराने पाळत असतात.
४] वासनिक :-
अश्या प्रकारचे साधक उपासक संख्येने कमीच असतात, अश्या उपासकांना पूर्णकालीक संन्यस्त साधक व्हायचे असते, पण काही सांसारीक जबाबदाऱ्यामुळे वचनपूर्ततेमुळे हे पंथात दीक्षा घेऊ शकत नाही.
     वर उल्लेखलेल्या सर्व अनुयायांनी उपासकांनी पुढील सात व्यसनांपासून दूर रहावे.
१] जुगार खेळणे
२] मांसाहार करणे
३] वेश्यागमन करणे
४] परस्री सेवना करणे
५] मद्यपान करणे
६] चोरी करणे
७] हिंसा करणे
       अहिंसेबद्दल या पंथाचा कडक कटाक्ष आहे. "हिंसा वर्ते तिये स्थानी महात्मेया असु नये"
हे सुत्र हेच सांगते की प्रत्यक्ष तर सोडाच पण दुसरे कोणी हिंसेने वागत असतील तर तेथेही  राहू नये.
      हिंसा तीन प्रकारची मानतात.
१] आगान्तुक हिंसा म्हणजे मानसिक हिंसा
२] अनारब्ध हिंसा म्हणजे वाचिक हिंसा
३] प्रारब्ध हिंसा म्हणजे कृतीतून हिंसा
     अशा प्रकारे वरील 'विधीनिषेध' हे सर्वांसाठी सांगितले आहेत.
   समारोप :-
       आज भारतात इतर धर्मपंथाच्या तुलनेत महानुभाव पंथ संख्येने कमी आहे. पण वरील सर्व विवेचनावरून हे नक्कीच लक्षात येते की भारताच्या संस्कृतीमध्ये या पंथाने गुणात्मक अशी मोलाची भर नक्कीच घातली आहे.
                                           डॉ. प्रज्ञा देशपांडे [नागपूर]



        संदर्भ - गोपाल कपाटे
gopalkapate123@gmail.com
संपर्क- 9604708768 / 9405275212
निमोण ता संगमनेर जि अहमदनगर

भक्तिरसाचे प्रियकरत्व !

भक्तिरसाचे प्रियकरत्व !
भजन,भक्ती,भक्ती,भक्तिभाव,भजनी लागणे इत्यादि इत्यादि फुरसतीत करण़्याच्या ,म्हाता-यांच्या फारच झाले तर प्रौढ महिलांच्या आवडीचा, सवयीचा,टाईमपासचा विषय नव्हे का?
 उलटपक्षी बॉलिवुडसाँग त्यातही रोमँटिक, सर्वांना भावणारे हवेहवेसे, गुणगुणण्या योग्य वाटतात. कुठे भजन अन् कुठे हे रोमँटिक गाणे!
एकाने इह सोडून परमार्थाच्या शोधात रहावे तर
 दुस-याने प्रियेतच परम अर्थ आहे हेच ठाम समजावे !
दोघांचा कुठेच काही मेळ बसत नाही.

 बॉलिवुड गीत सर्व जनमानसात प्रसिद्ध तर सत्संग-भजनीमंडळाची गाणे तुलनेत डाऊनमार्केट !
मग काय ?काहीजण कुठे कुठे हिंदी चित्रपट गीतांच्या
 चालीवर भजन लिहितात,म्हणतात.
उदा. बिडी जलायलेच्या चालीवर," दिया जलायले ",सावन का महिना पवन करे सोरच्या चालीवर " सावन का महिना मंदिरमे है शोर ", परदेसी परदेसी जाना नही च्या चालीवर" शिरडी के शिरडी के साईबाबा दरशन दो दर्शन दो". इ इ.
 असे शाब्दिक लटपटी-खटपटी करीत शब्दांशी कुस्ती, शब्दांचे चितपट करीत भजनं बेतली जातात. "भिन्नरुचिः लोकः " म्हणून काही लोकांना ते आवडतात. कोणाकोणाचे त्यामुऴे मनोरंजन होते तर कोणाला ती बाजारुभक्ती वाटते.असो.
मध्यंतर (चुकून) एका बाबांचे प्रवचन (की बोलबचन) कानी आले. प्रवचन सुरू होते ते ' तू इस त-हा से मेरी जिंदगी मे शामील है ' या गाण्यावर पहिले दचकलेच ,मग हसू आले. चिंतन करु लागले आणि एक वेगळच आयाम लक्षात आला.पिक्चरचे गाणं सगऴे जण अनन्यभक्तिभावाने एकाग्रतेने म्हणत होते. अभंग,श्लोक,आरती,भक्तिगीत ऐकलेल्या माझ्या कानांना,नवविधा भक्ती पाहिलेल्या माझ्या  डोळ्यांना अन् परंपरावादी मनाला हे सर्व झेपतच नव्हते. घरी आल्यावर  किती तरी वेऴा तेच तेच दृश्य मनःचक्षुंपुढे उभे रहात होते.
मन विचार करू लागले .......पिक्चरच्या ते ही रोमँटिक गाण्यात भक्ती(?) असते ??? मग बसल्या बसल्या जुन्या-नव्या हिंदी गाण्यांची उजळणी केली


1)एक तू ना मिला सारी दुनिया मिले भी तो क्या है ......
2)तू मंजिल तू ही मेरी पूजा तुम ही देवता हो......

3)तेरी आखों के सिवा दुनिया मे रक्खा क्या है.......

4)जब कोई बात बिगड जाये जब कोई मुश्किल पड जाये ......

5)जिया लागे ना ,तेरे बिना मेरा कही ...........

6)तुम जो मिल गये हो तो ये लगता है .......

7)तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही........

8)हमे और जिने की चाहत ना होती .......

9)तुम बिन जाऊ कहा ,ये दुनिया मे आके ........

10)ये दिल तुम बीन  कही लगता नही हम क्या करे.....

11)तुम से ही दिन होता है ,सुरमयी शाम आती है, तुमसे ही ,हर घडी सांस आती है ,जिंदगी कहलाती है...............

12)आप जैसा कोई मेरी जिंदगी मे आये तो बात बन जाये........


गाणे म्हणून पहावे. देवाला,ईश्वराला प्रियकर/प्रेयसी
( समजून)कल्पून पाहिले........तर खरंच ...भक्तिगीतच वाटले सर्व गाणे ,तेही खोल आध्यात्मिक अर्थासह... ! ! मग एक एक पुराणकथा आठवल्या.... ......मीराबाई ' मेरे तो गिरिधर गोपाल दुसरो न कोई... ' असे म्हणत कृष्णाच्या प्रेमात बुडल्या होत्या. कान्होपात्रा ,जनाबाई,सखुबाई इ.इ. सर्वजणी विठ्ठलभक्त होत्या. एकनाथांच्या गवळणी, ज्ञानेश्वरांच्या विराणी,लावणीचे काही प्रकार इ.इ. वर वर श्रुंगाररस अन् आंतरिक आध्यात्मच होत्या ना! प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांचे मधुराद्वैतवाद काय किंवा कात्यायनी व्रत काय किंवा ब्रह्माकुमारीज् काय ..सर्वांना ईश्वर प्रियतम म्हणूनच भावतो ना ! सुफीसांप्रदाय बहुधा याच धारणेतून निघालाय.

भजन,भक्ति या मध्ये मूळ संस्कृत धातू आहे भज्. ,ज्याचा अर्थ आस्वाद घेणे,उपभोगणे,भजन करणे हा होतो.कोणत्याही  गोष्टींचा आपण शरीर-मन-भावना याद्वारे आस्वाद घेतल्या शिवाय ,उपभोग घेतल्या शिवाय त्या गोष्टींच्या भजनी आपण लागू शकतो कां ?
 रामं रमेशं भजे किंवा भज गोविंदम् यातून काय कळतं तर रामाचे भजन करा ,गोविंदाचे भजन करा ,पण भजन करण्या अगोदर त्यात रममाण होता आले पाहिजे ना ,तर रममाण होण्यासाठी मुळात रस असला पाहिजे ना ,
अन्यथा भजन कसे शक्य होणार ?

एक संस्कृत श्लोक आहे, ' तमाखुपत्रं राजेंद्र भज माज्ञानदायकम्''  ,या एकाच ओळीचे दोन वेगवेगळ्या प्रकारे विभाजन केले की दोन अर्थ निघतात.
 1) हे राजेंद्र गुंगी आणणारे तंबाखुचे पान तू खाऊ नकोस.
(2) हे राजेंद्र पैसे अन् ज्ञान देणा-या गणपतीचे तू भजन कर.

 म्हणजे पहा .खाणे अन् भजन करणे यासाठी एकच धातू तो आहे'' भज्  "
 
साहित्यामध्ये नऊ रस मानतात.त्यामध्ये श्रुंगाररस हा महत्त्वपूर्ण रस आहे.श्रुंगाररसाचा मूळभाव ' रती '  म्हटल्या जातो . देवताविषयक वाटणा-या रतीतून भक्ती निर्माण होते तर पुत्रसदृश्यांच्या विषयी
 वाटणा-या रतीतून वात्सल्य निर्माण होते.

भारतीय संसकृतीच्या गौरवशाली परंपरेत अनेकांनी देवाला पुत्र ,पिता,बंधू,सखा,प्रियकर,पती,स्वामी इ .इ.रूपात पाहिले आहे.मग हे म्हणणे वावगे ठरणार नाही की श्रुंगाररसाचेच विस्तारित रूप म्हणजे भक्ती आणि वात्सल्य . मग श्रुंगाराचेच विस्तारित प्रगटीकरण म्हणजे देशभक्ती,देवभक्ती, गुरुभक्ती,मातृभक्ती,पितृभक्ती नव्हे काय?
कोणी देवाला प्रियकर मानावे की प्रियकराला देव ,हे ज्याचे त्याचे स्वातंत्र्य नव्हे कां ? गाण्यातून आध्यात्म शिकावे की  आध्यात्माचे गाणे  हे सुद्धा ज्याचे त्याचे स्वातंत्र्य नव्हे कां ?
                                 
  डॉ. सौ. प्रज्ञा शरद देशपांडे
                                      pradnyadeshpande1@yahoo.com

Saturday, January 7, 2017

प्रत्येकाचे आकाश......

प्रत्येकाचे असते त्याचे त्याचे आकाश।
ज्याच्या त्याच्या परी तेच असते खास।।१।।

वास्तवाचे चटके ज्याचे त्याला जाळी।
आपलेच भोग जणु आपल्याच भाळी।।२।।

डोंगरभर कष्ट आणि ऊरभर आशा।
ज्याने त्याने सांभाळावा आपलाच गाशा।।३।।

प्रत्येकाच्या डोळ्यात असते गोड स्वप्न।
रक्ताचेही पाणी करून त्याला नीट जपणं।।४।।

वास्तवात झेपत नाही स्वप्नामधली बात ।
तेव्हा घेतो प्रत्येक जण आकाशाची साथ।।५।।

प्रत्येकच्या आकाशात असतात खुप कप्पे।
त्यात अधिक भर टाकतात आयुष्यातील टप्पे।।६।।

आयुष्य म्हणजे चढउतार ।
आकाश कायम नितळ अपार।।७।।

आयुष्याला घेरतात कधी निराशेचे क्षण।
आकाशातील स्वप्नचांदणं उजळून टाकतात मन ।।८॥

प्रत्येकाला असावे असे खास आकाश।
ज्याने त्याने व्हावा स्वत:चाच प्रकाश।।९।।
२८/७/२०१६ प्रज्ञा देशपांडे

श्रद्धा-अंधश्रद्धा

श्रद्धा-अंधश्रद्धा

श्रद्धा-अंधश्रद्धा महाकाव्यात *अंधश्रद्धजना: एते नित्यं धूर्तै: वंचिता:*असा उल्लेख आलाय.

श्रद्धा- अंधश्रद्धा ह्या भावनाच आहेत. बरेचदा एखाद्याची श्रद्धा दुस-यासाठी अंधश्रद्धा ठरू शकते. अनेकदा *आपला तो सोन्या दुस-याचा तो कार्टा* अशी अवस्था *श्रद्धा-अंधश्रद्ध* या बद्दल असते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नमो नम: