#चिंतन.
आजचा विद्यार्थी -चक्रव्युहात फसलेला अभिमन्यू .
अभिमन्यू ,कोवळा पण उत्साहसंपन्न वीर योद्धा . अोढून आलेल्या प्रसंगाला धैर्याने सामोरे जातो . चक्रव्यूहात सगळ्या थोर महान् दिग्गज तेही जवळच्या नातेवाईकांविरुद्ध एकाकी लढत होता . मदत करणारे मार्गदर्शक जवळ नव्हते. पराक्रमाची शर्थ केली त्याने , अनुभवाची कमी , अपूर्ण ज्ञान पण ध्येयासक्ती अफाट . बरीच झुंज दिली पण शेवटी गारद झाला दुनियादारीच्या रगाड्यात .
हे सगळं आठवायचे कारण आजचीे शिक्षणव्यवस्था , ट्युशनचे महाभारत नि आजचा अभिमन्यू विद्यार्थी . कोणे एके काळी सहायक , पूरक म्हणून सुरू झालेला हा उपक्रम संपूर्ण व्यवस्थेला गिळंकृत करणारा अमरवेल ठरत आहे .
आजचा काळ प्रचंड संक्रमणाचा काळ आहे . सामाजिक , राजकीय , सांकृतिक , कौटुंबिक
सा-यांचा परिणाम शिक्षणक्षेत्रावर होतांना दिसतो आहे . यातच शिक्षणक्षेत्राचे प्रचंड अपयश दडले आहे . ज्या क्षेत्राने समाजाला दिशा द्यायची तेच आज दिशाहीन वाटू लागले . जो तो घटक भाराभिभूत , संभ्रमित तात्त्विक आदर्शवादी होऊ पाहतो आहे . 'परोपदेशे पांडित्य' सुचविणारे अनेक सोकॉल्ड शिक्षणतज्ज्ञ , स्वनामधन्य मान्यवर आज या क्षेत्रात प्रचंड वाढले आहेतच.
जागतिक स्पर्धा , वेगवान् परिवर्तने , नव्या युगाची आव्हाने नि वर्षानुवर्षांच्या रूढींवर चाललेले शिक्षण यांचा परिपाक म्हणजे आजची संक्रमणावस्था नि संभ्रमण . या सगळ्यांच्या गलबल्यात एकाकी लढणारा वा हारलेला अभिमन्यू रूपी आजचा विद्यार्थी .
परिस्थिती गंभीर चिंतनीय आहेच . सुदैवाने शासनाने अनेक ठोस पावले भराभर उचलले आहेतच . पण क्षेत्राच्या अंगी भिनलेले अनेक विकार सहज बदलतील असे नाही. उलट चांगल्या बदलांना स्वत:च्या क्षुद्र स्वार्थासाठी वाटेल तसे बदलतील . छोटं उदाहरण देऊन स्पष्ट करते. काही वर्षांपूर्वी सातत्यपूर्ण संर्वंकष मूल्यमापन पद्धत
सा-या भारताप्रमाणे महाराष्ट्रात लागू केली होती . मुलांचे दैनिक निरीक्षण करणे , त्यांच्या प्रगतीची नोंद ठेवणे , कलागुणांची नोंद करणे. जे कमी आहे ते योग्य रितीने वाढविणे इत्यादि बाबी अपेक्षित होत्या .
पण इतके वर्षांचे फलित काय तर दैनिक बोंबाबोंब !
शालेय शिक्षणाची ही अवस्था तर कनिष्ठ महाविद्यालय किंवा उच्चमाध्यमिक स्तराची त्याहूनही भयंकर गती आहे .
मूळात ११ व १२ वी हा अत्यल्पसंख्याक घटक असून अतिदुर्लक्षित आहे. यातही दोन प्रकार आढळतात. एक वरिष्ठ महाविद्यालयास जोडलेला तर दुसरा शाळेला जोडलेला . शिक्षणविभाग रूपी इंजिन समान असून एक एक्सप्रेस गाडी तर दुसरी मालगाडी इतका दोहोंशी वागण्यात भेदभाव आहे. काही वर्षांपूर्वीच्या माजी शिक्षणमंत्र्यांच्या कृपेने त्यात अजून एक वर्ग तयार झाला , तो म्हणजे कायमविना अनुदानित म्हणजे सामान्य भाषेत रोजंदारी शिक्षक . आधीच अल्पसंख्याक त्यात असंघटीत, मग काय ? मुका बिचारा कुणीही हाका !
साधारणपणे १२वी नंतर विविध पदवी-अभ्यासक्रम असतात . म्हणजे ११ नि १२ हा शैक्षणिक स्तर शालेयशिक्षण व पदवीशिक्षण यांना जोडणारा दुआ आहे . पण फार वर्षांपासून या स्तराकडे गांभीर्याने कोणीच पाहिले नाही.
ना पेशा म्हणून लागलेल्या शिक्षकांनी , ना पालकांनी ना संस्थाचालकांनी , ना शिक्षण विभागाने व वक्रदृष्टीने पाहिले ते अख्ख्या शिक्षण- यंत्रणेच्या मुळावर उठलेल्या ट्युशनच्या धंद्याने .
शिक्षक ही वृत्ती नसून पेशा आहे हेच इतके वर्ष समाजाच्या अंगी भिनले आहे. या सगळ्या कारणांमुळे सगळ्यात मोठे नुकसान विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे होते आहे. पर्यायाने वर्तमान पालकांचेच आर्थिक स्वरूपात प्रत्यक्ष नुकसान होते आहे . या स्तराला शिकविणा-या शिक्षकांचा बौद्धिक -हास होतोय तो वेगळा .
आज या स्तरात शिकणा-या विद्यार्थ्याची अवस्था अभिमन्यू सारखी झाली आहे यात शंकाच नाही .
क्लास ,कॉलेज ,करियर यांच्या चक्रव्यूहात तो पुरता अडकलाय. कित्तेक वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे खच्चीकरण , अवमूल्यन , अवप्रतिष्ठा , उपेक्षा त्यांनी स्वत: तर केलीच आहे शिवाय शासनातील भ्रष्ट घटक , संस्थाचालक , माजलेले ट्युशनसम्राट तसेच अधिकार व कर्तव्य यांची गफलत झालेला समाज हेही घटक या अधोगतीला कारणीभूत आहेत .
जेवढे जेवढे या चक्रव्यूहातून सुटण्याचा प्रयत्न करावा तितकं अधिक फसल्या जात आहे.
आता एकेका घटकांचा विचार करू.
शिक्षक =
आज उच्चमाध्यमिक शिक्षक म्हणजे असून अडचण नसून खोळंबा झालाय. शिकवायची इच्छा आहे पण विद्यार्थी नाहीत . विद्यार्थी आहेत तर शाळा-कॉलेजने लादलेल्या शिक्षणेतर कामात गुंतलेला असतो . त्यामुळे काम नाही नि पगार भरपूर म्हणून शाळेचे इतर घटक प्रचंड जळतात . इकडे विषय ज्ञान गंजते म्हणून शिक्षकांची तगमग होते . प्रवेशाच्या वेळीच पालक सांगतात , अमूक ट्युशन लावल्या आहेत तर कॉलेज नाही केले तर चालेल ना ?
ट्युशन शिक्षक सांगतात , "कॉलेजच्या मास्तरला १२वीचे ही येत नाही . ते काय फक्त बोर्डाच्या पेपरापुरता कामाचे . तसेही त्यांना तुम्हाला पास करावेच लागेल , काही ऐकू नका त्यांचे ".
अशा रितीने सारीकडून नडल्या गेलेला असतो या स्तरावरचा शिक्षक . खरे तर पदव्युत्तर पदवी व शिक्षणशास्त्र पदवी ही किमान अर्हता आहे या स्तरावर नोकरी मिळविण्याची . उलट ट्युशनच्या शिक्षकांच्या पदव्या नि अनुभव तपासायची गरज आहे . पण. . .
उच्चमाध्यमिक शिक्षकांनी उपलब्ध विद्यार्थ्यांना मनापासून शिकविले तर हळूहळू उपस्थिती सुधारेल . हा सुखद अनुभव आजकाल येतो आहे .ही अच्छे दिनची सुरवात आहे .
शासनातील भ्रष्ट घटक =
"तळे राखील तोच पाणी चाखेल " या म्हणीची सत्यता पटवून देण्यासाठीच सरकारी कचेरीचा जन्म झाला कि काय असे सामान्यांना वाटते . तरी बरे आजकाल तंत्रज्ञान व माहितीचा अधिकार आहे . पूर्वी सुद्धा चांगले लोक होते , आताही आहेत . पण काही निवडक नि नग मंडळींमुळे संपूर्ण यंत्रणेवर संशय येतो .
स्थानिक शाळा-कॉलेजाची अद्ययावत माहिती स्थानिक शासन प्रणालीला पुरेपुर माहित असते. तरी देखिल भूगोल नसलेल्या, सोय़ीसुविधा नसलेल्या संस्थेला मान्यता देणे , क्षमतेपेक्षा जास्त भरती झाली तरी तपासणीत पास करणे . कोणी कोणाशी कितीत टायप केला ? हे माहित असून सहीसलामत सोडणे. वृत्तपत्रांमध्ये राळ उडवली गेली किंवा वरून बडग्या आला तरी थातूतमारूर कारवाई करीत खाल्ल्या अन्नाला जागणे असे अनेक सुरस प्रकार या यंत्रणेत बघायला मिळतात . बरेचदा यांच्याच आशीर्वादाने स्थानिक ट्युशन लॉबी तणासारखी फैलते .
संस्थाचालक =
स्वातंत्रोत्तर काळात शिक्षण देणे हे व्रत होते आता हॉटधंदा आहे. व 'धंदे में सब जायज है ' ! काही तुरळक शैक्षणिक संस्था सोडल्या तर सामान्यांना या धंदेवाईक शैक्षणिक संस्थानिकांचा अनुभव येतोच येतो . सरकार कोणाचेही येऊद्या यांची स्वत:ची दुकानदारी अभंग राखण्यात यश मिळवितातच ते . "महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहाती" हे वाक्य जणु नसानसातून भिनलेली ही जमात , शाळेतील शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्या पर्यंत शासनाच्या ख-या योजना , शासनाची खरी भूमिका पोहचूच देत नाहीत . सर्व लाभ वरचेवर लाटून बाकी घटकांना कसाबसा जिवंत ठेवतात . सुशिक्षित बेरोजगारांचे लाचार लोंढे यांचे सहज बळी ठरतात यांचे . विद्यार्थी तर आपण कोणत्या षडयंत्रात अडकलो आहे हे समजण्यापूर्वीच दुस-या मोठ्या (इंजिनिअरिंग/मेडिकल प्रवेश) वर्तुळात अलगद अडकला असतो. पालकांविषयी स्वतंत्र लिहावे लागेल.
पैसा-सत्ता यांच्या जोरावर ही संस्थानिक मंडळी प्रभावशाली ठरतात . मग "बळी तो कान पिळी" होणारच .
ट्यूशन सम्राट =
आज नव्या व्यवसायाची भरभराट झाली आहे ती म्हणजे "ट्युशन"! बिनाभांडवलाचा , विना खर्चाचा तरी १०० टक्के नफ्याचा "दस उंगलीयाँ घी में।" असा एकमेवाद्वितीय धंदा म्हणजे ट्यूशन .
" मिया का ही सर ,मिया का ही जुता " या न्यायाने विद्यार्थ्यांचेच पैसे , विद्यार्थ्यांचाच वेळ , विद्यार्थ्यांचेच प्रयत्न मात्र यांचे नाव-सत्ता-माज . हेच चित्र आजकाल जास्त दिसत आहे. १०० ते २०० इतके विद्यार्थी एकेका बॅचमध्ये . दोन ते तीन लाख फी प्रत्येक विद्यार्थ्याकडून अॅडमिशच्या वेळी अर्धी फी नि काहीच महिन्यात उरलेली फी . व्यवसायात पहिले माल व मग किंमत हे सूत्र असते . इथे म्हणजे सारं उलटच . विद्यार्थ्याचा निकाल नीट लागला नाही तर नालायकीचे खापर त्याच्यावरच अलगद फोडले जाते. इतक्या मोठ्ठ्या समूहात सगळंच समजेल इतका प्रत्येक विद्यार्थी हूशार नसतो. शिवाय दोन वर्ष सतत आठाठ तास दडपणात अभ्यास करणे सा-यांनाच झेपत नाही . विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कुवतीपेक्षा यांना आर्थिक कुवतच अपेक्षित असते.
पूर्वी शाळा-कॉलेजाच्या वेळे नंतर क्लासेस चालायचे आता हेच ट्यूशनवाले शाळाकॉलेजला वेठीस धरून , त्यांच्याच वेळेत क्लासेस ठेवतात.
मध्यंतरी एक किस्सा ऐकायला मिळाला . नागपुरातील ब-यापैकी डॉन क्लासशी नागपुरातील नामांकित हूशार कॉलेजने टायप केले. समसमा संयोगाने दोघेही भरभरून फळले. मग कॉलेजची खांदेपालट झाली. नवे प्राचार्य काही डॉनच्या चरणी गेले नाही. त्यांना वाटले आतापर्यंत आपला दबदबा होता नि आहे देखिल तर मग डॉनला दुसरा पर्याय काय ? पण इथे अंदाज चुकला. जे कॉलेज तिस-या वा दहाच्या पुढे होते त्यांनी मधल्या काळात डॉनची मर्जी संपादित केली . अन् नागपूरचे शैक्षणिक चित्र पालटले . दहा-पंधरा वर्षे निर्विवाद नंबर एकवाले डाऊनमार्केट झाले नि ढप्पू-पप्पूची कॉलेजेस सरसर वर सरकली . हा महिमा नि प्रभाव पाहून भल्या भल्यांनी नतमस्तक होणे पसंत केले.
अशा अनेक सुरस कहाण्या शिक्षण क्षेत्रात मोठ्या भक्तिभावाने सांगितल्या जातात.
ट्यूशनवाल्यांची कोटीच्या कोटी उड्डाणे हा स्वतंत्र लेखविषय आहे. MBA फायनान्सची अॅडव्हांस ब्रांच म्हणून MBA ट्युशन अॅडमिनिस्ट्रेशन वा फायनान्स निघाले तर नवल वाटू नये इतके या क्षेत्राचे अमीट योगदान आहे.
सपनों का सौदागर म्हणजेच ट्यूशन ! अनिर्बंध ,अमर्याद , अनियंत्रित या शब्दांनाही मर्यादा पडावी इतकं हे क्षेत्र खोल आहे .
पालक =
अत्यूच्चशिक्षित ते अशिक्षित पालक असो पाल्यांच्या बाबत सगळे एकजात असहाय नि अव्यवहारी होतात . इथेच शिक्षणक्षेत्राच्या ससेहोलपाटीला सुरवात होते . माझा पाल्य "मोठ्ठा" झाला पाहिजे म्हणजे भौतिक सुख संपत्तीयुक्त एवढेच स्वप्न त्यांचे ,चारित्र्यनिर्माण-सुदृढशरीर-राष्ट्रभक्ती वगैरे नंतर पाहू हीच मानसिकता.
शाळा-कॉलेजात समजत नाही मग लाव ट्यूशन . तेथेही समजत नाही मग होमट्यूटर . तेही नाही झेपत तर पुन्हा दुसरे दुकान शोधा.अोता पैसा नि करा हूशार ही मानसिकता !
थोडा धीर धरणे , थोडा शालेयव्यवस्थेवर विश्वास ठेवणे नि त्यांच्याच कडून शिक्षण करवून घेण्याचा दबाव टाकणे या गोष्टी पालकांनी केल्या ना तर आजच्या सगळ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळून समाज सुरळित होईल , शिक्षणक्षेत्रातील हे निराशाजनक चित्र पालटेल.
पण सुरवात कोणी करावी ? हा मोठाच प्रश्न आहे.
आजकालच्या शिक्षण समस्येकडे अजून म्हणावे तेवढे सजग व सक्रियतेने समाज पाहात नाही म्हणून समस्या सुटत नाही.
या लेखातून समस्येविषयी फार सविस्तरपणे लिहिल्या गेले नाही. एका लेखात आटपेल इतकी सोपी ही समस्या नाही. पण किमान थोडी धूळ झटकावी हा या लेखाचा उद्देश.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेयशिक्षण समृद्ध करून धनदांडग्यांची दुकाने बंद करण्याची नितांत गरज आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर.