Tuesday, December 31, 2019

#सहजोक्त.


गेले दोनतीन दिवस कडाक्याचा गारठा , त्यात  काल पासून पाऊस ! मग काय ढगाळ-हिवाळा ! सारीकडे पेंगुळणारे वातावरण ! सकाळी फिरायला जायला निघणार तर पाऊस , मृद्गंधासह !    मग काय , 'आधीच  उल्ल्हास , त्यात पौष मास!' फिरायला जायला तयार झालेली मी परत बिछान्यात , दुलईत गडप झाली.  पृथ्वीच्या कक्षेतून उपग्रह पाठवणं सोपंय पण अशा झोपाळू हवेत स्वतःला बिछान्यातून बाहेर काढणं अवघड !
काय मस्त झोपरं झोपरं वातावरण आहे आज दिवसभर ! स्वतःला शालीत लपेटून खिडकीपासच्या  दिवाणावर ,  मोठ्या मग भरून कडक कॉफीचा भुरका घेत निवांत पीत बसायचं , मंद आवाजात गझल  किंवा जुनी हिंदी गाणी ऐकायची असं ठरवलं मनात . न् एफेम् रेडिअो लावला. जे गाणं लागलं तेही आवडतंच गाणं होतं  .
मौसम पिच्चरमधलं ते गुलजारने लिहिलेलं गाणं दोन वेगवेगळ्या मुडमध्ये गायलेलं आहे. मला भूपेंद्रच्या अावाजातील संथ न् गंभीर चालीतलं गाणं जास्त भावतं . न् तेच रेडिअोत लागलं नेमकं .

  कधी तरी अशा वातावरणात फक्त न् फक्त स्वतःसाठी वेळ ठेवावा राखून . आजूबाजूला कोणीच नको. स्वतःच्या हृदयाचे ठोकेही सहज ऐकू यावेत न् धमण्यातून वाहणा-या रक्ताची हालचाल कळावी इतकं तन्मय व्हावं स्वतःत !
  मंद आवाजातील सुरेल गाणी सुद्धा हळूहळू विरून जावीत. आत्मलीन , आत्ममग्न होऊन आपल्याच पंचज्ञानेंद्रियांनी अनुभवावे फुरसती क्षण . कुठली गडबड नको , गोंधळ नको  , कोणाचेही नियंत्रण नको. बस श्वास घ्यावा नि सोडावा. स्मरण , चिंतन , मनन , उजळणीही नकोच नको. शून्यवत् व्हावं आत-बाहेर .
  एरवी व्यवहारिक जीवनात चार-ट्रॅकवर  धावपळ करावी. चोवीस तासातले अठ्ठेचाळीस तास भरपूर व्याप-ताप लावून घ्यावेत , यशस्वीपणे निभवावे. पण दोन-तीन महिन्यातून एकदा तरी आपणच आपल्यासाठी असावे ,  विशेष  क्षण  जागवे , नाही कां ?
  असे खास क्षण मनाला अधिक चैतन्यमय करतात , येणारे बिकट आव्हानही लीलया पेलण्याची ताकद देतात.
रोज रोज तेच तेच दैनिक कामं करून मरगळ येतेच . असा एखादा 'फुकट व्यर्थ' घालवण्याचाही  दिवस असावा ना नशीबात. नेमकं तसं मिळालं नाही तर मग काय ? हेच या गाण्यात लिहिलय गुलजारने.

दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात दिन -
बैठे रहे तसव्वुर-ए-जानाँ किये हुए .॥
 जाड़ों की नर्म धूप और आँगन में लेट कर
 आँखों पे खींचकर तेरे आँचल के साए को
 औंधे पड़े रहे कभी करवट लिये हुए ॥१॥
  वादी में गूँजती हुई खामोशियाँ सुनें आँखों में भीगे भीगे से लम्हे लिये हुए ॥२॥  दिल ढूँढता है फिर वही फ़ुरसत के रात...
  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
  

Monday, December 30, 2019

#सहजोक्त.



#कविता.
क्षणा क्षणाचे हे जीवन ,कणा कणाने जगावे ।
मणामणाच्या दडपणाने मरणा आधी कां मरावे ।।
मानते जगणे नाही सोपे ,जागोजागी येथे धोके ।
सुखांशाच्या प्रतीक्षेचे शोधत जाणे नुसते मोके ।।
आजवर जे घडून गेले ,कशास गुंता पुन्हा तेथे ।
परतून येते न ते कधीही ,मनोरंजनी व्यर्थ स्मरते ।।
हवे हवेसे किंवा नकुसे ,अनुभव मर्मांकित वा हृद्य ।
पुनरपि वांछा कितीही तुम्ही,पुन: प्रत्ययाशक्य सद्य।
घडून गेले भूत जाहले ,भावी स्वप्न,म्हणूनि अप्रत्यक्ष।
वर्तमान जे आज या क्षणी, उपभोगावे मना तू दक्ष ।
आयुष्याचे सात रंग हे भले असो वा बुरे तरीही।
अंतरंगुनी मनापासूनी टिपून घ्यावे रीत खरी ।।
© डॅा प्रज्ञा देशपांडे

Sunday, December 29, 2019

#सहजोक्त.


श्रद्धा-अंधश्रद्धा.

वेदांमध्ये  *श्रद्धासूक्त*  आहेत.
*श्रद्धया कृतम् इति श्राद्धम्* असे मानतात. शिष्याला उपदेश करतात पहिले *श्रद्धस्व* असे सांगतात. भगवद्गीतेतही *श्रद्धावान् लभते ज्ञानम्*  असे म्हटले आहे. *धम्मपदातही* श्रद्धेचे महत्व मानले आहे. श्रद्धा महत्वाचीच आहे. त्याचे आलंबन योग्य वा अयोग्य असू शकते. ते सापेक्षही असू शकते . पण श्रद्धेशिवाय ज्ञान अशक्यच.
*अंधश्रद्धा*  हा शब्द मराठीत *लोकनायक बापुजी अणे*  यांनी आणला म्हटले तर वावगे ठरू नये. *तिलकयशोर्णव* या त्यांच्या संस्कृत महाकाव्यात *अंधश्रद्धजना: एते नित्यं धूर्तै: वंचिता:* असा उल्लेख आलाय.

श्रद्धा- अंधश्रद्धा ह्या भावनाच आहेत. बरेचदा एखाद्याची श्रद्धा दुस-यासाठी अंधश्रद्धा ठरू शकते. अनेकदा *आपला तो सोन्या दुस-याचा तो कार्टा* अशी अवस्था *श्रद्धा-अंधश्रद्ध* या बद्दल असते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Thursday, December 26, 2019

#सहजोक्त.

#सहजोक्त.

काही चाळता चाळता एक श्लोक वाचण्यात आला . कधी कधी अवचितपणे काही समर्पक गवसतं ते असं !
वक्तारः किं करिष्यन्ति श्रोता यत्र न विद्यते ।
नग्नक्षपणके देशे रजकः किं करिष्यति ॥
संस्कृत असूनही सरळ न् सोपं आहे समजायला.  "श्रोतेच नसतील तर वक्त्याने काय बरं करावं ? नागासाधुंच्या प्रदेशात धोब्याने काय काम  करावे बरे  ?" .
जेथे ज्या गोष्टीची गरजच नाही तेथे ती गोष्ट असून नसल्या सारखीच असते. मग अश्या वेळी ती नसलेली अधिक चांगली.
श्लोकाच्या स्पष्टीकरणासाठी व्यवहारातील अनेक उदाहरणं  देता येतील.आपल्या आयुष्यात अनेकदा , श्लोकातील  वक्त्यासारखी वा धोब्यासारखी अवस्था झाली असेलही.
आता हेच पहा की श्रोते नाही , सर्व व्यवस्था नीट केलेली आहे , हॉल सज्ज आहे. आता वक्त्याने काय करावे ? एकतर सोडून निघून यावे अथवा ज्या भाषणाची तयारी केली ते भाषण परिपूर्ण तयारीने सादर करावे. एवीतेवी कोणी असो अथवा नसो , आपला सराव होतो , आपण आपला सराव कां सोडायचा ? तीच गोष्ट नागासाधूंच्या देशाची. ते कपडे घालणारच नाहीत असां विचार न करता , कष्टसाध्य कां असेना , रजकाचा (धोब्याचा) व्यवसाय चालेल , यासाठी अतोनात प्रयत्न करायला हवे.
 श्लोकातील वक्ता अथवा धोब्यासारखी  वेळी  आली तर आपण नेमकं काय केलं ? यावर आपलं आजचं व्यक्तिमत्व न्  यशापयश अवलंबून असते.
 बरेचदा परिस्थिती अशीच असते .  मग  खापर फोडणे , निराश होणे , कोल्हाला द्राक्षे आंबट वाटणे , अर्ध्यातून पळून जाणे ,  परत त्या वाटी न जाणे ,  चुन्या सारखं सतत उबजणे इत्यादी इत्यादी न वागता ;  संथं , सातत्याने  कृतिशील सर्जनत्व अबाधित राखणे  , हाच खरा पुरुषार्थ !
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.



Monday, December 16, 2019

#वाकळ ~ एक संस्कार .

#सहजोक्त.
वाकळ शिवणे ही सध्याच्या काळात लुप्त झालेली कला आहे. वागळ , गोधडी म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ करण्याचा उपक्रम असे .   गरीबांची रजई असलेली वाकळ हळूहळू ग्रामीण भागातूनही  जवळ जवळ हद्दपार झालीय . शिलाईमशीनवर शिवतात काहीजण वाकळ , पण ती खरी वाकळ नाहीच . वाकळ शिवायला कसब , धीर न् ममत्व लागतं , "मोले घेतले शिवाया"  चालत नाही.
आमच्या लहानपणी खेड्यात घरोघरी वाकळीच असायच्या . उन्हाळ्यात आंथरण्यासाठी , हिवाळ्यात पांघरण्यासाठी तर कधी पार्टिशन म्हणूनही वाकळ उपयोगात येत असे.
वाकळ थंडीत गरम तर गर्मीत  हवी-हवीशी असे .
आजकाल महिला उद्योगात काही ठिकाणी वाकळ शिवतात , विकतात पण 'ती' सर नाहीच येत.
वाळत शिवण्याची पूर्वतयारी वर्ष वर्ष आधी करावी लागते. घरातील सर्वांचे वापरून वापरून फारच जुने , जीर्ण झालेले कपडे नीट धुवून जमा करून ठेवायचे. शर्ट , बंडी , झबले ,फ्रॉक इत्यादी इत्यादी कपड्यांच्या शिलाया उसवायच्या मग प्रत्येक छोटा मोठा चौकोन एकमेकांना जोडत जोडत मोठमोठे आयत-चौकोन तयार करायचे. फारच छोटे चौकट-कापटं असेल तर बाजूला राखून ठेवायचे , वाकळीवरचे डिझाईन काढायला. इकडे लुगडे , धोतर , साड्या ,  लुंग्या , अोढण्या यांनाही स्वच्छ धुवून एकमेकांना जोडायचे. म्हणजे एकमेकांवर ठेऊन नव्हे तर टोकाला टोक जोडत कमीत कमी चार न् जास्तीत जास्त ( सोय न् इच्छेनुसार) कितीही जोडायचे . आता या लांबच लांब जोड-कापडाला  साडेपाच / सहाफूट किंवा अधिक अश्या बेताने घड्या घालाव्या . मध्ये भरण म्हणून छोट्या कपड्यांपासून बनवलेल्या चौकटी , जुन्या कांबळीचे चौकोनी तुकडे टाकावे मग बाहेरून आत असे धावदोरा घालत जावे. धावदोरा इतका सफाईदार असावा की खालून व वरून गुंतागुंत नको. एकसारखं डिझाईन दिसावं . अशी पाचसहा स्तर असलेली वाकळ तयार झाली की मग छोट्या छोट्या चिंध्यांपासून पानं-फुलं , चिमण्या  , चांदणे असे वरून डिझाईनदार पॅच करावे. मग पूर्ण वाकळ तयार झाली की छान स्वच्छ धूवून कडक वाळवावी. ही झाली खरोखरची वाकळ. अशी मऊसुत , प्रेमळ-उबदार वाकळ बनवायला कधीकधी वर्षानुवर्षाच्या कपड्यांची साठवणूक करावी लागायची. जुन्या काळी वाकळ शिवणे , हे मुख्य काम नसून घरादाराची ,शेतीची कामे करून फावल्या वेळात करायचा उद्योग होता. चिकाटी , निटनेटकेपण , निरालस प्रयत्न  ,  प्रचंड कौशल्य न् घरातील प्रत्येक सदस्याविषयी मनापासून प्रेम   इत्यादी मुख्य  भांडवलावर वाकळ तयार होते.
आजकाल -  बाजारत जा , (सॉरी मॉलमध्ये जा ), पैसे फेक , (सॉरी कार्ड स्वाईप कर  किंवा गुगलपे कर ) नि मखमली रजई घे , असा प्रकार आहे . हे खरं स्वस्त न् ऐतखाऊ प्रकरण झालं आहे . उलट वाकळ तयार करणं अत्यंत किचकट व  मौलव्यान प्रक्रिया आहे.

एक एक चिंधी सुद्धा जोडून वाकळ तयार करणारी संस्कृती जेव्हा होती तेव्हा जातीपाती असूनही प्रेमाचे धागे न् मायेची ऊब कमी झाली नव्हती.  आज सारंच  नाते न् समाज पैशांच्या किमतीनुसार  स्टँडर्ड  ऊब विकत घ्यायला निघालाय . मग वाकळ शिवायचे संस्कार न् वाकळ देण्या- घेण्याची ऐपत  उरलीय  कुठे ?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.