Sunday, June 21, 2020

#सहजोक्त.

#शब्दचिंतन
खरे तर किती तरी दिवसांपासून शब्दचिंतन लिहायचं लिहायचं असं डोक्यात होतं . आज दुपारी तर चक्क शब्दरंजनही केलं , पण लिहिलं नाही . मग मात्र  स्वतःलाच ताकीद दिली न् लिहायला (म्हणजे टायपायला) बसली.
# तुझे ठायी माझी भक्ती । विरुढावी गणपती॥
तुझे ठायी ज्याची प्रीती । त्याची घडावी संगती ॥
#ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे
त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे ॥
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ।
तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही ॥
#म्हातारा इतुका न अवघे , पाऊणशे वयमान ।
दंताजीचे उठले ठाणे , नन्ना करिते मान !।
#ग्रंथ ठेवावा शुद्ध स्थानी । शुद्ध वस्त्री,  शुद्ध मनी ॥
हे झाले गीत , अभंगातील . आता व्यावहारिक भाषेत बघू .
#त्याचा कुठेच धड ठिकाणा नसतो.
#ध्रुवाचे स्थान अढळ अाहे.
# पोलिसठाण्या समोर मारुती मंदिर  आहे.
#ठाई ठाई तोच भरलाय चराचरात.
#बसस्थानक इथून जरा दूर आहे.
# ऐकणा-यांच्या मनाचा ठाव घेणारे त्यांचे शब्द सर्वांना  तोषवायचे.
#काय देवा , असता कुठे आजकाल ? काय ठावठिकाणा नाही ?
#अजुन किती वेळ तिष्ठत राहायचे ?
 कळवून टाका म्हणावं एकदाचं काय ते !
 # अतिपावसामुळे  फारच वाईट स्थिती झाली बघा शेताची.
 #अशा भीषण महामारीमुळे  सर्वच सार्वजनिक कार्यक्रम स्थगित केले आहे.
 #या संबंधीचे स्थगन आदेश वरूनच आले आहेत.
 # स्थिर मन आणि फिरते शरीर हेच स्वस्थ जीवनाचे रहस्य आहे.
 #विधिवत् स्थापन केलेली मूर्ती .

वरील पैकी  अनेक वाक्यांमध्ये   असे काही शब्द आहेत , ज्याचा अर्थ "स्थान"  हा  होतो.
ते शब्द आहेत , ठिकाण , ठाणे , ठायी , ठाई , ठाव , ठाणं ,  ठावठिकाणा , स्थानक , तिष्ठत रहाणे ,   इत्यादी.

हे सर्व शब्द वेगवेगळे दिसतात . ह्या शब्दांचे व्युत्पत्तिस्थान  एकच आहे.
स्था (तिष्ठ)  [ थांबणे)   या मूळ धातू पसरलेली ही विविध रूपे आहेत.
स्था > स्थान > ठाण  > ठाणे
स्थायी >  ठाय > ठायी >  ठाई
स्थायी > ठाय > ठाव 
स्थानक > ठानक  > ठिकाण
स्था> तिष्ठति > तिष्ठत  (रहाणे).
या शब्दांपैकी आजच्या दैनिक भाषेत आपण किती शब्द सहज योजतो /वापरतो ? याचा प्रत्येकानी विचार करावा. आपली भाषा किती समृद्ध आहे  , हे जाणून जास्तीत जास्त आपले शब्द वापरावेत.

 स्थानवाचक शब्दांशिवाय  इतर शब्दांचाही विचार करू.   स्थिर , स्थिती , स्थगन , स्थगिती , स्थापना 
ही सुद्धा  स्था(तिष्ठ) याच मूळ धातूपासून तयार होतात.
याशिवाय परिस्थिती , संस्था  वगैरे शब्दांतही हाच मूळ धातू आहे.

शब्दांचा अभ्यास करणे म्हणजे महावृक्षाची पाने मोजत बसण्यासारखं आहे.   तर मूळ धातूंचा अभ्यास करणे बियांची परीक्षा करणे होय.
 दैनिक बोलचालीत  आपल्याला मूळच कळले तर नवनविन शब्द घडवताही येतील .
 जुन्या-नव्या  , प्रमाण-बोली आदी सर्वच भाषांमधले शब्द अधिकाधिक वापरून भाषाश्रीमंती वाढती ठेवावी , नाही कां ?
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.








Thursday, June 18, 2020

#सहजोक्त.

#बागड/अमरवेल/परजीवी
आमच्या लहानपणी सगळ्या घरांच्या कुंपणाला हिरवीगार , कडवट वासाची बागड  ऊर्फ मेंदी असायची. भींतीसारखी जाड ,हिरवीकंच राखण्यात गृहस्वामीचे कौतुक असे . सरसकट सगळ्यांचे जीवन सायकल सारखे विना प्रदूषण ,विना आवाजाचे अन् स्वतःच्या कुवतीच्या गतीने पुढ सरकणारेे होते. कुठेच कर्णकटू भोंगे वा अोव्हरटेक नव्हते. वेगाचा उन्माद नव्हता.
जाड भींतीसारख्या बागडीतून अंगणातले आवाज ,अंधूक दृश्य रस्त्याहून दिसे न् घराच्या अंगणातून रस्त्यावरचे सारे दिसे.लाकडी फाटकाशी उभे राहिले तर सरळ मागच्या अंगणात काय सुरु आहे हे दिसणार ! इतकी सरळ ,पारदर्शी गृहरचना सगळ्यांचीच होती.  न मागता सर्वत्र  ट्रांसपरेंसी हेच त्याकाळाचे व्यवच्छेदक लक्षण .  सायंकाळी उन्हं  उतरल्यावर अंगणात पाणी शिंपडतांना मेंदीवरही शिंपडायचे. गार झुळूक अोघाने यायची.
दुपारी बक-या पाळणारे कळप घेऊन समोरच्या मैदानात येत. बक-यांना ,गाई-म्हशींना ही बागड खाद्य म्हणून चालत नसे कदाचित तिचे वेगळे कडवटपण कारण असावे. मग असे मेंढपाळ त्या मेंदीवर पिवळ्या रंगांचे वायर सारखा  वाढणारा पशुखाद्य असा  अमरवेल टाकायचे. त्या हिरव्याकंच बागडीवर पिवळाजर्द तो वेल ; रंगसंगतीनुसार तसा छानच दिसत असे. आम्ही वायर म्हणून अोढून खेळायचो त्याच्याशी. या हिरव्या बागडीला उग्रवासाची पांढरी फुले यायची . त्या फुलांचा गजरा कोणीच घालत नसे कारण त्या फुलांमुळे डोक्यात उवा होतात असा समज! या पिवळ्या वायरवेलालाही पांढरट तु-यासारखा  बहार यायचा. 
या पिवळ्या वेलीमुळे बागड सुकते ,पिवळीवेल परजीवी तर आहेच पण ज्यांच्या जिवावर जगते त्यांना ती जगू देत नाही ,त्यांचा जीवनरस शोषून घेते असा अनुभव आहे. म्हणून मोठी जाणती माणसं या पिवळ्या वायरीला खेचून काढायचे.
बरेच दिवसांनी बाळपणीचा हा अनुभव  दृष्टांतासारखा सुचला काही प्रसंगावरून  ! चालायचेच  !!!
बागड ,अमरवेल , मेंढपाळ ,गृहस्वामी , रंगसंगतीने डोळ्यांना सुख वाटणारे आमच्या सारखे दर्शक  आदी सगळे  "जीवो जीवस्य जीवनम्।" साधणारे घटक होय ; हे मात्र निर्विवाद !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Monday, June 15, 2020

सहजोक्त

#शब्दचिंतन .
काल सारखंच आजही ढगं दाटून आले. भर दुपारी अंधार पडला . न् पाऊस कोसळू लागला.  लाईनही गेली .मग काय करावं ? खिडकीत बसून  धो धो कोसळता पाऊस , अंधारलेलं आसमंत न् चिंब भिजणारी झाडं-पाखरं बघू लागली. अशा पावसाळी , काळोख्या दिवसाला संस्कृतात  'दुर्दिन' म्हणतात. किती चपखल आहे ना ?

 या अंधारी पावसाळी दिवसाला "मेघाच्छन्नदिनम् " असं अमरकोशात म्हणतात.  दुर्दिनाला घनान्धकार सुद्धा म्हणतात.  दुर्दिन म्हणजे काय तर  “घनान्धकारे वृष्टौ च दुर्द्दिनं कवयो विदुः ॥”  बरसणारा  घनांधकारी दिवस .

 संस्कृतातील किती तरी काव्यांमध्ये कवींनी  या दुर्दिनाचे वर्णन अतिशय हळूवारपणे न् प्रणयपोषक केले आहे.
 अशा दुर्दिनी अभिसारिका लपत छपत अभिसार करायला जाते वगैरे. जसे कुमारसंभवात एके ठिकाणी ,   “यत्रौषधिप्रकाशेन नक्तं दर्शितसञ्चराः । अनभिज्ञास्तमिस्राणां दुर्दिनेष्वभिसारिकाः ॥"(। ६ । ४३ ।)

संस्कृत साहित्यात  दुर्दिन हा प्रेमी जीवांसाठी भलेही सुयोग न् आनंददायी वर्णिला असला तरी  सामान्यांना तो काहूर माजवणारा , हुरहूर वाढवणारा,  काहीसा उदास वाटतो.

 खरोखर मनाला चुटपूट लावणारा हा दुर्+दिन असतो कां ?  रिकाम्या मनाला हे चोचले सुचणं स्वाभाविक आहे.
 "सम्प्राप्ते दुर्द्दिने काले दुर्द्दिनं भाति वै नभः ॥”(हरिवंशे । ६७ । ६६ । )   एकूण मनच निराश असेल तर सर्वच अंधारलेलं दिसते.

  स्वतःच्या कर्तव्यात अखंड बुडलेल्यांना सुदिन काय की दुर्दिन काय ? सारे सारखेच असतात. आपले कर्तव्य नियमितपणे केले की  अशुभ काहीच होत नाही. सर्वच शुभ घडत असते.
 “सुदिनं दुर्द्दिनञ्चैव सर्व्वं कर्म्मोद्भवे भव । तत् कर्म्म तपसां साध्यं कर्म्मणाञ्च शुभाशुभम् ॥”  ( ब्रह्मवैवर्त पुराण)

ढगाळ पावसाळी  बरसत्या काळोख्या दिवसाला भलेही दुर्दिन म्हटले तरी कर्तव्यपरायणांसाठी  सगळेच दिवस सुदिन  अन् कामचुकारांसाठी  सगळेच दिवस दुर्दिन असतात , हेच खरे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.








Sunday, June 14, 2020

#सहजोक्त.


संथ वाहते कृष्णामाई
तीरावरल्या सुख दुःखांची
जाणीव तिजला नाही ....
गाणं बरेचदा कानावर पडले आहे.  नदीवर मानवी भावभावनांचा आरोप करून चेतनगुणोक्ती साधत केलेलं हे काव्य. आधुनिक वाल्मिकी , रससिद्ध कवीश्वर ग. दि. माडगुळकर यांची ही रचना.

कवितेचा संपूर्ण आशय बघता  , 'नदी तिच्या गतीने वाहते , कोणी पूजा वा निंदा , तिला व्यवधान नाही. तीरावरच्या मानवी सुख-दुःखांशी घेणे-देणे नाही.'
हे सर्व आरोप नदीलाच नाही तर  सगळ्या निसर्गाला लागू होतात. दगड , माती ,डोंगर ,तलाव , झाडे , जंगल , जंगली श्वापदे न्  धादांत स्वार्थी माणूस !  नाही कां ?

निसर्ग परवडला एकवेळेस ! किमान तो इतरांना दावणीला जुंपत नाही . पण स्वकेंद्री माणसाचे नेमके उलट असते. असो. 

तसं बघता वृक्षवल्ली , पर्यावरण घटक 
इतरांच्या जीवनात स्वार्थी लुडबुड न करता ,  आत्ममग्न राहून सर्जकतेने स्वतःचे जीवन जगत असतात.  त्यांचे जगणे परस्परानुकूल तरीही  आत्मनिर्भर असेच असते  . आणि यांच्या अशाच जगण्याने मानवी जीवन समृद्ध होत असते.

कल्पनारम्य म्हणून असा विचार करू की हे निसर्गघटक मानवी भावभावनांच्यात गुंतू लागले. मग तेही कोणाशी तरी जवळिक साधतील. कोणाला तरी फटकारतील . कोणावर मेहरबान होतील तर कोणाला दे माय धरणी ठाय करतील .
इतकेच नाही , तर त्यांच्यातही उच्च-नीच , गरीब-श्रीमंत , मूलनिवासी-उपरे , अल्पसंख्याक -बहुसंख्याक असे भेद होतील . मानवी स्वभावाशी सह-अनुभूत झाल्यावर त्यांच्यातही वैचारिक , तात्विक  वगैरे संघटना होतील.  तसेच तेही सोयीचे राजकारण करतील.
असं झाले तर काय भीषण होईल , होय ना ? माणसांना जगताच येणार नाही. म्हणून निसर्गघटक अलिप्त असतात हेच उत्तम .


मानवांनी आपले गुण निसर्गावर आरोपित करण्याची इच्छा न करता निसर्गाकडून खूप काही शिकावे.
बाह्य परिस्थितीला न जुमानता आपल्याच गतीने ,आपल्याच प्राणशक्तीने  पण  प्रचंड स्वयंशिस्तीत जगण्याचा या निसर्गाचा गुण माणूस इतके वर्षात कां घेऊ शकला नाही ? याचे निसर्गालाही कोडे पडले असेल नाही कां ?
त्यामुळे संथ वाहणा-या कृष्णामाईला वाहू द्यावे , निसर्गाला त्याचे निसर्गत्व निभवू द्यावे. इतकी माणुसकी नक्की जपावी.
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

Sunday, June 7, 2020

सहजोक्त

#शब्दचिंतन.
आज एक मराठी वाक्प्रचार आठवला.
"कच्छपी लागणे" . कच्छपी लागणे याचा अर्थ आश्रय करणे , तंत्राने चालणे , मागे मागे करणे , त्रास देणे ,पाठपुरवठा करणे , नादी लागणे इत्यादी होतो.
शब्दांचे चिंतन करायला मनापासून आवडते. आज हा वाक्पचार आठवला मग लागली याचे चिंतन करायला.
कच्छ , कच्छप , कच्छपी हे वेगवेगळे शब्द तर आहेतच त्यांचा अर्थही वेगवेगळा आहे.
कच्छ म्हणजे पानथळ जमीन , समुद्रकिना-याची पानथळ जमीन , नावेचा विशिष्ट भाग , दलदलीचा भाग वगैरे अर्थ होतात.
कच्छप  याचा अर्थ  गूढाङ्गः , धरणीधरः, कच्छेष्टः , पल्वलावासः , कठिनपृष्ठकः , पञ्चसुप्तः, क्रोडाङ्गः म्हणजे  कासव . कच्छपचा अजून एक अर्थ लाल देवदार  असा होतो. असे म्हणतात की कच्छप हा मल्लयुद्धातील एक पवित्रा अथवा चाल असते.
 
तर कच्छपी म्हणजे कूर्म्मी ,डुलिः,  दुलिः ,  कमठी  म्हणजे कासवी .
कच्छपीचा दुसरा अर्थ वीणाविशेष म्हणजे सरस्वतीवीणा  असाही अर्थ आहे तर आयुर्वेदाने  क्षुद्ररोगविशेष  असेही म्हटले आहे. 

आता "कच्छपी लागणे" हा वाक्प्रचार नेमका कधी ? कसा ? आणि कां रूढ झाला असेल ? हे मोठेच कोडे पडले मला.
जर कोणी यावर भाष्य करून समजावून सांगेल तर मग या शब्दाच्या परत कच्छपी लागणार नाही मी.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.





  

Wednesday, June 3, 2020

#सहजोक्त.


#भानुतीर्थ.

सा रम्या नगरी महान् स नृपतिः सामन्तचक्रं च तत्
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत् ताः चन्द्रबिम्बाननाः ।
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहः ते वन्दिनः ताः कथाः
सर्वं यस्य वशात् अगात् स्मृतिपथं कालाय तस्मै नमः॥
बलवान् काळाचे महात्म्य सांगणारा हा श्लोक . किती तरी नंदत्या , वैभवशाली र‍ाजवटी या काळाने कवलीभूत केल्या आहेत.

 आज मोठ-मोठे विकसित शहर म्हणून  जे नगरं उदयाला आली आहेत , ते प्राचीन काळात होतेच असे नाही. तसेच तेव्हाची नगरं आज जंगल , गाव , मैदान वा रया नसलेले नगर असू शकते.

 भारतात कितीतरी असे प्राचीन वैभवशाली वारसे आहेत .  उत्खनन , पुनरुज्जीवन केले की लक्षात येते , त्याकाळातील विकसित , सुसंस्कृत समाज न् त्यावेळचे दक्ष राज्यकर्ते . आज पुरातत्वविद्येची  आणि स्थानिक खंबीर प्रशासनाची आवश्यकता आहे.

आज सर्व आठवण्याचे कारणही तसेच आहे.  आजच्या वर्तमानात नांदेड जिल्ह्यातील माहूर ही एक  तहसील आहे. आजचे माहूर पाहिले की ग्रामीण  खाणाखुणा डोळ्याला प्रकर्षाने जाणवतात.  कोणे एके काळी इथे नांदते   प्रगत राज्य असेल याची कल्पनाही येत नाही. पुराणकाळापासून प्रसिद्ध  असलेल्या या तीर्थक्षेत्राची  आजची स्थिती तेथे गेल्यावर जाणवते.

आमचे कुलदैवत म्हणून तीसेक वर्षांपासून तेथे दरवर्षी आमचे जाणे होते. काही वर्षांपासून माहूरचे रूपडे वेगाने  पालटत आहे.  आजकाल शहरांप्रमाणेच गावांचाही बाह्यांगी विकास करण्याचा सपाटा शासनाने चालवला आहे , त्यातीलच हा एक ; असा माझा समज होता. पण माहूरचा विकास हा निव्वळ बाह्यांगी आधुनिक नसून प्राचीन वारश्याचे पुनरुज्जीवन करून संपन्न देखभालही तेथे सुयोग्य पद्धतीने होत आहे , हे जाणवले. या मागची प्रेरणा व सद्बुद्धी नक्कीच आई रेणुका आहे असे वाटून तिला नमोमन हात जोडले.

  माहूरच्या धार्मिक -सांस्कृतिक वारश्याचा ख-या अर्थाने सुयोग्य वारस म्हणजे श्री. निलेश केदार. श्री. निलेश यांच्याकडे पाहिले की रेणुकेचे अनन्यभक्त कवी विष्णुदास यांचीच आठवण येते.
सध्याचे  रेणुका मंदिर प्रशासनही या कामासाठी तत्पर आहे.  अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी रेणुकाच योजना करते ,  यात शंका नाही. याच जोडीला सुदैवाने माहूरच्या  समृध्द वारश्याला जाणणारे कर्तव्यदक्ष व काटेकोर योजना करून कार्यान्वित करणारे स्थानिक प्रशासक  श्री. वरणगावकर तेथे तहसिलदार म्हणून कार्यरत आहेत.

 सुजाण व सक्रिय नागरिक आणि दक्ष , उद्यमी प्रशासन यांचा मणिकांचन योग जुळला की तेथे चांगले होणेच आहे . हे माहूरला घडतय.
 मातृतीर्थाचा जीर्णोद्धार , विष्णुकवींच्या मठाचा जीर्णोद्धार  , शिवाय तेथील प्राचीन अनेक बाबींची यादी करून लवकरात लवकर जीर्णोद्धार करायचे स्थानकं यांची यादी. असे अनेक प्रकल्प   रेणुका संस्थान ,  स्थानिक प्रशासन व श्री. केदारांसारखे जागरुक नागरिक यांच्या समन्वयाने माहूरमध्ये सफलरित्या होत आहेत.
 सध्या तेथे भानुतीर्थ नावाचे स्थानक दुरुस्तीचे कार्य सुरु आहे. पिण्यायोग्य पाण्यांच्या स्रोतांचे पुन्हा पुनरुज्जीवन करून त्याचे गतवैभव त्याला मिळवून देत , तीर्थस्थानाचे महत्व पुनर्प्रस्थापित करणें हे सर्व कार्य जोमात सुरु आहे.

माहूरच्या प्राचीन वारश्याला सर्व प्रकारे जपणा-या या सर्वांना कृतज्ञतापूर्वक  वंदन .
भारतातील ठायी ठायी असणा-या अशा दुर्लक्षित वारश्यांचाही भाग्योदय व्हावा हीच जगन्नियंत्याकडे प्रार्थना.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
  

Monday, June 1, 2020

सहजोक्त.


# चिंतन.
अम्भोजिनीवननिवासविलासमेव
हंसस्य हन्ति नितरां कुपितो विधाता
न त्वस्य दुग्धजलभेदविधौ प्रसिद्धां
वैदग्ध्यकीर्तिमपहर्तुमसौ समर्थः ॥
कोपलेला विधाता हंसाचे कमलवन , पाणी वगैरे काढून घेऊ शकतो पण दूध-पाणी वेगळं करण्याचे कसब न् तशी कीर्ती मात्र काढून  घेऊ शकत नाही.
दोन दिवसांपूर्वी माझी ज्येष्ठ सखी डॉ. रंजना दाते मॅडम यांनी फेसबुकवर हा श्लोक पोस्ट केला. त्या श्लोकाचा साधारण आशय दिला आहे.
या श्लोकाचे स्पष्टीकरण देण्यापेक्षा एका लोकोत्तर नेत्याची कथाच सांगते.
लोकनायक बापुजी अणे उपाख्य माधव श्रीहरी अणे (ऑगस्ट २९,इ.स. १८८०-जानेवारी २६,इ.स. १९६८) हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेते आणि स्वातंत्र्योत्तर भारत देशातील राजकारणी होते. ते जानेवारी १२,इ.स. १९४८ ते जून १४,इ.स. १९५२ या काळात बिहार राज्याचे राज्यपाल होते.
तसेच  अपक्ष उमेदवार म्हणून इ.स. १९६२ आणि   इ.स. १९६७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये  महाराष्ट्र राज्यातील नागपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या निवडक लेखांचे ‘अक्षरमाधव’ हे पुस्तक निघाले, तर ‘श्रीतिलकयशोर्णव’ या बापूजींनी रचलेल्या संस्कृत काव्यास साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला होता.

तर असे हे  बापुजी अणे मुळचे यवतमाळचे. त्यांचे वडिल  वेदशास्त्रसंपन्न होते. वडिलांनी  यांनाही ते ज्ञान दिले होते. पुढे बापुजी  नागपुरातील मॉरीस कॉलेजातून बीए झाले . नंतर कलकत्ता येथून वकीलीची पदवी घेतली. या सर्व काळात स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतच होते.   स्वातंत्र्य लढ्यात  सहभाग घेतला म्हणजे शासना विरुद्ध बंड म्हणून त्यांची  सनद एक वर्षासाठी थांबवून ठेवली होती. बापुजी उदास झाले. घरी विमनस्क बसले असता त्यांच्या वडिलांनी म्हटले , "अरे ते तुझी सनद काढून घेऊ शकतात , तुझ्या डोक्यातील बुद्धी नाही. वकिली नाही करता आली तरी काय झालं ? गरजूंना सल्ला देऊ शकतो . रामायण-महाभारतावरील प्रवचनांनीही पोट भरता येते . निराश  वा लाचार होण्याची गरज नाही ".
पुढे वर्षभराने त्यांना सनद मिळाली. आणि आपल्या बुद्धिसामर्थ्याने तत्कालीन भारतीय राजकारणावर त्यानी प्रभाव टाकला.
श्लोकाचा  मथितार्थ आजही  आचरणीय आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.