संथ वाहते कृष्णामाई
तीरावरल्या सुख दुःखांची
जाणीव तिजला नाही ....
गाणं बरेचदा कानावर पडले आहे. नदीवर मानवी भावभावनांचा आरोप करून चेतनगुणोक्ती साधत केलेलं हे काव्य. आधुनिक वाल्मिकी , रससिद्ध कवीश्वर ग. दि. माडगुळकर यांची ही रचना.
कवितेचा संपूर्ण आशय बघता , 'नदी तिच्या गतीने वाहते , कोणी पूजा वा निंदा , तिला व्यवधान नाही. तीरावरच्या मानवी सुख-दुःखांशी घेणे-देणे नाही.'
हे सर्व आरोप नदीलाच नाही तर सगळ्या निसर्गाला लागू होतात. दगड , माती ,डोंगर ,तलाव , झाडे , जंगल , जंगली श्वापदे न् धादांत स्वार्थी माणूस ! नाही कां ?
निसर्ग परवडला एकवेळेस ! किमान तो इतरांना दावणीला जुंपत नाही . पण स्वकेंद्री माणसाचे नेमके उलट असते. असो.
तसं बघता वृक्षवल्ली , पर्यावरण घटक
इतरांच्या जीवनात स्वार्थी लुडबुड न करता , आत्ममग्न राहून सर्जकतेने स्वतःचे जीवन जगत असतात. त्यांचे जगणे परस्परानुकूल तरीही आत्मनिर्भर असेच असते . आणि यांच्या अशाच जगण्याने मानवी जीवन समृद्ध होत असते.
कल्पनारम्य म्हणून असा विचार करू की हे निसर्गघटक मानवी भावभावनांच्यात गुंतू लागले. मग तेही कोणाशी तरी जवळिक साधतील. कोणाला तरी फटकारतील . कोणावर मेहरबान होतील तर कोणाला दे माय धरणी ठाय करतील .
इतकेच नाही , तर त्यांच्यातही उच्च-नीच , गरीब-श्रीमंत , मूलनिवासी-उपरे , अल्पसंख्याक -बहुसंख्याक असे भेद होतील . मानवी स्वभावाशी सह-अनुभूत झाल्यावर त्यांच्यातही वैचारिक , तात्विक वगैरे संघटना होतील. तसेच तेही सोयीचे राजकारण करतील.
असं झाले तर काय भीषण होईल , होय ना ? माणसांना जगताच येणार नाही. म्हणून निसर्गघटक अलिप्त असतात हेच उत्तम .
मानवांनी आपले गुण निसर्गावर आरोपित करण्याची इच्छा न करता निसर्गाकडून खूप काही शिकावे.
बाह्य परिस्थितीला न जुमानता आपल्याच गतीने ,आपल्याच प्राणशक्तीने पण प्रचंड स्वयंशिस्तीत जगण्याचा या निसर्गाचा गुण माणूस इतके वर्षात कां घेऊ शकला नाही ? याचे निसर्गालाही कोडे पडले असेल नाही कां ?
त्यामुळे संथ वाहणा-या कृष्णामाईला वाहू द्यावे , निसर्गाला त्याचे निसर्गत्व निभवू द्यावे. इतकी माणुसकी नक्की जपावी.
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment