Sunday, June 14, 2020

#सहजोक्त.


संथ वाहते कृष्णामाई
तीरावरल्या सुख दुःखांची
जाणीव तिजला नाही ....
गाणं बरेचदा कानावर पडले आहे.  नदीवर मानवी भावभावनांचा आरोप करून चेतनगुणोक्ती साधत केलेलं हे काव्य. आधुनिक वाल्मिकी , रससिद्ध कवीश्वर ग. दि. माडगुळकर यांची ही रचना.

कवितेचा संपूर्ण आशय बघता  , 'नदी तिच्या गतीने वाहते , कोणी पूजा वा निंदा , तिला व्यवधान नाही. तीरावरच्या मानवी सुख-दुःखांशी घेणे-देणे नाही.'
हे सर्व आरोप नदीलाच नाही तर  सगळ्या निसर्गाला लागू होतात. दगड , माती ,डोंगर ,तलाव , झाडे , जंगल , जंगली श्वापदे न्  धादांत स्वार्थी माणूस !  नाही कां ?

निसर्ग परवडला एकवेळेस ! किमान तो इतरांना दावणीला जुंपत नाही . पण स्वकेंद्री माणसाचे नेमके उलट असते. असो. 

तसं बघता वृक्षवल्ली , पर्यावरण घटक 
इतरांच्या जीवनात स्वार्थी लुडबुड न करता ,  आत्ममग्न राहून सर्जकतेने स्वतःचे जीवन जगत असतात.  त्यांचे जगणे परस्परानुकूल तरीही  आत्मनिर्भर असेच असते  . आणि यांच्या अशाच जगण्याने मानवी जीवन समृद्ध होत असते.

कल्पनारम्य म्हणून असा विचार करू की हे निसर्गघटक मानवी भावभावनांच्यात गुंतू लागले. मग तेही कोणाशी तरी जवळिक साधतील. कोणाला तरी फटकारतील . कोणावर मेहरबान होतील तर कोणाला दे माय धरणी ठाय करतील .
इतकेच नाही , तर त्यांच्यातही उच्च-नीच , गरीब-श्रीमंत , मूलनिवासी-उपरे , अल्पसंख्याक -बहुसंख्याक असे भेद होतील . मानवी स्वभावाशी सह-अनुभूत झाल्यावर त्यांच्यातही वैचारिक , तात्विक  वगैरे संघटना होतील.  तसेच तेही सोयीचे राजकारण करतील.
असं झाले तर काय भीषण होईल , होय ना ? माणसांना जगताच येणार नाही. म्हणून निसर्गघटक अलिप्त असतात हेच उत्तम .


मानवांनी आपले गुण निसर्गावर आरोपित करण्याची इच्छा न करता निसर्गाकडून खूप काही शिकावे.
बाह्य परिस्थितीला न जुमानता आपल्याच गतीने ,आपल्याच प्राणशक्तीने  पण  प्रचंड स्वयंशिस्तीत जगण्याचा या निसर्गाचा गुण माणूस इतके वर्षात कां घेऊ शकला नाही ? याचे निसर्गालाही कोडे पडले असेल नाही कां ?
त्यामुळे संथ वाहणा-या कृष्णामाईला वाहू द्यावे , निसर्गाला त्याचे निसर्गत्व निभवू द्यावे. इतकी माणुसकी नक्की जपावी.
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment