Monday, June 1, 2020

सहजोक्त.


# चिंतन.
अम्भोजिनीवननिवासविलासमेव
हंसस्य हन्ति नितरां कुपितो विधाता
न त्वस्य दुग्धजलभेदविधौ प्रसिद्धां
वैदग्ध्यकीर्तिमपहर्तुमसौ समर्थः ॥
कोपलेला विधाता हंसाचे कमलवन , पाणी वगैरे काढून घेऊ शकतो पण दूध-पाणी वेगळं करण्याचे कसब न् तशी कीर्ती मात्र काढून  घेऊ शकत नाही.
दोन दिवसांपूर्वी माझी ज्येष्ठ सखी डॉ. रंजना दाते मॅडम यांनी फेसबुकवर हा श्लोक पोस्ट केला. त्या श्लोकाचा साधारण आशय दिला आहे.
या श्लोकाचे स्पष्टीकरण देण्यापेक्षा एका लोकोत्तर नेत्याची कथाच सांगते.
लोकनायक बापुजी अणे उपाख्य माधव श्रीहरी अणे (ऑगस्ट २९,इ.स. १८८०-जानेवारी २६,इ.स. १९६८) हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेते आणि स्वातंत्र्योत्तर भारत देशातील राजकारणी होते. ते जानेवारी १२,इ.स. १९४८ ते जून १४,इ.स. १९५२ या काळात बिहार राज्याचे राज्यपाल होते.
तसेच  अपक्ष उमेदवार म्हणून इ.स. १९६२ आणि   इ.स. १९६७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये  महाराष्ट्र राज्यातील नागपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या निवडक लेखांचे ‘अक्षरमाधव’ हे पुस्तक निघाले, तर ‘श्रीतिलकयशोर्णव’ या बापूजींनी रचलेल्या संस्कृत काव्यास साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला होता.

तर असे हे  बापुजी अणे मुळचे यवतमाळचे. त्यांचे वडिल  वेदशास्त्रसंपन्न होते. वडिलांनी  यांनाही ते ज्ञान दिले होते. पुढे बापुजी  नागपुरातील मॉरीस कॉलेजातून बीए झाले . नंतर कलकत्ता येथून वकीलीची पदवी घेतली. या सर्व काळात स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतच होते.   स्वातंत्र्य लढ्यात  सहभाग घेतला म्हणजे शासना विरुद्ध बंड म्हणून त्यांची  सनद एक वर्षासाठी थांबवून ठेवली होती. बापुजी उदास झाले. घरी विमनस्क बसले असता त्यांच्या वडिलांनी म्हटले , "अरे ते तुझी सनद काढून घेऊ शकतात , तुझ्या डोक्यातील बुद्धी नाही. वकिली नाही करता आली तरी काय झालं ? गरजूंना सल्ला देऊ शकतो . रामायण-महाभारतावरील प्रवचनांनीही पोट भरता येते . निराश  वा लाचार होण्याची गरज नाही ".
पुढे वर्षभराने त्यांना सनद मिळाली. आणि आपल्या बुद्धिसामर्थ्याने तत्कालीन भारतीय राजकारणावर त्यानी प्रभाव टाकला.
श्लोकाचा  मथितार्थ आजही  आचरणीय आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.




No comments:

Post a Comment