Wednesday, June 3, 2020

#सहजोक्त.


#भानुतीर्थ.

सा रम्या नगरी महान् स नृपतिः सामन्तचक्रं च तत्
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत् ताः चन्द्रबिम्बाननाः ।
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहः ते वन्दिनः ताः कथाः
सर्वं यस्य वशात् अगात् स्मृतिपथं कालाय तस्मै नमः॥
बलवान् काळाचे महात्म्य सांगणारा हा श्लोक . किती तरी नंदत्या , वैभवशाली र‍ाजवटी या काळाने कवलीभूत केल्या आहेत.

 आज मोठ-मोठे विकसित शहर म्हणून  जे नगरं उदयाला आली आहेत , ते प्राचीन काळात होतेच असे नाही. तसेच तेव्हाची नगरं आज जंगल , गाव , मैदान वा रया नसलेले नगर असू शकते.

 भारतात कितीतरी असे प्राचीन वैभवशाली वारसे आहेत .  उत्खनन , पुनरुज्जीवन केले की लक्षात येते , त्याकाळातील विकसित , सुसंस्कृत समाज न् त्यावेळचे दक्ष राज्यकर्ते . आज पुरातत्वविद्येची  आणि स्थानिक खंबीर प्रशासनाची आवश्यकता आहे.

आज सर्व आठवण्याचे कारणही तसेच आहे.  आजच्या वर्तमानात नांदेड जिल्ह्यातील माहूर ही एक  तहसील आहे. आजचे माहूर पाहिले की ग्रामीण  खाणाखुणा डोळ्याला प्रकर्षाने जाणवतात.  कोणे एके काळी इथे नांदते   प्रगत राज्य असेल याची कल्पनाही येत नाही. पुराणकाळापासून प्रसिद्ध  असलेल्या या तीर्थक्षेत्राची  आजची स्थिती तेथे गेल्यावर जाणवते.

आमचे कुलदैवत म्हणून तीसेक वर्षांपासून तेथे दरवर्षी आमचे जाणे होते. काही वर्षांपासून माहूरचे रूपडे वेगाने  पालटत आहे.  आजकाल शहरांप्रमाणेच गावांचाही बाह्यांगी विकास करण्याचा सपाटा शासनाने चालवला आहे , त्यातीलच हा एक ; असा माझा समज होता. पण माहूरचा विकास हा निव्वळ बाह्यांगी आधुनिक नसून प्राचीन वारश्याचे पुनरुज्जीवन करून संपन्न देखभालही तेथे सुयोग्य पद्धतीने होत आहे , हे जाणवले. या मागची प्रेरणा व सद्बुद्धी नक्कीच आई रेणुका आहे असे वाटून तिला नमोमन हात जोडले.

  माहूरच्या धार्मिक -सांस्कृतिक वारश्याचा ख-या अर्थाने सुयोग्य वारस म्हणजे श्री. निलेश केदार. श्री. निलेश यांच्याकडे पाहिले की रेणुकेचे अनन्यभक्त कवी विष्णुदास यांचीच आठवण येते.
सध्याचे  रेणुका मंदिर प्रशासनही या कामासाठी तत्पर आहे.  अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी रेणुकाच योजना करते ,  यात शंका नाही. याच जोडीला सुदैवाने माहूरच्या  समृध्द वारश्याला जाणणारे कर्तव्यदक्ष व काटेकोर योजना करून कार्यान्वित करणारे स्थानिक प्रशासक  श्री. वरणगावकर तेथे तहसिलदार म्हणून कार्यरत आहेत.

 सुजाण व सक्रिय नागरिक आणि दक्ष , उद्यमी प्रशासन यांचा मणिकांचन योग जुळला की तेथे चांगले होणेच आहे . हे माहूरला घडतय.
 मातृतीर्थाचा जीर्णोद्धार , विष्णुकवींच्या मठाचा जीर्णोद्धार  , शिवाय तेथील प्राचीन अनेक बाबींची यादी करून लवकरात लवकर जीर्णोद्धार करायचे स्थानकं यांची यादी. असे अनेक प्रकल्प   रेणुका संस्थान ,  स्थानिक प्रशासन व श्री. केदारांसारखे जागरुक नागरिक यांच्या समन्वयाने माहूरमध्ये सफलरित्या होत आहेत.
 सध्या तेथे भानुतीर्थ नावाचे स्थानक दुरुस्तीचे कार्य सुरु आहे. पिण्यायोग्य पाण्यांच्या स्रोतांचे पुन्हा पुनरुज्जीवन करून त्याचे गतवैभव त्याला मिळवून देत , तीर्थस्थानाचे महत्व पुनर्प्रस्थापित करणें हे सर्व कार्य जोमात सुरु आहे.

माहूरच्या प्राचीन वारश्याला सर्व प्रकारे जपणा-या या सर्वांना कृतज्ञतापूर्वक  वंदन .
भारतातील ठायी ठायी असणा-या अशा दुर्लक्षित वारश्यांचाही भाग्योदय व्हावा हीच जगन्नियंत्याकडे प्रार्थना.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
  

No comments:

Post a Comment